Sunday, 31 May 2026

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-2026’ चे वितरण

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-2026’ चे वितरण

नागपूर, दि. 29 :- केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन लोकसहभागातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये परिवर्तन घडत आहे. राज्य शासनाने ग्राम विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना आणण्याचा प्रयत्न करुन ग्रामीण भागात दर्जेदार सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याचा लाभ घेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभागातून परिवर्तन घडविले आहे. अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसहभागातून गावांचा विकास होऊ शकतो असा विश्वास आज येथे व्यक्त केला. 


 


रणजीतबाबू देशमुख फाउंडेशनच्या वतीने राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री रणजीत देशमुख यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त वनामती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-2026' प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे अध्यक्षस्थानी होते तर महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख, रणजीतबाबू देशमुख फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. आशिष देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.


 


            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रणजीतबाबू देशमुख फाउंडेशनने माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या कार्याचे प्रतिबिंब उमटेल अशा ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती व संस्थांना सन्मानित करण्याचे कौतुकास्पद कार्य या पुरस्कार वितरण समारंभाच्या आयोजनाद्वारे केले आहे. 73 व्या व 74 व्या घटनादुरुस्तीद्वारे जिल्हा परिषदांना महत्वाचे अधिकार प्राप्त झाले आणि महिलांना जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मिळाले. रणजीतबाबू देशमुख यांनी हा कायदा सर्वप्रथम विधिमंडळात मांडला. तसेच ग्राम विकास मंत्री म्हणून नागपूरसह राज्यभर उल्लेखनीय कार्य करुन आपल्या कामाचा ठसा उमटविला, असेही त्यांनी सांगितले.


 


लोकसहभाग हा ग्राम विकासाचा मूलमंत्र असून राज्यात लोकसहभागातूनच ‘जलयुक्त शिवार योजना’ यशस्वी होऊन गावे पाणीदार झाली. रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती व संस्थांनी केंद्र व राज्याच्या योजनांचा उपयोग करून आपल्या भागाचा विकास केला ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.


 


 


पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशात ग्रामविकास आणि ग्राम परिवर्तनाचे ध्येय ठेवले आहे. महाराष्ट्र शासन या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याने ग्राम विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना आणण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या आहे. एक हजार पेक्षा जास्त लोकवस्तींच्या गावांना तीन टप्प्यांमध्ये काँक्रिट रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यात येत आहेत. ग्रामीण भागात घनकचऱ्याचा निचरा करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून गावे पाणीदार करण्याच्या दिशेने कार्य सुरु आहे. केंद्र शासनाच्या ‘जीरामजी’ योजनेत जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यासह राज्यात काही ठिकाणी डार्क झोन तयार झाल्याचे चित्र आहे. अशा भागात ‘जीरामजी’ योजनेद्वारे पुर्नभरण व जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत असेही त्यांनी सांगितले.


शेती क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर राज्य शासनाने भर दिला आहे. महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार ॲप’ शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले आहे. शेती विषयक सर्व बाबींची माहिती येथे उपलब्ध असून राज्यातील 50 लाख शेतकरी या ॲपचा उपयोग करीत आहेत. येत्या काळात राज्यातील सर्व बोली भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi