सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज
- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि १६ : सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेबाबत जागरूक राहणे ही बाब आता केवळ लक्झरी नाही, तर काळाची गरज बनली आहे. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत सतत अद्ययावत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक (सायबर) यशस्वी यादव, एनआयसी दिल्लीचे उप महासंचालक डॉ.राजेशकुमार पाठक, बीएआरसीचे वरिष्ठ वैज्ञानिक जीजी जोसेफ आणि एनआयसी महाराष्ट्राच्या सपना कपूर तसेच विविध राज्याचे एनआयसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, आपल्या दैनंदिन जीवनात आणि प्रशासकीय कामकाजात डिजिटल क्रांतीमुळे आमूलाग्र बदल झाले आहेत. आज मंत्रालयात काम करणारा प्रत्येक अधिकारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा आणि आपल्या जबाबदाऱ्या यांचा थेट संबंध निर्माण झाला आहे. अज्ञानामुळे केलेल्या चुकीसाठीही कायदा माफ करत नाही. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अद्ययावत राहणे आवश्यक आहे.
डिजिटल व्यवहारांमध्ये भारत आज जगात अग्रस्थानी आहे. प्रत्येकजण डिजिटल पेमेंट स्वीकारत आहे. भारत आज सर्वाधिक आणि सर्वात सुरक्षित डिजिटल व्यवहार करणारा देश बनला आहे. पण या प्रगतीसोबतच सायबर गुन्ह्यांची जटिलता आणि प्रमाणही वाढले असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment