Thursday, 26 January 2023

राष्ट्रीय मतदार दिन-2023लोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य

 राष्ट्रीय मतदार दिन-2023लोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य


- श्रीकांत देशपांडे

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विशेष संस्थात्मक योगदान पुरस्कार.

            मुंबई, दि.25 : “लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो”, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.


            मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन -2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, कुलसचिव विलास नांदवडेकर, उपसचिव मनोहर पारकर यांच्यासह मिलिंद बोकील, सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, डॉ.सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, डॉ.उज्ज्वला चक्रदेव आदी पाहुणे उपस्थित होते.


            यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे प्रसिद्धीसाठी नेहमीच अग्रेसर असते. राज्याच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळस माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालय हे निवडणूक कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्राथम्याने करते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना विशेष संस्थात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


            निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मुगराजन एस. (वाशिम), रूचेश जयवंशी (हिंगोली), अशोक शिनगारे (ठाणे), डॉ.विपीन इटनकर (नागपूर), डॉ.राजेंद्र भोसले (अहमदनगर) आणि राजेश देशमुख (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन (वाशिम), दिलीप कच्छवे (हिंगोली), श्रीमती अर्चना कदम (ठाणे), श्रीमती मीनल कळसकर (नागपूर), जितेंद्र पाटील (अहमदनगर), पुण्याच्या श्रीमती आरती भोसले आणि श्रीमती मृणालिनी सावंत यांना विभागून पुरस्कार देण्यात आले.


            त्याचप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कारात गणेश राठोड (मेहकर, जि.बुलडाणा), धीरज मांजरे (कारंजा, जि.वाशिम), डॉ.सचिन खल्लाळ (वसमत, जि.हिंगोली), श्रीमती क्रांती डोंबे (कळमनुरी, जि.हिंगोली), राहुल मुंडके (पनवेल, जि.मुंबई उपनगर), श्रीमती वैष्णवी बीष्वा (भाप्रसे)(तुमसर, जि.भंडारा), संदीप भस्के (ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर), श्रीमती ज्योती कावरे (सिन्नर, जि.नाशिक), डॉ.शशिकांत मंगरूळे (संगमनेर, जि.अहमदनगर), सुशांतकिरण बनसोडे (कागल, जि.कोल्हापूर) आणि गणेश मरकड (पलूस कडेगाव, जि.सांगली) या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा समावेश होता.


            सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे असल्याने समाजमाध्यमावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. यात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, शिवडी, जत आणि कोल्हापूर उत्तर यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मतदार मित्र पुरस्कारात किन्नर मॉ ट्रस्ट व कोरो इंडिया या सामाजिक संस्थाचा गौरव करण्यात आला. निवडणुकीचे वार्तांकन करून जनजागृती करणारे लोकसत्ताचे पत्रकार निखिल अहिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.


            या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात लोकशाही दिंडी, पथनाट्य, रांगोळी प्रदर्शन, मतदार जागृती दालन, ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण, शपथ घेणे, ओळखपत्राचे वाटप, अहवाल प्रकाशन आदी करण्यात आले.


            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी केले, तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी आभार मानले.

राज्यात उद्यापासून ‘महाराजस्व’ अभियान

 राज्यात उद्यापासून ‘महाराजस्व’ अभियान

            मुंबई, दि. 25 : सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान 26 जानेवारी ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत राबविण्यात येणार असून महसूल व वन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.


            एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे, भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या विविध कलमांची कार्यवाही करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते/ पाणंद/ पांधण/शेतरस्ते/ शिवाररस्ते/ शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे, मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906 अंतर्गत मंजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे आणि तयार करणे, गाव तिथे स्मशानभूमी/ दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देणे, लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच यासाठी प्रचार प्रसिध्दी करणे, निस्तार पत्रक व वाजिब-उल-अर्जच्या नोंदी अद्ययावत करणे, सप्टेंबर 2022 पर्यंतची मोजणी प्रकरणे मार्च 2023 पर्यंत निकाली काढणे, ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी करणे, ई चावडी प्रणालीची अंमलबजावणी करणे, भूसंपादन अधिनियम, 1894 अंतर्गत कार्यवाही करणे या घटकांची जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावपातळीपर्यंत प्रभावीपणे जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहेत.


            याशिवाय परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात यावी, गौण खनिज ऑनलाईन प्रणाली वापराबाबतची माहितीही देण्यात यावी तसेच सन 2016 चा महाराष्ट्र अधिनियम क्र 1 अन्वये कुळकायद्याच्या कलम 63 मधील सुधारणा करणे,पोटहिस्सा/सामीलिकरण/ भूसंपादन/रस्ता सेटबॅक इत्यादी कारणामुळे नकाशामध्ये होणाऱ्या बदलाबाबत दुरुस्तीसह अद्ययावत नकाशा पुरविणे, नावीन्यपूर्ण योजना उपविभाग आणि तहसील कार्यालय येथे राबविणे महाराजस्व अभियाना घेण्यात आले आहे.


            राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी महाराजस्व अभियानाअंतर्गत आपल्या जिल्हयांमध्ये जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवरक केलेली कामगिरीबाबतची माहिती मासिक प्रगती अहवालाद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील. तसेच जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांनी या अभियानाअंतर्गत त्यांच्या अधिनस्त कार्यालयात होणाऱ्या कार्यवाहीचा आढावा शासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


            महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भूत विविध लोकाभिमुख आणि प्रशासकीय घटकांच्या निपटाऱ्यासाठी कालबध्द मोहिम आखून प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागीय आयुक्तांनी घटकनिहाय कालबध्द कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करुन व्यवस्थापन पथकाची स्थापना करुन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनुपालनाचे निर्देश देण्यात यावेत अशा सूचना आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. 

दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य सेवा हक्कआयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची मुलाखत.

 दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य सेवा हक्कआयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 25: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नाशिक विभागाच्या राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 27, शनिवार दि. 28, सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


           महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान, कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याविषयी सविस्तर माहिती आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा, लोकसेवा हक्क आयोगाची कार्यपद्धती अशा विविध विषयांची माहिती त्यांनी या मुलाखतीतून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणाऱ्याअधिनियमात सुधारणा

 उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणाऱ्याअधिनियमात सुधारणा.

            मुंबई, दि. २५: उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकास कामे नियमाधीन करणाऱ्या अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. या सुधारित अधिनियमास राज्यपालांची संमती मिळाली आहे. त्यामुळे हा अधिनियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.


            या अधिनियमास उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे (सुधारणा) अधिनियम २०२२ असे म्हणण्यात येणार आहे. तसेच अधिनियमातील कलम तीनमध्ये पोट कलम तीन मधील खंड ' क ' तील ' पुढील तक्त्यानुसार निर्धारित केलेली ' या मजकुरा ऐवजी ' विहित करण्यात येईल अशी ' हा मजकूर दाखल करण्यात येईल. तसेच फिचा तक्ता वगळण्यात येणार आहे.


            त्याचप्रमाणे मुख्य अधिनियमाच्या कलम चारमध्ये पोट कलम तीन मधील खंड ' क' च्या परंतुकामधील '४.०० हून अधिक तलपृष्ठ निर्देशांक (एफ.एस.आय) ' या मजकुराऐवजी ' उल्हासनगर शहर महानगरपालिकेला लागू असलेल्या महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन विनियमांमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे तलपृष्ठ निर्देशांक (एफ.एस.आय) पेक्षा अधिक तलपृष्ठ निर्देशांक ' हा मजकूर दाखल करण्यात येईल. अशी सुधारणा करण्यात आलेला अधिनियम प्रसिद्ध करण्यात आला आहे.


0000


 


 



 



महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

 महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

            नवी दिल्ली, दि.25: दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 43 मान्यवरांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार आज जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.


            राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2022’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील रविराज अनिल फडणीस यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर महेश शंकर चोरमले आणि सय्यद बाबू शेख यांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाला.


            तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले असून, देशातील 43 नागरिकांचा समावेश आहे. यातील सात नागरिकांना ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’, दोन नागरिकांना मरणोपरांत पुरस्कार, आठ नागरिकांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. एकूण 28 नागरिकांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि पुरस्कार राशी असे आहे.



राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुण्याचे जिल्हाधिकारी

डॉ. राजेश देशमुख राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

            नवी दिल्ली दि.25: राज्यातील पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना 'बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड' या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.


            दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात 13 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे भारत निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजन करण्यात आले. केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते. यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            भारत निवडणूक आयोगाची यंदाची संकल्पना 'मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही', अशी आहे. यावेळी प्रख्यात निर्देशक सुभाष घई यांचे द्वारा निर्मित 'मैं भारत हॅुं' या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.


            पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राशी संवाद साधताना ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखांपेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारांवर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


            पुणे जिल्ह्यात युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह सहकार्याने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.


            जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.


            जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.


            यावेळी ‘इलेक्टिंग द फर्स्ट सिटिजन- एन इलेस्ट्रेटेड क्रॅानिकल ऑफ इंडियाज प्रेसिडेंशियल इलेक्शन’ पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी राष्ट्रपती यांच्या हस्ते एकूण १३ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.


००००


 

विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे

 विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे

-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 25: परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकलेसह इतर उपक्रमांमध्येही सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.


            ‘परीक्षा पे चर्चा’ पर्व 6 या उपक्रमाअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांतील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आर्यन एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय, गिरगाव, मुंबई या शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.


            या स्पर्धेमध्ये मुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागातील ६३१ शाळेतील २३ हजार ९६७ विद्यार्थी, शिक्षण निरीक्षक उत्तर विभागातील ४३० शाळेतील ५८९० विद्यार्थी, शिक्षण निरीक्षक दक्षिण विभागातील १३० शाळेतील २७२८ विद्यार्थी, ठाणे जिल्ह्यातील ६५६ शाळेतील १७ हजार ८७६ विद्यार्थी, रायगड जिल्ह्यातील ५७३ शाळेतील ९८८८ विद्यार्थी व पालघर जिल्ह्यातील ३३७ शाळेतील ८६४७ विद्यार्थी असे एकूण २७५७ शाळेतील ६८९९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली. यावेळी शिक्षण निरीक्षक देविदास महाजन उपस्थित होते.


            या चित्रकला स्पर्धेकरिता देण्यात आलेल्या विषयांमध्ये G-२० जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोस्तव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणमध्ये भारत नं. 1, प्रधानमंत्री जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योगदिन मोदीजीनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाओ, बेटी पढाओ, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला मोदींचा संवेदनशील निर्णय, हे विषय देण्यात आले होते.


            या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना व उत्तेजनार्थ पंचवीस विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.


00000

Featured post

Lakshvedhi