Tuesday, 20 September 2022

सचिवालय जिमखाना

 सचिवालय जिमखाना वार्षिक सर्वसाधारण सभा

28 सप्टेंबर रोजी

 

          मुंबई, दि. 20 : सचिवालय जिमखान्याची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 28 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता सचिवालय जिमखाना, मुंबई येथे होणार असल्याचे सचिवालय जिमखाना व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. याबाबतची सूचना अहवालासह सचिवालय जिमखान्याच्या  www.sachivalayagymkhana.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

          मतदानासाठी जिमखान्याचे सभासद/निवृत्त सभासद यांचेकडे जिमखाना / कार्यालय/ पॅन कार्ड अथवा आधार कार्ड यापैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे.

००००

 शालांत शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर.

            मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

            या परीक्षेसाठीची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची १८ ऑगस्ट, २०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल.

            तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आयुक्त श्रीमती दराडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


0000000



 

नाट्य-चित्रपट क्षेत्राचे गतवैभव




 नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाट्य, चित्रपट, मालिका क्षेत्रातील दिग्गजांशी साधला दिलखुलास संवाद

            मुंबई, दि. 20 : - ‘ आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी 'मला तुमचं ऐकायचंय...! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलुया.., असं म्हणत एका विशेष भेटीत दिलखुलास संवाद साधला. यावेळी मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                        गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, प्रवासी वाहतुक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चित्रपटांना जीएसटी मधून सूट, ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन योजना, त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकार, वादक, तंत्रज्ज्ञ आदींना विमा संरक्षण याबाबत तसेच अनेक धोरणात्मक बाबींविषयी मंत्रालयात बैठक आयोजित करून संबंधित विभागांच्या समन्वयाने चर्चेतून मार्ग काढला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले. तसेच चित्रनगरीला भेट देऊन पाहणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

                        मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कला क्षेत्राकडे पाहताना आपल्याला कायम त्यामागील झगमगाट दिसतो. मात्र कलाकारांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न समजत नाहीत. ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. या क्षेत्रातील पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ज्ञ यांच्याची निगडीत असे अनेक विषय आहेत. त्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यापासून विमा संरक्षण अशा सर्वच बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले जातील. नाट्यगृहांची परिस्थिती सुधारणे, एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या तसेच चित्रपटांसाठी कर सवलत तसेच अन्य मुद्यांवरही विचारविनीमय, चर्चेने उपाययोजना केल्या जातील. संस्कृती, कला जोपासली गेली पाहिजेत. या गोष्टीचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील. समाजासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. यातूनच उत्तम कलावंत घडतील, ते देश आणि आपल्या राज्याचा नावलौकीक वाढवतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या नाट्य, चित्रपट सृष्टीला गतवैभव पुन्हा मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

            या संवादा दरम्यान निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वश्री प्रशांत दामले, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, श्रीमती वर्षा उसगांवकर, निर्माता विद्याधर पाठारे, मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, गायक अवधूत गुप्ते, विजय पाटकर, विजय केंकरे, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रातिनिधीक स्वरूपात त्या-त्या क्षेत्रातील समस्या, मुद्यांची मांडणी केली. तसेच याबाबी समजावून घेण्याकरिता आवर्जून आयोजित केलेल्या या संवाद उपक्रमाचे स्वागतही केले.

००००००



 

Neeeeee वृत

 🍁सेवा-निवृत्ती शाप की वरदान.??🍁

🙏🏻वाचा मात्र जरूर…

(ह्रदय पिळवटून टाकणारी कथा)

जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस…

        ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सरकारी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे ५८व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.!!

        नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडेआठला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजायचे. आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. 

ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.

एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे. मग, आणि तिचा संताप होई. सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. 

त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो. तेवढं घरी रहाणं जमत नाही ,ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.

रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा. तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेंव्हा हौस करायची वेळ होती तेंव्हा शक्य होईल तसं करायचा. परंतू घरात आपल्या ॲाफिसमधील कामाचं कौतुक म्हणून सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.

गरजेपुरता पैसा घरांत येत असला की घरातल्याच माणसांचं ओझं व्हायला लागतं. वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या. त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेंव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे ,पण आता त्याला ‘भरपूर वेळ असल्यानं असली सर्व कामं त्यानेच आपणहून करायला हवीत’ असा तिचा आग्रह होता.

हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याच्याशी गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.

तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ,ही जाणीव तिला बोचत असावी. 

खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. मुलांची लग्न, सुनेशी जमवून घेतांना होत असलेली तारांबळ, त्यातच तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, आणि हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, पण घरकामाला काडीचा हातभार न लावणारा तीचा हा स्थितप्रज्ञ नवरा. 

तो समोर नसला की, त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस’ म्हणत ती त्याला झिडकारायची. 

हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला.

..आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली. कारण काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला. त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा जवळच्या मदत करणार्या मित्रांचा उद्धार केला. 

तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला. आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, *‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्.. नाहीतर मी तरी जाते. 

त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं! “आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?”

तिला वाटलं हा चिडवतोय, ती मग आणखीनच चिडली. हातवारे करत किंचाळली! “कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका तरी होईल.” हे ऐकून हा एकदमच शांत झाला. 

तश्याही परिस्थितीत म्हणाला, ते माझ्या हातात नाही, मी कधीही तुझे किंवा तुझ्या माहेरील लोकांचे वाईट चिंतले नाही की वागलो नाही. पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो..!!

हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणा साठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा.!! त्याची नातेवाईकांसह मित्रमंडळीही घरी येईनाशी झाली. 

तिच्या मनांत तसं काही नसायचं. त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. शेवटी तिनेही त्याचेबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पुजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्या इतकी ती खचितच दुष्ट नव्हती. परंतू ती, तिच्या सर्व ईच्छीलेल्या ईच्छा.. ईच्छापुर्ती झाल्यामुळे हेकेखोर आणि मनमौजी झाली होती.

पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचार शक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे, आणि एक दिवस अचानकच तो गेला. 

सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘थकवा वाटतोय’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.

घरांत धावपळ झाली, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत “सॉरी, ही इज नो मोअर” सांगितलं. एकच हलकल्लोळ झाला.

तो मात्र त्याच्या स्वभावा प्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. सर्वांशी मिळून मिसळून राहून आपले दु:ख न सांगता हसत हसत पदरमोड करून मदत करणारा Before Time असं मरण नको होतं ,असा प्रत्येकाचाच सूर होता.

तिच्यासाठी मात्र लोक खूपचं हळहळले ‘आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता ,तर ही वेळ आली’ असे लोक म्हणत होते . आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतयं का ? वगैरे वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले. 

आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला, ऐकायला हक्काचं कुणी उरलं नाही. तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.

तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.

असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचासाठीचा वाढदिवस साजरा केला. पण ‘सतत तुझंच कौतुक कसं काय करायचं ?’ म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.

नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे गं आजी?’ असं चिडक्या स्वरांत विचारू लागले. 

तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेंव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण “काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही” हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 

तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. 'तुझी उपयोगिता संपायला आलीय' याची जाणीव लोक आडून पाडून तीला करून देऊ लागले आणि नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.

एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते. त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करेना, तिच्याकडून आजेसासू साठी काही अपेक्षा करणं तर फारच कठीण होतं. 

ती रोज आतल्या आत रडायची. ‘देवा, उचल मला’ म्हणून प्रार्थना करायची. “भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला” म्हणत मनातल्या मनांत त्याला दुषणं देत पडून रहायची…

फारसं आठवायचं नाही तिला काही आज काल. मात्र तिने दिलेले शाप आणि त्याने दिलेले आशीर्वाद, प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते....!!

“मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.” हा तिनं त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता! ‘तू मात्र खूप जग, शतायुषी हो,’ हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता की आशीर्वाद ? हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं...

मित्रांनो!

आपलेही बरेच मित्र सेवेतून निवृत्त झाले आहेत व काही निवृत्ती'च्या उबंरठ्यावर आहेत. एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा. एवढंच..

सदरचा लेख कुणी लिहिला ,माहित नाही.

मात्र लेखकाने लिहीलेले प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले असावेत, असे जरी ग्रहित धरले तरी देखील, सदरची घटना सहजासहजी मान्य करावयास कुणाचेही मन तयार होणार नाही हे निश्चित. मात्र अशाही घटना कुणाच्या आयुष्यात सेवा निवृत्ती नंतर जर घडत असेल, तर हे फारच भयंकर आणि भयानक आहे.

हा लेख रिटायर्ड व्यक्तींनी जरुर जरुर वाचावा.

नवरी नेली पळवून

 एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर चर्चा झाली.


पाहण्याचा कार्यक्रम झाला, 

दोन्ही बाजूने होकार आला.


मुलीकडचे म्हणाले 

साखरपुडा करून घेऊ.


मुलाकडचे म्हणाले थोडं थांबा


थांबा थांबा म्हणण्यात 

जवळपास एक वर्ष गेले.


दरम्यान मुलीस दुसरे 

स्थळ सांगून आले.


मुलीकडच्यांनी लग्न 

उरकून घेतले.


आता पहिला मुलगा आरोप करतोय, माझी बायको पळवून नेली म्हणून 😂😀😂😀


*वरील प्रसंग आणि फॉक्सकॉन प्रकल्प यांचा काही संबंध जाणवल्यास निव्वळ योगायोग समजावा*

चंद्र मधूचा?


 

वाजवा रे वाजवा


 

Featured post

Lakshvedhi