Monday, 23 August 2021

 ***** थळचा किल्ला खुबलढा! *****


अलिबागच्या उत्तरेला साधारण ५ किलोमीटर अंतरावर थळ नावाचे लहानसे गाव आहे. थळ खांदेरी-उंदेरी किल्ल्यांसाठी आणि उत्तम प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते. RCF च्या खत प्रकल्पामुळे या लहानशा गावाला अलीकडच्या काळात खूप महत्व प्राप्त झाले. नारळी पोफळीच्या वाड्या, पर्यटकांना खेचणारे निसर्ग सौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जुन्या मंदिरांसाठी थळ ओळखले जात असले तरी येथे एक ऐतिहासिक आणि महत्वाचा भुईकोट होऊन गेला हे फार कमी माहीतीत आहे. हा किल्ला होता थळचा खुबलढा! 


थळच्या बंदराकडे जाताना जेथे मच्छिमार बांधव मच्छी वाळवताना दिसतात त्याच जागेवर पूर्वी हा चार बुरुजांचा लहानसा किल्ला होता. आज येथे किल्ल्याचे कोणतेही बांधकाम दिसत नाही फक्त एका बुरुजाचा पाया आणि इतर काही लहान अवशेष पहायला मिळतात. सध्या हा भाग सपाट करून येथे मच्छिमार बांधव मच्छी वाळवताना, बोटींची डागडुजी करताना आणि जाळ्यांची कामे करताना दिसतात. 


सन १६८० मध्ये खांदेरीच्या बेटावर मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली दुर्ग उभारणी सुरू होती. त्यावेळी खांदेरी बांधू न देण्यासाठी इंग्रज आटोकाट प्रयत्न करत होते. त्यांनी जंजिरेकर सिद्दी यास उंदेरी बेटावर दुर्ग उभारणीस परवानगी दिली आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. थळच्या समुद्रकिनारी स्वराज्याचा खुबलढा आणि पाण्यात स्वराज्यातीलच नवीन खांदेरी किल्ला नावारूपाला येत असताना उंदेरीवर सिद्दीने इंग्रजांच्या मदतीने आपले तळ ठोकणे म्हणजे येथील मराठी सत्तेला आव्हान दिल्यासारखे होते. अशा वेळी इंग्रज आणि सिद्दी यांच्या संयुक्त शक्तीला तोंड देणे, खांदेरीला रसद पुरविणे आणि थळच्या किनारपट्टीचे रक्षण करणे अशा तीनही आघाड्यांवर हा खुबलढा ( खडतर लढलेला ) भक्कम उभा होता! 


या किल्ल्याची तटबंदी ३.५ मीटर रुंद असून अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणेच मोठमोठे दगड एकमेकांवर रचून कोणतेही सिमेंटसारखे जोडपदार्थ न वापरता याची उभारणी करण्यात आलेली. कुलाबा आणि या किल्ल्यातील साधर्म्यामुळे यांचा बांधकामाचा काळ एकच असायला हवा पण समकालीन पुराव्याअभावी हा काळ नक्की सांगता येत नाही. 


या किल्ल्याचा सर्वात पहिला उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. २६ जानेवारी १६८० मध्ये महाराजांचा आरमारी अधिकारी दौलतखान याने खूबलढ्यावरूनच सिद्दीच्या उंदेरीवर तोफगोळ्यांचा वर्षाव केलेला. यानंतर शाहू महाराजांच्या काळात ८ जुलै १७३३ रोजी सेखोजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकल्याची नोंद आहे. १० जुलै १७३३ रोजी सेखोजी आंग्रे यांनी लिहिलेल्या एका पत्रातही तशी नोंद आहे. सेखोजी यांच्या निधनानंतर आंग्रे बंधूंमध्ये चालू असलेल्या सत्ता संघर्षात संभाजी व तुळाजी यांनी १७४० मध्ये मानाजींचे जे किल्ले घेतले होते त्यात खुबलढाही होता. पुढे जून १७४७ मध्ये सिद्दीने हा किल्ला ताब्यात घेतला. अडीच महिन्यांनंतर मानाजी आंग्रे यांनी या किल्ल्याला वेढा देऊन मोर्चेबांधणी केली त्यावेळी सिद्दीने उंदेरीवरून हल्ला चढविला होता. यावेळी मानाजी आंग्रे यांनी वेताळाचे स्मरण करून सिद्दीला नमवले होते. आंग्रेकालीन मंदिरांमध्ये वेतळाच्या मुर्त्या अजूनही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. या युद्धात मानाजी आंग्रे यांच्या मांडीला गोळी लागली होती व सिद्दीची २०० माणसे मारली गेली होती. या चकमकीच्या एक दोन वर्षातच किल्ला पुन्हा मराठ्यांकडे आला होता. १७५० मध्ये सिद्दीने पुन्हा एकदा हा किल्ला जिंकून घेण्यास शेवटचा अयशस्वी प्रयत्न केला. पुढे हा किल्ला मराठ्यांकडेच राहिला. 


या सिद्दीसोबतच्या लढाईचे वर्णन रामजी महादेव बिवलकर व राणोजी बलकवडे यांच्या पत्रात मिळते. या युद्धानंतर हा थळचा कोट राखण्यासाठी मनुष्यबळ, दारुगोळा, अन्नधान्य, डागडुजी अशा गोष्टींवर खूप खर्च होत होता व त्यामानाने कर स्वरूपातून मिळणारे उत्पन्न फार कमी होते. शिवाय किल्ला सिद्दीच्या हातात गेल्यास अजूनही नुकसान झाले असते म्हणून हा किल्ला पाडण्याचे ठरवले गेले. पुढे मानाजी आंग्रे यांनी हा किल्ला पाडून येथील तोफा अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावर नेल्या. पुढे १७९९ मध्ये जयसिंगराव आंग्रे यांनी खांदेरीवरून थळ वर हल्ला केल्याची नोंद मिळते. हा हल्ला बाबुराव आंग्रे यांनी परतवून लावला होता. 


आज येथे एका बुरुजाच्या पायाचा भाग थोडाफार पाहता येतो तो सोडला तर किल्ला म्हणून पाहण्यासारखे येथे काही नाही. येथील बंदरावरून उंदेरी आणि खांदेरी फार जवळ पाहता येतात. उंदेरी येथून १ मैल तर खांदेरी सव्वा मैल पश्चिमेकडे आहेत. खांदेरीच्या दक्षिणेकडील टोकावर असलेला दीपस्तंभ येथून पाहता येतो. हे तिन्ही किल्ले एकाच नजरेत पाहिल्यावर येथे घडलेला इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. हे तिन्ही किल्ले इतके जवळ असल्याने या किल्ल्यांवर तोफांचे किती महत्व असावे हे लगेच स्पष्ट होऊन जाते. हे किल्ले आणि त्यांचा इतिहास म्हणजे थळला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे! 


संदर्भ:

१. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कुलाबा गॅझेट -१८८३

२. अलिबाग थळ खांदेरी उंदेरी - महेश तेंडुलकर - २०१०

३. रायगड गॅझेटियर - १९९३ 


©️माहिती संकलन आणि फोटो: सुश्रुत निकाळजे (www.TheTown.in) 


----------------------------------------------------------------- 


ही माहिती आवडल्यास जरूर शेअर करा आणि अजूनही अशी माहिती मिळवण्यासाठी या पेजला लाईक करा! 


----------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi