Tuesday, 27 December 2022

उद्योग, व्यापार जगताची राष्ट्रीय शिखर संस्था 'फिक्की' च्या संचालक मंडळ निवडणुकीत ललित गांधी विजयी*

 उद्योग, व्यापार जगताची राष्ट्रीय शिखर संस्था 'फिक्की' च्या संचालक मंडळ निवडणुकीत ललित गांधी विजयी*

---------------------------

*'फिक्की'च्या संचालकपदी सलग तिसऱ्यांदा विजय*

---------------------------

नवी दिल्ली : देशातील उद्योग, व्यापार व आर्थिक जगताची सर्वोच्च शिखर संस्था म्हणून काम करत असलेल्या व 'फिक्की' या नावाने ओळखले जात असलेल्या नवी दिल्लीच्या 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज'च्या कार्यकारी समिती संचालकपदी ललित गांधी सलग तिसऱ्यांदा निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीत ललित गांधी विक्रमी मतांनी निवडून आले. निवडीचा कालावधी तीन वर्षासाठीचा आहे. फिक्कीचे महासंचालक अरुण चावला यांनी त्यांना नुकतेच निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले.


सध्या ललित गांधी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अँड अँग्री.'चे अध्यक्ष आहेत. दिल्ली येथे फिक्कीच्या 95 व्या वार्षिक सभेप्रसंगी ही निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत गांधी यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन बाजी मारली. त्यामुळे देशातील सर्वोच्च शिखर संस्थेत गांधी यांनी संचालकपदाची हॅटट्रीक पूर्ण केली आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत या गटात उर्वरित महाराष्ट्रातून निवडून आलेले ते एकमेव प्रतिनिधी आहेत.

 

देशातील विविध उद्योग व व्यापारी घटकांची राष्ट्रीय शिखर संस्था असलेल्या 'फिक्की' च्या औद्योगिक संस्था गटातून झालेल्या निवडणूकीत ललित गांधी यांनी हा विजय प्राप्त केला. यापूर्वी दोन वेळा संचालक म्हणून काम करताना अचूक माहिती उद्योग जगताला देत सरकार बरोबर योग्य तो समन्वय करण्याचं महत्वाचं काम केले आहे. 'फिक्की'सारख्या संस्था उद्योग आणि व्यापार क्षेत्रात, विशेषता शासकीय स्तरावर विविध धोरण ठरवण्यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका बजावितात. `फिक्की` या संस्थेवर सलग तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा मोठा सन्मान समजत असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले. देशाच्या अर्थविषयक आणि उद्योग विषयक धोरण ठरविण्यात प्रमुख भूमिका बजाविणाऱ्या 'फिक्की'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष पुढाकार घेतला जाईल, महाराष्ट्रातील छोट्या व मध्यम उद्योगांना सुद्धा अधिक बळ देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून काम करू असेही त्यांनी सांगितले.

स्मृति प्रित्यर्थ

 कै.शांताराम भाऊ फिल्से, स्मृतिप्र


त्यर्थ कार्यक्रमात 97 वर्षांचे श्री.धोंडू घाणेकर भाषण करताना.

सप्टेंबर २०२३ पर्यत लंपी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार

 सप्टेंबर २०२३ पर्यत लंपी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार


पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानपरिषदेत माहिती.

            नागपूर, दि. २७ : राज्यातील 33 जिल्ह्यात एक लाख 78 हजार 72 गोवर्गीय जनावरे लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. मात्र वेळेत 100 टक्के लसीकरण केल्याने पशुधनाचा मृत्यू कमी झाला आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.


            प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लंपी चर्मरोगाबाबत प्रश्न उपस्थित केला होता, प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री विखे-पाटील बोलत होते.


            श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात लंपी आजार बळावला होता. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तातडीने लसीकरणाचा निर्णय घेतला. राज्य शासनाने 100 टक्के लसीकरण गतीने केल्याने पशुधनाचा मृत्यू दर कमी झाला. यामध्ये राज्याने विशिष्ट पद्धती अवलंबल्याने लसीकरण पूर्ण झाले. प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक आणि तीन कोटी रुपये दिले. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने स्विकारल्या आहेत.


आर्थिक मदतीबाबत शासन सकारात्मक


            पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. यामध्ये मृत गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासराला 16 हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र यामध्ये आणखी वाढ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही श्री विखे पाटील यांनी सांगितले.


कायमस्वरूपी विमा योजना सुरू करणार


            राज्यात पशुधनाला अनेक आजरांचा सामना करावा लागतो. यात लाखो रुपयांचे पशुधन दगावण्याची शक्यता असते. यामुळे पशुपालकाचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी मदत व्हावी म्हणून सर्व जनावरासाठी व्यापक स्वरूपात विमा योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे श्री विखे पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


            आतापर्यंत 3383.85 लाख रुपयांचा निधी मृत पशुधनाच्या पशुपालकांना वाटप केला आहे. उर्वरित पशुपालकांना 15 दिवसात मदत देण्यात येईल. पशुवर स्वतः उपचार केले असल्यास शेतकऱ्यांना योग्य परतावा दिला जाईल. शिवाय पशुसंवर्धन दवाखान्यातील रिक्त जागा येत्या दोन महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असेही उप प्रश्नाला उत्तर देताना श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सतेज पाटील, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, प्रवीण दराडे, महादेव जानकर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे, यंत्रसामग्री पुरवठ्यासाठीमहाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार

 वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे, यंत्रसामग्री पुरवठ्यासाठीमहाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार

- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

            नागपूर दि. २७ : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे आणि अन्यबाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत दिली.


            सदस्य प्रवीण दटके यांनी हाफकीनच्या औषध आणि यंत्रसामग्री पुरवठ्याच्या कार्यप्रणालीमुळे रुग्णालयांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना मंत्री श्री. महाजन बोलत होते.


            मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, हाफकीन संस्थेकडून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध, सर्जिकल साहित्य आणि यंत्रसामग्री पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हाफकीनला सुमारे पंधराशे कोटी रुपयांचा निधी दिला मात्र त्यापैकी सुमारे ६५० कोटी रुपयांचा निधी विनावापरामुळे परत येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संस्थांना १० टक्क्यांवरून ३० टक्के खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच हाफकीन महामंडळाच्या खरेदी कक्षाचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. औषध खरेदीबाबत नियमावली तयार करण्याची कार्यवाही देखील सुरू असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.


उपसभापतींकडे होणार बैठक


            हाफकीन संस्थेच्या कार्यप्रणाली आणि संशोधकांच्या सोयीसुविधांसंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुढच्या महिन्यात बैठक आयोजित करण्यात यावी. अशी सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यानी केली. तत्पूर्वी हापकीन संस्थेची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


            या संदर्भातील चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे पाटील, सतीश चव्हाण, सचिन अहिर आदींनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.


०००

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विविध रस्त्यांच्या विकासकामांची चौकशी करणार

 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विविध रस्त्यांच्या विकासकामांची चौकशी करणार

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            नागपूर, दि. २७ : नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या जिल्हा परिषदेच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्त्याची विकास कामांबाबत एक महिन्यात चौकशी समिती नियुक्त करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली.


            याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य जयकुमार रावल यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. चव्हाण बोलत होते.


            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, मे. निलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला कामे दिली गेली आहेत, ती वेगवेगळ्या विभागाची कामे आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, व इतर कामे आहेत. ज्या कामाची सुरुवात झाली नसेल अशा कामांचे कार्यादेश दिले जाणार नाहीत. हे काम करत असताना कंपनीने चुकीचे कागदपत्रे सादर केल्याबाबत इतर विभागातून अहवाल मागविण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाली असल्यास, समितीमार्फत अभियंता सार्वजनिक बांधकाम, अभियंता नांदेड व अभियंता धुळे यांची सर्व कागदपत्रे तसेच नियमाप्रमाणे कामकाज झाले आहे का नाही हे तपासण्यात येईल. या कामात हलगर्जीपणा झाला आहे का, हे तपासून दोषीवर कारवाई केली जाईल.


            या लक्षवेधी सूचनेवरील सर्चेत सदस्य राजेश पाडवी, यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला होता.


000


शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे

 शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे

- मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. २७ : राज्याची सर्वांगिण प्रगती व्हावी तसेच कल्याणकारी राज्याची निर्मिती करत असताना त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, गरीबी, निरक्षरता दूर व्हावी याअनुषंगाने अर्थसंकल्पाची आखणी होणे गरजेचे असते. शासनाचा प्रत्येक पैसा हा सर्वसामान्यांच्या इच्छा-आकांक्षांच्या पुर्ततेसाठी खर्च व्हावा यासाठीचे सर्वात महत्वाचे आयुध म्हणजे अर्थसंकल्प होय, असे प्रतिपादन वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.


            राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयातील विद्यार्थ्यांसाठी विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत आयोजित संसदीय अभ्यासवर्गात ‘अर्थसंकल्पाची प्रक्रिया – कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्वपूर्ण साधन’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे यांच्यासह विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाच्या जीडीपीमध्ये १५ टक्के योगदान महाराष्ट्राचे आहे. देशातील १०३ पैकी २७ युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहेत. देशात आणि राज्यात अर्थसंकल्पातून याला चालना देण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना हा जनतेचा पैसा आहे, हा दृष्टीकोन असायला पाहिजे. प्रत्येक पैशाचा वापर हा कल्याणकारी राज्याच्या दिशेने व्हायला पाहिजे. भविष्याचा द्रष्टीकोन, तत्कालीन प्रश्न आणि आर्थिक द्रष्टीकोनातून अर्थसंकल्पाची मांडणी व्हायला हवी. त्याचबरोबर मर्यादीत साधनसामुग्री आणि अमर्यादीत गरजा यांचा तोल राखून अर्थसंकल्प मांडणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले.


            राज्यातील प्रश्नांचा वेध घेत त्याचबरोबर बदलत्या जगाचा वेध घेत अर्थसंकल्प सादर करावा लागतो. भुकमुक्त समाज, विषमतामुक्त समाज निर्माण करण्याचे उद्दीष्ट असावे. त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत विचारपूर्वक अर्थसंकल्प मांडावा. निवडणुकीचा वेध घेत अर्थसंकल्प मांडल्यास त्याचे वाईट परिणाम होतात. ग्रेट ब्रिटन, श्रीलंका यांच्यासह युरोपातील अनेक देश याचे दुष्परिणाम भोगत आहेत. त्यामुळे कल्याणकारी राज्यनिर्मितीसाठी शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.


            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विद्यार्थिनी दर्शना खंडीझोड हिने आभार मानले.


००००

गृहप्रवेश

 गृहप्रवेश 

                                     - अमृता


हल्ली इंटरनेट वर सगळीकडेच आपल्या प्रथा परंपरांना चुकीचे ठरवण्याचे पेव फुटले आहे. त्यातीलच एक महत्वाची प्रथा म्हणजे नव्या नवरीचा गृहप्रवेश. तिचे धान्यानी भरलेले माप पाऊलानी कलंडून घरात येणे. हे असे करणे कसे चुकीचे आहे. यात कसा अन्नाचा अपमान होतो. त्याला कसे लाथाडले जाते. या बद्दल अनेकदा बोलले जाते. त्याबद्दलच माझेही मत मला मांडवेसे वाटले म्हणून हे लेखन.


मुळात पाय आणि पाऊल यात एक फरक आहे. पाऊल आणि पाय दोन्ही शब्द ऐकायला जरी एकसारखेच वाटत असले, तरी दोन्हीत फरक असतो. पाऊल म्हणजे पायाचा खालचा, जमिनीला स्पर्श करणारा भाग. हा नाजुक, मुलायम असतो. आणि वरचा भाग असतो तो पाय. 


या पाऊलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या पाऊलांवरच आपल्या शरीराचा डोलारा उभा असतो. आपल्या संतांच्या, गुरुजनांच्या, वाड वडिलांच्या पाऊलखुणांवरुनच आपण आपले मार्गक्रमण करत असतो, म्हणूनच आपल्या संतांच्या, गुरुजनांच्या, वाड वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेऊन चालला आहे, असे आपण म्हणतो. आषाढी वारीला विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेली वारकऱ्यांची पाऊले, म्हणूनच महत्त्वपूर्ण असतात. "पाऊले चालती पंढरीची वाट" असे अभंग आणि "राम कृष्ण हरी" चा नामजप करत, जेव्हा पंढरपुरात विठुरायाचे दर्शन त्यांना होते, तेव्हा त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे त्यांना वाटते. म्हणूनच त्यांची पाऊले वंदनीय होतात. कारण ती पाऊलेच, त्यांना विठ्ठल दर्शन घडवतात.  

वामन अवतारात बटूच्या वेशात आलेले विष्णू केवळ आपल्या तीन पाऊलात आकाश, पाताळ आणि पृथ्वी व्यापतात, तेव्हा त्या पाऊलांमध्ये किती अचाट शक्ती असेल, हे आपण समजू शकतो. 


आपल्या शास्त्रात म्हणूनच देवी देवतांचे, गुरूंचे, थोरा मोठ्यांचे चरणस्पर्श किंवा चरणपूजन करण्याची प्रथा आहे. आपल्याकडे गौर सुद्धा सोनपाऊली आली, असे आपण म्हणतो. लक्ष्मीची पाऊले काढली जातात. वेगवेगळ्या प्रथांमध्ये, देवतांच्या पाऊलांचे किंवा पादुकांचे पूजन करून त्यांचे चरणामृत, तीर्थ म्हणून प्राशन करतो.


सवाष्णींच्या पाऊलांवर दूध पाणी घालून, कुंकू लाऊन त्यांचे अर्चन आपण का करतो? तर ज्या देवतेच्या पूजनाचे प्रतीक, म्हणून आपण तिचे पूजन करत असतो, त्या देवतेचे रुप ती आहे, अशी आपली भावना असते. तिच्या मुखामधून आपली इष्ट देवता आपण अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करून आपल्याला, आपल्या घराला आशीर्वाद देत असते असे आपले शास्त्र सांगते.


आपल्या घरात विवाह करून आलेली नववधू, ही त्या घराची अन्नपूर्णा असते, गृहलक्ष्मी असते. म्हणूनच सासरी आल्यावर तिचे लक्ष्मी पूजन केले जाते. यासाठीच माहेराहून तिला अन्नपूर्णेची मूर्ती देण्याची आणि त्याचे पूजन लग्न विधीमध्ये करण्याची पद्धत आहे. ज्या घरची तू सून होत आहेस, त्या घरी धनधान्याची कायम बरकत व्हावी, अन्नपूर्णेची कृपा त्या घरावर कायम असावी, असा महान आशय त्या पाठी आहे. 


अशा या गृहलक्ष्मीचा गृहप्रवेश करताना, धान्यानी शिगोशिग भरलेले माप तिने पायाच्या अंगठ्याच्या तळव्यानी, नाजूकपणे फक्त कलंडायचे आहे. उडवून किंवा लाथाडून टाकायचे नाही. यात घरात धान्य ओसंडून जावे, अशी कामना आहे. कारण ती गृहलक्ष्मीच्या, अन्नपूर्णेच्या शुभ पावलांनी घरात प्रवेश करत असते. लग्नविधी होताच ती स्वतःच अन्नपूर्णा, गृहलक्ष्मी असते. त्यामुळे तिच्या पावलांनी अन्नाचा उपमर्द होऊच शकत नाही. जमिनीवर धान्य सांडू नये म्हणून मापट्याच्या खाली फार फार तर एखादे वस्त्र ठेऊन, ते धान्य आपण वापरू शकतो. 


नवीन घरात गृहप्रवेश केल्या नंतर दूध वर येईपर्यंत तापऊन, ते उतू घालवले जाते. यात जशी घरात सुख, समृद्धी ओसंडून जावी अशी शुभकामना असते, तीच शुभकामना नववधू गृहप्रवेश करत असताना, सगळ्यांच्या मनामध्ये असते. तेव्हा या प्रथेमध्ये काहीही गैर असे मला वाटत नाही. अर्थात हे माझे मत झाले, या लेखनातून कुणाच्याही मताचे खंडन करण्याचा हेतू नाही. 


सौ. अमृता विजय शेंडे.

amu.shende4@gmail.com

Featured post

Lakshvedhi