Saturday, 13 August 2022

शोर्य पुरस्कार

 महाराष्ट्रातील 11 पोलीसांना “केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट तपास पदक'जाहीर.

        नवी दिल्ली, दि. 13 : सन 2022 च्या “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा करण्यात आली. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 पोलीसांचा समावेश आहे.

            केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सन 2022 साठी उत्कृष्ट तपासासाठीचे "केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्टता तपास पदक" (Union Home Minister’s Medal for Excellence in Investigation ) आज जाहीर करण्यात आले. देशभरातील एकूण 151 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. 

            या पुरस्काराची सुरुवात सन 2018 पासून करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना "केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास" जाहीर झाले आहेत.

            राज्यातील पोलीसांमध्ये कृष्णकांत उपाध्याय, उप पोलीस आयुक्त, प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक, मनोज मोहन पवार, सहा. पोलीस निरीक्षक, दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक, अशोक तानाजी वीरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), श्रीमती राणी तुकाराम काळे, सहा. निरीक्षक, दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक, सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक, जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक, समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक यांचा समावेश आहे.

            यासह केंद्रीय अन्वेषण ब्यूरो ( सीबीआय)चे 15, मध्य प्रदेशमधून 10 पोलीस अधिकारी - कर्मचारी, उत्तर प्रदेशातून 10 पोलीस अधिकारी - कर्मचारी, केरळमधून पोलीस 8, राजस्थानमधून 8 पोलीस , पश्चिम बंगालमधून 8 आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासीत प्रदेशातून पोलीस आहेत. 28 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.                                                                                            

जन्मभूमी

 जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी                                                                                                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

       सातारा दि. 12 (जिमाका): ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हीताचे निर्णय घेतांना प्रेरणादायी ठरेल.’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

       तापोळा ता. महाबळेश्वर येथे तापोळा ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्यासह तापोळा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हीताचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे तीन हेक्टर पर्यंत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दुपटीने देण्यात येणार आहे. राज्याचा सर्वांगी विकास करण्याचा प्रयत्न राहणार असून राज्यात मोठे उद्योग उभाण्यावर भर देण्यात येणार आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकणाला कसा जोडला जाईल यासाठी दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

                                                                           0000

 

मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्याआयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत.

            मुंबई, दि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवरून शनिवार दि.१३ व मंगळवार दि.१६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

       या मुलाखतीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणारे उपक्रम, अंगणवाड्यांचा या उपक्रमातील सहभाग, शाळा पूर्व शिक्षण प्रकल्प, माझी कन्या भाग्यश्री योजना, बेबी केअर किट योजना, आदर्श अंगणवाडी योजना, कुपोषणमुक्त गाव ही संकल्पना व त्यासाठी सुरू असलेली कामे, आगामी काळातील विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे.  

00000

सल्लागार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ

सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन.

        मुंबई, दि.12 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन सेवेत पात्र उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षा व चाळणी परीक्षा घेण्यात येतात. सदर सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा व मुलाखती संबंधी कामे करण्यासाठी आयोगास बाह्य माध्यमांची , तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. यास्तव अशा तज्ज्ञ व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी आयोगाने https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर 'ADVISOR PORTAL' विकसित केले असून सदर संगणकीय पोर्टलद्वारे आयोगासाठी वरील कामे करण्यास इच्छुक असलेल्या विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

         ऑनलाईन अर्ज मागविण्यासंबंधी आयोगाने दिनांक 12 ऑगस्ट, 2022 रोजी https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर प्रसिद्धपत्रकातील सूचना व कार्यपद्धतीचे अवलोकन करावे. प्रसिद्धीपत्रकातील कार्यपद्धीतीनुसार इच्छुक तज्ज्ञ व्यक्तींनी आयोगाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावेत, अधिक तपशीलासाठी आयोगाचे https://mpsc.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी असे राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक व सहसचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


000                   


मा तुझे सलाम

 






ग्रापंचायतीं निवडणूक

 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबरला मतदान थेट सरपंचपदाचाही समावेश

            मुंबई, दि. 12 (रानिआ) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. 


            श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


            घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली. 


            विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: नंदुरबार: शहादा- 74 व नंदुरबार- 75. धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 व यावल- 02. बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 व लोणार- 02. अकोला: अकोट- 07 व बाळापूर- 01. वाशिम : कारंजा- 04. अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 व चांदुर रेल्वे - 01. यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 व झरी जामणी- 08. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, व देगलूर- 01. हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 व पालम- 04. नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17. पुणे: जुन्नर - 38, आंबेगाव - 18, खेड- 05 व भोर - 02. अहमदनगर: अकोले - 45. लातूर: अहमदपूर - 01. सातारा: वाई- 01 व सातारा - 08 व कोल्हापूर : कागल - 01. एकूण: 608


-0-0-0-



 

भारतीय


 

Featured post

Lakshvedhi