Thursday, 9 February 2023

तुज मागतो मी आता


 

डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारी पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.

 डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारी पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 8 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. यानुसार अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज www.indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन जाऊन भरावेत. नियम व अटी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: (By hand) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिसूचनेच्या परिशिष्ट पाच (V) मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरावे लागेल.


            पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी, पत्रव्यवहार जर असेल तर, केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती/नोंदणी क्रमांक/मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही फसव्या फोन कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी यांनी कळविले आहे.

सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा

 सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


भेंडी बाजार येथे प्रकल्पाच्या सेक्टर 4चे भूमिपूजन.

            मुंबई, दि. 8 :- स्मार्ट सिटींच्या उभारणीद्वारे लोकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत असून मुंबईतील भेंडीबाजारसारख्या गजबजलेल्या भागात आकारास येत असलेला सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा (SBUT) गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            भेंडी बाजार येथे सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या गृहनिर्माण प्रकल्प सेक्टर 4 च्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, दाऊदी बोहरा समुदायाचे जागतिक अध्यात्मिक नेते डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन, आमदार अमीन पटेल व मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा हा गृहनिर्माण प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबईतील भेंडीबाजार हा भाग अतिशय दाट लोकवस्तीचा म्हणून ओळखला जातो. अशा गजबजलेल्या भागात हा प्रकल्प आकारास येत आहे हे नक्कीच कौतुकास्पद व पथदर्शी आहे. आपण सर्वजण परिवर्तनाबद्दल बोलतो पण हा प्रकल्प ख-या अर्थाने बदल घडविणारा ठरतो आहे. अनेक अडथळ्यांवर मात करत हा प्रकल्प उभा राहतो आहे. उत्थान हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे हे महत्वाचे. समाजाची श्रद्धा असेल, तर काय घडू शकते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा प्रकल्प असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.


एसबीयुटी (SBUT) प्रकल्प महाराष्ट्रातील नागरी नूतनीकरण प्रकल्पांसाठी ब्लू प्रिंट


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील धारावीसारख्या गजबजलेल्या भागाचेही पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. 'SBUT' प्रकल्पाचा मुख्य उद्देश लोकांचे जीवनमान उंचावणे असून हा प्रकल्प महाराष्ट्रातील नागरी नूतनीकरण प्रकल्पांसाठी ब्लू प्रिंट ठरेल. नागरी पुनरुत्थान घडवून आणणारा हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरेल. शासनाकडून या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण होईल. इथे जर बदल घडू शकत असेल तर संपूर्ण मुंबईत असे प्रकल्प नक्कीच उभे राहतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.


            दाऊदी बोहरा समाजाचे आध्यात्मिक नेते सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन म्हणाले की, सर्व नागरिक या परिसरात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या प्रकल्पामुळे या भागातील गरजू लोकांना लाभ होणार आहे. स्मार्ट सिटीच्या उभारणीत हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.


स्मार्ट सिटीकडे वाटचालीसाठी प्रकल्प पथदर्शी


            सैफी बु-हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 18 मे 2016 रोजी झाले. भेंडी बाजारातील सुमारे 250 मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी रुंद रस्ते, आधुनिक पायाभूत सुविधा, अधिक मोकळ्या जागा आणि अतिशय दृश्यमान व्यावसायिक क्षेत्रांसह 17 नवीन टॉवर उभारले जाणार आहेत.


या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्दिष्ट 3200 कुटुंबे आणि 1250 व्यवसायांचे पुनर्वसन करण्याचे आहे. छोट्या खोलीत राहणाऱ्या कुटुंबांना 375 ते 400 स्क्वेअर फुटांची सुसज्ज घरे, निरोगी, स्वच्छ सुरक्षित वातावरण, आणि मुलांना खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी पुरेशी जागा इथे उपलब्ध होत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल हा या प्रकल्पाच्या उभारणीचा महत्त्वाचा उद्देश आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आराखडा तयार करण्यात आला असून सर्व सोयी - सुविधांनी युक्त इमारती येथे बांधण्यात येत आहेत.


            'अन-नसर' नावाच्या सेक्टर 4 मध्ये पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या एकूण 16.5 एकर जमिनीपैकी अंदाजे 1.5 एकर जागा समाविष्ट आहे. An-Nasr मध्ये जवळपास 1400 निवासी युनिट्स आणि 375 पेक्षा जास्त व्यवसाय असतील. 74 मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे प्रत्येकी 53 आणि 54 मजल्यांचे दोन नवीन टॉवर उभारले जाणार आहेत.


            या प्रकल्पाद्वारे हाती घेतलेले पुनर्विकास क्षेत्र उत्तम व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेसाठी नऊ उप-समूहांमध्ये (सेक्टर) विभागण्यात आले आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सेक्टर 6 अल-एझचाही समावेश आहे, त्यासाठीचे बांधकाम 2021 मध्ये सुरू झाले. 2020 मध्ये, SBUT ने अल-सदाह नावाचा पहिला टप्पा पूर्ण केला ज्यामुळे 610 हून अधिक कुटुंबांचे आणि 128 कुटुंबांचे जीवनमान सुधारले. ट्रस्टने रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांसाठी नियोजित बांधकामांमध्ये किरकोळ आस्थापने देखील उपलब्ध करून दिली आहेत जेणेकरून त्यांचे जीवनमान चांगले होईल आणि एक सर्वसमावेशक समाज निर्माण होईल.


            पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून, भेंडी बाजार आधुनिक सुविधा, रुंद रस्ते, शाश्वत पद्धती आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी दर 2 महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार

 कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी

दर 2 महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार


- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

प्रशिक्षण संस्थांसाठी हेल्पलाईन

            मुंबई, दि. 8 : कोकण विभागातील कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थांसमवेत (VTPs/TPs/TCs) आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संवाद साधला. कौशल्य विकास विभागामार्फत नोंदणीकृत असलेल्या या प्रशिक्षण संस्था आणि विभागामध्ये समन्वय साधणे, अडीअडचणी दूर करणे यासाठी यापुढील काळात दर २ महिन्यांनी या संस्थांचा जनता दरबार घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. तसेच संस्थांना येणाऱ्या अडीअडचणी थेट मंत्री कार्यालयस्तरावर सोडविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही यावेळी जाहीर करण्यात आला. राज्यातील गरजू तरुणांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी केले.


            एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे झालेल्या या बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, एनएसडीसीच्या अधिकारी श्रीमती शताब्दी यांच्यासह महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अधिकारी, कोकण विभागातील विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            कौशल्य प्रशिक्षणाच्या विविध कार्यक्रमांना गती देणे, अडीअडचणी सोडविणे याअनुषंगाने मंत्री श्री. लोढा हे राज्यभरातील प्रशिक्षण संस्थांबरोबर संवाद साधणार आहेत. त्याअनुषंगाने आज कोकण विभागातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न, अडीअडचणी मंत्री श्री. लोढा यांनी ऐकून घेऊन त्या दूर होण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी काही संस्थाचालकांनी आपली मते मांडली. दर दोन महिन्यांनी याबाबतची बैठक संबंधितांसोबत घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.


            मुंबई विभागातील १७० प्रशिक्षण संस्था चालक या बैठकीकरिता उपस्थित होते. बैठकीमध्ये कोकण विभागातील उत्तम काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान १ प्रशिक्षण संस्थांची निवड करून त्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयडीईएमआय (मुंबई शहर), टीसी – के. जी. सोमय्या पॉलिटेक्निक, (मुंबई उपनगर), शगुन समाज विकास संस्था (जि. ठाणे), ऋषी कॉम्प्युटर एज्युकेशन (जि. पालघर), ब्युटीफूल टुमॉरो (जि. रायगड), सेंटर फॉर क्रिएटीव्हीटी डेव्हलपमेंट सेवा सामाजिक विकास संस्था, (जि. रत्नागिरी), श्री साई इन्फोटेक कॉम्प्युटर (सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) या संस्थांना सन्मानित करण्यात आले.

मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देणार

 मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 8 : मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये खर्चून काँक्रिट रस्त्यांचे काम सुरू आहे. सर्वत्र सुशोभिकरण सुरू आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचा विस्तार सुरू आहे, तर कोस्टल रोडच्या कामाला गती देण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. आगामी काळात मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


            न्यूज नेशन वृत्तवाहिनीच्या न्यूज स्टेट महाराष्ट्रतर्फे आयोजित ‘संकल्प महाराष्ट्र’ परिसंवादात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्याबरोबरच देशाचीही आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरात देशातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर विविध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला गती देण्यात आली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींचा नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. कोळी बांधवांच्या सुविधेसाठी कोस्टल रोडच्या नेव्हिगेशनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेसह पायाभूत सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध होत आहे. 


            आमचे सरकार राज्याच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगतानाच जागतिक दर्जाचा समृद्धी महामार्ग आकारास आला आहे. त्याची भूसंपादन प्रक्रियाही विक्रमी वेळेत पूर्ण केली. त्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली थेट बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला. या महामार्गामुळे या परिसरात उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक सवलती राज्य सरकारतर्फे दिल्या जातील. त्याबरोबरच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला ३३ लाख रोपांची लागवड करण्यात येईल. तसेच सौर ऊर्जा निर्मितीही प्रस्तावित आहे.


            राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र किनारे रस्त्यांशी जोडले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रस्ता तयार करण्यात येणार असून त्यावर प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळून रोजगार वाढण्यास मदत होईल, असे ते यावेळी म्हणाले.


            कोकणात लहान- मोठे बंधारे बांधून पावसाचे पाणी अडविण्यावर भर देण्यात आला आहे. पौष्टिक धान्य उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारणासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून आणण्याचे नियेाजन सुरू आहे. त्यासाठी ही योजना पुनर्जीवित करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


०००००

Wednesday, 8 February 2023

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ.

 विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ.

            मुंबई, दि. 8 :- विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली.


            विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.


००००

अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ;9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार.

 अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ;9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार.

            मुंबई, दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.


            विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली.


            या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृष्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधिमंडळ सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील, ॲड् आशिष शेलार, अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.


            बैठकीत 27 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात सोमवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.


            महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी "वंदे मातरम्' नंतर "जय जय महाराष्ट्र माझा" हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.


            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) 5 आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) 8 अशी अंदाजे 13 विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.


0000

Featured post

Lakshvedhi