Wednesday, 29 March 2023

मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का*_

 *मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का*_


*व्यायाम* हे औषध आहे.


*सकाळ/संध्याकाळ चालणे* हे औषध आहे.


*उपवास* हे औषध आहे.


*कुटुंबासोबत जेवण* हे औषध आहे.


*हसणे आणि विनोद* हे देखील औषध आहे.


*गाढ झोप* हे औषध आहे.


*सर्वांशी मिळून वागणे* हे औषध आहे.


*आनंदी राहण्याचा निर्णय* हे औषध आहे.


*मनातील सकारात्मकता* हे औषध आहे.

*सर्वांचे भले* हे औषध आहे.


*इतरांसाठी प्रार्थना* हे औषध आहे.


कधी कधी *मौन* हे औषध असते.


*प्रेम* हे औषध आहे.


*मन:शांती* हे औषध आहे.


_आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत_


आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे?


*प्रत्येक चांगला मित्र* हे एक परिपूर्ण *मेडिकल स्टोअर* आहे.


 *🌹 🍁🌹🍁🌹🍁* *🌹🍁🌹*🙏

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

 दहा वर्षे पूर्ण झालेल्या आधार’ कार्डचे

नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 29 : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाहीअशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावेअसे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची आहे. प्राधिकरणाच्या २३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार माय आधार (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२३ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावाअसेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे

जी 20 परिषदेत जगातील सर्वोत्तम 'माईल्ड' कॉफीचे प्रदर्शन

 जी 20 परिषदेत जगातील सर्वोत्तम 'माईल्डकॉफीचे प्रदर्शन

            मुंबईदि. 29 : सुमारे 8 हजार कोटी रुपये किमतीची कॉफी भारतातून निर्यात होतेअशी माहिती कॉफी बोर्डाचे विपणन उपसंचालक डॉ. बाबू रेड्डी यांनी दिली. मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात केंद्र शासनाच्या कॉफी बोर्डच्या माध्यमातून भारतातील उच्च प्रतीची कॉफी प्रदर्शित करण्यात आली आहे.

            भारतात उत्पादन आणि प्रक्रिया होणाऱ्या कॉफीविषयी अधिक माहिती देताना श्री. रेड्डी म्हणाले कीसुमारे १२० देशांमध्ये भारतातील कॉफी निर्यात होते. यात युरोपमध्य पूर्व देशांमध्ये अधिक मागणी आहे. जगभरात तयार होणाऱ्या कॉफी उत्पादकांमध्ये भारताचा सातवा क्रमांक आहे. तरजगभरातून कॉफी निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. सावलीत उगवलेलीहाताने तोडलेली आणि सूर्यप्रकाशात वाळवलेली ही 'माईल्डकॉफी जगभरातील कॉफी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. याबद्दलची अधिक माहिती indiacoffee.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            जी - 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यानभारतीय चहा महामंडळभारतीय कॉफी महामंडळभारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहाकॉफीमसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे.

00000

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी-20 परिषदेत प्रदर्शन

 हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी-20 परिषदेत प्रदर्शन


            मुंबई, दि. 29 : पाच लाख रूपये किलो किमतीचे केसर तसेच सहा हजार रूपये किलो किमतीची वेलची जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या कार्यगटाच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात केंद्र शासनाच्या स्पाइस बोर्डच्या माध्यमातून भारतातील हजारो वर्षांची परंपरा असलेले मसाले प्रदर्शित करण्यात आले आहेत.


            या विषयी माहिती देताना स्पाइस बोर्डाचे विपणन संचालक बसिस्थ नारायण झा यांनी सांगितले की, सुमारे 180 देशांमध्ये निर्यात होणाऱ्या या मसाल्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. 800 प्रकारचे मसाले, त्यांचे अर्क, मिश्रण आदींना जगभरात मागणी आहे. पोषक घटक पदार्थ, आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यात हे पदार्थ वापरले जातात. जगात मसाल्यांच्या व्यवसायाची सुमारे 33 हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. यापैकी 47 टक्के एवढा व्यापार एकट्या भारतातून होतो. याबाबतची अधिक माहिती www.indianspices.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


            जी - 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे.

पानफुटी..( bryophyllum pinnatum)..*उपचार

 *🌱🌱..पानफुटी..( bryophyllum pinnatum)..*


     . पानफुटि म्हणजेच घायमारि, एअर प्लांट, व कटकटक अशि बहुविध नावाने ओळखलि जाते. मूळचि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातलि आहे,. हिचे पुनरुत्पादन अतिशय सोपि असल्याने हिचा प्रसार जगभर झाला आहे,. कमि पाणि लागत असल्याने ती घरात शोभेकरता म्हणून लावल्या जाते,. पानफुटिचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे पान नुसते मातित लावले तर लगेच मूळ धरून रोप तयार होते...


🌱🌱.. पानफूटि हि मुख्यत्वे वापरलि जाते, औषध म्हणून, ते, पित्ताशयात व मूत्राशयात असलेले खडे यांना तोडुन बाहेर काढणे!!!... याचि दोन पाने स्वच्छ धुवून

 सकाळि अनशापोटि गरम पाण्यासोबत चावून खावित, काहि दिवसातच तूटुन खडे बाहेर पडतात..


🌱🌱.. पानफुटिच्या रसात सुंठेचे चूर्ण मिसळून सेवन केल्यास पोटशूळ लगेच बंद होतो,. युरिन चि जळजळ व सर्वच मूत्रविकार याच्या सेवनाने बरे होतात,. स्रियांचा श्वेतप्रदर, व रक्तप्रदर पानफुटिचा काढा करून पिल्यास बरा होतो,.


🌱🌱.. त्वचेवर आलेले फोडं, पूरळ, जखमांचे घाव, भाजलेले, व्रण, यावर पानफुटिच्या पानांना वाटुन ती लुगदि तिथे लावल्यास सर्व त्रास बरे होतात,. पान फुटी हि गुणाने शीतल, असल्याने सर्व पित्तविकार बरे करते,

 पोटातला अल्सर, व तोंडातले छाले, व्रण याच्या रसाच्या सेवनाने बरे होतात,.


🌱🌱. केसात कोंडा झाला असेल, तर याच्या रसाने मालिश करावी, कोंडा निघतो, आणि डोकेदूखी असेल तर ती थांबते, कानात कोणत्याहि प्रकारचा स्राव होत असेल, तर पानफुटिच्या पानाच्या रसाचे काहि थेंब कानात टाकल्यास आराम पडतो,.


🌱🌱 पानफुटिचि पाने रक्तस्तंभक, व जंतूनाशक, आहे, शरिराच्या आतून होणारा कोणताहि रक्तस्राव याच्या सेवनाने बंद होतो, जूलाब, अतिसार, डायरिआ, झाल्यास, याच्या रसाच्या दुप्पट लोणि घेउन प्राशन केल्यास आराम पडतो,.


🌱🌱. संधिवात, उच्च रक्तदाब, व अंगाचा दाह यांसारख्या व्याधिवरिल अनेक पारंपारिक औषधांमद्ये पानफुटि वनस्पति वापरतात,. शरिरावर कुठेहि सूज आल्यास पानफुटिची पाने तव्यावर गरम करून बांधल्यास सूज उतरते,. वमन, उलटी, मळमळ होत असेल, तर, याचि पाने चावुन रस गिळावा, बरे वाटते,.


🌱🌱. पुरुषवर्गात आढळणारा, प्रोस्टेट ग्रंथिंचि वाढ यांवर पानफुटिचे सेवन फायद्याचे ठरते, दिसायला पाणिदार असलेले हे रोपटे आँपरेशन सारखि अवघड क्रियेपासून वाचवून मनुष्यावर उपकारच करते...


 सुनिता सहस्रबुद्धे....


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*

शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना; सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्वावर सुरू

 शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना; सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्वावर सुरू


मुख्य सचिवांनी साधला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद.

            मुंबई, दि. 29 : राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा...कागदपत्रे काय जोडावीत...याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी 'शासकीय योजनांची जत्रा' हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. हा कार्यक्रम अभियानस्तरावर राबवून अद्यापपर्यंत शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थींना लाभ मिळवून देण्याचे आवाहन मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना केले.


            या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, समाजकल्याणचे सचिव सुमंत भांगे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री वॉर रूमचे अधिकारी उपस्थित होते.


            प्रशासन, शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत, हेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेरून शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकारी-जनता जत्रेच्या रूपात आणून जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहेत. यानुसार सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त ३६ विभागामार्फत ७५ शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थींना देण्यात येणार आहे. यामध्ये आणखी योजना वाढविण्यात येणार आहेत. या जत्रेनुसार एप्रिल महिन्यात सर्व विभागांनी आपापल्या योजनांची माहिती, शासन निर्णय याबाबत पूर्वतयारी करावी. योजनानिहाय लाभार्थी निवड, त्यांचे अर्ज भरून घेणे याबाबतही तयारी करावी. योजनांचा लाभ मे महिन्यामध्ये देण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही श्री. श्रीवास्तव यांनी केल्या.


            लाभार्थींना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार असून तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच छताखाली एकाच ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे. जत्रेत एकाच योजनेचा लाभ मिळणार नसून यामध्ये त्या कुटुंबाला अन्य योजनांचीही माहिती होणार आहे. यामुळे विविध योजनांचा लाभ एकाच गरीब कुटुंबाला झाल्यास ते कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर यायला हातभार लागणार आहे. यामुळे या जत्रेत प्रत्येक विभागांनी आपल्या विविध योजनांबाबत माहितीही पुस्तक रूपाने प्रसिद्धीस देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


            जत्रेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे. यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार असल्याने त्या समस्येवर उपाययोजना करता येणार आहेत. सर्व नियोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार असून गावपातळीवरील कर्मचाऱ्यांच्या मार्फत योजनांची माहिती 'हर घर दस्तक'च्या रूपाने देता येणार आहे. यामध्ये सर्व यंत्रणांचा समावेश राहणार आहे. यासोबतच सीएससी सेवा सेंटर, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांचीही मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागांनी त्यांच्या पात्र लाभार्थींना योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.


अंमलबजावणी आणि मार्गदर्शनासाठी असणार जनकल्याण कक्ष


            सर्व कार्यक्रमांची रूपरेषा, अंमलबजावणी, नियंत्रण करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष असणार आहे. विभागीय पातळीवर विभागीय जनकल्याण कक्ष, जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावरही जनकल्याण कक्षांची स्थापना करून याद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे.


पात्र लाभार्थीला मुख्यमंत्र्यांचे प्रमाणपत्र


            विविध योजनांसाठी पात्र असणाऱ्या आणि लाभ घेणाऱ्या लाभार्थींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडून लाभाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विविध योजनांसाठी पात्र लाभार्थींना योजना मंजुरीची पत्रे देण्याचा कार्यक्रम जिल्हावार लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील सर्व विभागांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांशी संपर्क साधून लाभ देण्यासाठी करावयाच्या कार्यवाहींची पूर्तता त्यांच्या स्तरावर करुन घ्यावी. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून शासन निर्णयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


            यावेळी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अमोल शिंदे यांनी या उपक्रमाचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री वॉर रूमचे विद्यार्थी, आयआयटीचे विद्यार्थी या उपक्रमाला मदत करणार आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, विभागांचे सचिवांनी यावेळी विविध सूचना केल्या. साताराचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी उपक्रमाबाबत सध्या करीत असलेल्या अंमलबजावणीची माहिती दिली.


००००

Tuesday, 28 March 2023

कृषी विकास आणि प्रगतीचा ध्यास घेणारा ‘महासंकल्प’

 कृषी विकास आणि प्रगतीचा ध्यास घेणारा ‘महासंकल्प


            शेतकरी हा आपल्या राज्याच्या विकासाचा कणा आहे. त्यामुळे त्या बळीराजाचा आर्थिक आधार बळकट करीत त्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प नुकताच राज्य शासनाने सादर केला. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात मदत आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक तंत्रकुशलतेची जोड देण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. शेती, सहकार आणि सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्टाला राज्य शासनाची साथ या माध्यमातून मिळणार आहे.


            राज्य शासनाने अर्थसंकल्प सादर करताना कृषि या महत्वाच्या घटकाला अधिक महत्व देत शेतकऱ्यांप्रती असणारी बांधीलकीच व्यक्त केली आहे. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती व्हावी यावर अर्थसंकल्पात दिलेला भर स्पष्टपणे दिसून येत आहे. बळीराजाच्या समृद्धीसाठी राज्य शासन सदैव पाठीशी असल्याचा विश्वास या माध्यमातून राज्यातील शेतकरी वर्गाला दिला आहे.


नमो शेतकरी सन्मान निधी योजना


            केंद्र शासन देशातील शेतकरी वर्गासाठी प्रधानमंत्री किसान योजना राबवित आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा करते. राज्य शासनाने याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना लागू करुन योजनेत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळून प्रतिवर्ष त्याच्या खात्यात 12 हजार रुपये जमा होणार आहेत. राज्य शासनाने त्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.


शाश्वत विकासासाठी कटिबद्ध


            शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. नानाजी देशमुख कृषीसंजीवनी योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आणि इतर योजनांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न होत आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने महा कृषीविकास अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. यात पीक, फळपीक या मूलभूत घटकांच्या उत्पादनापासून मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया, तसेच तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट समूहासाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील 5 वर्षासाठी या योजनेला 3 हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.


शेततळे योजनेचा विस्तार


            राज्य शासन शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवित आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने उदंड प्रतिसाद लाभला आहे. शेतकऱ्यांची ही गरज ओळखून या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा विस्तार करून त्यात अन्य काही घटकही आता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात फळबागा, ठिबक सिंचन, शेडनेट, हरितगृहे, आधुनिक पेरणी यंत्रे, कॉटन श्रेडर याचा समावेश आहे. यावर्षी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.


एक रुपयात पीक विमा


            प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप आणि रब्बी पिकांसाठी विमा योजना राबविण्यात येते. ठराविक रक्कम भरुन शेतकरी त्यांचे पीक संरक्षित करतात. यामध्ये राज्य आणि केंद्र शासन त्यांचा हिस्साही जोडते. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना आता त्यांना भरावी लागणारी रक्कमही भरावी लागणार नाही. आधीच्या योजनेत एकूण विमा रकमेच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. अर्थसंकल्पात याबाबतचा अभिनव निर्णय जाहीर करण्यात आला. केवळ एक रुपया भरुन शेतकऱ्यांना आता या पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यातील 1.52 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून आता राज्य शासनाचा खऱ्या अर्थाने आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटी येणारा रुपये 3300 कोटीचा विमा हप्ता आता राज्य शासन भरणार आहे.


अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला दोन लाखांची मदत


            राज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविते. आता ही योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहे. विमा योजनेच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास यामुळे वाचणार आहे. यासाठी अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाखांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यावर्षी 120 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे.


नैसर्गिक शेतीला मिळणार प्रोत्साहन


            रासायनिक खतांचा वापर कमी करत नैसर्गिक शेतीकडे आता शेतकरी वळत आहेत. नैसर्गिक शेती काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनही प्रयत्नशील आहे. या आगामी तीन वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी एक हजार कोटींच्या निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.


महाराष्ट्र श्री अन्न अभियान


            संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यात राज्याने महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरू केले आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रात्यक्षिक, यांत्रिकीकरण करणे, प्रक्रिया करणे, मूल्य साखळी विकास याचा समावेश आहे. राज्यात भरडधान्याचा प्रसार करणे, त्याचे महत्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे यासाठी श्री अन्न अभियान महत्वाचे ठरणार आहे.


शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे प्रशिक्षण


            शेतकऱ्यांना फक्त आधुनिक यंत्रे देऊन शेती कशी करायची हे सांगून उपयोगाचे नाही. तर त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची ही गरज आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या जागेवर सर्व सुविधांनी परिपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी कन्वेंशन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी 227 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित केली आहे तंत्रकुशलतेची जोड शेतीला देऊन शेती अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न होत आहेत. 


संत्रा प्रक्रिया केंद्र


            संत्री पिकावर प्रक्रिया करण्यासाठी नागपूर, काटोल, कळमेश्वर (जि. नागपूर), मोर्शी (जि. अमरावती) आणि बुलढाणा येथे संत्रा प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. याशिवाय, काजू फळपीक विकास योजना राबविण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. साध्या काजूच्या बोंडापेक्षा प्रक्रिया केलेल्या काजूच्या बोंडाची किंमत सात पटीने अधिक आहे. त्यामुळे काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना साहाय्य करण्यासाठी काजू फळपीक विकास योजना राबविण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षासाठी या योजनेकरिता 1 हजार 325 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.


            शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी पोषक ठरणाऱ्या तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. त्यांच्या प्रभावी माध्यमातून शेती आणि शेतकरी दोन्हीनाही बळ मिळेल, एवढे नक्की!


0000


दीपक चव्हान.         विभागीय संपर्क अधिकारी


 



Featured post

Lakshvedhi