Tuesday, 10 January 2023

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत

जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून कंत्राटदारांना नवी कामे द्यावीत

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. ९ : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तत्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची ६३ वी बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात पार पडली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु.पां.कुशारे आदी उपस्थित होते.


            महाराष्ट्र जलसंधारण महामंडळांतर्गत ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या जलसंधारण योजनांची मुख्य कामे, इतर बांधकामांच्या २२५ निविदांना सर्वसाधारण मान्यता देण्याच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रस्तावांचा उच्चस्तरीय समितीने अभ्यास करुन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.


आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामे घ्यावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            जलसंधारणाच्या कामांची राज्यात जिथे आवश्यकता आहे, अशा ठिकाणी जलसंधारण महामंडळाने कामे घेण्यावर भर देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.


महामंडळाकडे प्राप्त झालेल्या ८५ कंत्राटदारांच्या नोंदणीस मान्यता देतानाच यापुढे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्तरावर निकष तपासून कंत्राटदार नोंदणीला मान्यता देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


००००



Monday, 9 January 2023

मुंबईत 10 जानेवारीपासून कला प्रदर्शन.

 मुंबईत 10 जानेवारीपासून कला प्रदर्शन.

          मुंबई, दि. 10 : कला संचालनालयामार्फत 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) 2022-23 आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंगळवार 10 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणार आहे. हे प्रदर्शन 10 ते 16 जानेवारी, 2023 या कालावधीत होणार आहे. प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे, असे प्र. कला संचालक राजीव मिश्रा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


            प्रदर्शनाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित राहणार आहेत. सन 2020-21 यावर्षीचा "कै. वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार" शिल्पकार राम सुतार तसेच ज्येष्ठ कलाकार प्रमोद रामटेके यांचा व 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा शासनाच्या वतीने सत्कार समारंभ होणार आहे.


        पारितोषिक प्राप्त कलाकार : सुरभी कांचन गुळवेलकर (रेखा व रंगकला), प्रतिक बळीराम राऊत (रेखा व रंगकला), प्रसाद सुनील निकुंभ (रेखा व रंगकला), विवेक वसंत निंबोळकर (रेखा व रंगकला), अभिजित सुनील पाटोळे (रेखा व रंगकला), वैभव चंद्रकांत नाईक (रेखा व रंगकला), रोहन सुरेश पवार (शिल्पकला), अजित महादेव शिर्के (शिल्पकला) राहुल मच्छिंद्र गोडसे (उपयोजित कला), श्वेता श्याम दोडतले (उपयोजित कला), अनूज संजय बडवे (उपयोजित कला), दीक्षा संदेश कांबळे (उपयोजित कला), विजय रामभाऊ जैन (उपयोजित कला), किन्नरी जितेंद्र तोंडलेकर (मुद्राचित्रण), राकेश रमेश देवरुखकर (दिव्यांग विभाग) या कलाकारांचा पारितोषिक व रक्कम 50 हजार रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे.


०००००



 

पेन्शनर व फॅमिली पेन्शन घेणाऱ्यासर्वांसाठी अत्यंत महत्वाचे.

 . पेन्शनर व फॅमिली पेन्शन घेणाऱ्यासर्वांसाठी अत्यंत महत्वाचे.


भारत सरकार ने दिनांक १५-०५-२०२० रोजी पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना एक महत्वाची सूचना वजा ऑर्डर देणेसाठी एक पत्र प्रसिद्ध केले आहे या पत्राचे थोडक्यात मराठी रूपांतर


पेन्शनर व फॅमिली पेन्शन घेणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे. मित्रानो भारत सरकारने दिनांक १५-०५-२०२० रोजी पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना एक महत्वाची सूचना वजा ऑर्डर देणेसाठी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ते तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे लेटर असून जरूर वाचा आणि उपयोग करून घ्या.


पत्राचा विषय-- पेन्शन व फॅमिली पेन्शन देणाऱ्या बँकांना सूचना


१) बँकेला पहिली पेन्शन खात्यावर जमा करून देण्यासाठी पेन्शनरला बँकेत बोलावता येणार नाही तशी सक्ती करता येणार नाही कारण जर खात्यावर जास्तीचे पैसे आलेतर वसूल करण्यासाठीची ऍथॉरिटी P P O बरोबर बँकेला दिली असते.


२) पेन्शन धारक मयत झाल्यावर त्याच्या पत्नीस किंवा नवऱ्यास ( वारासदारास) फॉर्म नुंबर १४ भरून देणेस बँकेत बोलावू नये. कारण वारसदारास फॅमिली पेन्शन देण्याची ऑर्डर आधीच P P O बरोबर बँकेला दिली असते.

बँकेनी फक्त मृत्यूचा दाखला मिळाल्यानंतर वारसदारची ओळख P P O वरून करून KYC फॉर्म भरून घेऊन फॅमिली पेन्शन सुरु करून देणेही आहे त्याचे कॅल्क्युलेशन बँकेनेच करायचे आहे. या कामासाठी वारसदार बँकेत आला पाहिजे असा आग्रह बँकेस करता येणार नाही.


३) बँकेस फॅमिली पेन्शनरला नवीन खाते उघडण्यास सक्ती करता येणार नाही जर पेन्शन खाते अगोदरच जॉईंट अकाउंट असेल तर


४ /५) ग्रुप A ऑफिसरला पेन्शन नंतर एक वर्षांनी "दुसरी नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र" मागण्याची सक्ती करता येणार नाही. जर संबंधित ऑफिसरने बँकेला पत्र दिलेतरच बँक पेन्शन देण्याचे बंद करू शकेल.


६) ७) आणि ९) जर फॅमिली पेन्शन जर त्याच्या मुलास,मुलीस किंवा अपंग मुलं मुलीस मिळत असेल तर अश्या लोकांनी बँकेस "दुसरे कुठलेही उत्पन्न नाही" असे प्रमाणपत्र दर वर्षी नोव्हेंबर मध्ये देणायचे कारण नाही बँकेने ते मागू नये जर मुलीस पेन्शन मिळत असेल तर दर सह महिन्यास लग्न न झाले बद्दल जे प्रमाणपत्र द्यावे लागत होते ते आता देऊ नये कारण असे प्रमाण मागण्याची सक्ती बँकेस करता येणार नाही.


 जर अपंग व्यक्तीस पेन्शन मिळत असेल तर आणि अपंगत्व कायमचे असेल तर एकदाच तसे सर्टिफिकेट द्यायचे आहे दर वर्षी नाही.


८) व १०) हयातीचा दाखला म्हणून बँकेने "जीवन प्रमाणपत्राचा दाखला" स्वीकारायचा आहे. तो आपण मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळून घेऊ शकता त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही ८० वर्षे वरील लोक फॉर्म भरून देऊ शकतात 

हयातीचा दाखला बँक घरी येऊन सुद्धा घेण्याची सोय झाली आहे त्यासाठी बँकेने फक्त ६० रुपये आकरायचे आहेत तुमच्या मोबाइलला वर sms किंवा तुम्हाला ई-मेल येईल त्याला तुम्ही अशी सुविधा घेणार आहात काय असा मेसेज आल्यावर तुम्ही होकार कळवायचा आहे.


१०) कम्युटेशन जी पेन्शन मधून वजा झालेली असते ती १५ वर्षांनी रिस्टोर होते ती आता बँकेनेच करायची आहे. त्यासाठी पेन्शन धारकाने कोणताही अर्ज कोठेही करण्याची गरज नाही जर त्या संबंधी माहिती PPO मध्ये मिळत नसेल तर बँकेने संबंधित विभागाकडून ती मिळवायची आहे. तसेच बँकेने फॅमिली पेन्शन मधून कम्युटेशन पेन्शन वजा करु नये अशीही सूचना दिली आहे.


११) ८० वर्षे पूर्ण होतील त्या महिन्यापासून पेन्शन मध्ये २०% सरळ वाढ बँकेने काऊ पेन्शन द्याची आहे. हे काम आपोआप होईल कोणतेही लेटर देण्याचे कारण नाही. (८५ ते ९० वर्षे ३०% आणि ९० ते ९५ वर्षे ४०% व ९५ ते १०० वर्षे ५०% व १०० वर्ष्याच्या वर १००% पेन्शन वाढ होते)


              *अत्यंत महत्वाचे पुढे पाठवा.*

आपल्या ग्रुप मधिल सर्व संभासद व इतर सेवानिवृत अधिकारी व अंमलदार यांना ही माहीती पाठवा.

जवाहर नवोदय विद्यालय

 


महत्वाची सूचना

 Important information - TRAI does not provide any NOC for installing mobile towers. If a fraudster brings a fake letter to you, inform the concerned service provider and the local police.

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे

 औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            पुणे दि. ८: देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला, खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज चीनमधून उद्योग बाहेर पडत असताना हे उद्योग भारतात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. मात्र, अशा उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल, त्यासाठी त्याप्रकारचे शिक्षण द्यावे लागले. त्यादृष्टीने भारती विद्यापीठासारख्या संस्थांना महत्व आहे.


 देशाच्या विकासात स्टार्टअपची भूमिका महत्वाची


            भारतीय युवकांनी तंत्रज्ञान युगात आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारत आणि महाराष्ट्रातही अनेक स्टार्टअप तयार होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाने ही परिस्थिती निर्माण केली आहे. या वेळेचा उपयोग आपण केला तर आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख प्रस्थापित करता येईल. या अमृतकाळात पुढील २५ वर्ष आपल्यासाठी महत्वाचे आहेत. यात चांगली शैक्षणिक व्यवस्था निर्माण केली तरच आपण आपल्या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो.


 औद्योगिक विकासासाठी उत्तम शिक्षण आवश्यक


            आज तंत्रज्ञान क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. संरक्षण उत्पादनात आपण आयात करणारे होतो. मात्र आज अनुकूल व्यवस्था निर्माण केल्याने आपण संरक्षण उत्पादने निर्यात करू शकतो. पुण्यातील औद्योगिक प्रगती येथील शैक्षणिक विकासामुळे झाली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने पुणे, राज्याचे उत्पादनाचे केंद्र आणि उद्योगांसाठी आकर्षण होऊ शकले. भारती विद्यापीठासारख्या विद्यापीठाने मनुष्यबळ विकासाचे मोठे कार्य केले.


            भारती विद्यापीठाने विदेशासारखे शैक्षणिक परिसर निर्माण केले. एक मिशन म्हणून त्यांनी हे काम हातात घेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य केले. भारती विद्यापीठाने विदर्भातही असा शैक्षणिक परिसर निर्माण करावा. मराठवाडा आणि विदर्भात अशी शिक्षण व्यवस्था निर्माण झाल्यास महाराष्ट्र देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे राज्य ठरेल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.


 स्व.पतंगराव कदम यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद


            स्व.पतंगराव कदम यांच्याकडे पाहिल्यावर आश्वासकता वाटायची. त्यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद होती. शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. म्हणून १९० पेक्षा अधिक संस्था भारती विद्यापीठांतर्गत दिसून येतात. केवळ उच्च शिक्षण नाही तर गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याचे कार्य त्या माध्यमातून होते आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.


            अदार पुनावाला यांना या पुरस्काराच्या माध्यमातून देशातर्फे धन्यवाद देण्याचे काम झाले आहे. जगाला भारताची ताकद दाखविण्याचे कार्य सीरम इन्स्टिट्यूटने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातच लस निर्मितीचा निर्धार केला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ही लस पोहोचली. म्हणून सीरमसारख्या संस्थेचा अभिमान वाटतो. स्व.पतंगराव कदम यांच्या नावाचा अर्थात शून्यातून विश्व उभारणाऱ्याच्या नावाचा पुरस्कार शून्यातून विश्वाला वाचविण्याचे कार्य करणाऱ्याला दिला ही महत्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.



वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता

 वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता.

-शरद पवार

            खासदार श्री.पवार म्हणाले, आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्था हे करू शकतील. जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमोरचे प्रश्न सोडविण्याला हातभार लावावा. या नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देशाला देईल असा विश्वास शदर पवार यांनी व्यक्त केला.

            ते म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केले. शैक्षणिक क्षेत्रात द्रष्टे म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्नाचे जाणकार म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. रयत शिक्षण संस्थेशी असलेली बांधिलकी त्यांनी कधी सोडली नाही. त्यांच्या नावाचा पुरस्कार अदार पुनावाला यांना देण्यात आल्याचा आनंद आहे.

            जगात १६० देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक १०० मुलांपैकी ५० मुले सीरमची लस वापरतात. महाराष्ट्र आणि देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. सामाजिक भान ठेवून अदार पुनावाला यांनी वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला १५० पेक्षा अधिक वाहने दिली आहेत. मानवाचे प्रश्न सोडविण्याचे काम करताना समाजाला मदत करण्याचे कार्य ते करत असतात. असेही श्री. पवार म्हणाले.

            मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी विशेष उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे आज ही संस्था विविध विद्याशाखांमध्ये प्रगती करीत आहे. हिमाचल प्रदेश आज शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. हिमाचल प्रदेशच्या डॉक्टरांनी देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात लौकीक मिळविला आहे.

            तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुढे गेल्यास सुधारणा निश्चितपणे करता येते. वैद्यकीय क्षेत्रातदेखील तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल.  हिमाचल प्रदेशने वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणांसोबत उच्च शिक्षण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्याचे श्री. सुक्खू यांनी सांगितले.

            श्री.पुनावाला म्हणाले, सिरम इन्स्टीट्यूटच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारत आणि जगाची लशीची मागणी पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याने ७० ते ८० देशांना मदत करता आली. राज्य आणि केंद्र सरकारचेही यात सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण भारतात आहे, असे त्यांनी सांगितले.

            प्रास्ताविकात आमदार  कदम म्हणाले, भारती विद्यापीठाच्या स्थापनेच्या ५८ वर्षाच्या काळात ९० हून अधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. सामाजिक बांधिलकीचा वसा स्व.पतंगराव कदम यांनी घालून दिला आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही विद्यापीठाने अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कोविड काळात विद्यापीठाच्या रुग्णालयाने रुग्णसेवेचे काम केले. गोरगरिबांच्या सेवेसाठी नूतन सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. संस्थेने मानवता जपण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह  सुक्खू यांच्या हस्ते पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाबत अदार पुनावाला यांना प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्राड पवार यांनी भारती विद्यापीठ गोल्डन ज्युबिली म्युझियमला भेट दिली.

000


Featured post

Lakshvedhi