Tuesday, 14 June 2022

वटवृक्ष

 *🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*

----------------------------------------

*संकलन - सदानंद पाटील, रत्नागिरी.*

----------------------------------------

*🏵 वटसावित्री व्रतामागील शास्त्रीय भूमिका कोणती.*


           *वटसावित्री व्रतावरील साहित्य संकलित केले, तर एक ग्रंथ तयार होईल. वटसावित्री व्रतातील महत्त्वाचे कथासूत्र म्हणजे, "सत्यवानाचे प्राण यमधर्माने हरण केले तेव्हा सावित्रीने यमधर्माशी शास्त्रचर्चा करून आपल्या पतीचे प्राण परत मिळविले. हा प्रसंग वटवृक्षाखाली तब्बल तीन दिवस चाललेला होता." कथेचे सूत्र अनुसरून व्रताचे स्वरूप तयार केले गेले. तीन दिवस उपवास, रात्री जागरण, वटवृक्षाची पूजा व सूत्रवेष्टन आणि शेवटी दानधर्म, उपवास म्हणजे नेहमीप्रमाणे खिचडी, वरी, फळफळावळ, दुधाचे पदार्थ भरपूर खाणे.*


           *वडाखाली जाणे होत नसल्यास वडाची फांदी बाजारात तयार असतेच. हे सर्व विडंबन पाहिले म्हणजे एखाद्या आधुनिक विचारवंत स्त्रीला वाटू लागते की, असले विकृत वटसावित्री व्रत करण्यापेक्षा न केलेले बरे. या व्रताच्या अगोदर दोन-तीन दिवस चाललेला वटसंहार पाहून विचारी मनास ग्लानी आल्याशिवाय राहणार नाही. अशाने या व्रताचा उद्देश सफल होणे दूरच, पण वनसंहार थांबवण्यासाठी वनरक्षणखात्यास एक ना एक दिवस कायद्याने वटसंहार थांबवावा लागेल.*


           *वटसावित्री व्रत खऱ्या अर्थाने करायचे असेल तर स्त्रियांनी प्रथम पतिविषयीचे सर्व गैरसमज साफ दूर करावेत. त्याच्या एवढ्यातेवढ्या विधानाची सत्यासत्यता पटवून घेण्याचा आटापिटा सोडावा. त्याच्या बारीकसारीक वर्तनास आवाहन देणे सोडावे. तो काय म्हणतो, हे आपल्याला कितपत कळते, हे पहावे. कळल्यावर ते पटते किंवा नाही हे समजून घ्यावे. एवढे केले, तरी वटसावित्री व्रताचे निम्मे फळ मिळेल. उरलेले निम्मे फळ मिळण्यासाठी वटसावित्री व्रतापूर्वी तीन, दोन किंवा निदान एक दिवस कमीतकमी खाऊन उपवास करावा. व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त काळ वटवृक्षाखाली व्यतीत करावा, पूजा करावी, जास्तीतजास्त प्रदक्षिणा कराव्यात. प्रदक्षिणा करताना हातात दोरा असलाच पाहिजे असे नाही. वटवृक्षाला पूजेच्या वेळी "वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं " म्हणून एक, तीन, पाच वेढे घालावेत.*


           *वटसावित्रीव्रतामध्ये असणाऱ्या सर्व भूमिका नैसर्गिक व आध्यात्मिक दृष्ट्या प्रतिकात्मक आहेत. वड हा चिरंजीव वृक्षांपैकी एक आहे. वडाची साल जुनाट व्याधी निवारक व आयुष्यवर्धक आहे, हे आयुर्वेदिक सत्य आहे. वटवृक्षाच्या सहवासात अधिकाधिक काळ घालविल्यास निरोगी दिर्घायुष्य लाभते. यमधर्म हे पात्र ही प्रतिकात्मक आहे. नीतिनियमाविषयी तयार केलेल्या संहितेस "यम" ही संज्ञा आहे. सत्यवान म्हणजे सत्याची कास धरून वागणारा. त्यालाही नीतिनियम चुकले नाहीत. पण वटवृक्षाचे सेवन केल्यास नेहमीचे नियतीचे नियम देखील अपवाद निर्माण करू शकतात.*


           *अशाप्रकारे व्रताचा खरा अर्थ व उद्देश समजून व्रत केल्यास निश्चित फळ मिळेल. पण हे व्रत विडंबनात्मक रित्या साजरे करण्यापासून नेहमी परावृत्त व्हावे. वटवृक्षाच्या सान्निध्यात जाणे सर्वथैव अशक्य असल्यास एखाद्या पाटावर चंदनगंधाने वटवृक्ष काढून पूजाप्रदक्षिणा कराव्यात. पण वडाच्या संहारास उत्तेजन देऊ नये. ज्याची पूजा करायची त्याचेच अवयव तोडणे यापेक्षा दुष्कृत्य ते कोणते ?*


*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi