सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील धोकेदायक वृक्षतोडण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करणार
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २५ : पावसाळ्यात वादळवाऱ्याने वृक्ष पडणे, फांद्या तुटल्याने स्थानिक रहिवाशी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागनिहाय पथके तयार करून सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील धोकेदायक वृक्ष तोडण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मुंबईत १ ते २९ जून, २०२३ या कालावधीत ४३५ झाडे, फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. त्यात आठ जणांचा मृत्यू आणि ४ जण जखमी झाले आहेत. यामध्ये मुंबई शहरात झाडे आणि फांद्या तुटण्याच्या ११२ घटनांमध्ये एकाचा मृत्यू आणि १ जण जखमी झाला आहे. मुंबई पश्चिम उपनगरात झाडे आणि फांद्या पडण्याच्या सर्वाधिक २१४ घटना घडल्या असून त्यात सात जणांचा मृत्यू व १ जण जखमी झाला आहे, शासनाने याबाबत तातडीने करावयाची ठोस कार्यवाही, उपाययोजना आणि शासनाची प्रतिक्रिया याबाबत विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी लक्षवेधी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबईत १ जून ते १९ जुलै, २०२३ या कालावधीत ४८१ झाडे व ६३६ झाडांच्या फांद्या पडल्याची नोंद आहे. त्यापैकी पश्चिम उपनगरामध्ये १८८ झाडे व २५८ झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटना या प्रामुख्याने वादळी वारे व जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे घडल्या असून, अशा विविध दुर्घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले असल्याची नोंद आहे. धोकेदायक झाडे तसेच फांद्यांची छाटणी पावसाळ्यापूर्वी करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केले जाते. झाडे अथवा फांद्या पडण्याच्या घटना घडू नयेत याकरिता सन २०२३ च्या मान्सूनपूर्व कामांतर्गत सर्वेक्षण केलेल्या सुमारे १,५०,८३२ धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली असून, मृत, धोकेदायक व पोकळ असलेली झाडे काढण्यात आली आहेत. सन २०२२-२३ या वर्षात ४०६३ झाडांना काँक्रिटीकरणापासून मुक्त करण्यात आले आहे. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील धोकादायक झाडे तोडण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करण्यात येतील. अशी झाडे तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून आकारण्यात येणार नाही, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई गिरकर, विलास पोतनीस, अनिकेत तटकरे, सचिन अहीर, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
***
No comments:
Post a Comment