एसटी कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी
समुपदेशनाबरोबरच विम्याचे कवच
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातील चालक, वाहक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांचे शारिरिक तसेच मानसिक आरोग्य सुरळीत राहावे, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे कवच मिळावे, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची पाऊले उचलली आहे. राज्यातील प्रत्येक एसटी महामंडळातील वाहन, चालकांसोबत तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात यावे, तसेच त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांना देखील विम्याचे कवच मिळावे, यासाठी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एसटी महामंडळात आजपर्यंत 30 हजार वाहनचालक, 38 हजार वाहक आहेत. त्याचबरोबर मोठा तांत्रिक कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामाची गती सक्षमरित्या वाढविण्यासाठी त्यांचे वारंवार समुपदेशन करणे आवश्यक असल्याचे मत परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केले. त्याचबरोबर, एसटी कर्मचाऱ्यांसमवेत त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना आरोग्यांच्या दृष्टीने विम्याचे छत्र उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी त्यांना ‘आरोग्य कार्ड’ देण्यासंदर्भात परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले. आरोग्य कार्डद्वारे प्रत्येक कर्मचाऱ्यांना वर्षभरातून दोनदा आरोग्य तपासणी होऊन त्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा-सुविधा मिळाल्या पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील वाहक-चालक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना समुपदेशन सोबत विम्याचे कवच या दोन्ही सुविधा सरसकट एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात याव्यात. आरोग्य विमा योजना ही सर्वांना लागू झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ही सेवा कॅशलेस असावी. प्रत्येक कर्मचाऱ्यांस योग्य उपचार मिळावे आणि उपचार सुरू होण्यापूर्वी विमा कंपनीकडून तात्काळ मंजुरी मिळावी, याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही, मंत्री श्री. सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या
No comments:
Post a Comment