नवोदित उद्योजकांना आपल्या व्यवसायाला आकार देऊन त्याची वाढ करण्यासाठी राज्यात योग्य वातावरण आपण उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 14 लाख युवा मनुष्यबळ दाखल होत असल्याने त्यांच्या हातांना अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी ‘सक्षम’ सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रोत्साहन अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
राज्य शासनाच्या यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून ‘सक्षम’ सारखे कार्यक्रम अधिक व्यापक पातळीवर राबविल्यास शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकतेचा पाया रुजवण्याचे हे एक प्रभावी उदाहरण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
2023-24 मध्ये नागपूर जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये सक्षम उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनावर अत्यंत प्रभावीपणे उद्यमशिलतेला चालना देणारे संस्कार घडविता आले. यातून उत्तम प्रकारे कौशल्य शिक्षणाचा एक यशस्वी प्रयत्न आम्हाला करता आला याचे समाधान आहे. यातून विद्यार्थ्यांनी नोकरी/ स्वयंरोजगार निर्मिती कशी होऊ शकते याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. विद्यार्थ्यांचा विश्वास यातून वाढला. हा उपक्रम भविष्यातही मोठे परिवर्तन साध्य करुन दाखविल, असे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले.
उद्यम मार्फत राज्यात आतापर्यंत नागपूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला असून ४० प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या २१२ शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम राबविण्यात आला असून २०२५-२६ मध्ये ४०० शाळांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. राज्यात १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या सक्षम कार्यक्रमामार्फत २५०० हून अधिक व्यवसाय कल्पना सादर करण्यात आल्या, १५०० प्रोटोटाइप तयार झाले, तर ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्पादनांची विक्री केली. एकूणच विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल दिसून आला असून, ५०० शिक्षकांना उद्योजकतेसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
००००
No comments:
Post a Comment