प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद/ पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, शौर्य पुरस्कार विजेत्यांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 12 August 2025
शौचालयांच्या करारपद्धतीत बदल करावेत
शौचालयांच्या करारपद्धतीत बदल करावेत
- मंत्री मंगलप्रभात लोढा
जनता दरबारात महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई, दि. ११ : शौचालयांच्या कंत्राटासाठी मुंबई महापालिकेचा ३० वर्षांचा करार अतिशय जाचक असून नागरिकांना त्यामुळे सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे करार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी अशी सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.
यासंदर्भात कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनाही पत्र लिहिले आहे. पालिकेच्या एफ नॉर्थ विभागात आयोजित केलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या वेळी आमदार प्रसाद लाड आणि कॅप्टन तमीळ सेल्वन उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधण्याच्या निर्देशांनुसार कौशल्य मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्याकडून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विभागवार जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सायन कोळीवाडा मतदारसंघातील एफ उत्तर विभागात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी शौचालयांच्या बाबतीत तक्रारी मांडल्या. शौचालयांचा तीस वर्षांचा करार असल्याने कंत्राटदार मनमानी करतात, कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.
या अडचणींची कौशल्य मंत्री श्री. लोढा यांनी तातडीने दखल घेतली. तसेच यासंदर्भात महापालिकेचे सहायक आयुक्त श्री.अरुण क्षीरसागर यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
सायन-कोळीवाडा मतदारसंघात असलेल्या एफ /उत्तर या विभागात आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून तीनशे नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांना एकाच छताखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गणेशोत्सवादरम्यान रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि स्वच्छतेसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही कौशल्य मंत्री श्री. लोढा यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार श्री. तमिळ सेल्वन यांनी त्यांच्या मतदारसंघात जनता दरबार आयोजित केल्याबद्दल कौशल्य मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले.
****
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे
मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 11 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे शासन क्र. पुलदे-२०२५/प्र.क्र.७४ (ई-११४४०९५)/सां.का. २, दिनांक २० जून, २०२५ अन्वये सुरु होणा-या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परिशिष्ट "अ" मधील विहीत नमून्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर गणेश चतुर्दशीच्या एक दिवसा पूर्वीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरीता स्पर्धा आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येवून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र आणि व्हीडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडे सादर करतील.
या गणेशोत्सव स्पर्धेच्या निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांचेकडून स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाची 'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्न सुरक्षेचा' विशेष मोहीम
सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाची
'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्न सुरक्षेचा' विशेष मोहीम
- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
- नाशिक येथे मोहिमेचा आरंभ
मुंबई, दि. ११ :- सणासुदीच्या काळात होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या राज्यव्यापी मोहिमेचा आरंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नाशिक येथे करण्यात आला.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, ही मोहीम दिवाळी संपेपर्यंत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असून मिठाई, खाद्यतेल, खवा, मावा दूध इ. अन्न पदार्थाच्या गुणवत्तेवर यामध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
राज्यात आगामी काळात साजरे होणारे सण पोळा, गणेशोत्सव, ईद, गौरी पूजन, नवरात्र महोत्सव, दसरा व दिवाळीच्या अनुषंगाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यास, त्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अखाद्य, अपायकारक नमुने नियमानुसार नष्ट करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ व अन्न सुरक्षा आणि मानके नियम, २०११ नुसार शास्ती बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त यांचाही सहभाग असणार आहे. सणासुदीच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील टोलनाक्यांवर परराज्यातून येणाऱ्या खव्यासारख्या पदार्थ्यांच्या अचानक तपासणी मोहिम सोबतच सुरक्षित अन्न पदार्थाबाबत प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. ही मोहीम दिवाळीसंपेपर्यंत दर महिन्याला नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
Monday, 11 August 2025
तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा,राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी
तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा
- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे
राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करण्याचे निर्देश
मुंबई, दि. ११ : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन वाढ झाली आहे. येत्या हंगामामध्ये आणखी वाढ अपेक्षित असून त्यासाठी विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत. तसेच राज्यातील तलावामध्ये गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यामुळे तलावातील गाळ काढण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
मंत्रालयात मत्स्यव्यवसाय हंगामाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री.राणे यांनी या सूचना दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक उपस्थित होते. तर राज्यातील प्रादेशिक उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
ड्रोन सर्वेक्षण सुरू केल्यानंतर सागरी मत्स्योत्पादनात चांगली वाढ झाली असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, तलावातील गाळ काढल्यानंतर गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढणार आहे. हा गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वयाने कार्यक्रम आखावा. तलावांवर असलेली अतिक्रमणे काढण्यात यावी. कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही याची अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. जितकी चांगली शिस्त राहील तितके चांगले उत्पादन वाढेल. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांनी मत्स्योत्पादन वाढीसाठी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे मंत्री श्री.राणे यांनी सांगितले.
मंत्री श्री. राणे म्हणाले की, प्लास्टिक मुक्त कोळीवाडा या योजनेस गती द्यावी. मत्स्योत्पादकांना स्थानिक बाजारपेठेत उत्पादन विक्रीसाठी प्रोत्साहन द्यावे. अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त कराचा विचार करता मत्स्योत्पादन स्थानिक तसेच देशांतर्गत बाजारात विक्री करणे हा एक चांगला पर्याय आहे. त्यासाठी यामधील कंपन्यांसोबत चर्चा करावी. मत्स्योत्पदकांमध्ये जागृती करावी. ‘एआय’च्या वापराबाबत सर्व सहायक आयुक्त यांचे प्रशिक्षण घ्यावे. मत्स्य आणि कोळंबी खाद्य महोत्सवाचे आयोजन करावे. कोलंबीची विक्री वाढवण्यासाठी एक रोडमॅप करावा, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी यावेळी दिल्या.
शूर रघुजी भोसले प्रथम यांची तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व
तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व
रघुजी भोसले प्रथम (1695 ते 14 फेब्रुवारी 1755) हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. रघुजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीती यावर प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली होती. रघुजी भोसले प्रथम यांनी 1745 आणि 1755 मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. याचबरोबर रघुजी भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगड, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला. अठराव्या शतकातील एक अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून रघुजी भोसलेंकडे बघितले जाते. नागपूरकर भोसलेंच्या भौगोलिक सीमांमध्ये लोखंड, तांबे यांच्या खाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. यांचा वापर वस्तूंसोबतच शस्त्रे बनवण्यासाठीही केला जात असे. नागपूरकर भोसले घराण्यातील राजशस्त्रे निर्मिती आणि सौंदर्य यांचा अजोड मिलाफ आहे.
लंडन येथे लिलावात निघालेली रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती. पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. पात्यावरील लेख ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती, याकडे निर्देश करतो. तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे. तलवारीच्या उभट मुसुमेला हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले आहे.
रघुजी भोसले प्रथम यांची ही फिरंग तलवार अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेले नक्षीकाम आणि शस्त्रांवरील निर्माणकर्त्याच्या किंवा वापरकर्त्याच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्ये होती. या दोन्हीसही अपवाद म्हणून रघुजी भोसले यांच्या तलवारीवर नावाचा लेख तसेच नक्षीकाम केलेले आहे. तलवारीचे युरोपीय बनावटीचे पाते अठराव्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यापाराकडे निर्देश करते.
नागपूरकर भोसलेंची 1817 मध्ये सीताबर्डी येथे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढाई झाली. या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाल्यावर कंपनीने नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली. यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू, दागिने तसेच शस्त्रांचाही समावेश होता. नागपूरचे संस्थान खालसा झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला वेळोवेळी नजराणे आणि भेटीही मिळाल्या होत्या. रघुजी भोसलेंची तलवार युद्धानंतरच्या लुटीमध्ये अथवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटींमध्ये देशाबाहेर गेली असण्याची शक्यता असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार शासनाच्या ताब्यात
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार शासनाच्या ताब्यात
सोमवारी, 18 ऑगस्टला तलवार मुंबईत दाखल होणार
मुंबई, दि. 11 : नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवारी 18 ऑगस्ट 2025 रोजी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.
ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार लिलावात निघाल्याची बातमी 28 एप्रिल 2025 रोजी कळाली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ही तलवार शासनाला मिळावी, या दृष्टीने नियोजन करण्यात आले. दूतावासाशी संपर्क करुन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री ॲड.शेलार यांनी याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मंत्री ॲड.शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला.
महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थीने हा लिलाव जिंकला होता, त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करुन आज मंत्री ॲड.शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. अशा प्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार आपल्या ताब्यात घेण्याचे भाग्य मला लाभले. तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतहासिक विजय आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
ही तलवार ताब्यात घेतांना लंडन येथील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या घटनेचा आनंद जल्लोष करुन साजरा केला. या दौऱ्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन ही तलवार सोमवारी, 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे दाखल होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढून वाजतगाजत ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकदमीमध्ये अणली जाणार आहे. तर याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत “गड गर्जना” हा कार्यक्रम होणार आहे.
महाराष्ट्र शासनास मिळालेल्या या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या नावाने एक इतिहास नोंद होईल, असा हा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...