Wednesday, 6 April 2022

 रु. 2,215 कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात


जीएसटी विभागाकडून सूत्रधारास अटक


 


 

                   मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय ४२) यांस दि.०४ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली.

                  मे. साई गुरु एन्टरप्राईज व इतर आठ कंपन्यांबाबत वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात या सर्व बोगस कंपन्या नंदकिशोर बालूराम शर्मा नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे आढळून आले. नंदकिशोर शर्मा हा अशा प्रकारच्या २६ बोगस कंपन्या चालवत असून, या कंपन्यांमार्फत आतापर्यंत २२१५ कोटी रुपयांची बोगस बिले बनवण्यात आलेली आहेत. या बोगस बिलांमध्ये हिरे, कपडे, स्टील इत्यादी वस्तूंच्या बिलांचा समावेश असल्याचे चौकशीत आढळून आले. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाला १२६ कोटी रुपयांची करचोरी उघड करण्यात यश आले आहे.

                 या कारवाईमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गणेश रासकर यांनी या प्रकरणातील आरोपी नंदकिशोर शर्मा यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यांतर्गत अटक केली आहे. महानगर दंडाधिका-यांनी शर्मा यांस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

                  ही धडक कारवाई सहाय्यक राज्यकर आयुक्त गणेश रासकर, अविनाश ब. चव्हाण, संजय मो. शेटे व इतर सहाय्यक राज्यकर आयुक्त यांनी संयुक्तपणे राबविली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्वाचे योगदान राहीले. ही संपूर्ण कारवाई संजय वि. सावंत, राज्यकर उपआयुक्त व राहूल व्दिवेदी (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण अ. मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

                  श्री. व्दिवेदी यांनी नुकताच राज्यकर सहआयुक्त अन्वेषण अ, मुंबई या पदाचा कार्यभार स्वीकारला असून, केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत बोगस बिलांसंदर्भात मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या मोहिमेतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणा-यांना कडक इशारा दिलेला आहे.


 



 ग्रामीण आवास’बाबत डॉ. राजाराम दिघे यांची

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

            मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 6 एप्रिल, गुरूवार 7 एप्रिल, शुक्रवार 8 एप्रिल व शनिवार 9 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. राज्य शासन प्रत्येक कुटुंबाला आपल्या हक्काचे आणि मालकीचे घर मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. विशेषतः ग्रामीण भागात घरांची निर्मिती व्हावी, सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासनाने महा आवास अभियान-ग्रामीणची सुरूवात केली असून त्याद्वारे लाखो गरिब, गरजू, भूमिहीन व बेघरांचे घरकुलाचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत अधिक सविस्तर माहिती राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.


००००

 पशुवैद्यकिय पदवीधरांची कत्तलखान्यांच्या

कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणुक.

- सुनील केदार.

            मुंबई, दि. 5 : नोंदणीकृत खाजगी पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्यांनी त्यांच्या कत्तलखान्याच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

            मंत्रालयात पशुवैद्यकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळेस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे .पी. गुप्ता यांच्यासह राज्यातील पशुवैद्यक अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री.केदार म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या तत्सम प्राधिकरणाद्वारे प्राधिकृत असलेल्या राज्यातील अधिकृत कत्तलखान्यांमध्ये नोंदणीकृत असलेल्या खाजगी पशुवैद्यकांना संबंधित कत्तलखान्याकरिता प्राण्यांच्या कत्तली संदर्भात कत्तलपूर्व तपासणी करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य आणि राज्याबाहेरील पशु कत्तलखान्यामध्ये कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. राज्यातील काही भागात निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येतात. मनुष्यबळ अपुरे असल्याने टँगींग करिता अडचणी येतात या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले. हा व्यवसाय चालतो यासाठी पशुवैद्यकांची कत्तलखान्याच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

            जनावरांचे परराज्यातुन आणि राज्यातून येणारे टँगींग होणे महत्त्वाचे असून कत्तली पूर्व टँगींग करून घेण्याचे या वेळी संबंधितांना त्यांनी सांगितले. या व्यवसायातील आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

 नाभिक समाजासाठी अभ्यासगट नेमणार

- धनंजय मुंडे

           मुंबई, दि. 5 : नाभिक समाजाचा अभ्यास करण्याबाबत लवकरच अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेण्यात येईल तसेच नाभिक समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेवून या समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            नाभिक समाजाच्या प्रश्नांबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, सहसचिव दिनेश डिंगळे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, दामोदर बिडवे, सुरेंद्र कावरे यासह या समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मंत्री श्री.मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागातंर्गत उच्चस्तरीय समिती नेमून नाभिक समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. नाभिक समाजासंदर्भात बार्टीने केलेला अभ्यास तसेच समाजाने सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी मांडलेल्या सूचनांबाबत कार्यवाही करण्यात येईल. अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड वर्गवारी करून नाभिक समाजाला ठराविक आरक्षण मिळावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी बैठकीत दिली.



 जादुटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीनेसुचविलेल्या सूचनांवर कार्यवाही करा.

- धनंजय मुंडे.

            मुंबई, दि. 5 : जादुटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीने सुचविलेल्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (P.I.M.C.) प्रकल्प कार्यान्वयन बैठक सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती,प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव, सहसचिव दिनेश डिंगळे,समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यावेळी उपस्थित होते. 

             सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, जादुटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (P.I.M.C.) ने सुचविलेल्या सूचनांबाबत सविस्तर शासननिर्णय काढण्यात यावा.समितीच्या कामासाठी जागा देणे तसेच आवश्यक त्या मनुष्यबळाची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून या कायद्याचा चांगला प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित रहावे याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा यासाठी आपण स्वत: ही या कायद्याच्या प्रचार व प्रसार अंमलबजावणी कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे मंत्री श्री.मुंडे यांनी बैठकीत सांगितले.

            यावेळी जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी समिती गठन ते आतापर्यंत समितीने केलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. भविष्यात राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती त्यांनी बैठकीत दिली. समितीला लागणारे मनुष्यबळ व कार्यालयीन कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत केली.

००००



 

सही बात

  : *ऊँची उड़ान भरने वाले पंछी भी अहंकार नहीं करते*

*क्यूंकि....*

*वो भी जानते है की आसमान में बैठने की जगह नहीं होती।*


*सुप्रभात*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *अगर "जिंदगी" को "कामयाब"*

    *बनाना हो तो याद रखें,*

*"पाँव" भले ही "फिसल" जाये*

  *पर "जुबान" को* 

*कभी मत फिसलने देना.*

    


*सुप्रभात*......... ☕


 

Featured post

Lakshvedhi