सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास करणार
राज्यातील शेतकरी कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून सर्वांचा विकास करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य शासन काम करत असून, सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दिली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुढील महिन्यात शासन स्तरावर विभागीय आढावा बैठक घेण्यात येणार असून, लवकरच राज्य शासनाकडून मराठवाड्याच्या सर्वागिण विकासाबाबत योग्य निर्णय घेण्यात येतील, शेतकऱ्यांबाबतही ठोस महत्वाचे निर्णय घेण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
परभणी जिल्ह्याला ऐतिहासिक प्राचिन वास्तूंचा मोठा वारसा लाभला असून, त्यांच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या कामासाठी सर्वजण पुढे याल, असा विश्वास व्यक्त करुन राज्यात ‘शासन आपल्या दारी’ या अभियानामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांचे शासकीय कार्यालयातील होणारे हेलपाटे, वेळ आणि पैसाही वाचत असून, हा कार्यक्रम राज्यभर लोकप्रिय होत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
राज्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडला असून, राज्य शासन आपल्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. राज्यातील पीक परिस्थितीबाबत नुकताच व्हीसीद्वारे आढावा घेतला असून, त्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
पावसाच्या मोठ्या खंडामुळे राज्यातील धरणातील जीवंत पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असून, पाणी वापराबाबतचेही नियोजन करण्यात येत आहे. मराठवाड्यात पावसाळ्याचे अजून काही दिवस बाकी असल्याचे सांगून ते म्हणाले की, सध्या मराठवाड्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे. पाणी वापराचे योग्य नियोजन करून नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत त्यांनी वनविभागाने गवताचा लिलाव न करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची संकल्पना विशद करुन लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गंत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली.
शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ
यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. यामध्ये तृतीयपंथीयांना ओळखपत्र, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजना, कृषी यांत्रिकीकरण, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र, कर्मवीर दादासाहेब सबळीकरण व स्वाभीमान योजना, रमाई घरकुल योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, शबरी आवास योजना, वैयक्तीक शौचालय अनुदान, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, वैयक्तीक कर्ज परतावा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या योजनाचा यावेळी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
• परभणी जिल्ह्यातील पायाभूत विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द
• ‘शासन आपल्या दारी’ ही या देशातील क्रांतीकारी योजना
• आतापर्यंत १ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ
• जिल्ह्यात ८ लाख ७५ हजार लाभार्थ्यांची नोंदणी, त्यांना सुमारे १ हजार ४६४ कोटींचे लाभ
• सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम हे सरकार करीत आहे
• परभणी शहरात अमृत योजनेतून भुयारी गटार बांधण्यात येणार, त्यासाठी निधी देण्यात येईल.
• परभणी शहरातील कॉंक्रिटच्या रस्त्यांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
• मुंबई-नागपूर-गोवा या शक्तीपीठ महामार्गाचा मराठवाड्याला फायदा होईल.
• रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम गतीने सुरु आहे.
• औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर कार्यवाही केली जाईल.
• नाट्यगृह, पाण्याच्या योजना, औद्योगिक वसाहतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
• राज्याच्या काही भागात पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनो काळजी करु नका, शासन खंबीरपणे पाठीशी उभे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही…
00000
वृत्त क्र. २८८५
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण
परभणी, दि. 27: ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज कल्याण कार्यालय, परभणी यांच्यामार्फत परभणी येथील अमिता रौफ बक्श यांना तृतीयपंथी म्हणून ओळखपत्र देण्यात आले. तसेच के. के. एम. महाविद्यालय मानवत येथील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी प्रियंका भगीरथ अदमाने हिला राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार अंतर्गत 10 हजार रुपयाचा धनादेश, पी. डी. जैन होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या तनुजा संजय तायडे या विद्यार्थिनीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना-वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन व निवासाची सोय व्हावी म्हणून रोख रक्कम आधार संलग्न बँक खात्याद्वारे देण्यात आली आहे.
जिंतूर तालुक्यातील करवली येथील भारत स्वयंसहायता बचतगटाच्या शिल्पा रवी मानवते यांना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत वाटप करण्यात आले. वडगाव सुक्रे येथील वैशाली नाना हातागळे यांना ऊसतोड कामगार म्हणून ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
मानवत तालुक्यातील कुंभारी येथील घनश्याम मधुकर रणखांबे यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत चार एकर जिरायत शेतजमिनीचे वाटप समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले. गंगाखेड येथील गणपती यादव सवराते यांना हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडणारा जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाचा लाभ म्हणून 78 लाख 51 हजार 765 रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी (भूसंपादन) यांच्यामार्फत देण्यात आला.
परभणी शहरातील मंगलमूर्ती नगरातील रहिवाशी श्रीपादराव प्रल्हादराव झांबरे यांना प्रधानमंत्री आवास योजना “सर्वांसाठी घरे” या योजनेअंतर्गत महानगरपालिकेमार्फत 2 लाख 50 हजार रुपये लाभाची रक्कम देऊन घरकुल बांधकाम कार्यारंभ आदेश प्रमाणपत्र देण्यात आले. विकास प्रभाकर धापसे यांना रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत नगर परिषद सेलू यांच्याकडून घराची चावी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, परभणी यांच्याकडून पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील मीना भुजंग काळे यांना स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत धनादेश देण्यात आला. तसेच परभणी तालुक्यातील लोहगाव येथील गौरी बालाजी घोरवांड यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रिया प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाकडून वितरीत करण्यात आले.
जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथील राजेश कठाळू कऱ्हाळे यांना शबरी आवास योजना (ग्रामीण) योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कार्यालयाकडून 1 लाख 50 हजार अनुदानाची रक्कम देत घराची चावी दिली. जिंतूर तालुक्यातील करवली येथील तानाजी साहेबराव घाटुळ यांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिंतूर कार्यालयाकडून योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदानापोटी 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून साखला प्लॉट परिसर, परभणी येथील भाग्यश्री रवी गायकवाड यांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 5 हजाराचा तीन टप्यात लाभ लाभार्थीच्या बँक खात्यामार्फत देण्यात आला.
अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सोन्ना येथील मीराबाई ज्ञानेश्वर आतमवाड यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पाथरगव्हाण येथील अभिमान मरिबा ढवळे यांना सिंचन विहीर देण्यात आली.
जिल्हा कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सोन्ना येथील उषा रावसाहेब देशमुख यांना ट्रॅक्ठर देण्यात आले. मानवत तालुक्यातील कोथळाच्या कमल मोतीलाल जोहरुले यांना श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत निवृत्ती वेतन मंजूर केल्याबाबतचे प्रमाणत्र देण्यात आले.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शकन केंद्र परभणी यांच्यामार्फत शहापूर येथील बाबाराव दशरथ ढवळे आणि धर्मापुरीच्या लक्ष्मण संतुकराव चट्टे यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत अनुक्रमे 2 लाख 50 हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment