Monday, 20 February 2023

पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

 पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद.


पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ


            कोल्हापूर, दि. 20 : कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या 'पंचमहाभूत बोध' या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.


               काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते - दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेल्या या प्रयोगाचे (कलाकृती) मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अवघ्या 20 मिनिटांमध्ये 50 कलाकारांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. पंचतत्त्वांचे सृष्टीसाठीचे महत्व, त्यांच्यावर होत असलेले परिणाम, पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी मानवी जीवनशैलीत अपेक्षित असलेल्या बदलांचा संदेश 'पंचमहाभूत बोध' प्रयोगातून देण्यात आला. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी 'पंचमहाभूत संरक्षणाची शपथ' उपस्थितांना दिली.


                स्क्रीन, लेझर शो, नृत्य, नाट्य व स्पेशल इफेक्ट (अग्नी, वारा, पाऊस)चा वापर करुन तयार करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच संदेशपर प्रयोग असल्याची माहिती निर्माते - दिग्दर्शक श्री. माने यांनी दिली.


मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्र्यांनी केली विविध स्टॉलची पाहणी


            कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित 'सुमंगलम् पंचमहाभूत' या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली .


            कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर, महसूल विभागातर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलचे दिप प्रज्वलन तर पर्यावरण व वातावरणीय बदल आणि प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या स्टॉलचे फित कापून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते औपचारिकरित्या उद्घाटन करून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखविला. हवामान बदलाचे परिणाम, कारणे व उपाय या अनुषंगाने या स्टॉलवर माहिती देण्यात येणार आहे. तर महसूल विभागाच्या स्टॉलवर विविध दाखले, फेरफार, नोंदणी आदींची सविस्तर माहिती या ठिकाणी नागरिकांकरिता उपलब्ध आहे. या स्टॉलच्या उभारणीबद्दल मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.


            यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भय्याजी जोशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, योगेश जाधव, हिंदुराव शेळके, माजी आमदार अमल महाडिक व सुरेश हळवणकर, समरजितसिंह घाटगे, विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


००००



बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारकच्या पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा

 बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारकच्या पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            सिंधुदुर्गनगरी, दि. 20 : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्य जतन करुन बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारक पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन तसेच कोनशिला अनावरण करुन बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी पुष्पहार अर्पण केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. यानंतर जिल्हा नियोजन समिती नवीन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. राणे बोलत होते.


पत्रकार भवन मराठी पत्रकारांना प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं ठरेल - मुख्यमंत्री


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा देताना म्हणाले, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मधून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक सुधारणेवर भर दिला. त्यांचे स्मारक मराठी पत्रकारांना प्रेरणा, ऊर्जा देणारं ठरेल. ज्ञान मंदिर बनवून त्याचं पावित्र्यं जतन करावे. जांभेकरांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे. हे स्मारक त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे ठरेल. भविष्यातही शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.


पत्रकारांसाठी हक्काचे व्यासपीठ – केंद्रिय मंत्री नारायण राणे


            केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले, आज राज्यभरातील पत्रकारांसाठी एक हक्काचे दालन सज्ज झाले आहे. या स्मारक व भवन उभारण्यामागे सर्व पत्रकारांचे योगदान आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक प्रेरणदायी ठरेल. पत्रकारितेत त्यांनी सांगितलेले पावित्र्य जोपासावे, समाजाला प्रेरणा देऊन, समाजाचे प्रबोधन करुन समाजाच्या विकासाचे, प्रगतीचे विषय हाताळले जातील, लिहिले जातील, असे काम पत्रकारांनी करावे. आपला जिल्हा देशात समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


            आपला पेशा पत्रकारितेचा आहे, त्याच पावित्र्य टिकवणे हा आपला धर्म आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी विधायक, विकासात्मक कार्यकर्तृत्वाची ऊर्जा मराठी पत्रकारितेतून दिली आहे. समाज प्रबोधन होऊन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय पत्रकार भवनातून हाताळले जावेत, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.


            शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचे भूषण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पत्रकार भवनाची आवश्यकता होती ती आता साकार झाली आहे. पुढील काळातही पत्रकार भवनाबाबत सर्वतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. पत्रकार भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालय होण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुस्तके दिले जातील.


            आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यासह विविध प्रसार माध्यमांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


00000



मराठा महायोद्धा बाजीराव

: मराठा महायोद्धा बाजीराव 

नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून

गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…

उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला

सावली सापडत नव्हती…

आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने

देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…

शोध होता तो एकाच गोष्टीचा… पण ती देखील कुठे आहे

कोणालाच माहित नव्हती…

आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच आपल्यावर येऊ शकते..


१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…

हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर....


त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!

बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाला हे आम्हाला माहित

होतं…

पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?

शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव

खरोखर किती मोठा होता हे

आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा

‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व

देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच

ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!


ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!


"जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज

बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!"


बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदारा खिलाफ बाजीरावाची मदत मागितली.

संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते.

असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव

उठले आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले.

बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.


“ उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर

इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून

उशीर झाला!"


ह्याला म्हणतात मराठी बाणा! 


ह्या कृत्यानंतर बाजीरावाने

बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…

आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!


अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय

आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार

असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय… सगळं अगदी घाईघाईत घडलं…

इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला..

जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल

बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली…


घोड्यांच्या टापांनी हादरून

उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून गेला होता!


बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही

बळजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला…. आणि नंतर लागल ते एक छोट गाव! 

हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला! अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही

पटाईत!

गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये

विचारल,

"इधर कोई समाधी है क्या?"


" सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?"

असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड

होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली!

कोणालाच माहित नाही! मग मूळ मुद्द्यावर आलो,

"ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?" रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…

पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे

कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली…

ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली…


गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे… भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम... जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर

असावीत!


सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील!

अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला....

सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि

आपल्या डे-यात मसलती करीत बसलेला एक

दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर

नेणारा हाच तो......

बाजीराव!


गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित

स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत

विचारशक्ती!

कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक

व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा

पंतप्रधान!........असो!

तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसती सपाट जमीन!

डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकं भाजून काढणार ऊन!!

आता काय करायच ह्या विचारत असताना एक

उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी

वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पाहू इथे विचारून!

भात्यातील शेवटचा बाण उरलेला तो मारून पाहू!

असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!


पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची

जाणीव त्या दिवशी झाली!

आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो!

आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!

आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणूनदेखील घेत नहीं! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल अशी आपण अपेक्षा ठेवत नाही. तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!


महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून

आम्ही कधीच, "पेशवा बाजीराव की समाधी कहा है?"

असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही

गोष्ट घडली खरी! असो!

मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, "इधर कोई समाधी है क्या?"

"मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!", असे

म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!


हा माणूस म्हणजे दादासाहब!

नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम

बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली

आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या

खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता! मी म्हट्ल, " दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?"

आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले....


"समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो….."


पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!!

पेशवा सरकार!

पेशवा सरकार!!!

इतका मान! इतका आदर!! 


ते देखील पुण्याहून शेकडो

मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!! आश्चर्य! 


मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या

कडा पाणवल्या!

ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे

देखील त्याला इतका मान नाही!

महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी.......

"अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?" असे प्रश्न

विचारणारे महारथी देखील आहेत!


आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे

निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे आणि ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा

गावठी ‘दादासाहब’ कुठे !


मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का

असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत

आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!


कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं,

क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश,

पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते!


शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पणे आपण नावे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान?

कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण

कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना

इतका आदर करतो मराठ्यांच्या पेशव्यांचा....

पेशवा सरकार!!


ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि

आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या महान पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो! तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो!

परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण

विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’!

बाहेर वा-यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत

परत ऐकू येत होते....


पेशवा सरकार!

पेशवा सरकार!!

पेशवा सरकार!!!

वाचल्या बद्दल धन्यवाद्


आज या समाधीचे दर्शन घेण्याचा योग आला 👇🏼




 

Tututu हुतूतू

 


चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ

 चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ


सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जय जय महाराष्ट्र माझा’ चा जागर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे करणार


            चंद्रपूरदि. 19: सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या राज्यगीताचा शुभारंभ चंद्रपूर नगरीतून होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहेअसे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


            सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या राज्यगीताचा अधिकृत शुभारंभ झालाअसे घोषित करून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेसामान्य प्रशासन विभागाच्या फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयान्वयेमहाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. शिवजयंती हा केवळ एक उत्सव नव्हे तर छत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या पर्वावर रयतेचे राज्य आणण्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस आहे. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम गाजवतोगीतामधून विरतेचा मंत्र दिसतो. जगातील सर्वात जास्त वाघ असलेल्या भुमीतून या राज्यगीताचा शुभारंभ होत आहेयाचा आपल्याला मनस्वी आनंद आहे.

            जय भवानी...जय शिवाजी’ हे केवळ शब्द नाही तर उर्जाउत्साह देणारे शब्द आहेत. शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी रक्तामध्ये चैतन्य निर्माण होतेवीरता जाणवते. शिवाजी महाराज या नावामध्ये एक वेगळीच शक्ती आहे. शिवाजी महाराज हे सर्वधर्माचा सन्मान करणारे राजे होते.


            चांदा पासून बांदा’ पर्यंत आणि भामरागड पासून रायगडपर्यंत’ छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष संपूर्ण राज्यभर अतिशय उत्साहात साजरे करण्याचा आपला संकल्प आहे. एवढेच नाही तर आपल्यासाठी प्राणप्रिय व कोहीनुर हिऱ्यापेक्षाही जास्त महत्वाची असलेली शिवाजी महाराजांची जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडवरून भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी इंग्‍लंडचे पंतप्रधानभारत सरकारचे गृहमंत्रीराज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.


            छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारत्यांचे आचरण भावी पिढीला माहित होण्यासाठी पुढील वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात जाणता राजा’ या नाटकाचे प्रयोग नि:शुल्क सुरू करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेला चित्रपट महोत्‍सव जिल्ह्याजिल्ह्यात करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संग्रहालय आपण तयार करीत आहोत. शिवसाहित्य संमेलनशिवगीत स्पर्धा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.


            मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणालेशिवजयंतीनिमित्त आग्र्याला आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे 100 एकर जागेत छत्रपतींचे स्मारक करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे सहकार्य घेण्यात येईल. जून 2023 पासून एक कोटी तरुण – तरुणी शिवभक्तांची पोर्टलवर नोंदणी करण्याचा आपला संकल्प आहे. सुर्य – चंद्र असेपर्यंत शिवाजी महाराजांचे नाव राहणार आहे. त्यामुळे जातपातधर्मपंथ याच्या पलिकडे जाऊन प्रत्येकाच्या हृदयात फक्त शिवबा’ च असू द्याअसे आवाहन त्यांनी केले.


            कार्यक्रमाच्या सुरवातीला सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते लखोटा उघडून राज्यगीताचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी शिवस्मारकाला अभिवादन करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून भगवे फुगे आकाशात सोडण्यात आले. जगदंबा ढोल – ताशांच्या निनादात जय भवानी...जय शिवाजी’ चा जागर करण्यात आला. यावेळी विक्की दुपारे व विजय पारखी यांनी राज्यगीत सादर केले. प्रास्ताविक डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केलेतर कार्यक्रमाचे संचालन रवी गुरनुले यांनी केले.


सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव.

 सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न.

पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ.

       कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): कणेरी मठावरील श्री क्षेत्र सिद्धगिरी येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान येथे पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काडसिध्देश्वर स्वामीजी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

          शोभायात्रेचा मार्ग महात्मा गांधी मैदान -बिनखांबी गणेश मंदिर - महाद्वार रोड- पापाची तिकटी -गंगावेश- पंचगंगा नदी असा होता. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले. महात्मा गांधी मैदान येथे सुरु झालेली शोभायात्रा पंचगंगा नदी घाट येथे विसर्जित झाली. 

            देशभरातील चौदा राज्यांतील पारंपरिक लोकवाद्यांसह कलाकारांनी विविध कलांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रे, त्यांचे पर्यावरण विषयक विचार यांचे प्रदर्शन हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील घडशी - गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादन पथक हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. 

            २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या पंचमहाभूत उत्सव सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.


 


000


 


                   

Featured post

Lakshvedhi