Thursday, 16 February 2023

दिव्यांग विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ; दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत

 दिव्यांग विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ; दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत

राज्यभरात दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 15 : राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, दिव्यांग विकास विभागाचे सचिव अभय महाजन, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर, महाव्यवस्थापक युवराज पवार आदी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दिव्यांग बांधव हे समाजातील महत्वाचे घटक आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता, कलागुण असून त्याला वाव देण्यासाठी महामंडळामार्फत प्रयत्न झाले पाहिजेत. महामंडळाला ५०० कोटींचे भाग भांडवल देण्यात आले असून गेली काही वर्ष थांबलेले कर्जवाटप आता पुन्हा सुरू होईल. त्यामुळे दिव्यांग बांधव स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकतील.


            राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार २९ लाख दिव्यांग आहेत. मात्र, सध्या दिव्यांगांची संख्या किती आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्थानिक स्वराज्य संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, सामाजिक उत्तरदायित्व निधी या माध्यमातून दिव्यांगांना मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांगांकडून निर्मिती, उत्पादित केलेल्या साहित्यांना स्टॉल देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन, मुख्यमंत्र्यांनी केले.


            दिव्यांगांच्या मागण्यांसदर्भात विभागाने संवेदनशीलपणे समजून घ्याव्यात आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दिव्यांगांना उत्तम दर्जाच्या साहित्याचे वाटप झाले पाहिजे. साहित्याच्या गुणवत्तेची तडजोड करू नका, असे सांगतानाच दिव्यांग बंधू-भगिनी स्वतःचा व्यवसाय सुरू करतील असे बॅटरीवर चालणारी सायकल, वाहन त्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.



हसा लेको

 गण्याने त्याच्या गर्लफ्रेंडला 


५ फुटी टेडी गिफ्ट दिला..


आणि तिच्या आईने टेडी मधला 


कापूस काढून ४ उश्या बनवल्या..


End of valentine.....😜😅🤣😂

फुलांसारखी मुले

 "आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे.

क्लासमध्ये बघायला या, नाही तर मी बोलणार नाही!"


ही गोड धमकी आठवतंच मी माझ्या मुलीच्या दुसरीच्या वर्गात शिरलो.


माझ्या आधीही काही पालक हौसेनं निकाल बघायला आलेले. बाबापेक्षा आईंची संख्या जास्त.


मी बावरतच वर्गात नजर फिरवली. मला पाहताच अनपेक्षित लाभ झाल्यासारखी ,मुलगी उठुन आनंदाने मला घेऊन टीचरकडे गेली न् म्हणाली, माय फादर."


मीही 'गुडमॉर्निंग' म्हणालो.


टीचरनी एक कागद दिला व म्हणाल्या, हिच्या नावापुढे सही करा."


मुलीनं रोल नंबरवरुन नांव शोधलं. सही करताना लक्षात आलं की आधीच्या तिन्ही सह्या आईच्या होत्या. मनात विचार आला, खरेच एवढे बिझी आहोत का आपण?


विचारतच सही केली. टीचरनी एक्झाम पेपर्स माझ्याकडे दिले न म्हणाल्या, बसून बघा सगळे पेपर." असं म्हणुन टीचर बाकीच्या पालकांच्या शंका सोडवू लागल्या.


मी तिच्या बेंचवर कसा तरी बसलो. बाजुला माझं बाळ.


अगोदर सगळ्या पेपरवरचे मार्क्स पाहिले. ४० पैकी ३५, ३६. कुठे ३२. 


टीचरजवळ १ मार्क गेला म्हणुन मुलांची काळजी करणा-यांची गर्दी बघुन, माझी मुलगी पहिल्या ५ मध्ये काय, १० मध्येही नसेल याची खात्री झाली.


मीही मग चुकलेले प्रश्नोत्तरे बघायला लागलो.


उत्तरे व्यवस्थित सुवाच्च सुटसुटीत लिहिलेली. चुकीचं उत्तरही छान लिहिलेलं.


मी तिच्याकडे पाहताच ती हसत जीभ चावायची.


तिने असं केलं की मी रागवू शकत नाही म्हणून.


"बाबा, इथे माझी गडबड झाली म्हणून चुकलं!"


"आता तुला याचं बरोबर उत्तर माहित आहे का?" - मी.


"हो. सगळी माहीत आहेत."


"मग ठीक आहे. चुकू दे उत्तर. मार्क मिऴालेत समज"


"कसं काय ?" ती गोंधळली.


"बरोबर उत्तरे विसरण्यापेक्षा चुकलेले प्रश्न लक्षात ठेवलेले बरे." मी उत्तरलो.


ती परत 'का?'


"कळेल नंतर!" मी


मीही भरभर पेपर बघितले व टीचरना परत दिले. धन्यवाद देऊन मुलीला घेऊन बाहेर पडलो. 


तिला उचलून कडेवर घेऊन पाय-या उतरत होतो तेवढ्यात जिन्यात इंग्रजीत सुविचार दिसले. तिला ते वाचायला लावले. तिने ते वाचले पण अर्थ तिला कळाला नव्हता. 


मग मी तिला ते सुविचार उदाहरणासहित समजावून दिले. पहिल्या मजल्यावर येईस्तोवर तिला एक सुविचार पाठही झाला.


अचानक काही तरी आठवल्यासारखं मुलीनं विचारलं, बाबा तुम्ही टीचरना काहीच का नाही विचारलं?


"काहीच म्हणजे?"


"म्हणजे की मार्क कमी का मिळाले, मी दंगा करते का ते? घरी कधी कधी दमवते, टीव्ही बघत अभ्यास करते, अशी तक्रार पण नाही!"


मला हसू आलं.


मी तिला हसतच विचारलं, "तू शाळेत कचरा करतेस का?"


"नाही". - ती.


"सगळ्या टीचरना रिस्पेक्ट देतेस?"


"हो".


"तुझ्याजवळ नेहमी एक इरेजर, शार्पनर, पेन्सिल एक्स्ट्रा असते, ते तू कुणाला लागलं तर लगेच देतेस?"


"हो".


"रोज एकाच बेंचवर न बसता सगळ्यांशी मैत्री करतेस?'


"हो".


"नेहमी खरं बोलतेस?"


परत "हो"


"लगेचच मनापासुन सॉरी आणि थॅंक्यु म्हणतेस ना ?


'हो बाबा हो' किती विचारताय हो.


"मग ठीक आहे बेटा. या बदल्यात थोडे मार्क गेले, अध्येमध्ये घरी दमवलं तर चालतंय मग." मी म्हणालो.


का पण? 


"हेच तर शिकायचंय आता तुला"


"आणि मार्कं, शिक्षण, पहिला नंबर?


"बेटा दुसरीचे मार्क दाखवून जीवनात काही मिळणार नाही आणि शिक्षण काय? कायम चालुच असतं."


सगळं तिच्या डोक्यावरुन गेलेलं. ती जरा उचकुनच म्हणाली, "बाबा, मी मोठी झाल्यावर मला तुम्ही नक्की काय करणार आहे?"


तिच्या डोळ्यात बघुन मी म्हणालो, "सुसंस्क्रृत". 


परत एकदा डोक्यावरुन गेलं. कळावं म्हणुन ती म्हणाली, त्यासाठी मी काय करायचं नक्की.


मीही लगेच तिला धीर देत म्हणालो, "फार काही नकोस करू. आता जशी आहेस तसं तु कायम रहा!"


"मग ठीक आहे बाबा" तिच्या जीवात जीव आला.


एक दोन पाय-या उतरल्यावर ती परत म्हणाली, "बाबा, माझा रिझल्ट काय होता?

मी पाहिलाच नाही की?"


मी म्हणालो, "रिझल्ट? 

तू दुसरी पास होणार!"


पास शब्द ऐकताच तिचा चेहरा आणखी खुलला. माझ्या खांद्यावर मान ठेऊन लाडीक स्वरात कानात म्हणाली, 


"म्हणजे बाबा, आजही तुम्ही मला एक बटरस्कॉच आईस्क्रिम देणार ना?"


मीही हसत तिला घट्ट छातीशी धरत Yes म्हणलं, हीच खरी शिकवण कुठे तरी लोप होत चालली आहे, आणि चुकीच्या मार्गाने आपल्या मुलांचे मूल्यमापन करत आहोत। 


जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याचा!...

दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन.

 दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी

नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन.

            मुंबई, दि. 15 : फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे.


            दहावी व बारावीच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक / शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सुविधा 15 फेब्रुवारी पासून सकाळी 9 ते रात्री 7 या वेळेत सुरू राहील.


            हेल्पलाईन क्रमांक 022-27893756 आणि 022-27881075 हे आहेत. कार्यालयातील हेल्पलाईनसाठी डॉ.ज्योती परिहार, सहसचिव (7757089087), श्रीमती गीता तोरस्कर, वरिष्ठ अधीक्षक तथा सहा.सचिव (प्र.) (7021325879), श्रीमती सुप्रिया मोरे, वरिष्ठ अधीक्षक (9819136199) आणि श्रीमती सुवर्णा तारी, वरिष्ठ अधीक्षक (9987174227) या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


            तर, समुपदेशक म्हणून श्रीकांत शिनगारे - 9869634765, मुरलीधर मोरे- 7977919850 / 9322105618, 022-27893756/ 022-27881075. हयाळीज बी.के.- 9423947266, अनिलकुमार गाढे - 9969038020, जाधव विकास नारायण - 9867874623, विनोद पन्हाळकर - 9527587789, संजय जाधव - 9422594844, चंद्रकांत ज.मुंढे - 8169699204, अशोक देवराम सरोदे - 9322527076/ 8888830139, श्रीमती शैलजा मुळ्ये - 9820646115, शेख अखलाक अहमद अ.रज्जाक - 9967329370, श्रीमती स्नेहा अजित चव्हाण - 8369015013 आणि श्रीमती उज्ज्वला क.झरे - 9920125827 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


00000



 



वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतबृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम.

 वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतबृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम.

            मुंबई, दि. १५ : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना जाहीर झाला आहे.


            वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठी बाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून सर्व महानगरपालिका स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.


            "महाराष्ट्राची राजभाषा मराठी" या विषयाच्या अनुषंगाने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठीबाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून अभिनव कल्पनेच्या आधारे जसे की, अभिनव कल्पनेत संगीत, छायाचित्रीकरण, रेखाचित्रे, घोषवाक्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विषय मांडणी इत्यादी विविध माध्यमांचा उपयोग करुन महानगरपालिका क्षेत्रातील अधिकारी - कर्मचारी यांनी वरील माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना शिक्षीत करावयाचे अपेक्षित होते. स्पर्धेत महानगरपालिकेच्या कमीत कमी १० अधिकारी/कर्मचारी यांनी भाग घेणे आवश्यक होते. २७ महानगरपालिकापैकी ८ महानगरपालिकेचे प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त झाले होते.


००००

महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे बेल, फुल अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी

 महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे बेल, फुल

अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी


पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंदिर ट्रस्ट, भाविक प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय


            मुंबई, दि. 15 : मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात मंदिर ट्रस्ट व भाविक प्रतिनिधींची बैठक झाली. यंदा महाशिवरात्रीला मंदिरातील शिवलींगावर बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा सुवर्णमध्य या बैठकीमध्ये काढण्यात आला.


            बैठकीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन ठक्कर, विश्वस्त प्रदीप श्रॉफ यांच्यासह भाविकांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.


            कोरोना काळात मंदिरात पूजाविधीबाबत प्रतिबंध लावण्यात आले होते. तसेच आयआयटीच्या एका अहवालानुसार शिवलींगावर हळदी, कुंकू किंवा इतर पूजा साहित्य वाहिल्याने, चंदनाचा लेप लावल्याने शिवलींगाची झीज, नुकसान होत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत भाविकांमधून पूजाविधी परत सुरु करण्याबाबत मागणी होती. या मुद्द्यावर स्थानिक आमदार व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंदिर विश्वस्त व भाविक प्रतिनिधींची आज मंत्रालयात बैठक घेतली. महाशिवरात्रीला बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे मंदिर विश्वस्तांसह पोलीस प्रशासन आदी सर्वजण भाविकांच्या मदतीसाठी असतील. भाविकांनी सहकार्य करावे. शिवलींगाची झीज, नुकसान होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी. भाविकांच्या भावनाही महत्वाच्या आहेत. मंदिर आपल्या सर्वांचे आहे. त्याची सुरक्षा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.


००००

शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा

 शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            ठाणे दि. 15 (जिमाका) : राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांच्या लाभाचे वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. हा नवीन कल्याण पॅटर्न आहे. राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे, तरच हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनांच्या लाभाचा वितरण सोहळा व भव्य लाभार्थी सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी उपस्थित होते.


            या मेळाव्यात कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, मातृत्व वंदन योजना, श्रावणबाळ योजना, सखी आरोग्य किट, आदी योजनेच्या लाभाचे सुमारे दहा हजारहून अधिक लाभार्थींना वितरण करण्यात येणार आहे. यातील काही प्रातिनिधिक लाभार्थींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आग्र्याच्या लाल किल्यातील दिवाण ए आम मध्ये 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास मंजुरी मिळाली आहे. हा आनंदाचा क्षण आहे. या कार्यक्रमास मंजुरी दिल्याबद्दल प्रधानमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शपथविधी नंतर घेतलेले प्रत्येक निर्णय हे सर्वसामान्यांना मदत करणारे, त्यांना न्याय देणारे आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजना कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे व सरकार घरापर्यंत पोचण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.


            केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यासाठी मोठी तरतूद आहे. राज्याच्या हितासाठी निर्णय घेत आहोत. ठाण्यात रस्ते विकसित केले. त्याप्रमाणे कल्याणमध्ये चांगले रस्ते होण्यासाठी प्रकल्पबधितांना युएलसीची घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू. राज्यातील तरूण स्वतःच्या पायावर उभा राहून दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक होण्यासाठी इनोव्हेशन हबला राज्य शासन सहकार्य करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवू या. योजना फक्त कागदावरच न राहता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ कल्याण पूर्व मधील लोकांना देण्यात येत आहे. तळागाळातील एकही लाभार्थी वंचीत राहू नये, लोकांपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करत आहोत. महिलांसाठी राज्य सरकार चांगले काम करत आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित, आपला दवाखाना या योजना राबविण्यात येत आहे.


            केंद्रीय राज्यमंत्री श्री पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमुळे जनतेला खूप मोठा फायदा मिळत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खूप चांगल्या योजना मतदार संघामध्ये राबविल्या आहेत. या योजनांचा लोकांना खूप फायदा होणार आहे.


            यावेळी लाभार्थींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लाभाचे व नवीन शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.


00000



 



Featured post

Lakshvedhi