Wednesday, 21 December 2022

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार

 सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूर, दि. 21 :- सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देण्यात येईल. मात्र यासाठी निकष ठरवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

            अतिवृष्टी अनुदानापासून वगळण्यात आलेल्या गावांबाबत सदस्य नारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देतांना श्री.फडणवीस बोलत होते. या विषयावरील चर्चेत विरोधीपक्ष नेते अजित पवार, सदस्य सर्वश्री राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, डॉ.संजय कुटे, हसन मुश्रीफ, हरिभाऊ बागडे, श्रीमती यशोमती ठाकूर, यांनी सहभाग घेतला.


            उपमुख्यमंत्री म्हणाले की, ­‘अतिवृष्टीग्रस्त परिसरातील पिकाच्या नुकसानीसाठी एनडीआरएफ ने दर ठरवून दिले होते. या दरांनुसार नुकसान भरपाई देण्यात येते. नवीन दर नुकतेच घोषित केले आहेत. एनडीआरएफच्या निकषात सततचा पाऊस ही संकल्पना नाही. तरीही सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आपण मदत दिली आहे. यापुढे सतत पडणाऱ्या पावसामुळे द्याव्या लागणाऱ्या मदतीसाठीचे निकष समितीमार्फत एक महिन्याच्या आत ठरविले जातील.


            विमा कंपन्यांच्या संदर्भात विचारलेल्या एका उपप्रश्नाला उत्तर देतांना श्री. फडणवीस म्हणाले की, विमा कंपनीने किती नफा कमवावा या संदर्भात मर्यादा निश्चित करण्यासाठी नविन धोरण आणणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी देण्यात येणाऱ्या रकमेसाठी कमीतकमी एक हजार रुपये किमतीचा मदतीचा धनादेश असावा, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. विमा संबंधी तक्रार निवारणासाठी विशेष तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            अतिवृष्टीग्रस्त पिकांसाठी अनुदान देण्यासाठी 66 मि.ली. पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा निकष आहे. आतापर्यंत तीन हजार 500 कोटींचे प्रस्ताव आले आहेत. सततचा पाऊस पडणाऱ्या परिसरात मदत देण्याकरिता निकष ठरविण्यासाठी अपर मुख्य सचिव, नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री उदय सामंत यांनी वरील लक्षवेधी संदर्भात बोलतांना दिली.


0000

लोकराज्यमधील विषय समाज परिवर्तनशील

 लोकराज्यमधील विषय समाज परिवर्तनशील

-डॉ. नीलम गोऱ्हे.

            नागपूर, दि.21 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेल्या 'लोकराज्य' मासिकामधील विषय हे समाज परिवर्तनशील असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.


            नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने विधानभवन परिसरात शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या दुर्मिळ अंकांचे प्रदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लावण्यात आले आहे. या प्रदर्शनास त्यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अभिजित वंजारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहूल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकार प्रविण टाके, गोंदियाचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, विधानमंडळातील अवर सचिव पुष्पा दळवी यांची उपस्थित होती.


            उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले 'लोकराज्य' मासिक सामान्य लोकांपर्यंत पोहचणारे एकमेव मासिक आहे. सात दशकांची समृद्ध परंपरा असलेल्या लोकराज्यची व्याप्ती वाढविण्यासाठी आवश्यक ती मदत करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रामपंचायात स्तरावरील विकासावर आधारित लेख लोकराज्यमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना त्यांनी केली.


            लोकराज्य टीम परिश्रम घेवून विविध विशेषांकाची निर्मिती करत आहे. या प्रदर्शनात 1964 पासूनचे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत. हिवाळी अधिवेशन कालावधीत विधानभवनात येणाऱ्या सर्व स्तरातील लोकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे हे प्रदर्शन असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोकराज्य मासिकाच्या वाटचालीस तसेच महासंचालनालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रश्नांना न्याय

 विधिमंडळात विविध संसदीय आयुधांद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय

- माजी मंत्री बाळासाहेब थोरात.

            नागपूर, दि. 21 : “विधानसभा आणि विधान परिषदेत मांडण्यात येणारे तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अंतिम आठवडा प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, विविध नियमांन्वये चर्चा, औचित्याचे मुद्दे इत्यादी संसदीय आयुधे अत्यंत महत्त्वाची असून याद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात दोन्ही सभागृहे महत्त्वाची भूमिका बजावतात”, असे माजी महसूल मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज येथे सांगितले.


            राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विधान भवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत अभ्यासवर्ग सुरू आहे. त्यामध्ये आज ‘विविध संसदीय आयुधे, विधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर आमदार श्री. थोरात बोलत होते.


            श्री. थोरात म्हणाले की, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायपालिका हे आपल्या लोकशाहीचे स्तंभ आहेत. त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमांना आपण चौथा स्तंभ मानतो. कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाला जबाबदार असते. त्याचबरोबर विधिमंडळात तयार होणारे कायदे हे घटनेला अनुसरून आहेत किंवा नाहीत यावर न्यायपालिकेचे नियंत्रण असते. अशाप्रकारे एकमेकांवर नियंत्रण असणारी आपली राज्यपद्धती आदर्शवत अशी आहे.


            आमदार श्री. थोरात म्हणाले की, विधानसभेतील सदस्य हे फक्त त्यांच्या मतदारसंघापुरतेच प्रश्न न मांडता राज्यातील कोणत्याही भागातील प्रश्न विधिमंडळात मांडू शकतात. सभागृहात राज्यातील सर्व भागांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होते. या प्रश्नांची शासनाला दखल घ्यावी लागते आणि त्यावर कार्यवाही करावी लागते. अधिवेशन काळात शासन यंत्रणेला गती येते, मंत्र्यांनाही राज्याच्या विविध भागांतील अनुषंगिक प्रश्न माहीत होतात. त्यावर चर्चा, वाद-संवाद होत असल्याने सर्वांगीण माहिती घेऊन प्रश्न सोडविले जातात. अशा पद्धतीने लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारी आपली संसदीय पद्धती आहे, असे त्यांनी सांगितले.


            श्री. थोरात म्हणाले की, विधिमंडळात सदस्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विविध संसदीय आयुधांच्याद्वारे व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जाते, त्यातील दोष दूर केले जातात आणि शासन यंत्रणा गतिमान होते. त्यामुळे ही संसदीय आयुधे फार महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर विधिमंडळात विविध समित्या कार्यरत असतात. यामध्ये प्रामुख्याने अंदाज समिती, लोक लेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती अशा विविध समित्यांचा समावेश आहे. लोकहिताचा एखादा विशिष्ट विषय घेऊन त्यावर या समित्यांद्वारे कामकाज केले जाते. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने या समित्या फार महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.


            यावेळी आमदार लहू कानडे यांनी श्री. थोरात यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिमंडळाचे अवर सचिव सुनील झोरे यांनी केले. मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिनी यशश्री राणे हिने आभार मानले.


००००




शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी

 शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठीराज्यात प्रभावी उपाययोजना


- उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस.

            नागपूर, दि. 21 : शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रिकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टीकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार/ हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.


            मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत सदस्य उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, “माटुंगा येथील घटना चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. अशा विकृतींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सायबर गुन्ह्यांबाबत संबंधित प्राप्त तक्रारीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांमध्ये अश्लील चित्रिकरणाच्या प्रभावामुळे विकृती वाढतेय. ही चिंताजनक बाब आहे. लैंगिक अत्याचारासंबंधी व्हिडिओ व अन्य मजकूर याबाबतची माहिती मिळाल्यावर समाजमाध्यम व वेबसाईटवरून हटवण्यासंबंधी त्वरित कारवाई करण्यात येत आहे.तसेच राज्यामध्ये इंटरनेटवरील अशाप्रकारच्या मजकुरावर आणि वेबसाईटवर प्रतिबंध घालण्याचे काम सुरु आहे. राज्यातील सायबर गुन्ह्यांबाबत सायबर इंटेलिजन्स युनिट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. यामाध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवता येईल’’, असे श्री.फडणवीस यांनी उत्तरात सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, “राज्यातील काही मोठ्या शाळा, महाविद्यालयामध्ये सीसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, काही साधारण शाळा, महाविद्यालयांमध्ये सीसीटिव्ही बसविण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी टप्प्याटप्प्याने सीसीटिव्ही बसविण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासंदर्भात चांगला, वाईट स्पर्श (good touch-bad touch) बाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालय परिसरातील कॅफेटेरिया व अन्य सुविधा यांचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आणि गृह विभागाच्या सचिवांची समिती नेमून एक स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल”, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.


            “राज्यात किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी ‘पोलीस दिदी’ यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.पोलीस दिदींची संख्या वाढविण्यात येत आहे. यात खासगी स्वयंसंस्थांचाही सहभाग घेत आहोत. शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून शाळा प्रशासनास यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी बृहत कार्यक्रम हाती घेण्यात येईल”, असे श्री. फडणवीस म्हणाले.


            शाळेच्या वाहनांवरील वाहनचालकांच्या नियुक्ती/ कामाबाबत लेखापरीक्षण (ऑडिट) करणे गरजेचे आहे. यासंदर्भात कायदे, नियम आणि संहिता आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री यांनी दिली.


            या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.


००००




 



शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार!

 शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार!


आ. भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद


मुंबई, दि. 20 डिसेंबर (प्रतिनिधी)


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी) रुग्णालायात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची गैरसोय होत असून यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी तारांकित प्रश्नाद्वारे केली. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भात बैठक घेऊन मुंबईकरांच्या आरोग्यासाठी जे-जे करावे लागेल ते सर्व पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.


उपनगरातील अत्यंत महत्वाचे असलेल्या या रुग्णालयात अतिरिक्त शास्त्रक्रिया विभाग सुरु करावा, पदभरती करावी, औषधे उपलब्ध करून द्यावीत यासह विविध मागण्या आमदार भातखळकर यांनी केल्या. सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे सामान्य रुग्णाला केईएम, सायन रुग्णालयात जावे लागते. यावरील उपाययोजनांसाठी कालबद्ध धोरण ठरवण्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी केली.


या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार भातखळकर यांनी उपस्थित केलेला रुग्णालयाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता कार्यवाही करू. मुंबईकरांचे आरोग्य उत्तम कसे राहील हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. यापूर्वीच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशी अवस्था निर्माण झाली आहे. लवकरच यासंदर्भात आमदार, संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यासाठी जे-जे म्हणून करावे लागेल ते सर्व करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा निकाल जाहीर

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा निकाल जाहीर

रत्नागिरीचे पालघरवाडी मंडळ, कोल्हापूरचे दिपक हजारे प्रथम


मुंबई, दि, २० : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा - सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी जाहीर केला आहे.


३१ ऑगस्ट २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत आयोजित स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ४७९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांपैकी घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत ३७९, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १०० या गटात स्पर्धक सहभागी झाले. घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत दीपक हजारे (कोल्हापूर) यांना प्रथम पारितोषिक, राजेश परदेशी (अहमदनगर) यांना द्वितीय पारितोषिक, कोमल अग्रवाल (औरंगाबाद) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रत्नागिरी) या मंडळाला प्रथम पारितोषिक, शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ (नाशिक) या मंडळाला द्वितीय पारितोषिक, तर श्री आवडता गणेश मंडळ (नांदेड) या मंडळाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 


तसेच, घरगुती गणेशोत्सव सजावट आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या दोन्ही स्पर्धांना मिळून एकूण वीस उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :


१. घरगुती गणेशोत्सव सजावट गट: १. प्रिती पवार (नाशिक), २. प्राची पाटील (कोल्हापूर), ३. अदिरा इंगळे (पुणे), ४. नितीन पाटील (नाशिक), ५. ललिता कोठावदे (नाशिक), ६. स्वप्निल मुळे (पुणे),७. पराग अत्तरदे (जळगाव), ८. रमेश सूर्यवंशी (लातूर), ९. सुनिल करंबेळे (रत्नागिरी) आणि १०. स्नेहल खराळकर (पुणे).


२. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गट : १. प. पू गगनगिरी महाविद्यालय सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ (अहमदनगर), २. हाय कमांडो फ्रेंड्स सर्कल मंडळ (कोल्हापूर) ३. राजे शिवाजी विद्यालय गणेश मंडळ (नंदुरबार), ४. गणराज तरुण मंडळ (अहमदनगर) ५. विजय बाल उत्सव गणेश मंडळ (नागपूर), ६. श्री अष्टविनायक मित्र मंडळ (पुणे), ७. भारत क्रिडा मंडळ (नागपूर), ८. शंकरपुरा पेठ सांस्कृतिक विकास मंडळ (पुणे) ९. सुवर्णयुग तरुण मंडळ (अहमदनगर) आणि १०. श्री.कृष्ण गणेश मित्र मंडळ (अहमदनगर)


घरगुती गणेशोत्सव सजावट गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार रुपये, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपये ; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.


सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार रुपये, २१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.


या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम चित्रपट अभ्यासक संतोष पाठारे आणि कलावंत विकी शिंदे यांनी पाहिले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी दिली.


0000

कर्मसु कौशल्ययोगःम्.....*

 *अलौकिक.....*


*तिर्थयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन ट्रेन निघाली होती.काही अंतर कापल्यावर यात्रेकरू सैलावले.गप्पा सुरु झाल्या.बहुतेकांनी साठी ओलांडली होती.विषय पुण्यसंचयाचा निघाला.*


अत्यन्त उंची कपडे घातलेला गृहस्थ खिडकीजवळ बसला होता.बाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे बोट दाखवून तो म्हणाला,

*"तो समुद्र पाहिलात ? माझे पुण्य त्याच्याएव्हढे आहे. आम्ही जमीनदार! आमच्या वाड्यावरून कोणीच रिकाम्या हाताने परत गेला नाही.सगळा गाव आम्हाला दानवीर म्हणून ओळखतो.दान हीच आमच्या घराण्याची ओळख आहे."*


त्याच्या समोर साध्या कपड्यातील दुसरा गृहस्थ बसला होता. जमीनदाराने त्याला विचारले.... *"तुम्ही काय करता ?"*


*"मी शिक्षक होतो. निवृत्त झालो..."*


*"शिक्षक ...जमीनदाराच्या शब्दात उपहास होता.म्हणजे सहा तास काम करायचे आणि महिन्याला पगार मोजून घ्यायचा.तुम्हाला कुठे दानधर्म करायला जमणार ? हो ना !"*


शिक्षक हसला,म्हणाला...

*"हो, खरं आहे.."*


गप्पा ऐन भरात होत्या.बरेच अंतर पार झाले होते.तेवढ्यात ट्रेन अचानक थांबली. २० किलोमीटर पुढे असलेल्या गावात तुफान दंगल सुरू होती. रेल्वेचे रूळ उखडण्याचा प्रयत्न झाला. त्यादिवशी तरी ट्रेन पुढे सरकणार नाही अशी माहिती गार्डने दिली.


त्या कमालीच्या छोट्या गावात राहायचे कुठे... ना लॉज ना धर्मशाळा.जमीनदार साहेब त्रागा करू लागले.स्टेशनमास्तर मात्र भला माणूस होता.त्याने वेटिंग रूम,ओळखीची घरे अशा जागी यात्रेकरूची सोय करून दिली.


*शिक्षकाचा चेहरा पाहून तो त्यांच्या पायावर कोसळलाच..*


*"सर,ओळखलं मला ? मी मुकुंद देशमुख.वडील वारल्यानंतर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. तुम्ही दहावीची परीक्षा फी भरली म्हणून पुढे शिकलो. स्टेशनमास्तर झालो."* 


शिक्षकाचे डोळे भरून आले. त्यांची बॅग हातात घेऊन मुकुंद घरी घेऊन जात होता.त्यांनी मुकुंदला थांबवले... *"एका मिनिटात आलोच !"*


*अस्वस्थपणे उभ्या असलेल्या जमीनदाराला ते म्हणाले,*


*"साहेब,माझे पुण्य समुद्रएव्हढे निश्चितच नाही.मी दानधर्मही केला नाही.मी जे केले त्याला कर्तव्य म्हणतात.ज्या कामासाठी पगार घेतला,ते काम पूर्ण निष्ठेने केले.या मुकुंदासारखे शिष्य त्या कर्तव्यनिष्ठेची फळे आहेत.हे विद्यार्थी असे पायावर वाकले ना,की मग तिर्थयात्रेचे पुण्य आमच्या खात्यावर जमा होत असते."*


*"आता माझ्यासोबत येता की थांबताय ?"*


*जमीनदार खालमानेने त्यांच्यामागून निघाला..*


* कर्मसु कौशल्ययोगःम्.....*


*लेखक: अज्ञात...*

🙏🙏🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi