Sunday, 12 February 2023

वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक

 वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक


- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा



            मुंबई, दि. १० : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे केले.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.


            तसेच प्रधानमंत्री यांच्या हस्ते पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील वाकोला ते कुर्ला व एमटीएनएल ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गाचे आणि मालाडमधील कुरार गाव भुयारी मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.


            याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार राम कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात करत श्री. मोदी म्हणाले की,

भारतातील रेल्वे वाहतूक ही आपल्या प्रगतीची जीवनरेखा आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. आजपासून सुरु करण्यात आलेल्या दोन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी, विशेष करुन मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक संपर्क व्यवस्थेसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आतापर्यंत देशात एकूण १० वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. देशाला आज नववी आणि दहावी ‘वंदे भारत’ ट्रेन समर्पित करण्यात आली आहे. नाशिक आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांना जाण्यासाठी तसेच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, सिध्देश्वर मंदिर, श्री स्वामी समर्थ येथे भाविकांना जाता येणार आहे. शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी भाविकांचा प्रवास जलद होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे नव्या भारताच्या विश्वासाचा संकल्प असून आधुनिक भारताची प्रतिमा निर्माण करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या १० ट्रेन सुरू झाल्या असून त्यामुळे १७ राज्यात १०८ जिल्हे जोडले गेले असल्याचेही श्री. मोदी आपल्या भाषणात म्हणाले.


            मुंबई मध्ये पूर्व - पश्चिम उपनगरांना जोडणारे प्रकल्प सुरू केल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनशैलीत बदल होणार आहे. रेल्वे, नवीन विमानतळ आणि बंदरे विकसित करण्याबरोबरच नवीन राष्ट्रीय महामार्ग बनवले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तर रेल्वे साठी अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय जनतेसाठी विशेष लाभ देण्यात आला आहे. आयकर मर्यादा ५ लाख रुपयांवरुन ७ लाख रुपयांपर्यंत वाढविली असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.


अर्थसंकल्पात भरीव निधी मिळाल्याने महाराष्ट्रात


रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            श्री. शिंदे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, या सर्व क्षेत्रात महाराष्ट्रासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार प्रधानमंत्र्यांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी प्रयत्न करेल.


            नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. प्रधानमंत्र्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना निमंत्रित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव निधी - केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव


            रेल्वेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य आहे. यावर्षी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५०० कोटी रूपयांच्या निधींची तरतूद केली गेली आहे. ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास झाले आहे.


            अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली आहे. येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या धावतील.


रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री यांचे योगदान महत्वपूर्ण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस गतीने धावेल आणि महाराष्ट्रातील जनतेला आणि भाविकांना आनंद मिळेल. मुंबई आणि पुणे यासह अनेक शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्याने याचा फायदा व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, सामान्य नागरिकांना होणार आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीने वंदे भारत वर रचलेल्या संस्कृत कवितेचे प्रधानमंत्र्यांनी कौतुक केले.


वंदे भारत एक्सप्रेस गाडीविषयी


· आरामदायी आणि आनंददायी रेल्वे प्रवास हे वंदे भारत एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य


· वंदे भारत एक्सप्रेमसमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, झोपण्यायोग्य आसने, टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, एलईडी प्रकाश योजना, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित रीडिंग लाइट आणि कनसिंल्ड रोलर पडदे, 'आधुनिक मिनी-पॅन्ट्री' आणि चालक दलाशी संवाद साधण्याकरिता प्रवाशांसाठी 'इमरजन्सी टॉक-बॅक' युनिट कार्यान्वित


· उत्तम उष्णता वायुविजन आणि जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यांसह वातानूकुलित प्रणाली सारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा


· इंटेलिजेंट वातानूकुलित प्रणाली हवामान परिस्थितीनुसार कूलिंग समायोजन


· स्वदेशात तयार झालेली सेमी-हाय स्पीड सेल्फ प्रोपेल्ड ट्रेन सेट,१६० किमी प्रति तास वेग गाठण्याची वेळ १२९ सेकंद


· प्रवाशांसाठी ३.३ (राइडिंग इंडेक्स) सह उत्तम आरामशीर प्रवास


· स्वयंचलित प्लग दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे


· एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्विहंग सीट्स


· GSM/GPRS द्वारे नियंत्रण केंद्र / देखभाल कर्मचाऱ्यांना एअर कंडिशनिंग, कम्युनिकेशन आणि फीडबॅकचे निरीक्षण करण्यासाठी कोच नियंत्रण व्यवस्थापन प्रणाली


· जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यासह उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्रेसरचा वापर करून उत्तम उष्णता वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग नियंत्रण


· वातानुकूलित हवेच्या ध्वनीरहित आणि समान वितरणासाठी विशेष वातानुकूलित डक्ट


· दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय


· टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट


· ब्रेल अक्षरांमध्ये सीट क्रमांकासह आसन हँडल


· प्रत्येक कोचमध्ये ३२ प्रवासी माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम


· उत्तम ट्रेन नियंत्रण व्यवस्थापनासाठी स्तर –।। संरक्षा एकीकृत प्रमाणपत्र


· प्रमाणपत्रासह कवच प्रणाली (ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टीम) सुरू


· प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन प्रकाश व्यवस्था,अग्निशमन सुरक्षा उपाय


· ४ प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे ज्यात डब्याच्या बाहेर मागील दृश्य कॅमेरे


· सर्व डब्यांमध्ये फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम व इलेक्ट्रिकल क्यूबिकल्स आणि टॉयलेटमध्ये एरोसोल आधारित फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम यांसारखे उत्तम


· प्रत्येक कोचमध्ये ४ आपत्कालीन खिडक्या


· इमर्जन्सी टॉक ‌‌बॅक युनिट्स


· व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधेसह ड्रायव्हर-गार्ड संवाद


· अंडर- स्लंग इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी उत्तम फ्लड प्रूफिंग ज्यात ६५० मिमी पूर पाण्यामध्ये काही होणार नाही


मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ठळक वैशिष्ट्ये


· मुंबई ते सोलापूर अशी धावणारी ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन


·



उष्णतेच्या लाटा आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक

 उष्णतेच्या लाटा आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक


राष्ट्रीय कार्यशाळेचे १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयआयटी पवई येथे आयोजन


          मुंबई, दि. ११ : ‘उष्णतेच्या लाटा - आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन करणे’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये देशातील विविध राज्यातील व महाराष्ट्रातील विविध मान्यवर तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.


            या कार्यशाळेचे उद्घाटन दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी, आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशीस चौधरी, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.५० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ‘वातावरण बदल आणि उपाययोजना’ याविषयी दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे चर्चासत्र होणार आहेत. दि. १४ तारखेला ‘उष्णतेच्या लाटा टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना’, राष्ट्रीय, राज्य, जिल्हे आणि गावपातळीवर राबवावयाच्या उपाययोजना या विषयावर सकाळी ९.३० पासून दुपारी २.३० पर्यंत चर्चासत्र होणार आहेत.


उष्माघातामुळे आरोग्यावर होणारे परिणाम टाळणे


         जगभरात वातावरणात अनेक बदल होत आहेत. अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. वातावरण बदल आणि मानाकनांनुसार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार अलिकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता वाढली आहे. सन 2004 ते 2019 दरम्यान पंधरापैकी अकरा सर्वात उष्ण वर्षे आली होती. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. या विषयाच्या अनुषंगाने या दोन दिवसीय चर्चासत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे.


उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट


            उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था आणि या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येवून उष्णतेच्या लाटांबाबत उपाययोजना, तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा बनविणे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ने भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रम अंमलबजावणी, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुषंगाने या कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.


*****

विद्यापीठांनी देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी

 विद्यापीठांनी देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी.

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

एचएसएनसी समूह विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ संपन्न


            मुंबई, दि. 11 : एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी. यामुळे शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.  


            आज एचएसएनसी समूह विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ एचएसएनसी विद्यापीठ, रमा सुंदरी वाटूमल सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी पद्मश्री ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश, माजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.


             यावेळी बोलताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, अध्यात्मावर आधारित आपल्या देशाची संस्कृती महान आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. आपली शिक्षण पद्धती ही आदर्श असून अनेक देशांनी तिचा स्वीकारही केला आहे. ज्याप्रमाणे आज योगाभ्यास शिकण्यासाठी अनेक देशातील नागरिक आपल्या देशात येत आहेत त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही इतर देशातील नागरिक आपल्या देशाला नक्कीच प्राधान्य देत आहे. तसेच विद्यापीठांनी रोजगारक्षम तरूण पिढी घडवावी, अशी आशाही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.


            आपल्या देशातील मातृशक्ती महान असून महिलांना नेहमीच सर्वेच्च स्थान दिले आहे. आज आपल्या देशातील महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आज आयएएस परिक्षा पास होणाऱ्या यादीत पहिल्या तीन महिला आहेत. तसेच या विद्यापीठात विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करतानाही मुलींची संख्या जास्त आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नाही नोकरी किंवा व्यवसाय करताना प्रामाणिकपणे कष्ट केल्याने यश नक्की मिळते. या तत्वाचा अवलंब करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.


भारतीय असल्याचा मला अभिमान


         पद्मश्री ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले, भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण आपल्या देशाची संस्कृती महान आहे आणि अर्थातच आपली शिक्षण पद्धती खूप चांगली आहे. ज्ञान, बुद्धी, आचार, समता आणि मूल्सवंर्धनावर आधारित शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल घडून येतील. त्यामुळे या पद्धतीवर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेऊन कौशल्यपूर्ण शिक्षणानेच सक्षम विद्यार्थी आणि सक्षम भारत घडेल. स्नातकांना संतुलित, सुसंस्कृत, सुविद्य, समृद्ध, सुशासित, सुरक्षित, स्वानंदी तसेच जातीविरहित भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते विदयार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


*******



राज्यपाल झाले निक्षय मित्र; क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट.

 राज्यपाल झाले निक्षय मित्र; क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट.

            मुंबई, दि. 11 : क्षयरोग निर्मुलनाच्या राष्ट्रीय कार्यात लोकसहभाग वाढावा, क्षयरोग रुग्णांना पोषण आहारासाठी मदत व्हावी यादृष्टीने सुरु केलेल्या प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला प्रतिसाद देत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे एका क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट दिला. 


            'निक्षय मित्र' या नात्याने आपण संबंधित क्षयरोग रुग्णाच्या पोषण आहाराची पुढील एक वर्षाकरिता जबाबदारी स्वीकारत असल्याचे राज्यपालांनी यावेळी जाहीर केले. 


            राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम सफल करण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्राने पुढे येऊन निक्षय मित्र होण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. क्षयरोग रुग्णांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहार संचामध्ये कडधान्य, डाळी, तेल, दूध पावडर, अंडी, फळे व सुकामेवा यांचा समावेश आहे.  


            यावेळी बृहन्मुंबईचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेश पाटील, राज्यपालांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे, डी व ई वॉर्ड क्षयरोग अधिकारी डॉ. ओंकार तोडकरी, डॉ. पृथ्वीराज राजोळे व श्री. शशांक बंडकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्याअश्वारूढ पुतळ्याचे अनावरण.

 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्याअश्वारूढ पुतळ्याचे अनावरण.

            वाशीम, दि.१२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माता जगदंबा देवी मंदिर, संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पोहरादेवी, नगारा भवन येथे संत सेवालाल महाराज यांचा २१ फुट उंच पंचधातुचा भारतातील एकमेव अश्वारूढ पुतळा आणि १३५ फुट उंच धवल रंगातील सेवाध्वजाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ॲड. निलय नाईक, बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज, महंत कबिरदास महाराज, शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 326 कोटी 24 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

Covid चां प्रसारक ,take केअर

 


सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातसर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे


सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातसर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे.


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


· मुख्यमंत्र्यांकडून कणेरी मठ येथील पंचमहाभूतांवर आधारित विविध दालनाची पाहणी


· या लोकोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश घरोघरी पोहोचवावा


· श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या वतीने कणेरी मठावरील पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी


· राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीसाठी सर्व प्रकारची मदत देण्यात येणार.

            कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असून यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली. यावेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार अमल महाडिक, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील आदी उपस्थित होते.


               मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सध्या जागतिक तापमान वाढ आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होत आहेत. पंचमहाभूतांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे घेण्यात येणारा सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल व या ठिकाणी भेट देऊन जाणारा प्रत्येक नागरिक पुढील काळात पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


            पर्यावरण पूरक असलेली सेंद्रिय शेती खूप उपयुक्त असून राज्य शासन ही सेंद्रिय शेतीसाठी प्राधान्य देत आहे. सेंद्रिय शेतीचे उत्पादन घेणाऱ्या बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हा स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगून सेंद्रिय शेतीमुळे शेती पिकांच्या उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कणेरी मठावर घेण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेती पिकांची त्यांनी पाहणी केली. या महोत्सव कालावधीत येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी विशेषत: शेतकरी बांधवांनी येथील सेंद्रिय शेतीला भेट देऊन या पद्धतीची शेती आपण स्वतः करण्याबाबतचा निश्चय करावा, असे आवाहन त्यांनी केले. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.


            याठिकाणी उभारण्यात आलेल्या आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचमहाभूते व आयुर्वेद यावर आधारित सहा दालनांची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पंचमहाभूतांची निर्मिती, त्यांचे उपयोग, मानवाकडून पंचमहाभूतांचा होणारा दुरुपयोग आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती येथील दालनांमध्ये देण्यात आली आहे. त्रिमिती मॉडेल, माहितीपत्रक, ध्वनी व प्रकाश व्यवस्थेच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे महत्त्व या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात येत असून या ठिकाणी भेट देणारा प्रत्येक नागरिक हा पर्यावरण संरक्षणाचा संदेश येथून घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


            यावेळी श्री सिद्धगिरी मठ येथील महादेवाचे दर्शन घेतले. तसेच 1100 देशी गायींच्या गोशालेची पाहणी केली. तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलची पाहणी करुन याठिकाणी देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती घेतली.


            यानंतर गुरुकुलला भेट देवून गुरुकुल शिक्षणपद्धतीची माहिती घेतली. येथील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सादर केलेल्या योगाची प्रात्यक्षिके, रोप योगा, बौद्धिक प्रात्यक्षिके, वैदिक गणित, आदी कलागुणांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भरभरुन कौतुक केले. तसेच देशाच्या उन्नतीसाठी हातभार लागेल असे नावीन्यपूर्ण उपक्रम गुरुकुल शिक्षण पद्धती आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मुख्यमंत्री महोदयांना सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेली गोशाला, गुरुकुल शिक्षण पद्धती, कृषी विज्ञान केंद्र, हॉस्पिटल सह आदींची माहिती दिली. या महोत्सवात शेकडो स्टॉल लावले जाणार आहेत. त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या महत्वपूर्ण लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महिला बचत गटांचेही स्टॉल उभारले जाणार आहेत.



Featured post

Lakshvedhi