*तू स्वयंप्रकाशीत हो, तूझा दीप तू स्वतःच आहेस. तुझा मार्ग तुला स्वतःलाच शोधायचा आहे. तो तुलाच सापडायचा आहे. तुलाच तुझा प्रकाश व्हायचं आहे*.
*याचा साधा अर्थ असा आहे, की तुझ्या बाहेर अशी कोणतीही शक्ती नाही की जी शक्ती तुला जीवन प्रकाश दाखवू शकेल, की जी शक्ती तुला मार्गदर्शन करु शकेल, हे मार्गदर्शन करण्याचं काम, हा प्रकाश दाखवण्याचं काम तुला स्वतःलाच करावं लागेल.*
*विकसित झालेला अशा प्रकारचा हा माणूस आणि त्याला त्याचं जीवन घडवायचंय. हा स्वतःच्या प्रयत्नाने माणूस झालेला आहे. तुमच्या कृत्याला जर तुम्हीच कारणीभूत आहात असं एकदा तुम्हाला जाणवलं की तुमच्या प्रत्येक कृत्याला तुम्ही स्वतःच जबाबदार असता आणि मग ही स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ही साधी जाणीव नाही. ती माणसाला पूर्णपणे निराधार करणारी जाणीव आहे.*
*जगण्याच्या संघर्षामध्ये जेवढे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न पहिल्यांदा त्याची आपण उकल करुन घ्या. या सगळ्या प्रश्नाचं सम्यक आकलन करुन घ्या हे सगळे प्रश्न आपल्याला नीट समजल्या नंतर या सगळ्या आपल्या दुःखाची सगळ्या दैन्याची कोणती कारणं आहेत हे आपण स्वतः ती शोधून काढा. आणि ही कारणं एकदा शोधून काढली की ती नष्ट कशी करता येईल याचा संबधी चिंतन करा आणि एकदा कारणांचा नाश झाला, की आपोआप कार्याचा नाश होतो आणि मग आपण एक अर्थानं दुःखमुक्त होवू शकतो. आपण आनंदी होवू शकतो.*
*माणूस जगतोतरी कशासाठी ? माणसाला जगण्याला काहीतरी प्रयोजन असावं लागते. माणसाच्यां जगण्याला अर्थ प्राप्त होणे आणि माणसाचं जगणं सुंदर करणं हे स्वतः माणसालाचं करावं लागतं हे जर स्वतः माणसाला करावं लागत असेल तर मग माणसाने आपले चांगले वाईट जी कृत्यं असतील त्याची जबाबदारी त्याला स्वतःला स्वीकारावी लागेल. ती त्याच्या बाहेरच्या कुठल्याही शक्तीवर टाकता येणार नाही व त्याला या जबाबदारीतून मुक्त पण होता येणार नाही.*
*जर माणसं स्वतःच स्वतःचा प्रकाश बनू लागली, जर माणसं स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारु लागली आणि प्रत्येक कृती करतानां तिच्या परिणामाची साधक- बाधक चर्चा करु लागली तर माणसाला कोणतीही गरज वाटणार नाही.*
No comments:
Post a Comment