Sunday, 24 July 2022

माहेरची साडी

 🙏🙏 *जिवंतपणी तिला मिळावी माहेरच्या साडीची ऊब*🥰🥰

ऑफिसमध्ये असताना मला आईचा अचानक फोन आला. "पटकन घरी ये आत्या गेली,आपल्याला चिपळूणला जायचे आहे" माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. डोळ्यातील पाणी पुसत मी कशीबशी घरी पोहचले. गाडी दारात उभी होती. घरात न जाता थेट गाडीत बसले आणि आम्ही निघालो. पुढच्या चौकात गेल्यावर आईने एका साड्यांच्या दुकानापाशी गाडी थांबवली. तेव्हा मला काही कळेना. प्रसंग काय आणि ही करतेय काय हा विचार मनात असतानाच तिने एक साडी पिशवीत घालून आणली. पाच मिनिटात खरेदी केलेली ही पहिली साडी असेल पण ती अशावेळी आईने का घेतली हे विचारल्यावर तिने सांगितले, "लेक गेल्यावर तिला माहेरची साडी नेसवली जाते." ती गेल्यावर तिच्या अंगावर घातलेल्या साडीचं सुख तिला मिळणार आहे का ? हा प्रश्न घेऊन आत्याच्या चितेवर शेवटची "माहेरची साडी" चढवली.

या गोष्टीला आज पंधरा दिवस झाले मात्र अजूनही माझ्या डोक्यातून ही माहेरची साडी गेली नव्हती. आपल्या रीती आणि परंपरा सुद्धा कशा आहेत ना. माणूस जिवंत असताना आपण त्याची ख्यालीखुशाली विचारत नाही. पण तो गेल्यावर त्याच्या आवडीचा नैवेद्य तयार करतो. का तर कावळा शिवावा म्हणून . ही प्रथा तर मला माहित होती. मात्र माहेरची साडी आपण आत्याला ती मेल्यावर देण्यापेक्षा ती जिवंत असताना प्रत्येक सणावाराला दिली तर काय हरकत आहे. माहेरपणाला येणाऱ्या लेकीची तुमच्याकडून काय अपेक्षा असते हो, त्यांना तुम्ही दोन शब्द गोड बोलावे, बास झालं. त्यातच एखादी साडी मिळाली की माझ्या भावाने घेतली म्हणून गावभर मिरवणाऱ्या या मुली किती आनंदून जातात. मग त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद तुम्हाला त्या गेल्यावर नेसवलेल्या माहेरच्या साडीत मिळणार आहे का?

लग्नात मुलीला नेसवली जाणारी माहेरची साडी तिच्या कपाटात आयुष्यभर असते. कारण त्या साडीत तिच्या माहेरपणाची उब असते. कितीतरी आठवणी तिने त्या साडीशी जोडलेल्या असतात. कधी एखादा दुःखाचा प्रसंग आला, सासरी काही बिनसले तर हीच साडी तिला धीर देते.

कित्येक ठिकाणी मुलीला माहेरी गेल्यावर ही हक्काची साडी मिळतच नाही. जोपर्यंत आईवडील असतात तोवर त्यांना या साडीच सुख लाभतं. भावांच्या राज्यात मात्र चार दिवस पाहुण्यांसारखं येऊन जावं लागतं. त्यामुळे आजकाल त्या माहेरच्या साडीचं विशेष राहिलेलेच नाही. ज्या नणंदेला कधी वारभर कापड भावजयीने घेतलेलं नसतं. ती सुद्धा नणंदेच्या मयतीला जाताना न विसरता माहेरची साडी घेऊन जाते. का तर लोकांनी नावं ठेवायला नको म्हणून. म्हणजे इथे सुद्धा काही लोकांचा कसा स्वार्थ आहे बघा.

माहेरी गेल्यावर माहेरची साडी मिळणार म्हंटल्यावर त्या मुलीच्या मनात वेगळाच आनंद निर्माण होतो. कारण त्यांच्यासाठी ती फक्त साडी नसते तर एक भावना असते. माहेरच्या माणसांशी जोडली जाणारी सुंदर नाळ असते. कधी आपल्या भावाच्या आठवणीत ती साडी मुलगी नेसते. तर कधी आईने प्रेमाने घेतली म्हणून सगळ्यांना हौशीने दाखवते. तुमच्या एका साडीवाचून तिचं काहीच अडत नाही हो. पण एक भाबडी आशा तिच्या मनाला असते की आपल्या माहेरहून आपल्याला कोणी साडी द्यावी आणि ती नेसून आपण मिरवावे. श्रीमंत घरातल्या मुलींना देखील त्या माहेरच्या साडीची आस असते. मग ती किती भारी आहे की हलकी हे त्या पाहत नसतात. त्यातील प्रेम त्या माहेरवाशिणींपर्यंत आपोआप जाते.

मुलगी गेल्यानंतर तिच्या चितेवर माहेरची साडी तुम्ही ठेवता. पण तिच्या अग्नीत ती साडी देखील राख होऊन जाते मग त्याचा उपयोग काय. माहेर सोडताना आनंदाने नेसवलेली माहेरची साडी ते जग सोडून जाताना साश्रू नयनांनी तिच्यावर चढवलेली माहेरची साडी यात किती फरक आहे. जड अंतःकरणाने आणि थरथरत्या हाताने तिच्या देहावर शेवटची साडी ठेवताना काहीजणांना आपण बहिणीसाठी उभ्या आयुष्यात साडी घेऊ शकलो नाही याची खंत असते. मग तिची माफी मागत आपले कर्तव्य पूर्ण करणारे भाऊ ही सल मनात घेऊन जगतात. अशी वेळ आपल्यावर येऊ नये वाटत असेल तर आपल्या घरच्या माहेरवाशिणींना "माहेरची साडी" देण्यासाठी त्यांच्या मरणाची वाट बघू नका. तर त्या जिवंत असतानाच त्यांच्या अंगावर ही लाखमोलाची साडी नेसवण्याचे भाग्य नक्कीच मिळवा.🙏🙏🙏😊

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi