Friday, 23 September 2022

आष्टी अहमदनगर रेल्वे मार्ग

 नवीन आष्टी - अहमदनगर रेल्वे मार्ग

दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

• नवीन मार्गाचे उद्घाटन, डेमू सेवेचा प्रारंभ

• बीडवासियांच्या स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा पूर्ण.

            बीड, दि. 23 (जि. मा. का.) : नवीन आष्टी - अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर शासन भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


            अहमदनगर – बीड - परळी वैजनाथ या २६१ कि.मी. रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी - अहमदनगर ६६ कि.मी. मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलत होते.


            प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होते. माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सर्वश्री बाळासाहेब आजबे, लक्ष्मण पवार, सुरेश धस, आष्टीच्या नगराध्यक्षा श्रीमती पल्लवी धोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


            दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न आज सत्यात आले आहे, याचे आपणास विशेष समाधान असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आज गोपीनाथराव हयात असते तर त्यांनी हा मार्ग बीड- नगरवासियांना अर्पण केला असता. राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांबाबत त्यांनी दूरदृष्टी दाखवली होती. त्यात या रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रगती योजनेत अहमदनगर - बीड - परळी या २६१ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. त्यासाठीच्या ५० टक्के खर्चाच्या तरतुदीची जबाबदारी शासनाने उचलली आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, हा रेल्वे प्रकल्प केवळ दोन भूभाग आणि स्थानकांना जोडणारा नाही, तर माणसे, नातीगोती आणि हृदयांना जोडणारा आहे. या रेल्वेमुळे आता अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांना रोजच विकासाची धडधड जाणवणार आहे. विद्यमान शासनाच्या विकासाचा मार्ग वेगाचा राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.


            राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मराठवाड्यातील हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकल्याबद्दल मध्य रेल्वेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


            दीर्घ संघर्षानंतर अहमदनगर-आष्टी रेल्वे धावत असल्याचा आपणास आनंद असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बीड येथे रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. आज पहिल्या टप्प्यात न्यू आष्टी - अहमदनगर डेमू आणि रेल्वे मार्गाचे उदघाटन झाले. हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.


            आपण मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचा दर तीन महिन्याला आढावा घेत होतो. यासाठी आवश्यक तो भरीव निधी केंद्र व राज्य शासनाने दिला. राज्याचा भागीदारी हिस्सा सुरू करण्याचा निर्णयही या शासनाने घेतला, असे स्पष्ट करुन श्री. फडणवीस म्हणाले, येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कृष्णा - मराठवाडा प्रकल्पास सुधारित मान्यता देऊन भरीव निधी दिला जाईल. शिवाय मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी समुद्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे सांगतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीचे लवकरच लोकार्पण करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.


            अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती सर्वांच्या साक्षीने आज होत असल्याचे सांगून रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले, मराठवाड्यातील बीडव्यतिरिक्त अन्य जिल्हे रेल्वेने जोडले गेले होते. पहिल्या टप्प्यातील रेल्वेने आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासह सर्वांच्या मनातील स्वप्नपूर्तीची सुरुवात होत आहे. या मुख्य प्रकल्पासाठी 96 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. बीडपर्यंतचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


            अहमदनगर - परळी रेल्वेच्या विद्युतीकरणास मंजुरी देण्यात आली असून, 2014 पासून रेल्वे कामांना गती मिळाली आहे. 400 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत असून त्यापैकी 120 गाड्या लातूरच्या कारखान्यात तयार करण्यात येणार असल्याचे श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले.


            बीड आणि अहमदनगर जिल्हा रेल्वेने जोडले जात असल्याचा आनंद व्यक्त करून मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, सहकारी कारखानदारी सुरू ठेवण्यात बीड जिल्ह्याचे योगदान आहे. या रेल्वेमुळे बीड हा राज्यातील एक अग्रगण्य जिल्हा होईल. या रेल्वेला परळीपर्यंत नेण्याची जबाबदारी रेल्वे राज्यमंत्री श्री.दानवे यांची असल्याची अपेक्षा आहे. रेल्वेसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल तसेच पुरेसा निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री यांचे आभार मानले.


            खा. प्रीतम मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोगतात बीडवासियांची स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद व्यक्त करून केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.


            उपस्थित मान्यवरांनी यावेळी रेल्वे संघर्ष समितीतील लढा दिलेल्यांचे आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करुन रेल्वे स्थानकाची पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते न्यू आष्टी अहमदनगर डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. रेल्वे मार्गाची माहिती देणारी लघुफित यावेळी दाखवण्यात आली.


            माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार भीमराव धोंडे, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी प्रास्ताविक तर आमदार सुरेश धस यांनी आभार मानले.


नवीन आष्टी - अहमदनगर नवीन मार्गाविषयी...


 • 66 किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन हा अहमदनगर – बीड - परळी वैजनाथ या 261 कि.मी. नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समसमान म्हणजे प्रत्येकी 50 टक्के खर्चाचा वाटा आहे.


 • डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी - अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना सुलभ ठरेल. यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक - आर्थिक विकासाला चालना मिळेल.


 • डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता आठवड्यात दररोज धावणार आहे.


 • कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.


00000



ज्येष्ठ नागरिक

 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करा

- सचिव सुमंत भांगे.

            मुंबई, दि.23 : ज्येष्ठ नागरिक दिन राज्यात 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त क्षेत्रीय अधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सहकार्याने तालुका व जिल्हास्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन समन्वयाने आणि काटेकोरपणे करावे, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले.

      ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत सचिव सुमंत भांगे बोलत होते. या बैठकीला समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जनसेवा फाऊंडेशन पुणेचे डॉ.विनोद शहा, हेल्पेज इंडिया मुंबईचे प्रकाश बोरगांवकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अण्णासाहेब टेकाळे, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सलमा खान यावेळी उपस्थित होते.

      सचिव श्री.भांगे म्हणाले, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांची जास्तीत जास्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व सहायक आयुक्तांनी कार्यक्रमाची प्रचार व प्रसिद्धी करावी. लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच शालेय विद्यालयांमध्ये देखील या कार्यक्रमांची माहिती व्हावी यासाठी सर्वांना सोबत घेवून कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा. शाळा महाविद्यालयांना कार्यक्रमात सहभागी करून शालेय स्तरावरही याबाबतीत जनजागृती करा, अशा सूचना श्री.भांगे यांनी केल्या.

            यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच समाज कल्याण विभागाकडून आयोजित असणाऱ्या कार्यक्रमांनाही ज्येष्ठ नागरिक संघटना सर्वतोपरी मदत करतील अशी ग्वाही यावेळी विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांनी दिली.

००००



Stree जन्मा तुझी कहाणी

 *स्त्रीबद्दल मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट पोस्टपैकी ही एक. कृपया पूर्ण वाचा. अतिशय मौल्यवान आहे.*

   *स्त्री*.  .  .  .  .  .  .  .  .

जेव्हा विश्वकर्म्याने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार स्त्री निर्माण करावयास घेतली, तेव्हा त्याने निगुतीने, शांतपणे काम करायला सुरूवात केली.

ब्रह्मदेवाने विचारले,"स्त्री निर्मितीसाठी एवढा वेळ कां लागतो आहे?"

विश्वकर्म्याने उत्तर दिले.  "तिची रचना करण्यासाठी मला पूर्ण करावे लागणारे सर्व तपशील तुम्हाला निवेदन करतो."

   ● तिने सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये कार्य केले पाहिजे.

   ● ती एकाच वेळी अनेक मुले सांभाळण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

    ● तिने आलिंगन दिले कीं दुखापत झालेल्या गुडघ्यापासून तुटलेल्या हृदयापर्यंत काहीही बरे करू व्हायला पाहिजे.

    ● तिने हे सर्व फक्त दोन हातांनी केले पाहिजे.

   ● ती आजारी असताना स्वत:चे स्वतःला बरे करू शकली पाहिजे. तसेच दिवसाचे १८ तास काम करू शकली पाहिजे.

   ब्रह्मदेव प्रभावित झाले. "फक्त दोन हातांनी हे सर्व करणे ...अशक्य आहे !

   ब्रह्मदेवानी जवळ जाऊन त्या स्त्रीला स्पर्श केला.

 " तू तिला खूप मऊ केले आहेस."

   विश्वकर्मा वदले "ती मऊ आहे, पण मी तिला मजबूत बनवले आहे.  ती काय सहन करू शकते आणि त्यावर कशी मात करू शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही"

   "ती विचार करू शकते का?"  देवाने विचारले...

   विश्वकर्मा  उत्तरले "ती नुसता विचार करू शकत नाही, तर ती तर्क करू शकते आणि वाटाघाटीही करू शकते."

   देवाने तिच्या गालाला स्पर्श केला....

   "हा भाग गळतोय असं वाटतंय! तू या भागावर खूप ओझं टाकलं आहेस."

"ती गळत नाहीये...

ते डोळ्यातील अश्रू आहेत."  

विश्वकर्माने देवाला सांगितले ...

"ते अश्रू आणि कशासाठी?" 

देवाने विचारले......

विश्वकर्मा म्हणाले

"अश्रू हे, तिचे दु:ख, तिच्या शंका, तिचं प्रेम, तिचा आनंद, तिचं एकटेपण आणि तिचा अभिमान व्यक्त करण्याचा मार्ग आहे."  ...

त्याचा देवावर चांगलाच प्रभाव पडला,

"विश्वकर्मा, तू अतिशय प्रतिभावान आहेस. तू सर्व गोष्टींचा विचार केला आहेस.*खरोखर अद्भुत घडण आहे ही एक स्त्री."*

   ■ तिच्यात पुरुषाला चकित करण्याची ताकद आहे.

   ■ ती संकटे हाताळू शकते आणि जड भार वाहून नेऊ शकते.

   ■ तिला आनंद, प्रेम आणि मते आहेत.

   ■ जेव्हा तिला किंचाळावेसे वाटते तेव्हा ती हसते.

   ■ जेव्हा तिला रडावेसे वाटते, तेव्हा ती गाते, जेव्हा ती आनंदी असते तेव्हा रडते आणि जेव्हा ती घाबरते तेव्हा हसते.

   ■ ती ज्यावर विश्वास ठेवते त्यासाठी ती लढते.

   ■ तिचे प्रेम बिनशर्त आहे.

   ■ "एखादा नातेवाईक किंवा परिचित मरण पावल्यावर तिचे हृदय तुटते, परंतु तिला जगण्याची ताकदही मिळते."

   देवाने विचारले: 

"तर मग ती एक परिपूर्ण प्राणी आहे?"

विश्वकर्माने उत्तर दिले: 

*"नाही. यात फक्त एकच त्रुटी आहे. तिचे महत्व किती आणि ती किती मौल्यवान आहे हे ती अनेकदा विसरते."*

   तुम्ही ज्या महिलांचा आदर करता त्यांना पाठवा आणि त्या सर्व पुरुषांना जे स्त्रीचा आदर करतात 

   *स्त्री अनमोल आहे* 💃

*तिला स्वतःचा अभिमान वाटावा यासाठी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला हे कळू द्या.*

विकास कर्ज

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2030 अंतर्गत

2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

 

            मुंबईदि. 22  :  राज्य शासनाने 8 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

        रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. भारतीय राज्यघटनेनुसार सदरील कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी घेण्यात आली आहे.

            दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येतील. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                      

            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 27 सप्टेंबर2022 रोजी त्यांच्या फोर्टमुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 27 सप्टेंबर2022 रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्युशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत.

            अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकमुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 28 सप्टेंबर2022 रोजी करण्यात येईल.

            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 28 सप्टेंबर2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी 8 वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी हा दि. 28 सप्टेंबर, 2022 पासून सुरु होईल. दि. 28 सप्टेंबर2030 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या प्रतिवर्षी दिनांक 28 मार्च आणि 28 सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाच्या 22 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

००००

विक्रीकर अभय

 विक्रीकराची अभययोजना अंतिम टप्यातः

राज्यभरातून लाभला अभूतपूर्व प्रतिसाद

 

            मुंबई, दि. 23 : शासनाच्या जीएसटी विभागाने जाहीर केलेल्या विक्रीकराची अभय योजना 2022 ला संपूर्ण राज्यभरातील व्यापारीवर्गातून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभत आहे. 22 सप्टेंबर 2022 ला विभागाकडे थकबाकी प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांपैकी जवळपास 50%म्हणजे 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त व्यापाऱ्यांना या अभय योजनेचा लाभ झाला आहे.

            1 एप्रिल 2022 पासून ही योजना सुरु झाली असून जीएसटी पूर्व कायद्यांच्या थकबाकीतून कायमचे बाहेर पडण्याची शेवटची नामी संधी, असे या योजनेचे वर्णन केले जात आहे. आतापर्यंतच्या प्रतिसादावरून ही योजना सर्वात आकर्षक आणि व्यापारी वर्गासाठी सर्वात जास्त फायदेशीर अभय योजना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

छोट्या व्यापाऱ्यांकरिता आकर्षक सवलती

            या योजनेत छोटे व्यापारी विशेषतः ज्यांची थकबाकी दहा हजारापर्यंत आहे, त्यांना अर्ज देखील दाखल न करता पूर्ण थकबाकी माफ करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेची वैशिष्ठ्य ठरलेली व कमालीची लाभलेली वर्गवारी म्हणजे दहा हजार ते दहा लाखापर्यंतची प्रलंबित थकबाकी. या वर्गवारीतच विभागाकडे सर्वाधिक प्रलंबित प्रकरणेदेखील आहेत. या वर्गवारीत एकरकमी फक्त वीस टक्के थकबाकी भरून ऐंशी टक्के थकबाकी सरसकट माफ केली जात असल्यानेअधिकाधिक व्यापाऱ्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन प्रलंबित थकबाकीतून कायमची मुक्तता मिळवलेली आहे.

            मोठ्या म्हणजेच 50 लाखांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी हप्तेसवलती सारखा सोयीचा पर्याय उपलब्ध असल्यानेअशा मोठ्या प्रलंबित थकबाकीकरिता देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

व्यापारातील अनेक प्रश्नांना एकच उत्तर: अभय योजना 2022

            अपिलातील प्रलंबित थकबाकीचा पाठपुरावा करण्यात सर्वसामान्य व्यावसायिकाचा व्यवसायातील बहुमूल्य वेळ व पैसा नाहक खर्च होत असतो. थकबाकीला स्थगिती नसेल तर स्थावर व जंगम मालमत्ता लिलावात निघण्याची टांगती तलवार सतत डोक्यावर असते. तशातच कोरोना टाळेबंदीमुळे व्यापारावरील अनिष्ट परिणाम व ढासळलेले अर्थगणित. त्यामुळे व्यापारी वर्गाने या नामी संधीचे जोरदार स्वागत केले आहे.

            त्यामुळे अपिलात होणारा वेळेचा व पैशाचा अपव्यय तसेच विभागाकडून होणारी वसुलीची कार्यवाही टाळण्यासाठी अभय योजनेत सहभागी होऊन जीएसटी कारकिर्दीत व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यावर अनेकांनी भर दिल्याचे या योजनेच्या प्रतिसादावरून दिसून आले आहे.

            अगदी 1970 सालापासूनच्या सुद्धा प्रलंबित थकबाकीसाठी या योजनेत अर्ज सादर केले गेले आहेत, हे विशेष. त्याचप्रमाणे विक्रीकर न्यायाधिकरण अथवा उच्च न्यायालयातील देखील प्रलंबित दावे मागे घेत अनेकांनी या योजनेचा लाभ घेणे पसंत केले आहे. सर्व वर्गातून लाभत असलेल्या या प्रतिसादावरून ही योजना व्यापारीभिमुख आहे व या योजनेत यापूर्वीच्या सर्व अभय योजनांचे विक्रम मोडले जातील हे सुस्पष्ट आहे.

            सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे ही अभय योजना 30 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे योजनेच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित थकबाकीदारांपैकी अधिकाधिक व्यापारी बंधूनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीएसटी विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्राणी दिन

 जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून शहरी व ग्रामीण स्तरावर

विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करणारे कार्यक्रम राबवावे

जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 

            मुंबईदि. 23 : प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दि. 4 ऑक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून शहरी व ग्रामीण स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करणारे कार्यक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी दिल्या.

            मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची जागतिक प्राणी दिन साजरा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

            श्री. निवतकर म्हणालेकाही पाळीव प्राण्यांना आपण अतिशय चांगले वागवतो तर काहींना दिवसभरात खायलाही मिळत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी विविध कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. लहान - मोठ्यापाळीव - भटक्या अशा सर्व प्राणीमात्रांचा यामध्ये समावेश होतो. आपणही जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना चित्र स्वरूपात सादरीकरण करून जागृत करावे. सोसायटीच्या सर्व सदस्यांचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

            पोलीसपशुसंवर्धन विभाग तसेच प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती या सर्वांनी एकत्रित समन्वयाने शहरी तसेच ग्रामीण भागात मार्गदर्शिका तयार करावी. यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा. तसेच याबाबत प्रशिक्षण घ्यावे. प्राणी लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            यावेळी विविध भाषेतील चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश पेठेमुंबई पशुवैद्यकीय महाव्यवस्थापक डॉ. क.अ.पठाणमुंबई शिक्षण विभागाचे राजेंद्र पाटील निसार खान विनोद कदम शुभांगी बेटे यांची यावेळी उपस्थिती होती.

Wine विक्री

 सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण

            मुंबई दि.२३: राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

            २२ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत काही माध्यम प्रतिनिधींनी सुपर मार्केटमधील वाईन विक्री धोरणाबाबत प्रश्न विचारला असता याबाबत मागील सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सविस्तर निवेदन केले होते. यामध्ये सदर निर्णयांच्या अनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव हा राज्यातील जनतेच्या सूचना तसेच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जनतेसमोर ठेवला आहे. प्रस्तावावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पूर्ण अभ्यासाअंती मंत्रिमंडळ याबाबतचा निर्णय घेईल, असे निवेदन केले होते. मात्र काही माध्यमांनी याबाबत बोलण्याचा विपर्यास करून वृत्त दिले आहे. राज्य शासन सुपर मार्केट मधील वाईन धोरणांच्या बाजूने असे संकेत असल्याचे काही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.असा कोणताही निर्णय झालेला नसून निवेदनात सांगितल्याप्रमाणे शासन सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत पूर्ण अभ्यासांती निर्णय घेईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.



Featured post

Lakshvedhi