सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 15 October 2022
विदर्भात खनिजावर आधारित उद्योगधंद्य
विदर्भात खनिजावर आधारित उद्योगधंद्यांची बांधणी करणारे धोरण आखणार
- दादाजी भुसे
'मिनकॉन' 2022 परिषदेचे उदघाटन
नागपूर दि. १४ : महाराष्ट्रामध्ये विदर्भा एवढे खनिज व खाणी कुठेच नाहीत. त्यामुळे राज्याचे नवीन खनिज धोरण ठरवताना विदर्भामध्ये खनिजावर आधारित उद्योगधंद्यांची बांधणी करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.
सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस पार्क येथे आयोजित ‘मिनकॉन 2022’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री. भुसे बोलत होते. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. केंद्रीय कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे अध्यक्ष आमदार आशिष जयस्वाल, उद्योग व खाण विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे (वेद) अध्यक्ष देवेंद्र पारेख, राहुल उपगल्नावार, शिवकुमार राव यावेळी उपस्थित होते.
विदर्भात मोठ्या प्रमणात खनिज साठे सापडत असताना त्यावर आधारित उद्योग मात्र अन्य ठिकाणी आहेत. विदर्भासारख्या मागासलेल्या भागात खनिजावर आधारित उद्योग व्यवसाय उभे रहावेत. स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले. खनिजामध्ये असणारे धातू व त्यावर असणारे प्रक्रिया उद्योग, त्याचे परीक्षण, संशोधन या संदर्भातील सर्व कार्यालये संस्था विदर्भात उभी राहिली पाहिजे, असा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात नवीन खनिज धोरण राज्य सरकार आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वनमंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले, भूगर्भातील खनिज साठा हजारो वर्षाच्या प्रक्रियेनंतर तयार होतो. त्यामुळे त्याचा वापर योग्य प्रमाणात झाला पाहिजे. ज्या भागातून हा काढला जात आहे. त्या भागाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे विदर्भात उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आपल्या धोरणांमध्ये बदल होणे आवश्यक आहे. खाणीचे प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास विदर्भ सहन करतो, त्यामुळे येथील उद्योग उभारणीला गती मिळायला हवी. या संदर्भातील सर्व कार्यालये, प्रक्रिया उद्योग विदर्भात उभे होण्यासाठी प्रयत्न करावेत.
तीन दिवसीय ‘मिनकॉन 2022’ परिषदेतून देशाच्या खान, खनिज व त्यावर आधारित व्यवस्थापनाला नवी दिशा देणारे प्रस्ताव सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना पुढे आल्या पाहिजे. त्यावर आपण गांभीर्याने विचार करू, असे केंद्रीय कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या खनिज व पर्यावरणाविषयक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. जोशी यावेळी म्हणाले. तसेच विदर्भात उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी ज्यावेळी या ठिकाणीच्या खाणींचा लिलाव होतो, त्यावेळी उद्योगाची अट टाकण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात जगातील सर्वात मोठी अर्थसत्ता म्हणून पुढे येण्यासाठी आपले मार्गक्रमण असून त्यामध्ये खनिकर्म विभागाने आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर खनिकर्म क्षेत्रांसाठी आवश्यक परवानग्या घेताना होणारी दिरंगाई हद्दपार करावी लागेल. भूगर्भात मोठ्या प्रमाणात खनिज उपलब्ध असतानाही या दिरंगाईमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात खनिज आयात करावे लागते. शासकीय यंत्रणेतील दोष दूर करून आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. याअनुषंगाने तीन दिवसीय परिषदेत चर्चा व्हावी. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी मिनकॉनसारख्या परिषदेमध्ये धोरणांची पायाभरणी होणे आवश्यक असल्याचे केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
तत्पूर्वी खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. या परिषदेत होणाऱ्या चर्चेच्या मसुद्यावरून नवीन धोरण तयार करण्यात मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी केली.
राज्यातील खाण, खनिज आणि धातूंची उपलब्धता आणि उपयोगिता यावर प्रकाश टाकणाऱ्या 'मिनकॉन 2022 ' या तीन दिवशीय परिषदेचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रदर्शन, परिषद, व्यापार बैठका, आणि व्हेंडर विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, एम.ए. अॅक्टिव्ह आणि महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाच्यावतीने राज्य सरकार व केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास मंत्रालयामार्फत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
पुढील तीन दिवस ही परिषद सुरू असणार आहे. उद्या, 15 ऑक्टोबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार आशिष जायस्वाल आणि 16 रोजी समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.
*****
चर्नी रोड स्थानक
चर्नी रोड स्थानकातील रेल्वे पुलाची
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली पाहणी
मुंबई, दि.14 :- पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेल्या पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, रेल्वे, मुंबई महानगरपालिका आदी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्नी रोड स्थानकातील उत्तर बाजूचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर उतरणारा पूल सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. येथे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या परिसराची मंत्री श्री. केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सहायक विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.वर्मा, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.
पाहणी केल्यानंतर श्री केसरकर म्हणाले, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना करण्यात येईल. याबरोबरच सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल पडल्यानंतर मुंबईतील धोकादायक असलेले पूल नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात येऊन पाडण्यात आले. चर्नी रोड हा मूळ मुंबईतील मुख्य भाग आहे. येथे प्रवाशांची संख्या लक्षात घेता तातडीची उपाययोजना म्हणून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
डोंगरी, भायखळा पोलीस वसाहतीची पाहणी
डोंगरी तसेच भायखळा भागातील सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या पोलीस वसाहतींची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी वसाहतीतील पोलीस कुटुंबियांशी संवाद साधून इमारतींच्या दुरूस्तीचे काम येत्या दोन महिन्यात सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या इमारतींच्या नूतनीकरण आणि दुरूस्तीचे काम दर्जेदार व्हावे, प्रत्येकाला त्यांच्या घरात शौचालय मिळावे, आता असलेल्या एकत्रित शौचालयाच्या जागी जिम, योगा करता येतील अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक आमदार अमीन पटेल, डोंगरी येथे पोलीस उपायुक्त हरी बालाजी, भायखळा येथे पोलीस उपायुक्त योगेश कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील, उपअभियंता एन.सी.पाटील आदी उपस्थित होते.
०००००
फेरपरिक्षेच्या निर्णयामुळे
फेरपरिक्षेच्या निर्णयामुळे 13 हजार 787 विद्यार्थ्यांना लाभ
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
तंत्रनिकेतनच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर
मुंबई, दि. 14 : मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यानंतर प्रथमच उन्हाळी 2022 ही परिक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन घेण्यात आली. या परिक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी हितासाठी फेरपरिक्षा घेण्यात आली, या तंत्रनिकेतनच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेमध्ये 13 हजार 787 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली होती. तसेच टेक्निकल अभ्यासक्रम प्रात्यक्षिकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विषयाचे आकलन होण्यासही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी द्यावी अशी पालक, संस्था, संघटनांची मागणी होती. त्यानुसार शासनाने फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.
अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थातील अंतीम सत्र/ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास्तव उन्हाळी 2022 च्या परिक्षेत अंतीम सत्र वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता एक विशेष बाब म्हणून ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जवळपास 47 हजार 223 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 हजार 787 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 198 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.
या परिक्षेचा निकाल वेळेत जाहीर केला असल्याने अभियांत्रिकी पदवी परिक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.21 ऑक्टोबरपर्यंत असल्याने हे विद्यार्थी थेट द्वितीय वर्षाकरिता सुद्धा अर्ज करु शकतील.
००००
Friday, 14 October 2022
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




