Friday, 10 February 2023

राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’

 राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’

-मंत्री गिरीश महाजन

राळेगणसिद्धीतून अभियानाचा शुभारंभ होणार.

            मुंबई, दि. 10 : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिनी मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व योजनांची प्रभावी व लोकाभिमुख अंमलबजावणी होण्यासाठी ग्राम राजस्व अभियानाचा उपयोग होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.


            स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यात दि. 26 जानेवारी 2023 पासून दि.25 जानेवारी 2024 पर्यंत हे ग्राम राजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीतील विविध विभाग ग्राम राजस्व अभियानात विविध उपक्रम राबविणार आहेत. अंत्योदय हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा उपयोग लाभार्थींना व्हावा, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.


            याअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायती आता डिजिटल ग्रामपंचायती म्हणून विकसित करून यामार्फत नागरिकांना बीपीएल दाखला, जन्म नोंद दाखला, निराधार दाखला, नमूना 8 चा उतारा आदी दाखले देण्यात येतील. ग्रामपंचायत हद्दीमध्ये वारस नोंदी व मिळकत नोंदीसंदर्भात विशेष मोहीमा राबविण्यात येतील. ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या हरकती आणि सूचनांवर सरपंच, सदस्य यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात येईल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सर्व करांची 100 टक्के वसुली व्हावी, यासाठी शिबीरे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती श्री.महाजन यांनी दिली.


            ग्राम राजस्व अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी बालकांची 100 टक्के आरोग्य तपासणी करणे तसेच लसीकरण करण्यात येईल. गावातील बालकांची श्रेणीवर्धन करून गाव कुपोषण मुक्त करण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात येतील.


            त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत नागरिकांना तातडीच्या सेवा उपलब्ध करून देणे, मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांच्यासाठी आरोग्यविषयक सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. प्राथमिक शिक्षक विभागामार्फत प्राथमिक शाळांची 100 टक्के पटनोंदणी बरोबर शाळाबाह्य मुलांची नोंदणी केली जाईल. सोबतच सर्व प्राथमिक मुलांचे लसीकरण करण्यात येईल. माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शालेय शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येईल, अशीही माहिती मंत्री श्री.महाजन यांनी दिली.


            ग्राम राजस्व अभियानांतर्गत प्रत्येक गाव शिवारात पाण्याचा ताळेबंद करून पाणी वापराचे नियोजन केले जाणार आहे. घन कचरा, सांडपाणी, ओला-सुका कचरा, प्लास्टीक कचरा आदीच्या विलगिकरणासाठी मोहीम राबविल्या जातील. जनावरांचे आरोग्य व वैरणाच्या नियोजनासाठी शिबिरे आयोजित केले जातील. दिव्यांग व्यक्तींना विविध लाभ मिळण्यासाठी शिबीरे आयोजित केले जातील आणि एस.सी. व नवबौद्ध घटक वंचित राहू नये, यासाठी योजनांचे प्रस्ताव ग्रामस्तरावर तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच गावातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांवर रेन वॉटर हार्वेस्टींगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंधाऱ्याची क्षमता वाढविणे, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्व इमारतींची देखभाल दुरूस्ती करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.


0000

पत्रकारांसाठी 'व्हॉइस ऑफ मीडिया' चे लाखोंचे पुरस्कार

 पत्रकारांसाठी 'व्हॉइस ऑफ मीडिया' चे लाखोंचे पुरस्कार

 राज्यातील सर्व पत्रकारांसाठी स्पर्धा.  


मुंबई (प्रतिनिधी) : सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. जी संघटना सध्या देशात तेवीस राज्यांत कार्यरत आहे. ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ अजून रुजावे, या उद्देशाने या वर्षीपासून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड सुरू केला आहे. या स्पर्धेत रोख अडीच लाख रुपयांचे चार पुरस्कार, विशेष पाच पुरस्कार, सर्व सहभागी स्पर्धक पत्रकारांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

   ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा माने, शेट ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष ब्रिजमोहन लढ्ढा, यांनी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३ ची घोषणा केली आहे.                        


  'व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३ प्रथम क्रमांक १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान. द्वितीय क्रमांक ६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान. महिला पत्रकार ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ,मानपत्र, सन्मान. तृतीय क्रमांक ४१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान. सहभागींना उत्तेजनार्थ पाच विशेष पुरस्कार. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.    

  सहभागी होणारे पत्रकार त्या दैनिक, साप्ताहिकाचे प्रतिनिधी आवश्यक आहेत. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडणे आवश्यक आहे. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक असणाऱ्या बातम्या, लेख यास्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. जानेवारी २०२४ मध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत विजेत्यांना दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  

   ही स्पर्धा महाराष्ट्र, मराठी भाषेपुरतीच आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे वरिष्ठ व मुख्य पदाधिकारी मंदार फणसे,संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, अनिल मस्के, विलास बडे, सुधीर चेके पाटील, बालाजी मारगुडे हे निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

‘व्हाईस ऑफ मीडिया’ कोकण विभागीय कार्यालय एल.३०-१२०१- स्वप्नपूर्ती , सेक्टर ३६ खारघर, नवी मुंबई ४१०२१० या पत्त्यावर प्रस्ताव पाठवायचे आहेत. ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे सर्व ठिकाणीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव या प्रमुख चार जणांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही.  

   शेट ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठान चिखलीचे अध्यक्ष आशीष ब्रिजमोहन लढ्ढा यांच्या सहकार्याने हा पुरस्कार उपक्रम पार पडतोय. आशीष ब्रिजमोहन लढ्ढा म्हणाले, या सामाजिक उपक्रमात मला सहभागी होता आले, हे मी माझे भाग्य समजतोय, हा उपक्रम नक्कीच समाजासाठी प्रेरक ठरेल.

  या स्पर्धेत राज्यातल्या सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे , असे आवहान ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.voiceofmedia.org ला भेट द्या.

......................................


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार


राज्यातील सामान्य नागरिकांसाठी 500 ठिकाणी आपला दवाखाना


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 9 : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले.


            राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याबाबत घोषणा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आपला दवाखानाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.


            या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, भरत गोगावले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईपाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येईल. मुंबईत सुरू केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरू झाले. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.


            केंद्र सरकारने राज्यातील रेल्वेचे प्रकल्प, नगर विकास विभागाच्या विविध प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुंबई शहराला आणखी विकसित करण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.


            सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले. आज झालेल्या ४५८ रक्तदान शिबीरात सुमारे ७ हजार २०० बॅगचे संकलन झाले. राज्यभरात १ हजार ८३५ आरोग्य शिबीरात २ लाख १२ हजार ५०५ रुग्णांना तपासण्यात आले. जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानात सुमारे साडेतीन लाख बालकांची तपासणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.


            यावेळी मंत्री श्री. पाटील, आमदार ॲड. आशिष शेलार यांचीही भाषणे झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार यामिनी जाधव, आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.


            यावेळी आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. स्वप्नील लाळे, उपसंचालक डॉ.विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ विजय बाविस्कर, कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते. डॉ. कंदेवाड यांनी आभार मानले.



सावित्रीबाई फुले प्रशिक्षण केंद्र, करंजाडे*

 नमस्कार मित्रांनो🙏


जर तुमच्याकडे जुनी बोधकथा, ग्रंथ, गोष्टिची पुस्तके व थोर महापुरुषांची पुस्तके📚📖 पडून असतील तर कृपया आम्हाला द्यावी अशी आपणास विनंती..!


*सावित्रीबाई फुले प्रशिक्षण केंद्र, करंजाडे*


पत्ता : तळ मजला, नीलकंठ अवेन्यू, प्लॉट नंबर 131, सेक्टर 4, करंजाडे 410206

*( से.4, D mart समोरील इमारत )*


 *मोबाईल नंबर - 9699894202 / 9619894202*

विज्ञान प्रदर्शन

 


कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार

 कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार


- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील.

            पुणे, दि. 9 : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सुधारित प्रारुप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यानुसार 27 फेब्रुवारी 2023 रोजी सुधारित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.


            प्राधिकरणाने राज्यातील निवडणुकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रकिया सुरू केली असून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 245 बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यापूर्वी प्रारुप मतदार याद्या तयार करण्यासाठी 1 सप्टेंबर 2022 हा अर्हता दिनांक निश्चित केला होता. तथापि, शासनाच्या 7 फेब्रुवारी 2023 रोजीच्या अधिसूचनेनुसार नव्याने निवडून आलेल्या प्राथमिक सहकारी पतसंस्था, बहुद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सदस्यांना अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक असल्याने पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यामध्ये या नवीन सदस्यांना समाविष्ट करुन सुधारित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


            1 सप्टेंबर 2022 या अर्हता दिनांकानंतर राज्यातील 9 हजार 525 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहभागी होता यावे यासाठी 30 एप्रिल 2023 अथवा त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत प्राधिकरणास आदेश दिले आहेत. पूर्वीच्या अंतिम यादीत समावेश असलेले परंतु या कालावधीत निवडणूक न लढवलेले आणि पराभूत झालेले सदस्य अपात्र झालेले आहेत.


            सुधारित मतदार यादी कार्यक्रमानुसार 10 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत 1 सप्टेंबर 2022 नंतर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची नावे समाविष्ट करुन व प्रतिनिधीत्व संपुष्टात आलेल्या सदस्यांची नावे वगळून अंतिम मतदार यादीत सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार सुधारित प्रारुप मतदार यादी 27 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीमध्ये 27 फेब्रुवारी ते 8 मार्च 2023 या कालावधीत आक्षेप/ हरकती घेता येतील. प्राप्त झालेल्या हरकतींवर 17 मार्च 2023 पर्यंत निर्णय घेऊन 20 मार्च 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.


            20 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीमध्येही नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश नसल्यास त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीकरीता नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल, असेही आयुक्तांनी कळविले आहे.


0000



 

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध सामाजिक संस्थांना धनादेश प्रदान

 सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते

विविध सामाजिक संस्थांना धनादेश प्रदान


समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणार

– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            पुणे, दि. 9 : समाजातील विषमता दूर करून समतेसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने सामाजिक दायित्व निधीतून ९ सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, काही सामाजिक संस्था समाजातील विषमता दूर करण्यासाठी सेवाभावीवृत्तीने आणि चांगले संस्कार सोबत घेऊन कार्य करत आहेत याचे समाधान वाटते. अशा संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याचे चांगल्याप्रकारे सादरीकरण करून प्रस्ताव सादर करावेत. राज्य सरकारच्यावतीने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून या संस्थांना आर्थिक मदत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील.


            आज महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने ९ संस्थांना आर्थिक मदत देण्यात आली याचा आनंद होत आहे, असे सांगून त्यांनी सामाजिक संस्थांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.


आर्थिक मदत देण्यात आलेल्या संस्था


            जनसेवा न्यास हडपसर, सेवा आरोग्य फाऊंडेशन, पुणे, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, सिंहगड रोड, पुणे, स्वरूप वर्धिनी, पुणे, विवेक व्यासपीठ,पुणे, वनांचल समृध्दी अभियान फाऊंडेशन, नवी मुंबई, हिंदुस्थान प्रकाशन संस्था,मुंबई व भोगावती सांस्कृतिक मंडळ, कोल्हापूर या संस्थांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली.


            या संस्था समाजातील झोपडट्टीवासीय नागरिकांना आरोग्य सुविधा, मुलांसाठी अभ्यासिका, संस्कार वर्ग, किशोरी विकास प्रकल्प, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, साक्षरता, सामाजिक विकासासाठी शिक्षण, पर्यावरण व दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकास करण्यासाठी वसतिगृहे, इत्यादी माध्यमातून कार्य करत आहेत.


०००



 

Featured post

Lakshvedhi