Tuesday, 5 July 2022

 नमस्कार

आपले मित्र ज्येष्ठ पत्रकार ॲड जनार्दन पाटील यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी

रायगड प्रेस क्लब आणि अलिबाग प्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 6 जुलै रोजी शोकसभेचे आयोजन सकाळी 11 वाजता आदर्श नागरी पतसंस्था सभागृह अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे

तरी आपण यावेळी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करू या

 दिलखुलास’ कार्यक्रमात पावसाळ्यातील

आजारांविषयी डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत

               मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 6 जुलै व गुरूवार 7 जुलै 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


            पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. या काळात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, याविषयी सविस्तर माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

 महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार.


राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार- ललित गांधी

……………………………………………………………

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन 2018 चा राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कारासाठी निवड केली त्या राजस्थानच्या श्रीमती रूमादेवी ज्यांनी अल्पशिक्षित व ग्रामीण भागातील असुनही भारतीय कलाकुसर जोपासताना 30 हजारहुन अधिक महिलांना रोजगार दिला, हार्वर्ड विद्यापिठाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन गौरव केला, अशा असामान्य कर्तृत्वान महिलेच्या ज्ञानाचा व कौशल्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांना व्हावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर व श्रीमती रूमादेवी यांच्या दरम्यान महत्वपुर्ण सामंजस्य करार चेंबरच्या मुंबई येथील मुख्यालयात संपन्न झाला.

        महाराष्ट्रातल्या सर्वच महिलांना त्यांच्या उदार निर्वाह साठी नवीन साधन उपलब्ध होईल, त्यांच्याकडे असलेल्या कलाकुसरीला वाव मिळेल आणि त्यांना नवीन प्रकारच्या कलाकृती शिकण्याचे प्रशिक्षण मिळेल व या माध्यमातून त्या स्वावलंबी होऊ शकतील या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ने रुमादेवी फाउंडेशन सोबत हा महत्त्वपूर्ण करार केलेला आहे अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

        या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील महिला कारागिरांच्या उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनासाठी व्यापक बाजारपेठ मिळविण्याकरिता संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर व रुमा देवी फाउंडेशन प्रयत्नशील राहील असे श्रीमती रुमा देवी यांनी यावेळी सांगितले.

         राज्यातील महिलांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण हे महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाउंडेशन तर्फे उपलब्ध करून देण्यात येईल तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला उद्योजकांकरिता उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, राज्य व केंद्र सरकारच्या योजना याविषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल असे महिला उद्योजक समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी सांगितले.

         श्रीमती रूमादेवी यांचा महाराष्ट्र चेंबर तर्फे ललित गांधी यांनी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, रुमादेवी फाउंडेशनचे विक्रम सिंग, युवा समितीचे चेअरमन संदीप भंडारी, पब्लिक रिलेशन व कॉर्पोरेट कम्युनिकेशन समितीचे चेअरमन आशिष गदरे, महिला समितीच्या को चेअरपर्सन कविता देशमुख, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.

 आषाढी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली भेट.

            मुंबई, दि. 5 :- पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.

            समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला.

            याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.

0000



 अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष

एनडीआरएफसह अन्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

 

            मुंबई, दि. 5 :- कोकणासह राज्याच्या काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

            राज्यातील संपूर्ण कोकणसह, अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात आहेत.

            आज दुपारी १२ वाजेपर्यंत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ११७ मिमी तर सांताक्रूझ येथे १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

            रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील २ नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला असून वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.

            पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाहीमात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरु असूनसद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथके कार्यरत आहेत.

००००


 


अजित पवार - राज्यपाल भेट

            मुंबई, दि. 5 : विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि. ५) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

0000

Ajit Pawar met Governor

            Mumbai Dated 1 : The newly elected Leader of the Opposition in the Maharashtra Legislative Assembly Ajit Pawar met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.



 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने

विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव

               मुंबई, दि. ४ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले.

            महाराष्ट्र विधानमंडळाचे दोनदिवसीय विशेष अधिवेशन रविवारपासून मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार व भरतशेट गोगावले यांनी नियम २३ अन्वये प्रस्ताव दाखल केला होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करणारा हा प्रस्ताव होता. विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर मतविभागणी घेण्यात आली, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाल्याने त्यांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे, असे अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले. या प्रस्तावाच्या बाजूने १६४ तर प्रस्तावाच्या विरोधात ९९ सदस्यांनी मतदान केले, तर ३ सदस्य तटस्थ राहिले.

००००००

विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नावे जाहीर.

            मुंबई, दि. 4 :- महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सभाध्यक्षांच्या नावांची आज विधानसभेत घोषणा केली. सदस्य सर्वश्री आशिष शेलार, योगेश सागर, चेतन तुपे, संग्राम थोपटे, संजय शिरसाट यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

०००००


 


 

Featured post

Lakshvedhi