Friday, 9 September 2022

ये जीवन है





 

इतिहास

 स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड मोबाईल ॲपचेयेत्या सोमवारी लोकार्पण.

            मुंबई, दि. 8 : स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड- 1 ते 13 या मोबाईल ॲपचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाटय मंदिर येथे येत्या सोमवार, दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी लोकार्पण होणार आहे.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासापासून मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ जसे असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या 13 खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे.

            लोकार्पण सोहळयादरम्यान स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या ‘अज्ञात पैलू’ तसेच मराठी, हिंदी, उर्दु भाषेतील निवडक रचनांवर आधारित ‘यशोयुताम् वंदे’ हा कार्यक्रम होणार असून पुणे येथील कलासक्त संस्थेच्या 25 नृत्यांगना त्यावर आधारित शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.

            या कार्यक्रमाद्वारे पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीद्वारे प्रायोगिक नाट्यगृहाचे उट्घाटन होणार आहे.

००००


 



सुशासन

 सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावीप्रशासनाचे व्हावे सुशासन...!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.

            मुंबई, दि. 8 : सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना हा आदर्श ठरेल अशी नियमावली तयार करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            सुशासन नियमावली तयार करण्याकरिता नियुक्त समितीची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या समितीचे अध्यक्ष निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव तथा समिती सदस्य जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

            शासनाच्या सेवा नागरिकांना अधिक सुलभ व पारदर्शी पद्धतीने मिळाव्यात तसेच शासन व नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी सुशासन नियमावलीमध्ये त्याचा अतर्भाव करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रशासनाचे सुशासन होण्यासाठी सुशासन नियमावली उपयुक्त होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            प्रशासन गतिमान करतानाच माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याची गरज आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शेतकऱ्यांसाठी जोडधंदा, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान यासाठी समितीने उपाययोजना सुचविताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            अतिवृष्टीमुळे कोल्हापूरसारख्या भागात पूर येतो, वातावरणीय बदलांमुळे अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते, यासाठी शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाते, मात्र अशा नैसर्गिक आपत्तींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी या समितीने त्याचा सुशासन नियमावलीमध्ये समावेश करावा, अशी सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी केली.

            आदिवासी भागात कुपोषणासारखी समस्या कायमच भेडसावत असते अशावेळी ज्या योजना आहेत त्यांच्या अंमलबजावणीतील त्रृटी शोधून त्यावर देखील समितीने उपाययोजना सुचवाव्यात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येत असून पायाभूत सुविधांच्या कामांची गुणवत्ता यासाठी संनियंत्रण करणारी यंत्रणा समितीने सुचवावी.

            फायलींचा जलदगतीने निपटारा याविषयावर देखील समितीने अभ्यास करतानाच दप्तरदिरंगाई कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नियमावलीमध्ये त्याचा समावेश करावा, असे सांगत लोकांचे काम वेळेवर झाले तरच त्याला सुशासन म्हणता येईल, नागरिकांना कामांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांची भटकंती थांबावी, क्षेत्रीयस्तरावरच त्यांच्या समस्यांचा निपटारा व्हावा, मंत्रालयापर्यंत त्यांना यायची गरज भासू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            विभागीय स्तरावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज अधिक गतिमान करण्याच्या सूचना यावेळी श्री. शिंदे यांनी दिल्या.

            शासनाविषयी लोकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी सुशासन नियमावली महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

            मुख्य सचिवांनी यावेळी प्रास्ताविक केले. यावेळी समिती अध्यक्ष श्री. सुरेश कुमार व सदस्यांनी समितीने केलेल्या कार्याबाबतची माहिती दिली.


००००



 



Thursday, 8 September 2022

भवताल

 देवराई, भूजल, प्लास्टिक आणि हडप्पा संस्कृती !

- ‘भवताल शॉर्ट कोर्सेस’ चे दुसरे सत्.

‘भवताल शॉर्ट कोर्सेस’... म्हणजे आपल्या भवतालातील महत्त्वाच्या गोष्टींची सूत्रबद्ध पद्धतीने ओळख करून देणारा उपक्रम. तोसुद्धा ऑनलाईन लाईव्ह सेशन्सद्वारे. त्याची सुरुवात जुलै-ऑगस्टमध्ये चार कोर्सेसने झाली. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आणि या कोर्सेसमधील सहभागींच्या सकारात्मक व भारावलेल्या प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे वेगळ्या चार विषयांचे दुसरे सत्र जाहीर करत आहोत.

· परंपरागत नैसर्गिक वारसा लाभलेल्या देवराई,

· खोल जाणारे व व्यवस्थापनाची गरज असणारे भूजल,

· उपयुक्त की समस्या याबाबत गोंधळ असणारे प्लास्टिक,

· भारतातील प्राचीन व तत्कालिक प्रगत हडप्पा सभ्यता

सर्वच विषयांचे मार्गदर्शक अर्थातच त्या-त्या विषयातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्ती आहेत. मर्यादित जागा असल्याने नावनोंदणी करण्यासाठी जास्त वेळ लावू नका.

नावनोंदणीसाठी लिंक=

https://bhavatal.com/ShortCourses2

किंवा

पोस्टरमध्ये दिलेला QR code

अधिक माहितीसाठी संपर्क=

9545350862 / bhavatal@gmail.com

.. 

१. भूजलाची ओळख व सद्यस्थिती (Introduction to Ground Water)

१९ ते २२ सप्टेंबर २०२२; सायं. ७ ते ८.३०

मार्गदर्शक- डॉ. शशांक देशपांडे.

२. हडप्पा संस्कृतीचा उदयास्त (Rise & fall of Harappan civilization)

२६ ते २९ सप्टेंबर २०२२; सायं. ७ ते ८.३०

मार्गदर्शक- डॉ. प्रबोध शिरवळकर..

३. देवराईंचे अद्भुत विश्व (Introduction to Sacred Groves)

३ ते ७ ऑक्टोबर २०२२; सायं. ७ ते ८.३०


मार्गदर्शक- डॉ. उमेश मुंडल्ये.

४. प्लास्टिक समजून घेताना (Introduction to Plastic & Polymers)

१० ते १३ ऑक्टोबर २०२२; सायं. ७ ते ८.३०

मार्गदर्शक- डॉ. जयंत गाडगीळ

Poster (small).jpg

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


छान छान शतायुषी फॅमिली,

 एकाच कुटुंबातील हे 12 भाऊ-बहीण 👆 असून सर्व जिवंत आहेत. ते सर्वात वयस्कर भावंड असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहेत. सर्वात मोठे वय ११३ वर्षे आहे तर सर्वात लहान ९० वर्षांचे आहे. किती छान फॅमिली गेट-टुगेदर!. .....


नाबाद शतक टीम seniors


 

इशारा

 हवामान विभागाने पावसाचा जोर वाढण्याचा दिला इशारा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा प्रशासनांना सावधगिरीच्या सूचना.

            मुंबई, दि. 8 : पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

            कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


०००

ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती.

            मुंबई, दि. 8 : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

            नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

            ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

००००


Featured post

Lakshvedhi