Wednesday, 13 May 2026

शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने द्यावेत

 शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने द्यावेत

-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड


· सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या समवेत घेतला आढावा


मुंबई, दि. १२ : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

मंत्रालयात आयोजित राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जलसंधारण विभागाच्या विविध प्रलंबित आणि प्रगतीपथावरील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापडकर तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. .

            जलसंधारण कामांमुळे भविष्यात शेतीसाठी पाणी उपलब्धता वाढून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

Tuesday, 12 May 2026

वाल्मीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेणार

 वाल्मीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेणार

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

मुंबई, दि. १२ : राज्यातील इतर प्रशासकीय विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थांमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयाचा सखोल अभ्यास करून त्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावा आणि शासन मान्यता घेणेबाबत कार्यवाही करावी, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करेल, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

 

मंत्रालयात जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) कर्मचाऱ्यांसाठी ईएसटी आणि सर्व्हिस रुल मधील अर्धवट लागू करण्यात आलेला महाराष्ट्र नागरी सेवा (सेवानिवृत्ती वेतन) नियम १९८२ पूर्णतः लागू करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापडकर यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री संजय राठोड म्हणाले की, वाल्मीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा विषय शासनाच्या विचाराधीन असून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल. राज्यातील विविध स्वायत्त संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा व निवृत्तीवेतनासंदर्भातील नियमांचा अभ्यास करून त्यावर योग्य तो प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

बैठकीत वाल्मी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांमधील प्रलंबित बाबी, निवृत्तीवेतन नियमांची अंमलबजावणी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

केवळ सुविधा निर्माण करून चालणार नाही, तर त्याची माहिती कामगारांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज

 केवळ सुविधा निर्माण करून चालणार नाही, तर त्याची माहिती कामगारांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे सांगत कामगार मंत्री म्हणाले, प्रत्येक विमाधारक कामगाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर जवळच्या रुग्णालयाची माहिती, उपलब्ध सुविधा याची माहिती पाठवावी. याद्वारे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण होईल. तसेच आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत त्यांच्यासाठी असलेल्या रुग्णालयांची मदत त्यांना होईल.

 

सध्या राज्यात साधारण ४९ लाख विमाधारक कामगार आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्याच्या अंमलबजावणीनंतर या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. वाढणाऱ्या या कामगार वर्गाला दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी यंत्रणेने आतापासूनच सज्ज व्हावे, असे आवाहनही कामगार मंत्र्यांनी केले. कामगारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि मंजूर झालेली रुग्णालये लवकरात लवकर कार्यान्वित करण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले.

राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा

 राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील

आरोग्य सुविधांचा लाभ  प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा

-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

मुंबई, दि. १२:  राज्यातील प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात.  यासाठी 'कर्मचारी राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधांचा लाभ शेवटच्या कामगारापर्यंत पोहचविण्यात यावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. राज्यातील विमाधारक कामगारांची वाढती संख्या लक्षात घेता, आरोग्य सुविधांचा विस्तार आणि जनजागृती करण्याच्या सूचनाही मंत्री फुंडकर यांनी दिल्या.

 

बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या प्रादेशिक संचालक अभिलाषा झा, उपसचिव रोशनी कदम, भारतीय मजूर संघाचे अनिल डोमणे आदी उपस्थित होते.

 

बैठकीत कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, केंद्रीय कामगार विभागाच्या माध्यमातून राज्यात कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत १८ नवीन रुग्णालयांना मंजुरी देण्यात आली आहे. या रुग्णालयांमुळे कामगारांना त्यांच्या निवासस्थानाजवळ किंवा कामाच्या ठिकाणी तातडीने उपचार मिळणे सुलभ होणार आहे. तसेच आरोग्य शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्यासाठी अंधेरी (मुंबई), पुणे आणि नागपूर येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. ही महाविद्यालये आणि रुग्णालये कामगारांसाठी आरोग्य सुविधेचा मोठा आधार ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांचा 14 मे रोजी शपथविधी

 विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांचा 14 मे रोजी शपथविधी

·         सभापती प्रा. राम शिंदे सदस्यत्वाची शपथ देणार

मुख्यमंत्री महोदयांसह अनेक नेते उपस्थित राहणार

 

मुंबई, दि. 12: महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक सदस्या अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी गुरुवार, 14 मे, 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे या दहा सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील.

 

1) डॉ. नीलम गोऱ्हे, 2) ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू,

3) अंबादास एकनाथराव दानवे, 4) डॉ. प्रज्ञा राजीव सातव,

5) प्रमोद शांताराम जठार, 6) झीशान झिआउद्दीन सिध्दीकी,

7) माधवी संजय नाईक, 8) सुनिल विनायक कर्जतकर,

9) विवेक बिपिनदादा कोल्हे, 10) संजय नथ्थुजी भेंडे

           

या नवनिर्वाचित सदस्यांना सभापती शपथ देतील. या शपथविधी समारंभास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष. अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निमंत्रित करण्यात आले असून या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. विधानपरिषदेच्या सदस्यांनाही शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विधानपरिषदेच्या विद्यमान उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे सलग पाचव्यांदा सदस्यत्वाची शपथ घेतील.

आदिवासी अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञान,

 मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, आदिवासी अध्यासन केंद्रच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि जीवनशैलीचा अभ्यास होऊन त्याचे जतन करण्यास मदत होणार आहे. तसेच, शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून आदिवासी युवकांना नवीन संधी उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होण्यास मदत होईल. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च व तंत्र शिक्षणातील सहभाग वाढविणे आणि त्यांना रोजगारक्षम बनविणे हेही या केंद्रांचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

 

जळगाव, नांदेड व मुंबई विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र कार्यरत

 मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जळगाव, नांदेड व मुंबई विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र कार्यरत असून अमरावती व गडचिरोली विद्यापीठात नव्याने आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. या विद्यापीठाला आदिवासी अध्ययन केंद्रासाठी ३ कोटी रुपयांचा निधी आदिवासी विकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीतून केंद्रांची उभारणी, संशोधन उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

 

आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी संशोधनाधारित उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची समृद्ध लोकसंस्कृती, भाषा आणि परंपरा जतन करणे तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी संशोधन करणे हा या केंद्रांचा मुख्य उद्देश आहे. यामार्फत आदिवासी समाजाचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले

Featured post

Lakshvedhi