Saturday, 21 January 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण

राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी-मुख्यमंत्री.

पुणे दि.21 : शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता 900 हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला व्ही.एस.आय.चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यात देखील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम शासन करेल. साखर उद्योगावर लाखो शेतकरी अवलंबून असल्याने हा उद्योग वाढणे आणि टिकणे गरजेचे आहे. शासनाने साखर उद्योगासोबत इतरही शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना शेतकऱ्यांसाठी 18 सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत, त्यामुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येईल. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून 7 लाख 19 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटींचेही वाटप करण्यात येत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही वाढीव मदत करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे सुरू करण्यात आली आहे.

कृषि क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे गरजेचे


कृषि उत्पादनावर प्रक्रीया करणाऱ्या उद्योगात वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा क्रमांक लागतो. ग्रामीण भागाच्या विकासात या उद्योगाचे मोठे योगदान आहे. नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात अधिकचे उत्पादन करण्यासाठी व्हीएसआयचे सहकार्य मिळते आहे. संशोधन, विकास, प्रशिक्षण आणि विस्तार हे संस्थेचे उद्दीष्ट आहे. ऊस उत्पादनापासून साखर निर्मितीच्या तंत्रापर्यंत विविध टप्यांवर आधुनिकीकरण कसे करता येईल, याबाबतचे संशोधन व्हीएसआय करत असल्याने सहकारी क्षेत्राला फायदा होत आहे. जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे लागेल. कृषि संशोधनाला चालना मिळाली तर राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल.

साखर उद्योग क्षेत्रातील संशोधनात व्हीएसआयचे मोठे योगदान


ऊस, शेती आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली आणि शेतकऱ्यांनी स्थापन केलेली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही अशा स्वरुपाची जगातली एकमात्र संस्था आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, व्हीएसआयने जालना येथे विविध ऊसाची बेणे निर्माण केली. त्याचा मराठवाडा आणि खानदेशच्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. विदर्भातदेखील संस्थेचे केंद्र सुरू करण्यात येत आहे.

कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरणाचा शास्त्रीय विचार, अल्कोहल निर्मितीचे आधुनिक तंत्र अशा अनेक अंगांनी संस्था संशोधन करते आहे. ऊस लागवड, जमिनीची सुपीकता ऊसाच्या बेण्यातील बदल, जैविक तंत्रज्ञान अशा महत्वाच्या विषयावर संस्था शेतकऱ्यांना माहिती देते आणि संशोधन करते. आंबोली येथे विकसीत केलेल्या व्हीएसआय 8005 आणि 12121 या जातीच्या ऊसाचे क्षेत्र वाढते आहे. अवर्षण परिस्थितीत ही जात शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इथेनॉल निर्मितीला शासनाचे प्रोत्साहन

चालू गळीत हंगामात 508 लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन 47 लाख मे.टन साखरेचे गाळप झाले आहे. जगात महाराष्ट्राचा साखर उत्पादनात तिसरा क्रमांक आहे, ही अभिमानाची बाब आहे. राज्यात गतवर्षी 137.20 लाख मे.टन साखरेचे उत्पादन झाले. 12.6 लाख मे.टन साखरेचा वापर इथेनॉलच्या निर्मितीसाठी झाला आहे. इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळते आहे. 106 कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. चालू हंगामातही मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

ऊसासोबत फळबागांचेही क्षेत्र वाढवावे


ऊसाचे वाढते उत्पादन, गाळपाशिवाय राहणारा ऊस अशी आव्हाने साखर कारखान्यांसमोर आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात ऊस हा उत्तम पर्याय असला तरी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. राज्यात साखरेचे अतिरिक्त उत्पादन असल्याने साखर निर्यात व साखरेचे कमी उत्पादन होणाऱ्या अन्य राज्यात साखर विक्रीचे व्यवस्थापन करण्यावर कारखान्यांनी भर द्यावा. ऊस उत्पादनासोबत खरीपातील कापूस-सोयाबीनचाही पेरा शेतकऱ्यांनी वाढवावा. फळबाग क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऊस पीकासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील. त्यामुळे साखर कारखान्यांना आवश्यक असणारा ऊस कमी क्षेत्रात आणि कमी पाण्यात उपलब्ध करणे शक्य होईल. यादृष्टीने व्हीएसआयचे काम महत्वपूर्ण आहे, असे श्री.शिंदे म्हणाले.

केवळ नफा-तोटा यावर लक्ष केंद्रीत न करता साखर काराखान्यांनी आपत्तीच्यावेळी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे नमूद करून साखर कारखान्यांनी असे उपक्रम वाढविण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

दावोसमध्ये उद्योगांशी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातल्या विविध भागात उद्याग येणार असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे-शरद पवार


भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. साखर कारखान्यात आसवनींतील बायोगॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प यापासून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो.

भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर साखरेव्यतिरिक्त इतर उपपदार्थावर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. साखर कारखान्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात साखर, इथेनॉल आणि सी.बी. जी., हायड्रोजन आदी उप उत्पादनांचे उत्पादन घेतले पाहिजे.

भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. सरकारने फ्लेक्स इंधन वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून त्याची पूर्तता करणे ही आजची गरज आहे. इथेनॉल व्यतिरिक्त, सी.बी. जी. कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि हायड्रोजन सारखे अक्षय ऊर्जा खोत देशाच्या ऊर्जेच्या गरजेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतील.

शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर शुद्ध बेण्याचा वापर झाला पाहिजे याकडे साखर कारखान्यांनी लक्ष देणे आवश्यक आणि गरजेचे आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विभागवार ऊस भूषण पुरस्कार, उत्कृष्ट शेती अधिकारी, उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी, उत्कृष्ट चीफ इंजिनिअर, उत्कृष्ट चिफ केमिस्ट, उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक, उत्कृष्ट कार्यकारी संचालक, संस्थेत काम करणरे उत्कृष्ट कर्मचारी, विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखानाह पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी ता.कडेगाव जि.सांगली या कारखान्याला प्रदान करण्यात आला. कै.रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार जयवंत शुगर्स लि.धावरवाडी ता.कराड जि.सातारा, कै.किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कडूस ता.पलूस जि.सांगली, कै.कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, कै.डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार दौंड शुगर प्रा.लि.पो.आलेगाव ता.दौंड, जि.पुणे, कै.विलासरावजी देशमुख उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ता.कागल जि.कोल्हापूर या कारखान्याला प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्षमता पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले. संघाकडून देण्यात येणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल या कारखान्यास प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तांत्रिक कार्यक्षमता अहवाल, आर्थिक कार्यक्षमता अहवाल, आसवणी अहवाल अशा विविध अहवालांचे प्रकाशन करण्यात आले.


000

Salutes to teacher's

 


अर्ध हात अपंग ना मोठा दिलासा.

 


प्रभात

 














मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद

 मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद.

            मुंबई, दि. २० : सुप्रशासनाच्या सुसूत्रीकरण व अंमलबजावणीबाबतच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे दि. २३ व २४ जानेवारी, २०२३ या कालावधीत रॉयल हॉल, नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया, वरळी, मुंबई येथे आयोजन करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले.


             ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेच्या आयोजनाबाबत मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, साप्रविचे सह सचिव सोमनाथ बागूल, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती/प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके यांची उपस्थिती होती.


            श्रीमती सौनिक म्हणाल्या की, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे उद्घाटन दि.२३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे या परिषदेला संबोधित करणार आहेत.


            केंद्र सरकार व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. देशातून ३० राज्यांमधील अधिकारी सहभागी होणार आहेत. या परिषदेत प्रशासकीय सुधारणा, ई-गव्हर्नन्स,गुड गव्हर्नन्स इत्यादी विषयांवर चर्चा विनिमय होणार आहे. देशातील त्या त्या विषयातील तज्ञ वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे श्रीमती सौनिक यांनी सांगितले.


            या परिषदेत स्टार्टअप आणि गुड गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स पुरस्कार प्राप्त उपक्रम, महाराष्ट्र राज्य सरकारचे सर्वोत्तम पध्दती, डिजिटल संस्था आणि डिजिटल सचिवालय,ई गव्हर्नन्स मधील स्टार्टअप, ई सेवा राज्यामध्ये वितरण अशा विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रीमती सौनिक यांनी यावेळी सांगितले.


000000

अंधेरीतील ईएसआय दवाखान्याचे नूतनीकरण सहा महिन्यात पूर्ण करावे

 अंधेरीतील ईएसआय दवाखान्याचे नूतनीकरण सहा महिन्यात पूर्ण करावे

- केंद्रीय सचिव आरती आहुजा.

            मुंबई, दि. २० : राज्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआय) कामगारांसाठी दवाखाने आहेत. त्यात १२ राज्य कामगार दवाखाने तर ६५ ठिकाणी राज्य कामगार विमा सेवा योजनाद्वारे कामगारांना आरोग्य सेवा दिली जाते. मुंबईतील अंधेरी येथे ५०० खाटांच्या दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे २२० खाटांचे काम सुरु आहे. उर्वरित खाटांचे काम अग्निशामक विभागाच्या परवानगीने सहा महिन्यात नूतनीकरण पूर्ण करावे, अशा सूचना केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.


            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ईएसआयसी योजनेंतर्गत आरोग्य सेवा आणि योजनांच्या आढावा बैठकीत श्रीमती आहुजा बोलत होत्या. यावेळी ईएसआयसीचे महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार, राज्याचे आरोग्य आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह विमा योजनेचे आयुक्त उपस्थित होते.


            श्रीमती आहुजा यांनी राज्यातील विमा दवाखान्यांचा आढावा घेतला. राज्यात ३९ लाख ९० हजार ४९० कामगार विमा योजनेच्या माध्यमातून दवाखान्याचा लाभ घेत आहेत. मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता अंधेरी पूर्व येथील विमा दवाखान्यात खाटांची संख्या वाढविली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामक विभागाची परवानगी घेवून काम सुरू करावे. एकही कामगार विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. राज्यातील गडचिरोली, वाशिम, रत्नागिरी येथे दवाखान्यांना परवानगी मिळाली आहे. त्याची पुढील महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. नंदुरबार आणि हिंगोली येथील सर्वेक्षण पूर्ण करून माहिती संकलित करावी. यावरही त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्रीमती आहुजा यांनी दिल्या.


            कोल्हापूर येथे १०० बेडपैकी ३० बेड सुरू आहेत तर बिबवेवाडी (पुणे) येथे १०० बेड पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. प्रत्येक दवाखाना परिसरात अग्निप्रतिबंधक सुरक्षा, परीक्षण यावर भर द्यावा. ज्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमी असेल तिथे राज्य शासनातील निवृत्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्याच्या सूचनाही श्रीमती आहुजा यांनी दिल्या.



मुंबईत ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन

 प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी

मुंबईत ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन

          मुंबई, दि. २० : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या अकराव्या अखिल भारतीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्यात देशभरातून १७ नामवंत शायर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सर्वांना प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.


          या कार्यक्रमात नामवंत शायर सहभागी होणार असून वसीम बरेलवी, कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत. डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी हे शायर या कार्यक्रमात मुशायऱ्याचे सादरीकरण करणार आहेत. अतहर शकील हे सुत्रसंचालन करणार आहेत.  


          विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत या कार्यक्रमास निमंत्रित आहेत. सन २०१३ पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या मुशायरा कार्यक्रमांमध्ये देशभरातील नामवंत शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण करतात.

Featured post

Lakshvedhi