‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी नवी आव्हाने, डिजिटल व्यवहारांमधील फसवणूक तसेच ऑनलाइन सुरक्षिततेबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी या मुलाखतीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही विशेष मुलाखत दोन भागांत प्रसारित होणार असून पहिला भाग मंगळवार दि. 26 मे 2026 आणि दुसरा भाग मंगळवार दि. 2 जून 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचेता गरुडे यांनी केले आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook: https://www.facebook.com/
YouTube: https://www.youtube.com/
डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक तांत्रिक आणि गुंतागुंतीचे होत असल्याचे संजय शिंत्रे यांनी मुलाखतीत स्पष्ट केले. डिजिटल अरेस्ट, फिशिंग, बनावट कॉल्स, सोशल मीडियावरील फसवणूक, व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक व्हिडिओ तसेच AI आधारित फसवणुकीच्या नव्या प्रकारांबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अल्पवयीनांना लक्ष्य करून होणारे सायबर गुन्हे, वैयक्तिक माहितीची चोरी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि गोपनीयतेशी संबंधित वाढते धोके याविषयीही या मुलाखतीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी आणि कुठे नोंदवावी, तक्रार करताना कोणती खबरदारी घ्यावी आणि सायबर सुरक्षेसाठी राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती "जय महाराष्ट्र" कार्यक्रमातून देण्यात आली आहे.
0000
No comments:
Post a Comment