Monday, 13 February 2023

अध्यत्म

 


संध्या छाया, भिवावती हृदयया

 


शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार

 शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार


                               - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        मुंबई दि.१२- महाराष्ट्र विविध क्रिडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असून शासनामार्फत खेळाडूंच्या विजयी वाटचालीसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित 'बोरिवली खेल महोत्सव 2023' या ठिकाणी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), आमदार प्रवीण दरेकर, बोरीवलीचे आमदार आणि खेळ महोत्सवाचे संयोजक सुनील राणे, दहीसरच्या आमदार मनिषा चौधरी , कांदिवलीचे आमदार योगेश सागर, कुस्तीपटू तथा ॲथलिट नरसिंग पंचम यादव, यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध उपक्रम सातत्याने राबवित असून खेळाडूंच्या कौशल्याची दखल घेऊन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्यांना यापूर्वी शासकीय सेवेत नियुक्ती दिलेल्या आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपण महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी यासह कुस्तीमध्ये विविध किताब जिंकलेल्या खेळाडूंच्या मानधनात तीन पट वाढ केली आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरी साठी महाराष्ट्रात खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, उत्तम प्रशिक्षण सुविधा, शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक पोषणतत्वे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासह सर्व पूरक सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

            तसेच कुस्ती आपला पारंपरिक खेळ आहे. भारताला खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक कुस्तीमध्येच मिळवून दिले होते. आता ही आपले कुस्तीपटु वेगवेगळ्या ठिकाणी पदक मिळवत आहेत. खेलो इंडिया मध्येही विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी आपल्या खेळाडूंनी बजावली असून सर्वात जास्त पदक महाराष्ट्राने पटकावली आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र भविष्यात उज्वल कामगिरी करत आपल्या देशाचे, राज्याचे नाव मोठे करेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

            मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी जागतिक विजेता पृथ्वीराज पाटील आणि एशियन चॅम्पियन इरानचे हुसेन रमजानी यांची विशेष लढत यावेळी झाली. या लढतीत विजयी झालेल्या पृथ्वीराज पाटीलचा आणि प्रतिस्पर्धी कुस्तीपटु हुसेन रमजानीचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते फेटा ,गदा देऊन सत्कार करण्यात आला. रोमहर्षक कुस्ती या खेळ महोत्सवात बघायला मिळाली यात आपल्या महाराष्ट्र केसरीने इराणच्या कुस्ती पटुला चित करून कुस्ती जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री यांनी आनंद व्यक्त करत दोन्ही कुस्ती पटुंना शुभेच्छा दिल्या.


000


 


 


 

जीवन







 

Sunday, 12 February 2023

उष्णतेच्या लाटा - आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन

 उष्णतेच्या लाटा - आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’

विषयक दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयआयटी पवईत आयोजन.

            मुंबई, दि. १२ : ‘उष्णतेच्या लाटा - आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये देशातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

            या कार्यशाळेचे उद्घाटन १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी, आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशीस चौधरी, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.५० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ‘वातावरण बदल आणि उपाययोजना’ याविषयी दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे चर्चासत्र होणार आहेत. दि. १४ तारखेला ‘उष्णतेच्या लाटा टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना’, राष्ट्रीय, राज्य, जिल्हे आणि गावपातळीवर राबवावयाच्या उपाययोजना या विषयावर सकाळी ९.३० पासून दुपारी २.३० पर्यंत चर्चासत्र होणार आहेत.

उष्माघातामुळे आरोग्यावर होणारे परिणाम टाळणे

            जगभरात वातावरणात अनेक बदल होत आहेत. अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. वातावरण बदल आणि मानाकनांनुसार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार अलिकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता वाढली आहे. सन 2004 ते 2019 दरम्यान पंधरापैकी अकरा सर्वात उष्ण वर्षे आली होती. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. या विषयाच्या अनुषंगाने या दोन दिवसीय चर्चासत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे.

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट

            उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था आणि या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येवून उष्णतेच्या लाटांबाबत उपाययोजना, तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा बनविणे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ने भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रम अंमलबजावणी, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुषंगाने या कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.


000



संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण.

            वाशिम, दि १२: देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात संत सेवालाल महाराज यांचा २१ फुट उंच पंचधातुच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि १३५ फुट उंच धवल रंगाच्या सेवाध्वजाची स्थापना रिमोट कंट्रोलद्वारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आली.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ॲड निलय नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे, बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत शेखर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

            'ब' दर्जा प्राप्त या तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने ५९३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. याच विकास आराखड्यातील विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पोहरादेवी दौ-यावर होते. यावेळी त्यांनी बंजारा समाजाचे शक्तिशाली चिन्ह असलेला नंगारा वाजवुन आनंद व्यक्त केला.

            भूमिपूजन झालेल्या विकास कामात पोहरादेवी येथील स्थानिक पायाभूत सुविधा व मंदिर सुशोभिकरण, नंगारा भवन वाढीव बांधकाम व अंतर्गत व्यवस्था, बायोलॉजिकल पार्क, संगमरवरी सामकी माता मंदिर, जगदंबादेवी मंदिर, प्रल्हाद महाराज मंदिर,जेतालाल महाराज मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर व संत रामराव महाराज मंदिर बांधकाम सुशोभीकरण, सुसज्ज यात्री निवास, भाविकांसाठी सोई -सुविधा, प्रवेशद्वार, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, पथदिवे, प्रदर्शन केंद्र, लकिशा बंजारा सुविधा केंद्र इत्यादीचा समावेश आहे.

            नंगारा वास्तु संग्रहालय व परिसर विकासासाठी ६७ कोटी, उमरी व पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकासासाठी ३२६ कोटी २५ लक्ष रुपये तर संत रामराव बापु उद्यानासाठी २०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यामधुन ही विकास कामे करण्यात येणार आहेत.


000


 


 



बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व ‘नंगारा बोर्ड’ स्थापणार

 बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व ‘नंगारा बोर्ड’ स्थापणार .                                                                      - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            वाशिम, दि. 12 ‍: बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ (वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) तसेच ‘नंगारा बोर्ड’ स्थापन करुन त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोहरादेवी येथे केली.


 


            बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातू्च्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व 593 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.


             या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महंत बाबुसिंग महाराज, खासदार भावना गवळी, खासदार प्रतापराव जाधव, उमेश जाधव, आमदार सर्वश्री ॲड. किरण सरनाईक, राजेंद्र पाटणी, संतोष बांगर, इंद्रनील नाईक, संजय रायमुलकर, निलय नाईक, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड आदी उपस्थित होते.

            यावेळी पारंपरिक बंजारा पद्धतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींच्या हस्ते पोहरादेवी व उमरी येथील 593 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणा-या विकासकामांच्या भुमिपूजन कोनशिलेचे अनावरण झाले.

            मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात गोर बंजारा बोलीत करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. ते म्हणाले की, पोहरादेवी येथे आल्यावर काशीला आल्यासारखे वाटले. बंजारा समाज हा निसर्गपूजक आणि लढवय्या आहे. बंजारा समाजाच्या विकासासाठी नंगारा प्राधिकरण स्थापण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच वसंतराव नाईक महामंडळालाही निधी कमी पडू देणार नाही. तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर पाणी, रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा विकासासह शाळा, दवाखाने, अंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन श्री. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. नवी मुंबई येथे बंजारा समाज भवन स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली

पोहरादेवीचा कायापालट करु - उपमुख्यमंत्री

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोर बंजारा बोलीत भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले की, बंजारा समाजाची काशी असलेल्या या स्थळाचा कायापालट करण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला. त्याप्रमाणे बंजारा समाजाच्या काशीचा अर्थात पोहरादेवी तीर्थस्थळाचा कायापालट करू, असे ते म्हणाले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, संत सेवालाल महाराज यांनी दिलेल्या प्रतिज्ञा या केवळ बंजारा समाजासाठी नव्हे तर समस्त मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. बंजारा हा एक प्राचीन समाज आहे. बंजारा समाजातील महापुरुषांनी त्याग आणि समर्पणाची मोठी परंपरा निर्माण केली आहे. एकेकाळी समृद्ध असणाऱ्या या गोपालक समाजाची आजची हलाखीची स्थिती सुधारण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, तांड्यांचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करून प्रत्येक तांड्यापर्यंत विकास पोहोचवू. बंजारा समाजातील मुला-मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी शासन उपाययोजना करेल. ‘नॉन क्रिमिलेयर’ ची अट रद्द करण्याबाबत महाधिवक्त्यांचे मत मागविण्यात येईल. पोहरादेवीचा विकास करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही. गोर बोलीचे संवर्धन करण्यासाठी अकादमी स्थापन करू. शासन संत सेवालाल महाराज यांचे कार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            पालकमंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.


            या कार्यक्रमात उपस्थित बंजारा बांधवांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले.


000


 


 


 



Featured post

Lakshvedhi