Wednesday, 5 October 2022

लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू

 लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास

 सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई

- राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबई, दि. ४ : नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असूनआता लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

            श्री. विखे पाटील यांनी सोलापूर येथून आयुक्त पशुसंवर्धन यांचे समवेत लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी गठित राज्यस्तरीय कार्यदलाची (टास्क फोर्स) दृकश्राव्य माध्यमाद्वारे बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.

            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पशुसंवर्धन विभागाचे लम्पी रोगाविषयी महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आले. यामध्ये पहिला निर्णय नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असूनआता लम्पी चर्मरोगाने बाधीत पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. दुसरा निर्णय पशुपालकांना यापुर्वी लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या जास्तीतजास्त ३ जनावरांसाठी हा लाभ अनुज्ञेय होता. आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे.या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे होणारी मर्तुक कमी करण्यासाठी उपचार प्रोटोकॉल मध्ये सुधारणा करण्याचे आणि बाधित पशुरुग्णांचे सुक्ष्म अवलोकन करुन उपचार करण्याचे निर्देश श्री.विखे पाटील यांनी दिले.

            शासन अधिसूचना दि. 30.09.2022 अन्वये संक्रमित / संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून आरोग्य प्रमाणपत्रासह म्हशींची वाहतुक करण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून वाहतुक करण्यास परवानगी दिलेली असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

            राज्यामध्ये आज दि.4 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 179 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 52 हजार 955 बाधित पशुधनापैकी एकूण 27,403 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 115.11 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 108.29 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व अकोलाजळगांवकोल्हापूरसांगलीवाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्थासहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 77.39 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे. 

0000

सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबर

 सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार

१४ लाखांहून अधिक नागरिकांचे तक्रार अर्ज निकाली

जास्तीत जास्त तक्रार अर्ज निकाली काढून नागरिकांना दिलासा द्यावा.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

            मुंबई, दि. ४: सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी राज्यात आयोजित केलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात १४ लाख ८६ हजार ९५९ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. दरम्यान, हा सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबर पर्यंत सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

          आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेवा पंधरवड्याबाबत आढावा घेण्यात आला. राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दि. १० सप्टेंबर पर्यंतचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत आपले सरकार वेबपोर्टल, महावितरण, डीबीटी, नागरी सेवा केंद्र तसेच विभागांच्या वेबपोर्टलवर एकूण २३ लाख ७६ हजार ६३२ अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी १४ लाख ८६ हजार ९५९ अर्ज निकाली काढण्यात आले.

          नागरिकांच्या सर्वच तक्रार अर्जांचा निपटारा करण्यासाठी या सेवा पंधरवड्यास मुदतवाढ देऊन तो दि. ५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरू ठेवण्याबाबत निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. जास्तीत जास्त तक्रार अर्ज निकाली काढून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.



कोल्हापूर - मुंबई विमानसेव

 कोल्हापूर - मुंबई विमानसेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

                                     

            नवी दिल्ली४ : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे कोल्हापूर - मुंबई या विमानसेवेचे उद्घाटन केले.

          येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. सिंधिया  यांच्या  हस्ते  विभागाचे राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंहअपर सचिव उषा पाधी  यांच्या उपस्थितीत कोल्हापूर - मुंबई  विमानसेवेचे  दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुढील वर्षी मार्च महिन्यात कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे (डोमेस्टिक टर्मिनल) उद्घाटन करण्यात येईल, असे श्री. सिंधिया यांनी यावेळी सांगितले.

            या कार्यक्रमास कोल्हापूर विमानतळाहून खासदार सर्वश्री संजय मंडलिकधैर्यशील माने, धनंजय महाडिक तसेच पंढरपूर येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

               नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान योजनेंतर्गंत देशातील २ टियर आणि ३ टियर शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर आणि मुंबई शहरांमध्ये ही विमानसेवा सुरु झाली आहे. या शहरांदरम्यान स्टार एअरच्यावतीने आठवड्यात मंगळवारगुरुवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये ही  विमानसेवा असेल.

मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे उद्घाटन

                   श्री. सिंधिया म्हणाले कीदेशातील जनतेला रास्तदरात विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने उडान योजना’ सुरु केली आहे. आतापर्यंत देशातील ४३३ मार्गांवर ही सेवा सुरु झाली असून १ कोटींहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमातळाच्या देशांतर्गत टर्मीनलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे श्री. सिंधिया यांनी यावेळी सांगितले.  

                                      

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनां

 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी ग्रंथालयांनी अर्ज करावे

- ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले

 

            मुंबई,दि.४:  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रस्ताव/अर्ज सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांनी केले आहे.

            भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय  ग्रंथालय प्रतिष्ठानकोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय यांच्या मार्फत राबविण्यात येतात.

             या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याने   सन २०२२-२३ साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियमअटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर असून इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना उपलब्ध करून घ्यावा. सन २०२२-२३ साठीच्या समान निधी योजनेनंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत.या योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करू नयेत.

             असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथसाधन सामग्रीफर्निचरइमारत बांधकाम  व विस्तार यासाठी अर्थसहाय्यराजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान 'ज्ञान कोपराविकसित करण्यासाठी अर्थसहाय्यमहोत्सवी वर्ष जसे ५०/६०/७५/१००/१२५/१५० वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्यराष्ट्रस्तरीय चर्चासत्रकार्यशाळाप्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्यबाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय 'बाल कोपरा स्थापनकरण्याकरिता अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे.

अर्ज कुठे व कसा करावा  :

            राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी इछुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पाठवावेतअसे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांनी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.

0000

लम्पी आजाराबाबत. सूचना

 लम्पी आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करून रुग्णसंख्या कमी करापालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

            सोलापूर, दि.4 (जिमाका): राज्यामध्ये लम्पी आजाराने आतापर्यंत 2100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

            नियोजन भवन येथे लम्पी आजाराबाबत राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत श्री. विखे-पाटील बोलत होते. बैठकीला आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. बिकाणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नवनाथ नरळे, विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉक्टर आदी उपस्थित होते.

            श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यात गाय वर्गीय जनावरांना लम्पी आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी संशोधन करून मृत्यू नेमका होण्याचे कारणे शोधून उपाययोजना काय कराव्यात, हे सूचवावे. पशुधन मालकांची पशु ही संपत्ती आहे. जनावरांचा मृत्यू होऊ देऊ नका. बरी झालेली जनावरे लम्पी आजार न झालेल्या जनावरांमध्ये मिसळणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी.

            टास्क फोर्सने राज्यातील सर्व जिल्हानिहाय पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांची ऑनलाईन कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करावे. जनावरांची कोणती तपासणी करावी, निदान काय येईल, यावर कोणते उपचार करावेत, याविषयी कार्यशाळेत योग्य मार्गदर्शन करावे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावनिहाय नकाशे करावेत. जनावरांचे पर्यवेक्षण करून उपचार करावेत. यामध्ये स्थानिक डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये, असेही श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

15 व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घ्याव्यात

            जिल्ह्यात लसीकरणासाठी वाहनांची आवश्यकता असल्यास 15 व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घेता येतील. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे असलेल्या विना चालक रूग्णवाहिका तीन महिन्यासाठी घ्याव्यात. या रूग्णवाहिका लसीकरणासाठी वापरता येतील. पशुधन जास्त असलेल्या तालुक्यात दोन रूग्णवाहिका वापरून लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

            श्री. प्रतापसिंह यांनी सांगितले की, राज्यात एक कोटी 40 लाख जनावरे असून एक कोटी 15 लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. सर्वांना वेगाने लसीकरण सुरू असून एक कोटी 8 लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. सध्या 52 हजार पशु बाधित असून 2100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाही म्हशींची समावेश नसल्याने म्हैशीची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. वेळेत निर्णय आणि गतीने लसीकरण सुरू केल्याने दोन हजार गावात लम्पी कमी होतोय. अत्यवस्थ जनावरे कमी होत आहेत, सध्या किरकोळ आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत.

            टास्क फोर्सचे डॉ. बिकाणे यांनी सांगितले की, संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय मृत्यूदर कमी होणार नाही. मृत्यू होणाऱ्यामध्ये वयस्क, आजारी जनावरे, गाभण असलेले, लहान वासरे यांचा समावेश आहे. यामुळे अशा जनावरांची पशुपालकांनी काळजी घ्यावी. अजून आठ ते 10 दिवस लम्पी आजाराचे रूग्ण निघतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

पशुपालकांना अर्थसहाय्य

            लम्पी आजारामुळे जनावरे दगावलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दहा पशुपालक लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मृत्यू पडलेल्या प्रत्येक संकरित गायीसाठी 30 हजार तर खिलार बैलासाठी पंचवीस हजार रुपये याप्रमाणे धनादेशाचे वितरण करण्यात आले.



प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्या

 प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

- जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 

            मुंबईदि. 4 : शालेय जीवनात ऐकलेलेअनुभवलेले प्रबोधनात्मक विचार विद्यार्थी आयुष्यभर लक्षात ठेवतात. या गोष्टी त्यांच्यासाठी पुढे अनुकरणीय होतातप्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी व्यक्त केला. जागतिक प्राणी दिनानिमित्त मुंबई जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी तर्फे मुंबई जिल्ह्यातील बृहन्मुंबई  महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना प्राण्यांबाबत जागृती करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयपरळ येथे करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजित रानडेप्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मुंबई विभाग डॉ. प्रशांत कांबळेमहाव्यवस्थापक देवनार पशुवधगृहाचे डॉ. कलीमपाशा पठाण तसेच वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग या संस्थेचे अबोध अरासजिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा  सदस्य सचिव डॉ. शैलेश पेठेबृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            महानगर पालिकेच्या शाळेत अशाप्रकारे साजरा करण्यात आलेला हा महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण जनजागृती कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना प्राण्यांचे अधिकार व प्राण्यांविषयक कायद्यांची माहिती देणाऱ्या प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या हस्ते झाले. जागतिक प्राणी दिनानिमित्त मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक व सन्मानपत्र वितरित करण्यात आले.

            जिल्हाधिकारी श्री. निवतकर म्हणालेप्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात येत असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यानिमित्त मुंबई शहरातील विविध शाळांत मुलांमध्ये प्राण्यांविषयी जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचा भविष्यात सकारात्मक परिणाम दिसेल. प्राण्यांवर दया करण्याविषयी केलेली चित्रफित पाहून मुले त्याचे अनुकरण करतील.

            डॉ. रानडे यांनी मनुष्याच्या सानिध्यात राहणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व सांगीतले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ - भोईवाडा मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे प्राण्यांचे महत्त्व विषद केले. डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी आभार मानले.

००००


योजनांचा आढावा

 मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून

 महानगरपालिका कामकाजाचा आढावा.

             मुंबई. दि.4 : राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बैठक घेवून महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच सध्या प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा घेतला.

            बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरांमध्ये असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुयोग्य प्रकारे होत असून याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचा उल्लेख त्यांनी आजच्या बैठकी दरम्यान केला. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांच्या दृष्टीने राज्य शासनाच्या स्तरावर समन्वय साधण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधितांनी प्राधान्याने करावी, असे निर्देश देताना पालकमंत्री म्हणून जे सहकार्य लागेल, ते निश्चितच केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी पालकमंत्री महोदयांना व उपस्थित मान्यवरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामांची व प्रकल्पांची माहिती यावेळी दिली.

             बैठकीस उत्तर मुंबई मतदार संघाचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई स्थानिक प्राधिकारी संस्थेचे विधान परिषदेतील आमदार राजहंस सिंह, गोरेगांव विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीमती विद्या ठाकूर, वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर, विलेपार्ले विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. पराग अळवणी आदी उपस्थित होते.

००

Featured post

Lakshvedhi