व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
-विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
नशामुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला अधोरेखित
व्यसनमुक्तीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे गौरवोद्गार
राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रम
मुंबई, दि. २६ :व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०२० ते २०२५ या पाच वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर बोलत होते.
कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, समाजात परिवर्तन घडविण्याचे काम सामाजिक न्याय विभाग प्रभावीपणे करत असून, लोकोपयोगी उपक्रमांमुळे सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे. या सोहळ्यात १०० हून अधिक व्यक्ती आणि १३ संस्थांचा गौरव होत असून, हे कार्य राष्ट्रनिर्मितीला बळ देणारे आहे, असे त्यांनी नमूद केले. व्यसन ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. व्यसनामुळे आर्थिक नुकसान, उत्पादकतेत घट, आरोग्य व्यवस्थेवर ताण, गुन्हेगारीत वाढ, कुटुंबव्यवस्थेचे विघटन आणि शिक्षणातील गळती वाढते, असेही त्यांनी सांगितले.