सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 23 December 2023
विठुराया सुट्टीवर, एक महिना देवाचा पत्ता 'मुक्काम पोस्ट विष्णूपद'*
*विठुराया सुट्टीवर, एक महिना देवाचा पत्ता 'मुक्काम पोस्ट विष्णूपद'*
*मार्गशीर्ष महिना हा विठुरायाच्या सुट्टीसाठी राखीव असून चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर देव सुट्टीसाठी येतो.*
*रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आलेला थकवा घालवण्यासाठी सर्वजण विश्रांतीसाठी निसर्गरम्य ठिकाणाच्या शोधात असतो, या ठिकाणी प्रत्येकाला फक्त मानसिक शिणवटा घालवण्यासाठी शांतता हवी असते. हीच अवस्था देवाची होत असेल नाही का? त्यामुळेच पंढरपूरचा विठुराया चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहे.*
*देव सुट्टीवर आहे याचे सर्वांना आश्चर्य वाटत असेल, परंतु हे खरे आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही पाळली जाते. मार्गशीर्ष महिना हा देवाच्या सुट्टीसाठी राखीव असून चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर देव सुट्टीसाठी येतो, असे लोक मानतात. आषाढी यात्रेनंतरचा चातुर्मास आणि नंतर आलेली कार्तिकी यात्रा यामुळे थकलेला विठुराया मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतीक्षेत असतो. हेमंत ऋतूचे वेध लागताच देवालाही विष्णुपदावर येण्याची ओढ सुरु होते. यंदा मात्र राज्यभर परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे देवाच्या या स्पॉटवर पाणी साचले आहे. त्यामुळे या पाण्यातच देव सुट्टीचा आनंद घेणार आहे.*
*पंढरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर हे विष्णुपद नावाचे असेच एक निसर्गरम्य ठिकाण आहे.* *विठ्ठल मंदिराकडून गोपाळपूरला येताना रस्त्यापासून आतल्या बाजूला दाट झाडीत चंद्रभागा तीरावरील या मंदिराला बहुसंख्य पर्यटक हे नदीमार्गे होडीतून येतात.*
*पुंडलिक मंदिरापासून रोज अनेक होड्या दिवसभर पर्यटकांना नौकानयनाच्या आनंदासह देवाच्या या स्पॉटवर नेतात. गेल्या शेकडो वर्षांपासून दरवर्षी कार्तिक वद्य अमावास्येला विठुराया येथे सुट्टीवर येतात आणि तब्बल महिनाभर विश्रांती घेऊन मार्गशीर्ष वद्य अमावास्येला पुन्हा वाजत गाजत मंदिराकडे परततात.*
*चंद्रभागेच्या पाण्यातून प्रवास करीत या मंदिराकडे येताना वाटेत पात्राच्या माढ्यातच पाण्यात अर्धवट बुडालेले नारदमुनींचे बैठेखानी लहानसे मंदिर लागते. या मंदिरात पद्मासन घातलेली नारदमुनींची पुरातन मूर्ती आहे.* *विष्णुपदाला जाण्यापूर्वी सर्व भाविक होडीतूनच नारदमुनींचे दर्शन घेऊन पुढे प्रवास करतात.*
*नारदमुनींच्या मंदिराबाबतही भाविकांच्या विविध प्रकारच्या आख्यायिका असून देव आणि रुक्मिणी मातेचे भांडण लावल्यामुळेच विठुरायाने नारदाला नदीच्या पात्रात बसविले आहे.* त्यामुळे *नारदमुनींचे मंदिर सहा महिने पाण्याबाहेर आणि सहा महिने पाण्यात असते. नारदांच्या मंदिराच्या पुढे येताच विष्णुपदाचे दगडी मंदिर दिसू लागते.*
*पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेला नदीतच अदमासे पाऊण किलोमीटर अंतरावर हे मंदिर चंद्रभागा आणि पुष्पावती या नद्यांच्या संगमावर आहे. विष्णुपदाचे मुख्य मंदिर इ.स.1640 साली धामणगावकर बुवा यांनी बांधले असून 1785 साली चिंतो नागेश बडवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे पूर्णतः काळ्या पाषाणातील असून चारी बाजूला मोकळ्या कमानी आणि मध्यभागी भगवान श्रीविष्णूंचे जवळपास तीन-साडेतीन फुटांचे पाऊल आहे.*
*याठिकाणी देव गोपालक आणि आपल्या गाईंसमवेत येऊन क्रीडा करीत असल्याच्या आख्यायिका असून येथील दगडावर अनेक ठिकाणी गाईच्या आणि गोपालकांच्या पायाच्या आकाराच्या खुणा दगडात तयार झालेल्या आहेत . मध्यभागी देवाचे समचरण, बासरी, काठी आणि गोपाळकाल्याच्या भांड्याच्या खुणा दगडात दिसतात. मंदिराच्या चार पायऱ्या उतरून खाली असलेल्या दगडी ओट्यावर शेकडो वर्षांपूर्वीची प्रताप मारुतीची मूर्ती आहे.*
*सध्या पाणी असल्याने ही सर्व मंदिरे पाण्यात गेलेली आहेत. देवाच्या पायाच्या दगडावरील खुणांच्या सभोवताली जरी पाणी असले तरी या पाण्यात या खुणा पाहून भाविक दर्शन घेत आहेत. सध्या विष्णूपदाकडे येणार मार्गही पाण्यात असून मंदिरात पाणी आल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर समितीने संपूर्ण मार्ग आणि मंदिराच्या सभोवताली लोखंडी बॅरिगेट्स लावले आहेत. याठिकाणी येणारे भाविक आपल्यासोबत भोजनासाठी जेवणाचे डबे घेऊन येतात आणि या निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आनंद घेत असतात. यासाठी आता मंदिर समितीने या परिसराची स्वच्छता केली असून भाविकांच्या वनभोजनासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करुन ठेवली आहे.*
*विठुराया मंदिरातून विष्णुपदावर आल्याने देवाच्या मंदिरात होणारी नित्यपूजा, धुपारती, शेजारती, सकाळच्या खिचडीचा, दुपारचा महानैवेद्य आणि रात्रीचा बालभोग नैवेद्य याच* *ठिकाणी दाखविले जातात.*
*देव आले कि भक्तही त्याच्या पाठोपाठ येथे येत असतात. तेही सोबत* *जेवणाचे डबे घेऊन येथे गोपाळकाल्याच्या आनंद घेतात. वारकरी आणि पर्यटक महिला येथे देवासमोर फेर धरून अभंग गाऊन आणि नाचून आपला आनंद व्यक्त करीत असतात.* *एकंदर सुट्टीवर आलेल्या देवाला येथेही भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे मनासारखा सुट्टीचा आनंद घेत येत नसला तरी भाविक मात्र येथे येऊन दर्शन घेण्यास पर्वणी मानतात.*
*या मंदिराकडून पायऱ्या चढून गोपाळपूर रस्त्याकडे जाताना वाटेतच संत जनाबाईंचे मंदिर आहे.याच ठिकाणी संत जनाबाईंना सुळावर चढवले असता त्या सुळाचे पाणी झाल्याची आख्यायिका सांगितली जाते.* *मंडळी तुम्ही देखील विठ्ठल दर्शनासाठी येणार असाल तर विठ्ठल मंदिरात जावंच पण सध्या देवाचा महिनाभरासाठी बदलेल पत्ता मुक्काम पोस्ट विष्णुपद हा आहे हे ध्यानात ठेवा म्हणजे झाले.*
🙏🚩 राम कृष्ण हरी🚩🙏
मतदार यादीमधील नाव अद्यावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे
मतदार यादीमधील नाव अद्यावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे
- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई, दि. २२ : मतदार यादीत नाव तपासणे आणि नवीन नाव नोंदविणे यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
मंत्रालय येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नाव नोंदणी संदर्भात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवीण महाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरीष सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रवींद्र पवार, आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दिनकर तावडे, दीपक पारडीवाला, काँग्रेस पक्षाचे डॉ. गजानन देसाई, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण- २०२४ कार्यक्रमांतर्गत मतदार ओळखपत्रातील त्रृटी दुर करणे, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट तसेच अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यासोबत एक Booth Level Agent (BLA) राजकीय पक्षाने नियुक्त करुन सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केली.
मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम-2024 अंतर्गत राज्यामध्ये दि.27 ऑक्टोंबर, 2023 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यानंतर दि.27 ऑक्टोंबर, 2023 ते 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार दि.21डिसेंबर, 2023 पर्यत मतदार यादीमध्ये 8 लाख 50हजार 816 एवढी निव्वळ नाव नोंदणी झालेली आहे. यामुळे दि. 21 डिसेंबर,2023 रोजी राज्याच्या मतदार यादीतील एकुण मतदारांची संख्या 9 कोटी 16 लाख 83 हजार 79 एवढी झालेली आहे. यामध्ये महिला मतदार ४ कोटी ३९ लाख ३८ हजार ३१६ ,पुरुष मतदार ४ कोटी ७७ लाख ३९ हजार ३८८ इतके असून तृतीय पंथी ५३७५ इतके मतदारांची नोंद झाली आहे. मतदार नोंदणी बाबत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.मतदार संघ निहाय असलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.
पदवीधर विधानपरिषद मतदार नाव नोंदणीमध्ये प्रारुप मतदार यादीमध्ये मुंबईसाठी एकूण 61 हजार 390, कोकणसाठी 85 हजार 667 इतकी नोंदणी झाली आहे. तसेच दि.21 डिसेंबर पर्यत मुंबईसाठी 29 हजार 446 व कोकणसाठी 1 लाख 8हजार 76 एवढे आणखी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक विधानपरिषद मतदारांच्या नाव नोंदणीमध्ये प्रारुप मतदार यादीमध्ये मुंबईसाठी 11 हजार 155 व नाशिकसाठी 53 हजार 518 एवढी नोंदणी झाली आहे. दि.21 डिसेंबर पर्यत मुंबई साठी 2हजार 820 व नाशिकसाठी 11 हजार 268 एवढे आणखी अर्ज प्राप्त झालेले आहेत. मतदार नोंदणीची प्रक्रिया ही निवडणूकीमध्ये उमेदवाराच्या नामनिर्देशनाच्या दिनांकाच्या 10 दिवस अगोदर पर्यत सुरु असते, अशीही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी दिली.
ओबीसी विद्यार्थींच्या वसतिगृहासाठी भाडे तत्त्वावर इमारतीसाठी इमारत मालकांकडून अर्ज आमंत्रित
ओबीसी विद्यार्थींच्या वसतिगृहासाठी
भाडे तत्त्वावर इमारतीसाठी इमारत मालकांकडून अर्ज आमंत्रित
मुंबई, दि. २२ : इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुलांचे एक व मुलींचे एक शासकीय वसतिगृह सुरु करावयाचे आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या 30 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. या परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, सिडको तसेच खासगी इमारत मालक, बांधकाम विकासक यांचेकडून इमारत भाडेतत्वावर घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
इतर मागास प्रवर्गातील मुलांकरिता १०० मुलांच्या क्षमतेचे एक शासकीय वसतिगृह आणि इतर मागास प्रवर्गातील मुलींकरिता १०० मुलींची क्षमता असलेले एक शासकीय वसतिगृह अशा दोन वसतिगृहाकरीता इमारत तपशिल असा आहे. इमारत मुंबई उपनगर परिसरात असणे आवश्यक आहे. किमान क्षेत्रफळ दहा हजार चौ. फुट असावे. या इमारतीमध्ये १० स्वच्छतागृह व १० स्नानगृहाची सुविधा असावी. इमारत अधिकृत असावी व पूर्णत्वाचा दाखला असावा. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार इमारत मालक देण्यास तयार असलेबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील. प्रत्येक वसतिगृहाकरिता स्वतंत्र दोन इमारती आवश्यक आहेत.
इच्छूक म्हाडा, सिडको, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच खासगी इमारत मालक, बांधकाम विकासक यांनी नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, आर सी चेंबुरकर मार्ग, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, चेंबुर (पूर्व), मुंबई ७१, (दूरध्वनी क्रमांक ०२२ २५२२२०२३) या कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात अर्ज करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
००००
मुंबई फेस्टिव्हल २०२४' च्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा
'मुंबई फेस्टिव्हल २०२४' च्या यशस्वी आयोजनासाठी
सर्वांनी समन्वयाने काम करा
मुंबई, दि. २२ : मुंबईत २० ते २८ जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' आयोजित करण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल समितीसह सर्व सहभागी संस्थांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत पर्यटनमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी - शर्मा, ड्रीम स्पोर्ट्सचे सिध्देश्वर मिश्रा यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री.महाजन म्हणाले की, देशातील आणि विविध परदेशातील नागरिकांना मुंबईचे आकर्षण आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून महाराष्टाची संस्कृती पर्यटकांना सांगण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवामध्ये व्यावसायिक, भागधारक, शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा गृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाईडेड सीटी टूर, सीटी टूर यांचा समावेश असणार आहे. मुंबई फेस्टिवलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करुन या महोत्सवात लोकांचा सहभाग वाढविण्यात यावा.
मुंबई महोत्सवाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. महोत्सवासाठी कमी कालावधी राहिला असल्याने महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी लागणा-या विविध परवानग्या, महोत्सवाचे नियोजन, वेळापत्रक व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबतचे सविस्तर सादरीकरण संबंधित संस्थेने तयार करावे. मुंबईचे डबेवाले, मुंबईची सांस्कृतिक कोळी बांधव, मुंबईचे शेअर मार्केट, मुंबईचे हॉलीवुड स्टार, मुंबई चौपाटी या सर्वांना मुंबई फेस्टिवल मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. शासनाच्या सर्व यंत्रणा आणि अशासकीय संस्थांनी समन्वयाने काम करावे, असेही आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले.
महाराष्ट्राचे चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी पुरस्काराचे वितरण
महाराष्ट्राचे चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी,
गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
राष्ट्रपतींच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी पुरस्काराचे वितरण
नवी दिल्ली, दि. 22 : वर्ष 2023 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.
दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी दोन खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 26 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यासह एकूण 9 खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ व ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यासोबतच ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील तीन खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. ‘मौलाना अबुल कलाम आझाद चषक’ गुरू नानक विद्यापीठ, अमृतसर, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र या तीन संस्थांना घोषित करण्यात आला आहे.
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्रचे बॅडमिंटन पटू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा समावेश आहे. तर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांना आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे, तर ‘अर्जुन पुरस्कार’ हा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देखील दिले जाते.
ऑगस्ट 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत 21 वर्षीय ओजसने सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून आणखी एक विक्रम केला. नागपूरचा गोल्डन बॉय तिरंदाज ओजस देवतळे याच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी त्याचे नाव जाहीर झाले आहे.
सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये 720 पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.
सलग चारवर्ष कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते. खेळात तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी ‘अर्जुन पुरस्कार’ दिला जातो. खेळाडूंच्या मागील चार वर्षांतील उत्तम प्रदर्शन, नेतृत्व, खेळ आणि त्यातील शिस्तीसाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळातील प्रशिक्षण देण्यासाठी आणि खेळाडुंकडून स्पर्धांसांठी उत्कृष्ट कार्य करून घेणा-या क्रीडा प्रशिक्षकांची ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’साठी शिफारस केली जाते.
खेळ आणि स्पर्धेमधील आजीवन कामगिरीसाठी ‘ध्यानचंद पुरस्कार’ दिला जातो. यामध्ये खेळाडूंच्या चांगले प्रदर्शन आणि सेवानिवृत्तीनंतरही संबंधित क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देत राहण्यासाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते. खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कॉर्पोरेट संस्था ज्या खेळाडू आणि खेळांना प्रोत्साहन देतात अशा संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन’ पुरस्काराने गौरिवण्यात येते. आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी दिली जाते.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी
मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन) अर्जुन पुरस्कार:ओजस देवताळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बोल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). ’
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब).
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ’
ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)
0000
गाथा पराक्रमाची : वीर बालपणाच्या आदर्शाची बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग
गाथा पराक्रमाची : वीर बालपणाच्या आदर्शाची
बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग
काही कृत्ये आणि कर्मे इतकी प्रगल्भ असतात की ते इतिहासाचा मार्ग बदलतात! असाच एक म्हणजे शिखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य!
तरूण, निरागस आणि निष्पाप सुपुत्र, साहिबजादा (प्रिन्स) अजीत सिंग, साहिबजादा जुझार सिंग ज्यांना चमकौरच्या युध्दात 23 डिसेंबर 1704 रोजी हौतात्म्य आले. छोटे साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना 26 डिसेंबर 1705 रोजी सरहिंदच्या (पंजाब) मुघल (Governor) शासक वजीर खान याने निघृणपणे ठार मारले.ते शहीद झाले.
मागील वर्षापासून 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ पाळला जावा असे केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना व केंद्र शासित प्रदेशांना आदेश प्राप्त झाले आहेत. या अन्वये या दिवसाच्या महत्वाचे औचित्य साधून, गुरू गोबिंद सिंग यांचे चार साहिबजादा यांच्या हौतात्म्यावर तसेच त्यांच्या शौर्यावर प्रकाश टाकणारा विशेष लेख.
शीख समाजासाठी डिसेंबर महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच महिन्यात मुघल आणि डोंगरी संस्थानिकांच्या एकत्रित सैन्याने गुरू गोबिंद सिंग, त्यांचे कुटुंब आणि अनुयायांना आनंदपूर साहिब किल्ल्यातून बाहेर काढण्यासाठी कपटाचा वापर केला आणि नंतर त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला गेला.
गुरू गोबिंद सिंगांचे शूर आणि निर्भय शीख आनंदपूरच्या किल्ल्याबाहेर मुघल सैन्याशी प्रदीर्घ युध्दात काही महिने एकत्र गुंतले होते. सम्राट औरंगजेबने शपथेवर संदेश पाठवला की जर गुरू आणि त्यांच्या शिखांनी किल्ला सोडला तर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जाण्याची परवानगी दिली जाईल. गुरू गोबिंद सिंग यांना शंका होती पण, सरहिंदचे शासक वजीर खानाच्या नेतृत्वाखाली या सैन्याने गुरूंना आनंदपूर साहिबमधून सुरक्षित मार्गाचे वचन दिले. तथापि, ते बाहेर आल्यावर त्यांच्यावर प्रचंड संख्येने हल्ला केला गेला.
नऊ वर्षे आणि सात वर्षे वयाचे दोन लहान साहिबजादे, त्यांची आजी माता गुर्जर कौर यांच्यासोबत किल्ला सोडताना मुख्य दलापासून विभक्त झाले. त्यांना गंगू नावाच्या वृध्द सेवकाने त्यांच्या मूळ गावी सहेडी येथे आश्रय देण्याचे वचन दिले. तथापि, त्याने विश्वासघात केला व त्यांना मुघलांच्या सरहिंद प्रशासनाकडे सोपविले.
गुरू गोबिंद सिंग यांचे दोन मोठे साहिबजादे, साहिबजादा अजीत सिंग आणि साहिबजादा जुझार सिंग दोन्ही सुपुत्रांनी शिखांच्या मुख्य तुकडी सोबत चमकौरच्या युध्दात शेवटच्या माणसापर्यंत लढा दिला, गुरूंच्या थोरले सुपुत्र साहिबजादा अजीत सिंग आणि साहिबजादा जुझार सिंग दोन्ही साहिबजादा यांना हौतात्म्य आले. पुढील घटनांमध्ये गुरूंनी त्यांचे चार साहिबजादा आणि त्यांची आई गमावली. तथापि, त्यांच्या समर्पित अनुयायांच्या शौर्याने आणि बलिदानामुळे ते वैयक्तिकरित्या वाचले. गुरूंना मारण्यात किंवा अटक करण्यात अयशस्वी झालेल्या वजीर खानाला नैराश्य आले व तो सरहिंदला परतला. तो ज्या फसव्या वर्तनाने वागला होता, त्याबद्दल तो घाबरून गेला होता. या पार्श्वभूमीवरच त्याने लहान साहिबजादांवर इस्लाम धर्म स्वीकारून आणि नंतर त्यांना ताब्यात ठेवून त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी वजीर खानाने लहान राजपुत्रांना सर्वात वाईट प्रकारचा छळ केला आणि त्यांना धमकावले. त्याने त्यांना आणि त्यांच्या आजीला थंडा बुर्ज (थंड बुरूज) मध्ये ठेवले, ज्याची रचना पाण्याच्या वाहिन्यांवरून रात्रीच्या थंड हवेच्या झुळूकांना पकडण्यासाठी करण्यात आली होती. हे ठिकाण उन्हाळ्यासाठी एक योग्य ठिकाण होते पण हिवाळ्यात आणि ते ही रात्रीच्या वेळी खूपच अस्वस्थ करणारे ठिकाण होते. अशात, विशेषत: दोन्ही लहान साहिबजादांना येथे कैद करून वजीर खानाने त्यांच्यावर अत्याचार केला.
वजीर खानने आपल्या सरहिंदच्या दरबारात दोन्ही राजपुत्रांवर दोन दिवस खटला चालवला. पहिल्या दिवशी साहिबजादा यांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यास प्रवृत्त केले. त्यांना प्रचंड संपत्ती आणि मोठे अधिकार देऊ केले.
दोन्ही भावांनी गुरू नानक यांच्या अनुयायांच्या शौर्याचे किस्से, गुरू अर्जन देव आणि गुरू तेग बहादूर (साहिबजादा यांचे आजोबा, गुरू गोबिंद सिंग यांचे पिता) यांच्या अद्वितीय हौतात्म्याची कहाणी त्यांच्या आजीकडून ऐकली होती. दोन्ही साहिबजादे यांनी वजीर खानाच्या अत्याचार धैर्याने, हिम्मतीने सहन केले व खंबीर राहून इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे वजीर खान अस्वस्थ झाला आणि प्रचंड संतापला. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या दरबारात मलेरकोटल्याचा नवाब, शेर मोहम्मद खान याला शिक्षा सुनावण्याचा अधिकार बहाल केला. हे करण्यामागचे त्याचे कारण म्हणजे गुरू गोबिंद सिंग यांनी शेर मोहम्मद खानाच्या भावाला एका युध्दात मारले होते. मात्र, शेर खान यांनी स्त्रिया आणि मुलांवर सूड उगवण्यास नकार दिला आणि शौर्याचा सर्वोच्च परिचय दिला आणि, त्यांनी दोन्ही लहान साहिबजादे व त्यांच्या आजीला सोडण्याचा सल्ला दिला.
याच वेळेला, वजीर खानाने सर्वात क्रूरकृत्य केले जे माणूसकीच्या तत्वांच्या विरूध्द आहे. वजीर खानाने या दोन निष्पाप राजपुत्रांना मुघल साम्राज्याचे शत्रु घोषित केले व त्यांना भिंतीत जिवंत कोंडण्याचा फतवा सोडला. दुसऱ्या दिवशी आदेशाचे पालन व्हायचे होते. निष्पाप व लहान मुलांवर एवढे जुलमी अत्याचार करण्याचा इतिहासात अद्यापपर्यंत कदाचित हा एकमेव दुर्दैवी प्रसंग असावा. शेवटच्या क्षणालाही वजीर खानाने साहिबजादांना त्यांचे विचार बदलून इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकवण्याचा प्रयत्न केला. शौर्यवान साहिबजादा यांनी मरण कबुल केले पण धर्म परिवर्तनास ठाम नकार दिला. तसेच, आम्हाला सोडल्यास आम्ही जंगलात जाऊ, काही शीख एकत्र करू, चांगले घोडे खरेदी करू आणि परत येऊन युध्दभूमीवर तुमचा व तुमच्या सैन्याचा सामना करू अशा कणखर आवाजात साहिबजादा बाबा जोरावर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. त्याच क्षणी नवीन भिंतीची निर्मिती करून त्यांना डांबण्यात आले. तथापि, राजपुत्रांचा श्वास निघण्यापूर्वीच भिंत तुटली. वजीर खानाने जल्लादांना लहान राजपुत्रांचे गळे कापण्याचा आदेश दिला. दोन्ही साहिबजादा यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच त्यांची आजी माता गुर्जर कौर यांनीही अखेरचा श्वास घेतला. दोन लहान व निष्पाप साहिबजादे अन्याय आणि भेदभावाविरूद्ध ज्या पध्दतीने उभे राहिले, त्याची इतिहासात तुलना होणे नाही. या लहान राजपुत्रांनी दाखवलेले धैर्य आणि धैर्याने शीख समुदायाला छळ आणि अन्यायाविरूध्द लढा देण्यास प्रवृत्त केले.
‘इन पुत्रन के सीस पर वार दिए सुत चार, चार मुए तो क्या हुआ जीवत कई हजार’
अर्थात
माझे जे हजारो पुत्र जिवंत आहेत त्यांच्या जगण्यासाठी मी चार पुत्रांचे बलिदान दिले आहे.
साहिबजादांच्या हौतात्म्याचे वृत्त समजताच संपूर्ण देशात दु:खाची लाट उसळली. काही काळानंतर, एकांतवासीय बंदा बैरागी (नांदेड, महाराष्ट्र येथील) गुरू गोबिंद सिंग यांच्या प्रभावाखाली आला आणि त्यांचा अनुयायी झाला. यावेळी त्यांनी ‘अमृत’ प्राशन केले आणि बंदा सिंग बहादूर या नावलौकिकाने इतिहासात नोंद झाली.
बाबा बंदा सिंग बहादूर नांदेडहून पंजाबमध्ये नियोजित कार्यासाठी आले. मोठ्या संख्येने शीख बांधव त्यांच्या सोबत सहभागी झाले. त्यांनी प्रथम सामना आणि सधौरा सरहिंदच्या परिघात घेतला आणि शेवटी वजीर खानावर हल्ला चढवला. 22 मे 1710 रोजी चप्पर चिरीची लढाई म्हणून ओळखली जणारी चकमक झाली. यात शिखांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. युध्दात वजीर खान मारला गेला आणि पुढच्या दोन दिवसांत त्यांनी सदहिंदचा ताबा घेतला. अशा प्रकारे साहिबजादांच्या हौतात्म्याने मुघल साम्राज्याच्या ढिगाऱ्यातून शीख साम्राज्याच्या निर्मितीची घोषणा झाली.
अशा पराक्रमी बालकांना, साहिबजादा अजीत सिंग, साहिबजादा जुझार सिंग, साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना शत शत नमन..!
अमरज्योत कौर अरोरा
(प्रभारी) उपसंचालक (माहिती), मपकें, नवी दिल्ली
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
