सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 8 October 2022
Friday, 7 October 2022
सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीविषयक लाभ
महापालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीविषयक लाभ तत्काळ द्या
- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
'पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या दिवशी 269 अर्ज प्राप्त.
मुंबई, दि. 7 : महापालिकेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनविषयक लाभ सात दिवसात देण्यासंदर्भात महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. कांदिवली येथील साऊथ वॉर्ड येथे पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या दारी' या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. या अभियानाचा प्रारंभ 6 ऑक्टोबरपासून झाला असून 4 नोव्हेंबर, 2022 पर्यंत हे अभियान चालू राहणार आहे.
कांदिवली येथील साऊथ वॉर्ड येथे पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या दारी' या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या शाळांतून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक दिवस शिक्षकांना सेवानिवृत्ती व इतर देय लाभ मिळत नसल्याची तक्रार आमदार श्री. भातखळकर यांनी मांडली. मंत्री श्री. लोढा यांनी अशी प्रकरणे असल्यास दिरंगाई न करता तत्काळ निकाली काढावीत असे निर्देश दिले. पाणी वेळेत न येणे, कमी दाबाने येणे, स्वच्छता, शौचालयासंबंधी प्रश्न, नादुरूस्त पथदिवे, झोपडपट्टी पुर्नविकास करणे अशा विविध 269 विषयांवर नागरिकांनी तक्रार अर्ज दिले. तर या तक्रारीपैकी 95 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. महापालिकेच्या मैदानावर भरणाऱ्या बचतगटांच्या बाजारांची सवलत तीन ऐवजी सहा दिवस वाढवावी अशी मागणी बचतगटांच्या महिलांकडून करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नी कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.
दरम्यान सोमवार 10 ऑक्टोबर रोजी आर सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड - बोरीवली पश्चिम येथे पालकमंत्री श्री. लोढा भेट देणार आहेत. नागरिकांना आपल्या तक्रारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या : https://mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या : portal.mcgm.gov.in संकेतस्थळावरही ऑनलाइन तक्रारी दाखल करता येतील.
*****
दिलखुलास’
दिलखुलास’ कार्यक्रमात वन्यजीव अभ्यासक डॉ. विनया जंगले यांची मुलाखत
मुंबई, दि. 7: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव अभ्यासक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनया जंगले यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शनिवार दि. 8 ऑक्टोबर आणि सोमवार दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव अभ्यासक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण, अन्नसाखळी यासारख्या विविध विषयांवर दिलखुलास कार्यक्रमात विस्तृत माहिती दिली आहे. प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये, वन्यजीव आणि मानवाच्या सहजीवनाबद्दलही त्यांनी माहिती सांगितली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
00000
लम्पी बाधित जनावराचा मृत्यू
लम्पी बाधित जनावराचा मृत्यू झाल्याससर्व पशुपालकांना नुकसान भरपाई
- सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 7 : नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असून, आता लम्पी चर्मरोगाने बाधीत पशुधनाचा (जनावराचा) मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
श्री. सिंह म्हणाले, पशुसंवर्धन विभागाचे लम्पी रोगाविषयी महत्त्वाचे दोन निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पहिला निर्णय नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असून, आता लम्पी बाधीत पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
दुसरा निर्णय पशुपालकांना यापुर्वी लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जास्तीत जास्त ३ जनावरांसाठी हा लाभ अनुज्ञेय होता. आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. सिंह म्हणाले, लम्पी आजाराच्या विषाणूच्या जनुकीय परिक्षणांतर्गत जिनोम क्रमवारीता तपासणीसाठी (Genome sequencing) आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे (National Institute of Virology (NIV) येथे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती प्राप्त होणार आहे, तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापुर्वीचे नमुने व लसीकरणाकरणानंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बेंगलुरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था (National Institute Of Veterinary Epidemiology And Disease Informatics (NIVEDI) येथे पाठविण्यात येत आहेत.
शासन अधिसूचना दि. ३०.९.२०२२ अन्वये संक्रमित / संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून आरोग्य प्रमाणपत्रासह म्हशींची वाहतुक करण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून वाहतुक करण्यास परवानगी दिली असल्याचे श्री. सिंह यांनी सांगितले.
राज्यामध्ये दि. ०७.१०.२०२२ अखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार २६७ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ६३ हजार ०६४ बाधित पशुधनापैकी एकूण ३३ हजार ६७५ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 128.01 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 115.18 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले असून अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 82.32 % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.
0000000
अभियांत्रिकी अभ्यासक्रम
पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशात यंदा १५ टक्क्यांनी वाढ
यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ८५ टक्के
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.
मुंबई, दि. ७ : शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील तीन वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग १० टक्के होत असलेली वाढ यावर्षी १५ टक्के झाली आहे. या प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या आता ८५ टक्के झाल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या सन २०१८ - १९ मध्ये ४१ टक्के होती, ही संख्या २०१९ - २० मध्ये ५० टक्के तर २०२०-२१ मध्ये ६० टक्के आणि २०२१-२२ मध्ये ७० टक्के होती. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षांत ही संख्या ८५ टक्के एवढी विक्रमी झाली आहे. पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व संस्थांनी व अध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे सांगून पदविका अभ्यासक्रम प्रवेशाचा चढता आलेख कायम ठेवावा, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत आहे. शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थांचा ओघ या क्षेत्राकडे वाढला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता एकूण प्रवेशक्षमता सुमारे १ लाख आहे. पदविका अभ्यासक्रमांसाठी एकूण ८४ हजार ४५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. विभागनिहाय विचार केल्यास अमरावती विभाग ९१ टक्के, औरंगाबाद विभाग ८६ टक्के, मुंबई विभाग ८२ टक्के, नागपुर विभाग ६८ टक्के, नाशिक विभाग ७८ टक्के व पुणे विभाग ९० टक्के असे प्रवेश झाले आहेत. तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या सहकार्याने रोजगार देणारे क्षेत्र म्हणून हे विकसित करावे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
महाराष्ट्र व गोवा राज्य उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवणार : ना. प्रमोद सावंत
--------------------------------
इन्व्हेस्ट गोवा परिषदेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर सामंजस्य करार
--------------------------------
उद्योगात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अॅण्ड अग्रिकल्चर' व गोवा सरकार आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवतील अशी अपेक्षा गोव्याचे मुख्यमंत्री नामदार प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
इन्व्हेस्ट गोवा या गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' च्या वतीने अध्यक्ष ललित गांधी, गोवा चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीज च्या वतीने अध्यक्ष राल्फ डिसूजा यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या व सामंजस्य करारांचे आदान प्रदान केले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ,गोव्याचे उद्योग मंत्री मावीन गोदीना, गोव्याचे पर्यटन व आयटी उद्योग मंत्री रोहन खुंटे, इन्व्हेस्ट गोवा परिषदेचे निमंत्रक मांगिरिश रायकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आदी विविध राज्यातून मोठ्या संख्येने उद्योजक व गुंतवणूकदार या परिषदेस उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या शतक महोत्सवी शिखर संस्थेतर्फे चेंबरच्या कार्यक्षेत्रातील गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज तर्फे बरोबर सामंजस्य करार करून दोन्ही राज्यातील उद्योग वाढीसाठी विविध स्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती देऊन ललित गांधी यांनी गोवा येथे महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने सुविधा केंद्र व कौशल प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. माजी मंत्री सुरेश प्रभू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गोव्याच्या नवीन उद्योग धोरणाच्या पुस्तिकेचे याप्रसंगी अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या उद्योगाच्या व नवीन गुंतवणुकीच्या विविध संधींचा एक अहवाल ललित गांधी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत सादर केला. तसेच 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचा उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योग परिषद आयोजित केल्याची माहिती देऊन गोवा सरकारला त्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. गोव्याचे मुख्यमंत्री नामदार डॉ. प्रमोद सावंत यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केल्याचे सांगितले.
मुंबईत संपन्न होणाऱ्या या व्यापार उद्योग परिषदेस देशातील उद्योजकांनी सहभागी व्हावे असे आमंत्रण ललित गांधी यांनी उपस्थित त्यांना याप्रसंगी दिले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...