Tuesday, 13 September 2022

Sadvichar









 

लम्पी रोग नियंत्रणासाठी

 लम्पी रोग नियंत्रणासाठी पशुसंवर्धन यंत्रणेसह

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध;

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी

- सचिंद्र प्रताप सिंह

            मुंबई, दि. 12 : लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागाशी संवाद साधताना ते बोलत होते.


            पशुसंवर्धन आयुक्त श्री.सिंह यांनी सांगितले, लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा कीटककांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात विविध राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यामुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती बाळगळण्याचे कारण नाही, परंतु खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.  


टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा


            पशुपालकांना आवाहन करताना श्री. सिंह यांनी सांगितले की, लम्‍पी पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. यामध्ये पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००-२३३०-४१८ अथवा राज्यातील कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.


            श्री. सिंह यांनी सांगितले की, खाजगी पशु वैद्यकीय डॉक्टर हे लम्‍पी बाधित पशुधनासाठी महागडी प्रतिजैविके आणि इतर औषधे लिहून देत आहेत तर एल एस डी निर्धारित उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने व तालुका लघुपशुचिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी बाधित पशुसाठी त्यांच्या दारात मोफत उपचार घ्यावेत याबाबत काही तक्रार असल्यास विभागाच्या जिल्हा उपायुक्त किंवा खात्याच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, तसेच लम्‍पी चर्मरोगाची लक्षणे दिल्यास दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन उपचार करून घ्यावेत.

दहा लक्ष लस मात्रा; अधिक गतीने लसीकरण करावे

            राज्यात लम्‍पी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात बाधित क्षेत्रात 5 किमी परिघातील गायींना लसीकरण करण्यासाठी 10 लाख लस मात्रांची खेप प्राप्त झाली आहे. अधिक गतीने लसीकरण करावे व रोग पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावे, अशा सूचना यंत्रणांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लम्‍पी रोगाची लक्षणे

            श्री. सिंह यांनी आजाराच्या लक्षणांविषयी सांगितले की, प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते, लसिकाग्रंथींना सूज येते, सुरुवातीस ताप येतो, दूध उत्पादन कमी होते, चारा खाणे पाणी पिणे कमी होते, हळूहळू दहा-पंधरा मी. मी. व्यासाच्या गाठी, प्रामुख्याने डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येवून दृष्टी बाधित होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात अशी लक्षणे दिसतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

लम्‍पी हा संसर्गजन्य आजार असल्याने रोग होवू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग झाल्यास त्याचा प्रसार होवू नये, याकरिता पशुपालकांनी पुढीलप्रमाणे आवश्यक काळजी घ्यावी.

        बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.

            निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.

            जनावरांमध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लम्‍पी सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.

बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.

            बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. त्याकरिता १% फॉर्मलीन किंवा २-३ % सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २४ यांचा वापर करता येईल. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावताना मृत जनावरांच्या खाली व वर चुना पावडर टाकावी.

या रोगाचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डासमाश्यागोचीड इ.) होत असल्याने निरोगी सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी. रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील 4 महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. बाधित जनावरांना औषधोपचार करावेत. रोगप्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी - विक्री थांबवावी.

            लम्‍पी औषधोपचाराने बरा होत असल्यानेपशुपालकांनी प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्र.१८००२३३०४९८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 वर तत्काळ द्यावी. असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. "प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 ( The Prevention and Control of Infectious & Contagious Diseases in Animals Act, 2009) मधील कलम ४ (१) नुसार पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्तीअशासकीय संस्थासंबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ही माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

००००


            

समता चळवळ

 डॉ. आंबेडकर आणि मातंग परिषदांचा दस्तऐवजसामाजिक समतेच्या चळवळीचा दीपस्तंभ !

- धम्मज्योति गजभिये.

            मुंबई / पुणे, दि. 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग परिषदांचा ऐतिहासिक दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीसाठी दीपस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या 13 मातंग परिषदांच्या संशोधन व संकलनाच्या अनुषंगाने महासंचालक धम्मज्योति गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीची पहिली बैठक दि.7 सप्टेंबर रोजी बार्टीच्या मुख्यालयात झाली. या बैठकीला निबंधक तथा विभाग प्रमुख इंदिरा अस्वार, विभागप्रमुख तथा जात पडताळणी अध्यक्ष डॉ.ज्योत्स्ना पडियार, उपायुक्त तथा विभागप्रमुख उमेश सोनवणे, विभागप्रमुख विस्तार व सेवा डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण, कार्यालय अधिक्षक डॉ. संध्या नारखेडे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विकास गायकवाड, प्रकल्प अधिकारी रजनी वाघ उपस्थित होते.

            श्री. गजभिये म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केलेल्या विविध समाजाच्या परिषदांविषयी पाहिजे तसे संशोधन न झाल्यामुळे बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती त्या त्या समाजापर्यंत पोहचली नाही. त्यामुळे खरा इतिहास समोर आला नाही. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने कार्य केले. अनेकांनी बलिदान देखील दिले, या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नातून आंबेडकरी चळवळ गतिमान व सर्वव्यापी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या उत्थानासाठी ज्या परिषदा आयोजित केल्या त्याचे संशोधन करून दस्तऐवजीकरण झाल्यास येणाऱ्या पिढ्यांसाठी हा अनमोल ठेवा असेल.

मातंग परिषदांच्या अभ्यासासाठी समिती गठित

            डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या 13 मातंग परिषदा शोधून काढणे, त्यांचे संशोधन, संकलन करून ग्रंथरूपाने प्रकाशित व्हावे यासाठी बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या सूचनेवरून निबंधक तथा संशोधन विभागप्रमुख इंदिरा अस्वार यांनी महाराष्ट्रातील तज्ज्ञ अभ्यासकांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि 13 मातंग परिषद अभ्यास समिती गठित केली. या समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून प्रसिद्ध विचारवंत रमेश राक्षे (पुणे),इतिहास संशोधक डॉ.संभाजी बिरांजे (कोल्हापूर), समाजशास्त्र अभ्यासक प्रा.डॉ.सुरेश वाघमारे (लातूर) आणि साहित्यिक प्रा.डॉ.विजयकुमार कुमठेकर (जालना) हे असून या समितीचे सदस्य सचिव डॉ.प्रेम हनवते (संशोधन अधिकारी बार्टी) हे आहेत.

००००



सहकार विभाग

  

राज्याचे सहकार विभागाचे काम देशात पथदर्शक ठरेल

- सहकार मंत्री अतुल सावे

केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण

 योजनेची राज्यात होणार अंमलबजावणी

 

            मुंबईदि. 12 : केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरण योजनेमुळेराज्यातील 12 हजार  प्राथमिक कृषी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थाचे कामकाज अधिक गतिमानपारदर्शक व उत्तरदायी होवून संगणकीय माहितीमध्ये अधिक सुलभता येईलया योजनेतील कामामध्ये महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्रात देशात पथदर्शी ठरेल, असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

         आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण या योजनेच्या राज्यात अंमलबजावणीस मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सहकार मंत्री श्री. सावे बोलत होते.

         राज्यातील  शेती कर्ज पुरवठा करण्यात सहकारी संस्थांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असून राज्यजिल्हा व गाव पातळीवरील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थाचा महत्त्वाचा सहभाग आहे. राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व २० हजार ९८६ कृषी पतपुरवठा सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी १२ हजार प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांची निवड करण्यात येणार असून या सहकारी संस्थाची कार्यक्षमता वाढविणेउत्तरदायित्व वाढवून कामामध्ये पारदर्शकता आणून सहकार क्षेत्राला अधिक बळकट करता येईल. हा प्रकल्प सन २०२२ - २३ ते २०२६ - २७ या पाच वर्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

      या योजनेसाठी राज्याच्या हिश्याची १५६ कोटी ५५ लाख रक्कम २०२२ - २३ ते २०२४ - २५ या तीन वर्षात उपलब्ध करून देण्यास आणि त्यासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ५१ कोटी ८ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. नाबार्डच्या पुढाकाराने राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तथापि, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना संलग्न असलेल्या बहुतांश कृषी पतपुरवठा सहकारी संस्थामध्ये अद्यापही संगणक प्रणाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सभासदांना विविध प्रकारच्या सेवा सक्षमपणे पुरविण्यासाठी ही सेवा उपयोगी ठरेल.

       या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येत आहे.

0000

आंतरमहाविद्यालयीन नाट्य

 आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन

कलाविष्कारही ईश्वराची अर्चना समजून सादर करा

-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 12 : विविध कला सादरीकरणाद्वारे समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम ईश्वरी कार्य आहे. कलाकार मंडळींनी कलाविष्काराचे सादरीकरण ईश्वराची अर्चना समजूनच करावेअसे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

            ईप्टाच्या 49 व्या आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री.मुनगंटीवार बोलत होते. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडेपुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गेइंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएशन (ईप्टा) अर्थात भारतीय जननाट्य संघाच्या अध्यक्ष सुलभा आर्याजनरल सेक्रेटरी मसुद अख्तर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तवरमेश तलवारसचिन निंबाळकर यांच्यासह या नाट्य स्पर्धेत भाग घेतलेले विद्यार्थी  यावेळी उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेकला अविष्कार सादर करून समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे कठीण काम कलाकार मंडळी करतात. कोणत्याही कलाकाराला आपण सादर केलेल्या कलेतून आनंद मिळाला तरच त्याची कला सगळ्यांपर्यंत पोहचेल. हे ईश्वरी कार्य करणाऱ्या कलाकारांचे स्थान समाजात अग्रस्थानी आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आजच्या या नवीन कलाकारांनी आपापल्या कलेत स्वतःला वाहून घेऊन काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            इंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएशन (ईप्टा) अर्थात भारतीय जननाट्य संघ गेले अनेक वर्षे नाट्य स्पर्धा आयोजित करून नवीन कलाकार तयार करीत आहे याचा आनंद आहे. सांस्कृतिक कार्य विभाग अशा संस्थांच्या मागे उभा असून भविष्यातील उपक्रमांना श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

०००

स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास

 स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून प्राधान्याने उपलब्ध करणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबई, दि. 12 : स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास वाचकांना मातृभाषेतून उपलब्ध झाल्यास तो अधिक लोकांपर्यत पोहचण्यास मदत होईल. त्यामुळे लोकार्पण करण्यात आलेले साहित्य मराठीत प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

            ‘स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड’ - 1 ते 13 या मोबाईल ॲपचे लोकार्पण सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दर्शनिका विभागाने दुर्मिळ साहित्य मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध केले आहे याचा आनंद आहे. कारण या अॅपमुळे हे साहित्य आपल्या मोबाइलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आपण कितीही पुढे जात असलो तरी आपला इतिहास आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि हा इतिहास वाचण्यासाठी जर मातृभाषेतून उपलब्ध असेल तर ते आजच्या तरुणाईपर्यंत सहज पोहचू शकेल. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकार्पण करण्यात आलेले साहित्य लवकरच मराठीत भाषांतरित करण्यात येणार आहे, असेही श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यचळवळीतील सक्रिय सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन या सर्व महत्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या 13 खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे.दर्शनिका विभागाकडून विविध ग्रंथ प्रकाशित करण्यात येतात. या सर्व प्रकाशित ग्रंथांच्या ई आवृत्ती सीडी स्वरुपात तर काही पेन ड्राईव्ह स्वरुपात उपलब्ध आहेत. सर्व ग्रंथ मोबाईल ॲप, संकेतस्थळ याबरोबरच केंद्र शासनाच्या इंडियन कल्चर पोर्टलवरुन अभ्यासकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.

कलाकार करतात हास्यदानाचे ईश्वरी कार्य

            कलाकार कला सादर करताना आपल्यासमोर बसलेल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करतात. कलाकारांमुळे सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम होत असून रक्तदान, अन्नदान याप्रमाणे हास्यदानाचे ईश्वरी कार्य कलाकार करत असून या कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग उभा असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक गीतरचनेवर “यशोयुताम् वंदे” कार्यक्रम

            स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या रचनेवर आधारित “यशोयुताम् वंदे” कार्यक्रम या लोकार्पण सोहळ्यादरम्यान पुणे येथील कलासक्त संस्थेच्या 25 नृत्यांगना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अज्ञात पैलूवर आणि मराठी, हिंदी, उर्दू भाषेतील निवडक रचनेवर आधारीत “यशोयुताम् वंदे” कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले.

००००



 

एम्पोरियमला भेट.

 विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची विविध राज्यांच्या एम्पोरियमला भेट.

            नवी दिल्ली, 12 : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्ग स्थित विविध राज्यांच्या एम्पोरियमला भेट दिली आणि राज्यांच्या हस्तकला व त्यांचे प्रदर्शन-विक्री विषयीही माहिती जाणून घेतली.

           श्री. झिरवाळ यांनी आज येथील कॅनॉट प्लेस भागातील बाबा खडकसिंह मार्गवरील स्टेट एम्पोरिया बिल्डींगमध्ये विविध राज्यांच्या कारागिरांच्या हस्तकलांचे दालन असणाऱ्या राज्यांच्या एम्पोरियमला भेट दिली. 

             श्री. झिरवाळ यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या मऱ्हाटी एम्पोरियमला भेट दिली. महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाच्यावतीने येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या राज्याच्या वैशिष्टयपूर्ण हस्तकलांची माहिती त्यांनी जाणून घेतली. यांनतर श्री झिरवाळ यांनी अनुक्रमे जम्मू-कश्मीर, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि खादी इंडिया एम्पोरियमला भेट देवून हस्तकला वस्तुंची माहिती जाणून घेतली. सरकारच्या ट्राईब्स इंडिया या एम्पोरियमला भेट देवून त्यांनी येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या विविध राज्यांतील आदिवासींच्या हस्तकलांची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.

            दरम्यान, श्री. झिरवाळ यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.

000000

Featured post

Lakshvedhi