Friday, 18 February 2022


ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा

पाणथळाच्या संरक्षणाबरोबर पर्यटन वाढीस चालना मिळेल - मुख्यमंत्री

· मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने प्रस्ताव केंद्र शासनाकडे

            मुंबई, दि. १७ : ठाणे खाडी क्षेत्राला “रामसर” स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे. रामसर दर्जा मिळाल्यास पक्षी निरिक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ जागेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळतांना जागतिक पर्यटन नकाशावर देखील याची नोंद होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

            पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ९ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या चौथ्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

ठाणे खाडी

            ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौ.कि.मी क्षेत्रावर पसलेले आहे. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या पर्यावरणाबाबत महत्त्व असलेल्या क्षेत्रांना रामसर क्षेत्र असे म्हटले जाते.ठाणे खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी-प्रजाती आढळतात. त्यामुळे या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. ठाणे खाडीच्या अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित असून त्यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे.ठाणे खाडी परिसर रामसर क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर फ्लेमिंगोसह विविध पक्षी व प्रजातींचे अधिक संवर्धन होण्यास मदत मिळेल.

महाराष्ट्रातील रामसर स्थळे

            पाणथळांसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील “नांदूर मधमेश्वर”अभयारण्यास जानेवारी २०२० मध्ये रामसर स्थळाचा दर्जा दिला गेला. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये घोषित झालेले बुलडाण्यातील “लोणार”सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे. यानंतर ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यास महाराष्ट्रातील हे तिसरे रामसर स्थळ होईल....

रामसर दर्जा म्हणजे काय ?

            १९७१ मध्ये इराणमधील रामसर शहरात “रामसर परिषद” झाली. या परिषदेत जगातील महत्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिकदृष्टीने महत्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना “रामसर स्थळ” घोषित करण्याचे निश्चित करण्यात आले. पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्र किनारे, भातखाचरे, इ. जागांचा समावेश करण्यात आला.

जगात २४२४ पाणथळांना रामसर स्थळे

            भारताने “रामसर” करारावर १९८२ मध्ये स्वाक्षरी करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचचले. सध्या जगातील २४२४ पाणथळांना “रामसर” स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. यात भारतातील ४९ स्थळांना “रामसर स्थळा”चा दर्जा मिळाला आहे.

...

 महिला धोरणाच्या जाणीवजागृतीत सामाजिक संस्थांचा सहभाग असावा

- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            मुंबई, दि. 17 : अनेक सामाजिक संस्था महिलांच्या प्रश्नांबाबत काम करतात. महिला धोरणाच्या ग्रामपातळीपर्यंत जाणीवजागृतीसाठी महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही महिला धोरणात सहभाग करून घ्यावा, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            राज्याच्या महिला धोरणात महिलांच्या समस्यांचा व्यापक प्रमाणात विचार करण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार व पायाभूत सुविधा याबाबत उपाययोजना केल्या आहेत. महिला धोरण काळानुरूप अधिक सक्षम आणि प्रभावी करणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

            महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा याबाबत सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक असावा. यासाठी शिक्षण विभागात आर्थिक तरतूद असावी. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कायदे आहेत परंतु या कायद्यांबाबत विविध पातळ्यांवर जनजागृतीची गरज आहे. राज्य शासनाच्या प्रत्येक विभागावर या धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी असल्यामुळे सर्व विभांगाचा यामध्ये समावेश असणार आहे.

             सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना महिला धोरणामुळे संधी मिळाली. शहरी व ग्रामीण भागातील महिला आज विविध क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हा प्रवाह असाच सुरू ठेवण्यासाठी त्यात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे. महिलांना समान न्यायाचे मूल्य प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. या धोरणाच्या जाणीवजागृतीसाठी सामाजिक संस्थाची मदत घेणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

            या बैठकीस ‘माविम’च्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, सहसचिव श.ल.अहिरे, महिला व बालविकासचे आयुक्त राहुल मोरे ,अवर सचिव महेश वरुडकर उपस्थित होते.

----



 

 महाराष्ट्र चेंबरने राज्यातील शिक्षण संस्था व उद्योगजगताच्या विकासाकरीता समन्वय साधावा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

--------------------------------

उद्योगांच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी वर्षभरात ३०००० विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार: ललित गांधी

---------------------------------

राज्यातील उद्योग, व्यापार क्षेत्राच्या माध्यमातून शिक्षण संस्थांचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने निवेदनाद्वारे केलेल्या सूचनाबाबत सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. महाराष्ट्र चेंबरने राज्यातील शिक्षण संस्था व उद्योगजगताच्या विकासाकरीता समन्वय साधावा असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या व उद्योग, व्यापार क्षेत्रांकडून उपलब्ध करून देण्यात येणारे रोजगार तसेच शिक्षण संस्था आणि व्यापार, उद्योग यांचा योग्य तो समन्वय साधण्याचे कार्य महाराष्ट्र चेंबर करेल असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन उद्योगांला प्रशिक्षित मनुष्यबळ, कौशल्याधारित शिक्षण, सरकारने सुरु केलेल्या विविध योजना व शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या याविषयावर चर्चा केली.

महाराष्ट्र राज्याला अग्रेसर राज्य बनविण्याच्या दृष्टीने केलेल्या भरीव कार्याबद्दल महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

चर्चेप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबर राबवित असलेल्या बिझनेस सोल्युशन पॉलीक्लिनिक प्रोग्राम ( BSPP ) या उपक्रमाबद्दल माहिती दिली व उद्योगांची प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज तसेच विध्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाधारित कौशल्यावर चांगली नोकरी मिळण्याकरीता येणाऱ्या वर्षभरात ३०००० विध्यार्थ्यांना इंडस्ट्री इंटर्नशिप उपक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाअंतर्गत विध्यार्थ्यांना उद्योगांशी जोडण्यासाठी उद्योगांची प्रक्रिया, उत्पादन, आव्हान क्षेत्र, उद्योगात येत असलेल्या विविध अडचणी यासारख्या आवश्यक मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र चेंबरने जाहीर केलेल्या महिला उद्योजकता धोरणाची थोडक्यात माहिती देऊन, महाराष्ट्र चेंबर महिलांकरीता राबवित असलेल्या कार्याची माहिती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

राज्यातील ६ विभागात महाराष्ट्र चेंबर उभारीत असलेल्या क्लस्टरची व त्यामधून सुक्ष्म, लघु उद्योगांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी दिली.

शिष्टमंडळात ट्रस्ट बोर्डचे आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, रवींद्र माणगवे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, सरकार्यवाह सागर नागरे होते.

Ma tuze salam


 

 मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीसेवेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

            ठाणे, दि. 17 (जिमाका) : देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेलापूर जेट्टी आणि बेलापूर मुंबई वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

            महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत बेलापूर येथून सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आणि बेलापूर जेट्टीच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री श्री. ठाकरे, केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, मंदा म्हात्रे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्वाचा असून देशातील पहिली वॉटर टॅक्सी महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईतून सुरू झालेल्या सेवेचे अनुकरण देशभर केले जाते हे मुंबई ठाणे दरम्यानच्या पहिल्या रेल्वेसेवेवरून दिसून आले आहे. जलवाहतुकीच्या या सेवेचे देखील देशात अनुकरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग जनसेवेसाठी

            छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर हुकूमत असली पाहिजे या भावनेने त्याकाळात कल्याणमध्ये आरमाराची बांधणी केली, तेंव्हापासूनच या परिसराचे महत्व अधोरेखित झाले. त्यानंतर इंग्रजांनी रेल्वे आणली. आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्व आपण किती ओळखतो आणि त्याचा जनतेला किती उपयोग करून देतो याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर

            विकासात दळणवळणाची सेवा महत्वाची भूमिका बजावते. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरु झाली. नवी मुंबईला मुंबईशी आणि एलिफंटा लेण्यांना जोडणारी ही जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

            समुद्राचा उपयोग जलवाहतुकीसारख्या प्रकल्पांसाठी वाढला पाहिजे. येत्या समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्यासंदर्भातील प्रकल्प प्रगतीपथावर असून हा क्रांतिकारक टप्पा असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई परिसरात परिवहनाचे जाळे विकसित

            मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील 55 उड्डाणपूल, सागरी किनारा मार्ग, मुंबई- कोकणाला जोडणारा सागरी मार्ग, शिवडी न्हावा शेवा मार्ग असे परिवहनाचे जाळे विकसित केले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, असून ती जगाशी हवाई मार्गाने जोडली. पण मुंबई महानगर परिसराला जोडणारी जलवाहतूक सेवा महत्वाची आहे, कामासाठी, उद्योग व्यवसायासाठी मुंबईत येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ही सेवा अधिक उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईत पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य

            नवी मुंबई विमानतळासोबतच नवी मुंबई स्पोर्टस सिटी म्हणून विकसित होत आहे हे सर्व लक्षात घेता येथे अनेक पायाभूत सुविधांचा राज्य शासनामार्फत विकास केला जात आहे. गुंतवणूक करतांना उद्योजक पायाभूत सुविधांचा विचार करतात त्यादृष्टीनेही या सर्व कामांना वेगळे महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

            लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. जनतेच्या हिताचे काम करतांना केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला बलशाली बनवण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महाराष्ट्र देईल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून महाराष्ट्रात १३१ प्रकल्प

- केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल

            केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल म्हणाले, सागर किनारपट्टी जिल्ह्यात सागरमाला प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे. यातून सागरतटीय जिल्ह्यातील लोकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्नआहे. यातून रोजगार निर्मिती करून आर्थिक विकासाचे चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.कोरोना काळातही बेलापूर जेट्टीचे काम सुरु राहिले. नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या जलवाहतूक सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. आणखी काही जे्ट्टी मुंबई हार्बर भागात प्रस्तावित आहेत.

            मुंबई ते अलिबाग रो रो सेवा सुरु झाली आहे. वॉटर टॅक्सीला मिळणारा प्रतिसाद पाहून जलवाहतूकीसाठी अतिरिक्त जेट्टीचे बांधकाम केले जाईल. केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, जेट्टीचे निर्माण, कौशल्य विकास अशा विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. सागरमाला कार्यक्रमातून जलद आर्थिक विकासाला चालना देण्यात येत आहे. १.०५ लाख कोटीचे १३१ प्रकल्प महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यात सागरमाला कार्यक्रमांतर्गत ४६ प्रकल्पास २७८ कोटीचे वित्तीय सहाय्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

            पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या सक्षमीकरणाचे काम करण्यात येत असल्याचे सांगतांना त्यांनी ससुन डॉकसह सिंधुदूर्ग आणि रायगडच्या बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना संकटातही विकासकामांना गती - उपमुख्यमंत्री

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मुंबई महानगरच्या परिवहन सेवेच्या विकासासाठी शासन मागील दोन वर्षांपासून काम करत आहे. चक्रीवादळ, अतिवृष्टीसारखे नैसर्गिक संकट आले, कोरोना सारखे संकट आले, पण या अडचणीतून विकासकामांना गती देण्याचे काम शासनाने केले. मेट्रो , मोनो नंतर जलवाहतूक प्रकल्प आज सुरु होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडकरांसाठी आजचा दिवस अभिमानाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

            गेट वे ऑफ इंडियाजवळ केंद्र शासनाच्यातर्फे आणखी एक प्रकल्प प्रस्तावित आहे. तो लवकर सुरु व्हावा यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

जलवाहतुकीमुळे नवी मुंबई, ठाणेकरांना लाभ

            जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे. दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे, नवी मुंबईकरांना याचा लाभ होईल. यामध्ये पर्यावरणाचाही विचार आहे. सर्व मिळून या कामांना गती देऊ या. आज चार मार्गावर जल टॅक्सी सेवा सुरु होत आहे. प्रवाशांचा वेळ, पैसा, श्रम तर यामुळे वाचेलच परंतु प्रदुषणालाही आळा बसेल, असे श्री. पवार यावेळी म्हणाले.

            एमएमआरक्षेत्राला लागून खाडी आहे त्यामुळे जलवाहतूकीला चालना देऊन या सुविधेचा लाभ घेता आला पाहिजे. सुरक्षित प्रवासाला चालना देत ही जलवाहतूक सेवा सुरु केली तर प्रवाशांनाही सुलभ सुविधा उपलब्ध होईल. पायाभूत सुविधांसाठी निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आग्रह असतो असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी सगळे मिळून काम करू असे आवाहनही त्यांनी केले. मेट्रो चे काम पूर्ण झाले, जलवाहतूक सुरु झाली तर एमएमआरचे रुप एकदम पालटलेले दिसेल असेही ते म्हणाले.

जलवाहतुकीमुळे रस्ते वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

            नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील वाहतूकीस आज या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून चालना देण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, नवी मुंबईकरांना जलवाहतूक सेवा उपलब्ध झाली तर रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. ठाणे- मुंबई सेवाही लवकरच सुरु होईल. एमएमआरक्षेत्रातील वाढत्या नागरिकीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम एमएमआरडीए, सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सागरमाला कार्यक्रमातून केंद्र आणि राज्याच्या ५०:५० टक्क्यांच्या सहभागातून बंदर विकासाच्या कामाला गती दिल्याचे ते म्हणाले.

            नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, अशा विविध ठिकाणाहून जलवाहतूक सुरु झाल्यास प्रवाशांना उत्तम परिवहन सेवा उपलब्ध होईल. काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय नौवहन मंत्र्यांचे त्यांनी आभार मानले.

16 लाख लोकांना जलवाहतुकीची सेवा – बंदरे विकास मंत्री अस्लम शेख

बंदरे विकास मंत्री श्री. शेख म्हणाले, कोरोनाकाळातही वर्षानुवर्षे रखडलेली कामे एकेक करून पूर्ण करत आहोत. जलवाहतूकीची ही सेवा आज 16 लाख लोकांना उपलब्ध करून देत असलो तरी ही सेवा अधिक व्यापक करण्याची गरज आहे. नॅशनल वॉटर वेजचे, जेट्टी बांधण्याचे काही प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यास मान्यता मिळाली तर वाहतूक कोंडी फोडण्यास नक्कीच मदत होईल.

            जलवाहतूकीमध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच महाराष्ट्रात जलवाहतुकीच्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज आहे, असेही श्री. शेख यावेळी म्हणाले.

कोरोना संकटातही विकासकामांना चालना - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

            मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातून समुद्र पाहण्यास येणाऱ्यांना या वॉटर टॅक्सीची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. यातून पर्यटकांची सोय होईल, पर्यटन वाढेल. देश आणि राज्यभरातून येणाऱ्या लोकांना ही सेवा उपयुक्त सेवा देईल. कोरोना संकटातही विकासकामांना शासनाने चालना दिली. त्याला कुठेही निधी कमी पडू दिला नाही, असे राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले. यावेळी खासदार श्री. विचारे, आमदार श्रीमती म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

            महाराष्ट्र सागरी मंडळाला (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे, तिकीट काऊंटरचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. वॉटर टॅक्सीला ध्वजांकन करून उपमुख्यमंत्री श्री.पवार, मंत्री श्री. शेख आणि अधिकारी त्याच वॉटर टॅक्सीतून मुंबईकडे रवाना झाले. जलवाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कंत्राटदारांचा यावेळी उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

000



Featured post

Lakshvedhi