राज्य शासनाच्या पीएचडी शिष्यवृत्तीसाठी वितरण मर्यादा व निकष ठरवणार
- उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, दि. 13 : राज्य शासनाच्या बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी लक्षांक ठरविण्यात येणार असून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्याबाबत सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, राज्य शासनाच्या विविध संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी गुणवत्तेचा विचार केला जाणार असून विद्यार्थ्यांच्या संशोधन विषयांचा प्रत्यक्ष उपयोग भविष्यातील कामकाजाला होतो का, याचीही तपासणी केली जाणार आहे. जसे परदेशात उच्च शिक्षणासाठी मेरीटनुसार ठरावीक संख्येने विद्यार्थ्यांना पाठवले जाते, त्याच धर्तीवर डॉक्टरेटसाठीही गुणवत्ता हा मुख्य निकष राहील. तसेच शिष्यवृत्तीसाठी यंदाच्या विनियोजन विधेयकात तरतूद करण्यात आली असून लवकर ती देण्यात येईल.
वंचित घटकातील, अनाथ किंवा पालक नसलेल्या, मात्र मेरीटमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने मदत केली जाईल. अशा विद्यार्थ्यांना मदत करणे हे शासनाचे धोरण असून, ही मदत भविष्यातही सुरू राहील, असेही. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment