अवयवदान प्रबोधन चळवळ निरंतर सुरू ठेवू,
अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचवूया.
- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. 13 : "अवयवदान प्रबोधन चळवळ निरंतर सुरू ठेवू, मरणोत्तर अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचवू आणि पुढील वर्षीच्या अवयवदान पंधरवड्यात उत्कृष्ट कार्यासाठी एकमेकांचे अभिनंदन करण्याची संधी निर्माण करू," असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि झेडटीसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान पंधरवड्यानिमित्त राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभागाचे उपसंचालक तसेच इतर खासगी रुग्णालयाच्या प्रमुखांचे प्रशिक्षण कार्यक्रम सायन मुंबई येथे आयोजित केला होता.
राज्यात 3 ते 15 ऑगस्टदरम्यान अवयवदान पंधरवडा साजरा केला जात आहे. या कालावधीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, विविध सेवाभावी संस्था व खासगी रुग्णालये अवयवदान मोहिमेचा प्रचार-प्रसार करत आहेत. लोकांनी अंधश्रद्धा व अनावश्यक भीती न बाळगता मरणोत्तर अवयवदानासाठी पुढे यावे व ही चळवळ गतिमान करावी, असे मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment