सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 30 September 2022
चांदणी चौक पूल पाडण्या
चांदणी चौक पूल पाडण्याच्यावेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरीलपुणे शहरातील वाहतूक बंद रहाणार
पुणे, दि. 29 : मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल स्फोटकांद्वारे पाडण्यात येणार असल्याने या कामाच्यावेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास मनाईबाबतचे आदेश पुणे शहरचे पोलीस उपायुक्त वाहतूक राहूल श्रीरामे यांनी जारी केले आहेत.
वाहतूकीतील बदल १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत अथवा आवश्यकतेनुसार पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील.
वाहतुकीतील बदल-
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे.
• साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंदी राहील.
वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग-
मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता-
• मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने ऊर्से टोलनाका येथून जुन्या पुणे- मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग
• वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग
• राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग
साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता-
• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग
• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग
• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग
0000
चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबर
चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणारसर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे, दि. 29 : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा. ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
चांदणी चौक पूल पाडण्याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजीव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आदी उपस्थित होते.
चांदणी चौकात होणारी वाहतुकीचा समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने चांदणी चौक येथे एकात्मिक संरचना पूल प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी अस्तित्वातील जूना पूल पाडण्यात येणार असून महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती तसेच त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या सुमारे तीन आठवड्यांपासून पूलासाठीच्या भूसंपादनाचे काम पूर्ण करणे, सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण करणे आदी कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. आता हा पूल पाडण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण होत आली असून त्याबाबतची आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यखतेखाली घेण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्याद्वारे समन्वयाने वाहतुकीचे नियमन करण्यात येणार असून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पूलाच्या पाडकामावेळी देण्यात यावा. वाहतूक बंद कालावधीत मुंबईकडून येणारी जड वाहने उर्से पथकर नाका येथे थांबवण्यात येणार असून साताराकडून मुंबईकडे येणारी वाहने खेड शिवापूर पथकर नाका येथे थांबवण्यात येणार आहेत. हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग व वाहतुकीचे नियमन तीनही पोलीस दलांनी समन्वयाने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
या मार्गावरील दिवसाच्या वाहतूकीचे प्रमाण पाहता नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन रात्री हा पूल पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रात्री ११ वा. वाहतूक बंद केल्यानंतर सुमारे पहाटे २ वा. स्फोटकांद्वारे ब्लास्ट करण्यात येईल. ब्लास्ट करण्यासाठी सुमारे दीड मीटरची १ हजार ३०० छिद्रे घेण्यात आली असून त्यामध्ये सुमारे ६०० कि. ग्रा. स्फोटके वापरण्यात येणार आहेत. स्फोटकांसाठी पोलीस विभागासह सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. पुलाचा २०० मीटर परीघातील परिसर ब्लास्टपूर्वी रात्री ११ वा. च्या नंतर पूर्णत: निर्मनुष्य करण्यात येणार आहे.
पाडकामाच्यावेळी सुरक्षिततेची तपासणी करण्यासाठी तसेच रात्री कामावर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण पूल दिव्यांच्या सहाय्याने प्रकाशित करण्यात येणार आहे. राडारोडा काढण्यासाठी ४ डोझर्स, ८ पोक्लेन, ३९ टिपर तसेच सुमारे १०० कर्मचारी लावण्यात येणार असून ब्लास्टनंतर ३० मिनीटात तेथील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सुरक्षिततेची खात्री करुन राडारोडा काढण्यास सुरूवात करण्यात येईल. सकाळी ८ वाजेपर्यंत संपूर्ण राडारोडा काढला जाऊन मार्ग वाहतूकीसाठी खुला केला जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर सुमारे ८ दिवसात अतिरिक्त मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे.
महामार्ग पोलीसच्या पोलीस अधीक्षक लता फड, एडीफीस इंजिनिअरींग मुंबईचे उत्कर्ष मेहता यांच्यासह पोलीस विभाग, परिवहन विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000
माता सुरक्षित तर घर सुरक्षित
माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानदिवाळी पर्यंत राबविणार
- आरोग्य मंत्री तानाजी सावंत
मुंबई, दि. 29 : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान दिवाळी पर्यंत राबवावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या.
मंत्री श्री. सावंत यांनी आज पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव नवीन सोना, आयुक्त तथा अभियान संचालक डॉ. एन. रामास्वामी, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. नितीन आंबडेकर आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते .
मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या यंत्रणेला कार्यान्वित करण्याच्या सूचना द्याव्यात.जनजागृती, समुपदेशन, तसेच प्रत्यक्ष भेटी यावर पुढील काळात भर देऊन मोहीम यशस्वी करावी. मोहीम फक्त तपासणी वरच न थांबता पुढे गंभीर आजारा संबंधी उपचार आणि त्याकरिता लागणारा खर्च या बाबत रूग्णास सर्वोतोपरीने मदत करावी.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ रूग्णास देण्याकरिता यंत्रणा कार्यान्वित करणे, मदत सेल उभा करावा. याच मोहीमेच्या माध्यमातून रूग्णाचे आरोग्य विषयी आयुष्यमान भारत कार्ड तयार करून घ्यावे. कोरोना सारखी आपत्ती पुढे आल्यास या हेल्थ डाटाचा उपयोग आपत्ती निवारणासाठी करता येईल शिवाय नविन मोहीम देखील राबविण्याकरिता याचा उपयोग होईल , असे त्यांनी सांगितले.
मोहिमेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानामुळे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण झाली आहे, हे या अभियानाचे यश आहे, असे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी आरोग्य विभागांच्या योजनांबाबत यावेळी माहिती दिली. डॉ. साधना तायडे यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यसैनिक
स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठीराज्य शासन सकारात्मक
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 29 : स्वातंत्र्यसैनिकांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची जाणीव असून त्यांच्या आणि कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही देतानाच शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रालयात आज स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, सचिव सुमंत भांगे आदी यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यासाठी प्राधान्य कसे देता येईल, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करावी. स्वातंत्र्यसैनिकांना सध्या मिळत असलेल्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सध्या सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. राज्यात विविध ठिकाणी असलेल्या २०० हून अधिक हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती, सुशोभीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
००००
मदत
अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना
७५५ कोटी रुपयांची मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्यामंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय.
मुंबई, दि. 29 :- अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन आणि अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा
आतापर्यंत सुमारे ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटीच्या निधीमुळे अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
आतापर्यंत सुमारे ३ हजार ९५४ कोटी रुपयांचा मदत निधी वितरित
राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सुमारे ३४४५.२५ कोटी आणि ५६.४५ कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास ९८.५८ कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ
● औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र
● जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र
● परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र
● हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र
● बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र
● लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र
● उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र
● यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र
● सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र
एकूण क्षेत्र- ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र
एकूण निधी – सुमारे ७५५ कोटी रुपये
०००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




