सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 15 October 2022
सुवर्ण पदक बॉक्सिंग खेळाडू सत्कार
सामान्य कुटुंबातील निखिल दुबे याने राष्ट्रीय स्पर्धेत बॉक्सिंग प्रकारात सुवर्णपदकाची केलेली कमाई ही निश्चितच अभिमानास्पद आहे. त्याने भविष्यात ऑलम्पिकमध्ये सहभाग घ्यावा. त्याला कायम नोकरी कशी मिळेल, यासाठी केंद्र सरकार स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
कांदिवली पूर्व विधानसभेतील पोईसर विभागात राहणाऱ्या निखिल प्रेमनाथ दुबे याने गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 75 किलो वजनी गटात, बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्याचा आमदार भातखळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार भातखळकर म्हणाले, १९९४ नंतर प्रथमच महाराष्ट्राला निखिल दुबेच्या रूपाने सुवर्णपदक मिळाले आहे. ही गौरवास्पद बाब आहे. त्याची मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री यांच्याशी भेट घडवून देणार आहे. राज्य सरकारकडून त्याला आवश्यक असणारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय केंद्र सरकार स्तरावरही प्रयत्न करून त्याला कायम नोकरी मिळाली पाहिजे, घर मिळाले पाहिजे यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे. या सत्कार समारंभाला कांदिवली पूर्व विधानसभेतील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
दिव्यांगासाठी एक खिडकी योजना
दिव्यांगासाठी एक खिडकी योजना सुरू करणार
- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
'पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. 10 : दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
बोरविली पश्चिम येथील आर सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड येथे 'पालकमंत्री आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, दिव्यांगासाठी केंद्र, राज्य तसेच महापालिकेच्या विविध योजना राबविण्यात येतात अशा वेळी, नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जावे लागू नये, यासाठी महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या हेतूने ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्याचे निर्देश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.
यावेळी ३६९ विविध विषयांवर नागरिकांनी आपले तक्रार अर्ज दिले. तर १०५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.
'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमांतर्गत दि. १२ ऑक्टोबर रोजी एल वॉर्ड - कुर्ला पश्चिम येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही आपली तक्रार नोंदविता येईल.
०००००
संध्या गरवारे/विसंअ/10.10.22
चला जाणूया नदीला" अभियान
चला जाणूया नदीला" अभियान लोकसहभागातून वेग घेणार
नदी संवाद यात्रेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समिती
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती
मुंबई, दि.१५: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबरला प्रारंभ झालेल्या "चला जाणूया नदीला " अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आता राज्यभर वेग घेणार असून वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय तसेच जिल्हावार समित्यांची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्य सचिव राज्यस्तरीय समितीचे प्रमुख असतील. यासंदर्भातील शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे. या अभियानाचे यश लोकसहभागात असून, प्रत्येक समितीने लोकसहभाग जास्तीत जास्त राहील यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. त्यावर उपाय म्हणून नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करणे हे या अभियानातून अभिप्रेत असून लोकसहभागातून हे अभियान निश्चित यशस्वी होईल व प्रत्येक समिती त्या दृष्टीने काम करेल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होते आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. येणाऱ्या काळात नद्यांचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी "चला जाणूया नदीला" अभियान राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे.
अभियानाची उद्दिष्ट्ये
या अभियानाचे उहिष्ट प्रामुख्याने जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, नागरीकांच्या सहकार्याने नद्यांचा सर्वकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे असणार आहे. तसेच नदीला अमृत वाहिनी बनविण्यासाठी कार्यक्रमाचा मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रुपरेषा आखणे, नदीचा तट, प्रवाह आणि परिसरातील जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्हयात प्रचार प्रसार याबाबत नियोजन करणे, नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पुर रेषा व पाणलोट क्षेत्रांचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी या बाबतची माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे यावर भर असेल. याचबरोबर अभियानाबाबत जनजागृती करणे,अतिक्रमण, शोषण आणि प्रदुषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे, नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे ही कामेही या समित्या करतील. नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रत्येक विभागाचा सहभाग
या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून वाहणाऱ्या निवडक नद्यांबाबतची माहिती, तिचा प्रचार-प्रसार आणि त्यानुषंगिक बाबींसाठी सहाय्य करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या जिल्हा समित्यांमधे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष असतील. याशिवाय विद्यापीठाचे निबंधक आणि महानगरपालिकेचे आयुक्त किंवा उपायुक्त या समितीत विशेष निमंत्रित सदस्य असतील. निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,कार्यकारी अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणा, आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महाविकास अधिकारी, प्रकल्प संचालक, विभागीय साक्षरता केंद्राचे संचालक,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी या समितीचे सदस्य असतील. तर जलसंपदा विभागातील सिंचन व्यवस्थापनाचे अधीक्षक अभियंता समितीत सहसदस्य सचिव असतील तर जिल्हा वनसंरक्षक सदस्य सचिव असतील. चला जाणूया नदीला अभियानाचे समन्वयक आणि नदी प्रहरी सदस्य यामध्ये सदस्य असतील.समितीचा महत्वाचा दुवा हे संबंधित जिल्हाधिकारी असतील.
यात्रे दरम्यान २ ऑक्टोबर, २०२२ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये राज्यभरातील किमान ७५ नद्यांपर्यंत यात्रा पोहोचणार आहे.३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत यात्रेचा / अभ्यासाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार असून १ डिसेंबर २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत यात्रेचा दुसरा टप्पा असेल. या अभ्यासावर आधारित लोक शिक्षणाचा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम नियोजित होईल व १ जानेवारी २०२३ ते २० जानेवारी २०२३ या काळात अहवालास अंतिम स्वरूप दिले जाईल.
००००
दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांनाअग्रीम
दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांनाअग्रीम देण्यास मान्यता
मुंबई, दि. १४ : राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी मान्यता दिली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे.
उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. दिवाळीच्या काळात या अग्रीमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
