Saturday, 30 May 2026

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत; विद्यार्थ्यांना दिलासा

 अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत;

विद्यार्थ्यांना दिलासा

 

मुंबई, दि. ३० : राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झालेला नसल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रवेश निश्चित करताना ही कागदपत्रे तात्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ.महेश पालकर यांनी याबाबत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना जारी केल्या आहेत. सन २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित फेरी क्रमांक १ सुरू असून २९ मे २०२६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करताना मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्यपणे सादर करण्याची अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत, त्यांच्याकडून गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होताच सादर करण्यात येईल, असे हमीपत्र घेऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. आधार व्हेरिफाइड विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

            गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला निर्धारित कालावधीत सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो, याची जाणीव विद्यार्थी व पालकांना करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

            या निर्णयामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत वेळेत सहभागी होणे शक्य होणार असून प्रवेश प्रक्रियेला अधिक गती व सुलभता मिळेल, असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi