Saturday, 18 September 2021

 वेतन संहिता, 2019 प्रारुपाबाबत 45 दिवसात सूचना किंवा आक्षेप

नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

            मुंबईदि.17:  वेतन संहिता, 2019 च्या कलम 67 च्या पोटकलम (1) आणि (2) तसेच सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम,1897 (1897 चा 10) याच्या कलम 24 याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ/ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन आणि महाराष्ट्र किमान वेतन नियम, 1963 आणि महाराष्ट्र वेतन प्रदान नियम, 1963 यांचे अधिक्रमण करुन महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले नियमांचे पुढील प्रारुपत्याद्वारे बाधित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी उक्त कलम 67 च्या पोट कलम (1) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे प्रसिध्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये ही अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून 45 दिवस समाप्त झाल्यानंतर हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल. वेतन संहिता, 2019 अधिसूचना 3.9.2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

            45 दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी या प्रारुपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून कामगार आयुक्तकामगार भवनई ब्लॉकबांद्रा-कुर्ला संकुलवांद्रे (पूर्व)मुंबई-400059 यांना किंवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलवर प्राप्त होतील असे कोणतेही आक्षेप/सूचना शासकनाकडून विचारात घेण्यात येतील.

0000

 

 

 

सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 प्रारुपाबाबत 45 दिवसात

सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

            मुंबईदि.17:  सामाजिक सुरक्षा संहिता, 2020(2020 चा 36) याच्या कलम 154 व कलम 156 तसेच सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, 1897 (1897 चा 10)याच्या कलम 24 याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन आणि प्रसुती लाभ अधिनियम, 1961 (1961 चा 53) अन्वये केलेले महाराष्ट्र प्रसुती लाभ नियम, 1965, उपदान प्रदान अधिनियम, 1975 (1972 चा 39) अन्वये केलेले उपदान प्रदान (महाराष्ट्र) नियम, 1972 व असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 (2008 चा 33) अन्वये केलेले महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम, 2013 यांचे अधिक्रमण करुनमहाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले नियमांचे पुढील प्रारुपत्याद्वारे बाधित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी,कलम 154 च्या पोट कलम (1) व कलम 156 च्या पोट- कलम(1) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये ही अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून 45 दिवस समाप्त झाल्यानंतर हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 अधिसूचना 27.8.2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

            45 दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी या प्रारुपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून कामगार आयुक्तकामगार भवनई ब्लॉकबांद्रा-कुर्ला संकुलवांद्रे (पूर्व)मुंबई-400059 यांना किंवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलवर प्राप्त होतील असे कोणतेही आक्षेप/सूचना शासकनाकडून विचारात घेण्यात येतील.

०००

 नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा शासन निर्णय निर्गमित;

१०० खाटांऐवजी ३०० खाटांच्या रुग्णालयास मान्यता

पालकमंत्री अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे आभार

 

            मुंबईदि. १७-  नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांवरुन ३०० खाटांत श्रेणीवर्धन करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली असूनयाबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या रुग्णालयात खाटांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

            नांदेड शहरासह जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता जिल्हा रुग्णालयातील १०० खाटा अपुऱ्या पडत होत्या. कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या काळात या रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. दरम्यानया जिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याची मागणी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. त्यानुसार नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० खाटांवरुन ३०० खाटा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            ३०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाची नवीन अत्याधुनिक इमारत सध्याच्याच जागेत बांधली जाणार असूनवाढीव आवश्यकतेनुसार पदनिर्मितीही केली जाणार आहे. या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनामुळे जिल्ह्यातील गरजूंना वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार आणि वाढीव सुविधा उपलब्ध होतील. मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या ७४ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा रुग्णालयाचे ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याचा शासन निर्णय निर्गमित होणे ही नांदेडकरांसाठी मोठी भेट असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या निर्णयासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.

  

तीन राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती

 

            मुंबई दि 17 : महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्त म्हणून डॉ. सुरेशचंद्र गैरोलासमीर  सहायआणि राहुल भालचंद्र पांडे या तिघांची नेमणूक करण्याची अधिसूचना  काढण्यात आली.

 या तिघांच्या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मान्यता दिली असून राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना 16 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली.

         श्री.सुरेशचंद्र गैरोला हे भारतीय वन सेवेचे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त अधिकारी असून भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषदेचे महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

        श्री.समीर सहाय हे भारतीय वन सेवेतील निवृत्त अधिकारी असून त्यांनी यापूर्वी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे अतिरिक्त निवासी आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तसेच वन खात्यात कार्यरत असताना त्यांनी मराठवाड्यात रोजगार हमी योजना व वन तलावाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले आहे.

            श्री.राहुल भालचंद्र पांडे हे वरिष्ठ पत्रकार असून ते कायद्याचे पदवीधर आहेत. त्यांनी राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीही संपादन केली आहे.  

00000


 

 

 #सफर_विज्ञानविश्वाची


गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं..

कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाश्यात काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते..


त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता..


त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात कुजबूज करत हसत होते..


‘आपल्यालाच हसतायेत’ हे ठाऊक असूनही तो साधा सावळा तरुण त्यांचाकडं लक्ष्य न देता आपल्याच विचारात दंग होता आणि हे बघून त्याच्याबद्दल कुजबूज करणारे जास्तच हसत होते..तेवढ्यात ‘त्या’ तरुणानं अचानक उभं रहात रेल्वेची साखळी खेचली..


एव्हाना रेल्वेनं वेग पकडला होता पण या तरुणानं साखळी ओढल्यानं रेल्वे अचानक थांबली..


हा आपली तक्रार करतो की काय?याला इथं उतरायचं तर नसेल?वेडा तर नाही? सहप्रवाश्यांच्या मनात एक ना अनेक शंका डोकावल्या..


काहींनी तर त्याला बावळट,मुर्ख म्हणत शिव्याही घातल्या..

तेवढ्यात डब्यात गार्ड आला आणि त्यानं अंमळ रागातच विचारलं,”कुणी आणि का साखळी खेचली रे ?” 


साखळी खेचणारा साधासा तो तरुण पुढं आला ‘मी खेचली’ त्याचं हे उत्तर ऐकून गार्डनं त्याला खालून वर न्याहाळलं आणि काही बोलणार तोच तरुण पुढं सांगू लागला,”मला वाटतं इथून साधारण काही फर्लांग अंतरावर रेल्वेचा रूळ तुटलाय.”


“ॲंऽऽ तुला इथूनच कसं कळलं बुवा?” गार्ड अद्यापही रागातच होता..

“महोदय..गाडीच्या नैसर्गिक वेगात थोडा फरक पडलाय आणि रुळांतून येणारा आवाजही मला काहीसा बदलल्यासारखा वाटतोय..ही धोक्याची घंटा आहे..”


“अच्छा एवढी हुशारी?चल बघूनच घेऊ” म्हणत गार्ड त्या तरुणाला घेऊन डब्यातून खाली उतरला..


फर्लांगभर अंतरावर बघतो तर काय? एका ठिकाणी रुळाचा जोड खरोखरच निखळला होता आणि नटबोल्ट इतस्तत: पसरले होते..

हे सगळं बघून इतर प्रवाश्यांचे अन् विशेषत: इंग्रजांचे तर डोळे पांढरे झाले..


त्या साध्याश्या तरुणाच्या समजदारीमुळं मोठा अपघात टळला होता..लोकं त्याचं कौतूक करू लागले..

इंग्रजासोबतच गार्डलाही स्वत:ची क्षणभर लाज वाटली ‘आपलं नाव?’ त्यानं अदबीनचं तरुणाला विचारलं..

“मी मोक्षगुंडम विश्वेशरैय्या..मी एक अभियंता आहे”


त्याचं नाव ऐकून सगळेच क्षणभर स्तब्ध झाले कारण या नावानं तोपर्यंत देशभरात ख्याती मिळवली होती..


लोकं त्या तरुणाची माफी मागू लागले..”अरे पण तुम्ही माफी का मागताय?” विश्वेशरैय्यांनी हसत विचारलं..

“ते..आम्ही..तुमची जरा खिल्ली..”

“मला तर नाही बुवा काही आठवत” मंद स्मित करत विश्वेशरैय्यांनी सगळ्यांना लागलीच माफही करून टाकलं..


१८८३साली अभियांत्रिकी परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विश्वेश्वरैय्यांचं पहिलं प्रेम ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ अर्थात सिव्हिल इंजिनिअरींग..


आपल्या करीयरच्या पहिल्या काही वर्षातच त्यांनी कोल्हापुर-बेळगाव-धारवाड-विजापूर-अहमदाबाद-पुणे इथं शहरांसाठी राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत भरपूर काम केलं..


१९०९ साली त्यांची म्हैसुर राज्याचा मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली सोबतच रेल्वेचं सचिवपदही मिळालं..


तिथं ‘कृष्णराज सागर’ धरणनिर्मितीत त्यांच्या योगदानाबद्दल भरपूर चर्चा झाली कारण यामुळं प्रचंड मोठं क्षेत्र पाण्याखाली आलं होतं आणि वीजनिर्मितीसोबतच म्हैसुर-बंगलोर या शहरांना पाणीपुरवठाही झाला..


‘कृष्णराज सागर’ धरण विश्वेशरैय्यांच्या तांत्रिक कौशल्याचं अन् प्रशासकिय वकुबाचं प्रतिक ठरलं..


आता सोपं वाटत असेल पण त्याकाळी इतकी मोठाली धरणं बांधणं तांत्रिकदृष्ट्या प्रचंड अवघड होतं..

हायड्रोलिक इंजिनिअरींग तितकीशी विकसित नव्हती आणि सगळ्यात मोठं आव्हान तर सिमेंटचं होतं..

इतकं सिमेंट आणायचं कुठून? तेव्हा देश याबाबतीत संपुर्णपणे आयातीवर अवलंबून होता आणि थोडक्यात सांगायचं तर ऐपतही नव्हती..


जलाशयात पाणी नियंत्रित करण्यासाठी विश्वेशरैय्यांनी पुस्तकापलिकडं जात विशेष तांत्रिक प्रयोग केले..

त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..


यातल्या १७१ दरवाज्यांपैकी ४८ लोखंडी दरवाजे भद्रावतीच्या पोलाद कारखान्यात बनवले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रत्येक दरवाज्यावर दहा टनांचा भार असूनही ते स्वत: वर खाली होऊ शकत होते..


जेव्हा जलाशयात पाण्याची पातळी वाढायची

तेव्हा पाणी विहिरीत पडायचं ज्यामुळं विहिरीची पातळी वाढून स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडून जायचे आणि अतिरिक्त पाणी निघून जायचं अन् विहिरीची पातळी जशी कमी व्हायची तसे दरवाजे आपोआप बंद होऊन पाण्याचा प्रवाह थांबत होता..


संपुर्ण जगभरात असं अभिनव तंत्र पहिल्यांदाच वापरलं जात होतं याची नंतर युरोपासह इतर अन्य देशात काॅपी झाली..


‘धरणाची उंची न वाढवता त्याची जलक्षमता वाढवणं’ ही कल्पना कुणाच्या स्वप्नात देखील आली नसेल पण 

विश्वेशरैय्यांनी ते करून दाखवलं ते ही इथं पुण्यातल्या खडकवासल्यात..


‘मुठा’ नदीच्या पुराला नियंत्रित करण्यासाठी त्यांनी खडकवासला धरणावर पहिल्यांदाच स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग केला होता..या प्रयोगाचं त्यांनी पेटंटही घेतलं होतं..


धरण निर्मितीसोबतच विश्वेश्वरैय्यांनी देशाच्या औद्योगिक विकासातही भरिव असं योगदान दिलं..

धरण आलं तशी वीज आली आणि जशी वीज आली तसे उद्योगधंदे बहरू लागले..


औद्योगिकीकरणाचे खंदे समर्थक असल्यानं त्यांनी बंगलोर इथं ‘भारतीय विज्ञान संस्थान’ या ठिकाणी धातुकाम विभाग-वैमानिकी-औद्योगिक दहन आणि अभियांत्रिकी अश्या अनेक विभागांची पायाभरणी केली..


औद्योगिकीकरणास त्यांचा फक्त ढोबळ पाठिंबा नव्हता यामागं देशांतर्गत अशिक्षितपणा-गरीबी-बेरोजगारी-अनारोग्य याबाबत मुलभूत असं चिंतन होतं..


उद्याेगधंद्यांचा अभाव-सिंचनासाठी मान्सूनवरची अवलंबिता-पारंपरिक कृषी पद्धती-प्रयोगांची कमतरता यामुळं विकासात येणारा अडथळा रोखण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम करत आपल्या कार्यकाळात म्हैसूर राज्यातल्या शाळांची संख्या ४५००वरून १०,५०० पर्यंत नेली फलस्वरुप विद्यार्थ्यांची संख्या १,४०,००० वरून ३,६६,००० पर्यंत वाढली..


मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहासोबतच पहिलं फर्स्ट ग्रेड काॅलेज सुरू करण्याचं श्रेयही त्यांचंच..

सोबत म्हैसूर विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता..


हुशार मुलांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती,शेतकी-अभियांत्रिकी-औद्योगिक प्रशिक्षणासाठी महाविद्यालये यासाठी त्यांनी दुरगामी नियोजन केलं..


‘उद्योगंधदे म्हणजे देशाची जीवनरेखा’ असं मानत त्यांनी रेशम-चंदन-धातू-स्टिल अश्या उद्योगांना जर्मन आणि इटालियन तंत्रज्ञांच्या मदतीनं विकसित केलं..


त्यांची धडपड आणि आशावाद निव्वळ स्वप्नाळू होता असं नाही तर ‘फंड’ हे वास्तव ध्यानात घेऊन त्यांनी बॅंक ऑफ म्हैसूरची मुहूर्तमेढ रोवली..


तब्बल ४४वर्षे सक्रिय सेवा देऊन १९१८साली विश्वेश्वरैय्या लौकिकार्थानं निवृत्त झाले तरी त्यांनी समाजजीवनातलं आपलं काम सोडलं नाही किंबहुना अडीअडचणीला भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित करून अनेक बंद पडलेली कामं मार्गी लावली..


म्हैसूरमध्ये ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्ट फॅक्टरीचं स्वप्न बघत त्यांनी एचएएल आणि प्रिमिअर ऑटोमोबाईलचं बीज पेरलं आणि निवृत्तीनंतरही बख्खळ काम करून ठेवलं..


आपल्या आयुष्यात संख्य असंख्य बहुमानांनी सन्मानित झालेल्या त्यांना १९५५ साली वयाच्या ९५व्या वर्षी जेव्हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहिर झाला तेव्हा त्यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं,”मला या उपाधीनं सन्मानित केलं म्हणून मी तुमचं कौतूक करेल अशी अपेक्षा तुम्ही बाळगलीत तर तुमच्या पदरी निराशा पडेल..मी सत्यांच्या मुळाशी जाणारा माणुस आहे”


नेहरूंनी त्यांच्या या पत्राची प्रशंसा करत त्यांना “राष्ट्रिय घडामोडींवर बोलणं-शासकिय धोरणांवर टिका करण्याचं स्वातंत्र्य नेहमी अबाधित असेल..पुरस्कृत करणं म्हणजे शांत बसवणं नव्हे”असं उत्तर दिलं..


वयाची शंभरी उलटल्यानंतरही विश्वेशरैय्या कार्यमग्न राहिले आणि १४ एप्रिल १९६२ या दिवशी रुढार्थानं हे जग कायमचे सोडून गेले असले तरी इतिहासात त्यांचं नाव कायमचं कोरून गेलं..


विश्वेश्वरैय्या हे ना जन्मानं महान होते,ना त्यांना कुठला दैदिप्यमान वारसा होता,ना हे महात्म्य त्यांचावर कुणी थोपवलं होतं..

कठिण परिश्रम-ज्ञानपिपासु वृत्ती-अथक प्रयत्न-समाजाभिमुख वर्तन यामुळं त्यांना हे ‘महात्म्य’ प्राप्त झालं होतं..


प्रचंड बुद्धिमान अभियंता-तितकेच कुशल प्रशासक असणाऱ्या विश्वेशरैय्यांचा आज जन्मदिन..

त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणूनही साजरा केला जातो..

या ऋषितुल्य व्यक्तित्वाला विनम्र अभिवादन💐 


#ByPradnyawant

©डॉ.प्रज्ञावंत देवळेकर

 रामदास फुटाणे...यांचा सिक्सर 

********************************

विद्यार्थी : सर ड्राय डे म्हणजे काय हो ????

मास्तर : कोरडे दिवस. 

विद्यार्थी : विस्कटून विस्कटून सांगा सर.....

मास्तर : या दिवशी दारूची दुकाने बंद असतात.....

विद्यार्थी : का सर ? 

मास्तर : अरे आपल्याला महापुरुषांची आठवण व्हावी असा शासनाचा यामागचा उद्देश आहे...

विद्यार्थी : मग सर एकतीस डिसेंबरला विशेष परवाने देऊन सरकार उत्तेजन का देतं ? 

मास्तर : लोकांनी नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत करावं म्हणून. 

विद्यार्थी : म्हणजे आनंदासाठी पिण्यास हरकत नाही असंच ना ? 

मास्तर : हो तसंच. 

विद्यार्थी : मग सर , स्वातंत्र्य दिनी , प्रजासत्ताक दिनी जनतेला दु:ख होत असतं का ? 

मास्तर : ........... 

विद्यार्थी : दु:खामुळे ड्राय डे असतो का ? 

मास्तर : ........... 

विद्यार्थी : बोला ना सर. 

मास्तर : हा तुझा विषय नाही. तू पीत नाहीस ना ? मग गप्प बस. 

विद्यार्थी : पण सर , तीस जानेवारीला दु:खामुळे तर दोन ऑक्टोबरला आनंदामुळे ड्राय डे , असं असतं का ? 

मास्तर : तसं नाही बाबा. थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला त्यांची आठवण राहावी म्हणून ड्राय डे असतो.

विद्यार्थी : सर , ड्राय डेच्या दिवशी महापुरुषांची आठवण येते हे भन्नाट आहे. पण अगोदर सवय लागली पाहिजे. ना ? 

मास्तर : तोच तर सरकारचा उद्देश आहे. 

विद्यार्थी : म्हणजे... जाणून बुजून शासनाने लोकांना दारूबाज केले. 

ड्राय डेमुळे तर कळले , महात्मा गांधी आज गेले.........

विद्यार्थी : सर देव जळी-स्थळी-पाषाणी आहे ना ? 

मास्तर : हो. 

विद्यार्थी : मग सर दारूची दुकानं मंदिरापासून पंचाहत्तर मीटर दूर का ठेवतात ? 

विद्यार्थी : देवाला पंचाहत्तर मीटर पलीकडचं दिसत नाही का ? 

मास्तर : तसं नाही रे बाळा. मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे. 

विद्यार्थी : पण काही देवांना दारूचा नैवेद्य लागतो. 

मास्तर : तुझं सामान्य ज्ञान बरंच बरं दिसतंय. 

विद्यार्थी : देवाचं सोडा , पण राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासमोरही वाईन शॉपला बंदी आहे. 

मास्तर : हो. बरोबरच आहे ते. 

विद्यार्थी : पण सर एखादा राष्ट्रपुरुष पिणारा असेल तर ? 

विद्यार्थी : सांगा ना सर , वाईन शॉप बंद केल्यास त्या पुतळ्यास काय वाटेल ? 

मास्तर : राष्ट्रपुरुष तसे नसतात रे. 

विद्यार्थी : सर , आजकालचे बहुतेक आमदार-खासदार तर घेणारेच आहेत. ह्यांच्यापैकीच काहीजण उद्याचे राष्ट्रपुरुष असणार. त्यांचे पुतळे होणार. समोर वाईन शॉप नसेल तर त्या पुतळ्यांना काय वाटेल सर ? 

विद्यार्थी : बोला ना सर... 

विद्यार्थी : सर आचारसंहिता म्हंजी काय ? 

मास्तर : अरे , निवडणुकीत पाळायचा आचार-विचार. 

विद्यार्थी : तसं नाही , विस्कटून विस्कटून सांगा. 

मास्तर : अरे बाबा , मतदारांना उमेदवाराने किंवा पक्षाने प्रलोभने दाखवू नयेत यासाठी काही नियम केलेले असतात.

विद्यार्थी : पण सर , पुतळ्यांना-फोटोंना का झाकलं जातं ? 

मास्तर : गांधी , नेहरू , फुले , आंबेडकर यांच्या चित्रांचा वापर करू नये म्हणून. 

विद्यार्थी : पण सर , मतदानाच्या ठिकाणी महापुरुषांची चित्रंसुद्धा झाकली जातात. 

मास्तर : हो , त्यांचा परिणाम होऊ नये म्हणून. 

विद्यार्थी : सर , महापुरुषांचा वाईट परिणाम होतो ? 

विद्यार्थी : बोला ना सर , महापुरुष का झाकतात ? 

विद्यार्थी : सर हत्ती झाकले , कमळ झाकलं , पण हाताचं काय करणार ? 

विद्यार्थी : सर एक आयडिया. उमेदवाराला सत्यनारायण घालायला सांगा. मतदार आपोआप घरी येतील. 

मास्तर : हुशार आहेस! 

विद्यार्थी : आणखी एक आयडिया सर... 

मास्तर : बोल बाळा. 

विद्यार्थी : मतदाराने स्वत:चेच तळहात पाहिले तर त्याचा त्याच्या मनावर परिणाम होईल आणि तो काँग्रेसला मत देईल. त्यामुळे प्रत्येक मतदाराला हातमोजे दिले तर ?.. 

ह्या पोराला ' वाह्यात म्हणावं की विचारवंत ' हे गुरुजींना कळेना. तरी नवीन शैक्षणिक धोरणानुसार उत्तर देणं भाग होतं. ' मतदारांना हातमोजे वाटण्याची विनंती आयुक्तांना करू ', असं पुटपुटत गुरुजींनी चष्म्याची काच पुसली. पुटपुटत पुटपुटत आपण वाईन शॉपजवळ कधी आलो , ते त्यांचं त्यांना कळलंच नाही. 

ड्राय डेमुळेच ' पूर्वनियोजित साठा ' करण्याची सवय महाराष्ट्रात वाढू लागली होती. गुरुजींनाही रात्री ' टीचर्स ' ची संगत जडली होती. सहाव्या वेतनामुळे मुलेही गुरुजींना गुरुजी न म्हणता ' सर ' म्हणू लागली होती. सहाव्या वेतनाचा मान राखण्यासाठीच गुरुजींनी ' देशी ' पण सोडलं होतं. ते दिवसाचे ' सर ' आणि रात्री ' टीचर्स ' झाले होते. 

प्रजासत्ताक दिनाच्या आनंदासाठी एक , तीस जानेवारीच्या पुण्यतिथीच्या दु:खासाठी एक आणि निवडणुकीच्या गोंधळासाठी एक असा पूर्वनियोजित साठा घेऊन गुरुजी घराकडे वळले....

(सौजन्य....रामदास फुटाणे...)


 


Featured post

Lakshvedhi