*मटणाची नळी*
*लेखक: स. दा.उपाशी*
कडाडून भूक लागलेली असताना समोर मस्त मटणाचे ताट येते. वाडग्यात दिलेल्या रस्सेदार मटणातून एक मोठी भरीव नळी बाहेर डोकावत असते. इतरांच्या कुणाच्या ताटात न जाता नळी आपल्याच ताटात आली म्हणून आपण मनोमन सुखावून जातो.
पहिल्या घासापासून त्या नळीशी चाळे सुरू होतात. नळीला लागुन असलेले लुसलुशीत मटण खाताना देखील त्या भरीव नळीची खरी मजा देणाऱ्या आतल्या मगज वर आपली नजर कायम असते. मग त्या नळीची उघडी बाजू तोंडात पकडून ओठांचा चंबू करत फुर्रर्रकन आवाज काढत तो मगज तोंडात ओढण्याचा प्रयत्न होतो पण यश येत नाही. मग नळी ताटाच्या एका कडेला ठेऊन पुन्हा जेवणावर लक्ष केंद्रित केले जाते.
ताटात किती जरी मटण असले तरी खाणाऱ्याचे सगळे लक्ष त्या नळीतल्या मगज वरच असते. दर दोन घासानंतर ती नळी उचलून ओठांचा चंबू करत ती रिकामी करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू असतो. मग लक्षात येते की ही नळी पण आपल्या सारखीच जिद्दी आहे. म्हणून तिला शेवटी जेवण झाल्यावर बघू म्हणत परत ताटाच्या कोपऱ्यात सरकवली जाते.
बघता बघता जेवण संपते. ४ वाट्या मटण खाऊन झालेले असले तरी आपले लक्ष त्या नळीवरच असते. मोर्चा पुन्हा नळीकडे वळवला जातो. पुढून ओढून नळी रिकामी होत नाही म्हंटल्यावर तिला मागून फोडण्याचा प्रयत्न सुरू होतो. दाढा, सुळे सगळ्याखाली धरून पूर्ण ताकदीनिशी दाबली तरी त्या नळीला काही फरक पडत नाही. पुन्हा हातात धरून तिचे मागून पुढून नीट निरीक्षण होते. पुन्हा जोराचा प्रयत्न केला जातो पण नळीतला थोडा रस्सा आणि लाळेव्यतिरिक्त तोंडामध्ये काहीच येत नाही.
खाणारा घरात बसून खात असेल तर मग बत्ता घेऊन नळी फोडायचा प्रयत्न होतो किंवा नळी हातात पकडून ताटात जोरजोरात आपटून मगज काढण्याचा प्रयत्न केला जातो.
पण या जिद्दी नळीची गाठभेट जर एखाद्या हॉटेलात झाली असेल तर खाणाऱ्याच्या प्रयत्नांवर मर्यादा येतात. इकडे तिकडे बघत नळीला ताटाच्या दिशेने दोन चार झटके दिले जातात. पण हाती काही लागत नाही. शेवटी जीव रडकुंडीला येतो. नळीची उघडी बाजू पुन्हा ओठांमध्ये धरून त्यात जीभ घालून चव चाखण्याचा प्रयत्न होतो. पण सगळे प्रयत्न करून दमल्यावर लक्षात येते की किलोभर मटण खाऊन जिरवण्याची ताकद असलेल्याची मटणाच्या एका नळीने जिरवली आहे.
शेवटी त्या नळीकडे एक कटाक्ष टाकला जातो. "एका फुरकीत जर त्यातला मगज जिभेवर आला असता तर काय मजा आली असती राव" या स्वप्नात मन काही क्षण रमते, त्या स्वप्नातच जिभेवर त्याच्या चवीचा आनंद अनुभवला जातो आणि लगेच भानावर येत जड अंतःकरणाने हार मान्य करत आपण ती नळी ताटात परत ठेऊन टाकतो.
ताट समोर आल्यापासून नळीसोबत सुरू झालेले द्वंद्व युद्ध इथे संपुष्टात येते, आपण आपले मन त्या नळीत गुंतवून युद्धात हरलेल्या योध्याप्रमाणे खांदे उतरवून जड पावलांनी हॉटेल बाहेर पडतो. कितीही मटण फस्त केले असले तरी एका नळीमुळे आपला आत्मा अतृप्त राहुन गेलेला असतो.
मित्रांनो या प्रसंगात लेखकाच्या नळीप्रतीच्या वेदना फक्त एक मटण प्रेमी रसिकच समजू शकेल.
😊😊😆😆😀😀😀😆
No comments:
Post a Comment