लोहगावासह ११ नवीन गावांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात
- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. १२ : पुणे महापालिकेत लोहगावासह ११ नवीन गावांचा समावेश प्रस्तावित असलेल्या विकास आराखड्याची (डीपी) अंतिम प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून, कायद्यानुसार सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच अंतिम डीपी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सदस्य बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, संबंधित डीपीचा मसुदा १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १५ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून ६० दिवसांची मुदत पूर्ण झाल्यानंतर सुनावणीची प्रक्रिया होणार आहे.
मंत्री सामंत म्हणाले की, रस्त्यांची आरक्षणे, घरांवर पडलेली आरक्षणे, काही बिल्डरांच्या जमिनी वगळणे आदी सर्व तक्रारी आणि हरकती सुनावणीत विचारात घेतल्या जातील. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. सुनावणी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डीपी जाहीर केला जाणार नाही. शेतकरी, नागरिक, भागधारक यांनी केलेल्या हरकती, सूचना विचारात घेवूनच डीपी अंतिम करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
०००००
No comments:
Post a Comment