पंढरीची वारी चालती-बोलती संस्कृती
इथल्या मातीनेच बोलायला सुरवात केली, ती संतांच्या रुपाने. तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभव पंथ जाती-पातींना नाकारणारा आहे. त्यांनी साध्या-सोप्या भाषेत शिकवण दिली. नंतरच्या काळात नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. जगात क्वचितच अशी यात्रा असेल. जी सामाजिक समतेचा झरा बनली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना आहे. निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची सुरुवात केली. मुक्ताईंच्या ओव्या तर मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. संत नामदेवांच्या विचारांना गुरू ग्रंथसाहिबमध्येही स्थान आहे. पंजाबमध्ये आपण घुमान येथे साहित्य संमेलन घेतले. पंजाबमध्ये संत नामदेव यांच्याविषयी मोठा आदर, भक्तीभाव पाहायला मिळाला. संत एकनाथ, संत चोखोबा, त्यांच्या पत्नी सोयराबाई असे सर्व संत हे केवळ उपदेशक नव्हते, ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे, शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. आपली वारीची परंपरा ही चालती-बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे, जी महाराष्ट्राचे आत्मभिमान जपते आहे. हजारो वर्षांपूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता चालत राहीली. वारी न इस्लामी राजवटीत थांबली, न इंग्रजी आक्रमणात. हजारो दिंड्या या वारीत सहभागी होतात. यंदाही या वारीत देश-विदेशातून लोक सहभागी झाले आहेत. यावर्षी काहींनी या वारीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर सुरु केला आहे. हा पंढरीचा महिमा थक्क करणारा आहे.
No comments:
Post a Comment