Thursday, 12 May 2022

 उस्ताद झाकीर हुसेन यांनी पदवी स्वीकारणे हा विद्यापीठाचा बहुमान

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

विद्यापीठाची पदवी वडिलांना समर्पण : उस्ताद झाकीर हुसेन

            मुंबई, दि. 12 :- जागतिक कीर्तीचे तबला कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांनी मुंबई विद्यापीठातर्फे दिलेल्या पदवीचा स्वीकार करणे हा विद्यापीठाचा मोठा सन्मान असून या पुरस्कारामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

            मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारंभात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

            संगीत क्षेत्रात व इतर विद्याशाखांमध्ये आपला शिष्य आपल्याही पुढे जावा असे गुरुजनांना वाटते, दुःखद प्रसंगी संगीत मनाला सांत्वन देते ही संगीताची शक्ती आहे. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा दिली असते. या प्रतिभेला शिस्त, एकनिष्ठपणा व परिश्रमातून फुलवता येते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय अध्ययनास चालना देण्यात येत असून यानंतर विद्यार्थ्यांना विज्ञानासह संगीत देखील शिकण्याची व्यवस्था असेल असे सांगून या धोरणाची अंमलबजावणी चांगली झाली तर विद्यापीठांमधून झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांच्याप्रमाणे प्रतिभावंत विद्यार्थी निर्माण होतील असे राज्यपालांनी सांगितले. पंतप्रधान मोदी 'मेक इन इंडिया'चे आवाहन करीत आहेत. मात्र गरवारे समूहाने 80 वर्षांपूर्वीच 'मेक इन इंडिया' ची सुरुवात केली होती असे राज्यपालांनी सांगितले. 

लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद : उदय सामंत

            ज्या झाकीर हुसेन यांचा तबला ऐकून आपण लहानाचे मोठे झालो त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसावयास मिळणे हा आपला बहुमान असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. लता मंगेशकर यांच्या जयंतीच्या दिवशी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय सुरु होईल, असे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. या महाविद्यालयासाठी शासनाने 100 कोटी रुपयांची तरतूद देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले. या महाविद्यालयातील अभ्यासक्रम ठरविण्यासाठी झाकीर हुसेन, शंकर महादेवन, उषा मंगेशकर यांनी मदत करावी असे त्यांनी सांगितले. राज्यातील शैक्षणिक क्षेत्र प्रगती पथावर नेण्यासाठी आपण राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाची पदवी हा कृपाप्रसाद : उस्ताद झाकीर हुसेन

            जगातील सर्वाधिक जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने दिलेली पदवी हा आपण थोरामोठ्यांचा कृपाप्रसाद आहे, असे समजतो व तो सन्मान आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखा यांना समर्पित करतो असे सत्काराला उत्तर देताना उस्ताद झाकीर हुसेन यांनी सांगितले.

            जीवनात गुरु होण्याचा प्रयत्न न करता उत्तम शिष्य होऊन रहा असा सल्ला आपल्याला वडिलांनी दिला होता व तो आपण पाळत आहोत असे सांगून आज अनेक उत्तमोत्तम संगीतकार असून आपण केवळ त्यापैकी एक असल्याचे विनम्र उद्गार झाकीर हुसेन यांनी यावेळी काढले.  

            मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडलेल्या विशेष दीक्षांत सोहळ्यात उद्योगपती शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही पदवी देण्यात आली तर रसायन शास्त्रातील योगदाबाबद्दल वैज्ञानिक डॉ मुकुंद चोरघडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशिकांत गरवारे उपस्थित राहू शकले नाही. त्यांची कन्या मोनिका गरवारे यांनी पदवीचा स्वीकार केला.


            कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन कार्य केल्यास तो व्यक्ती घडतो आणि दुसऱ्याही घडवतो. भारतीय संगीत आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे संगीत क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि अंगभूत गुणांमुळे स्वयंभू राजे बनले.

            विशेष दीक्षान्त समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

            कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, संगीत क्षेत्रातील शंकर महादेवन, कुलसचिव सुधीर पुराणिक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, पं. विभव नागेशकर, सत्यजित तळवलकर, राकेश चौरसिया, विजय घाटे तसेच विविध कलाकार व विद्यापीठाचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.

 वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत

पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार.

            राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व लाभार्थींची नावे दि. 30 डिसेंबर 2022 पर्यंत आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 

            या संदर्भात राज्याच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात या योजना लाभार्थींच्या आधार क्रमांकाशी जोडण्यात येतील असे नमूद करण्यात आले होते. पोषण आहार योजनेंतर्गत महिला व बालविकास, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय, आदिवासी आणि इतर बहुजन कल्याण विभागांनी पोषण आहाराशी संबंधित सर्व लाभार्थींची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सर्व संबंधित विभागाच्या सचिवांनी आपल्या शिक्षक तसेच विद्यार्थी, लाभार्थी यांचा डेटाबेस तयार करताना आधारशी संलग्न करून कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. ज्या विभागांमध्ये पोषण आहार व तत्सम बाबींचा धान्य पुरवठा होत असतो त्याकरीता वाहनांच्या जीपीएस ट्रॅकींग व्यवस्था दि. 30 डिसेंबर, 2022 पर्यंत कार्यान्वित करण्यात येणार आहे. दि. 1 जून 2022 पासून सर्व संबंधित विभागाच्या सचिवांनी आपापल्या विभागातील मास्टर डेटाबेस देखील अद्ययावत ठेवायचा आहे.

            शिष्यवृत्तीसाठी कोणताही पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये म्हणून उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, इतर मागास बहुजन कल्याण आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजना आधारशी लिंक करूनच दि. 2 जानेवारी 2023 पासून डीबीटी मार्फत विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यात यावी असेही ठरले.


-----०-----


डॉगी

 तुम्हाला काय वाटलं भू भू काय फक्त भारतातच दुचाकींच्या मागे लागतात असं वाटलं का? विश्वव्यापी समस्या आहे 😀🦮🐕🦮


 मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भातगृहमंत्र्यांनी घेतला आढावा

            मुंबई दि. 11 : मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरु आहे. संबंधित जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी आढावा घेऊन या संदर्भातील माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिले.

            मंत्रालयात गृहमंत्री यांच्या दालनात मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव गृह आनंद लिमये, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंत कुमार सरंगल, प्रधान सचिव संजय सक्सेना, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे यांच्यासह मराठा संघटनांचे प्रतिनिधी विनोद साबळे, संजीव भोर, तुषार जगताप, अंकुश कदम, राजेंद्र लाड उपस्थित होते.

            यावेळी गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. कोपर्डीसह अन्य प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेवून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

            मराठा संघटनांचे प्रतिनिधी आणि शासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी नेमलेल्या अधिकारी यांनी या सर्व प्रतिनिधींसोबत योग्य तो समन्वय ठेवावा यासाठी निर्देश दिले. तसेच प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. एसईबीसी आरक्षणातील मराठा उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा विषय तसेच आरक्षणाची सद्यस्थिती या विषयावर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

००००



 

संसारी


 

Wednesday, 11 May 2022

 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधीलरिक्तपदांसाठी 5 जूनला मतदान.

            मुंबई, दि. 11 : पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.

            नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखाडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू राहील. नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे 2022 या कालावधीत दाखल करता येतील. 22 मे 2022 रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे 2022 रोजी होईल. 5 जून 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 6 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वा. सुरू होईल.



 सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनाआरोग्याचे महत्त्वही समजावून सांगणार.

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

            मुंबई, दि. 11 : सुरक्षित शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार असून वाढते शहरीकरण आणि रहदारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितपणे जाता-येता यावे या उद्देशाने मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व देखील समजावून सांगितले जाणार असल्याचे ते म्हणाले.


            पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई महानगरपालिकेच्या शाळा परिसरात सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाचा उद्घाटन समारंभ झाला. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मनपाचे सहआयुक्त अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, मनपाच्या माजी शिक्षण सभापती संध्या दोशी, माजी शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे आदी यावेळी उपस्थित होते.


            श्री.ठाकरे म्हणाले, सुरक्षित शाळा उपक्रमांतर्गत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य, मौखिक आरोग्य, मधुमेह आदींची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. राज्य आणि देशाची प्रगती करणे आवश्यक असेल तर शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, याच उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सध्या आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जात असून एसएससी प्रमाणेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शिक्षण सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय बोर्डाची शिक्षण पद्धती देखील सुरू करण्यात येणार आहे. मागील वर्षी मनपाच्या शाळांमधील चार हजार जागांसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झाले होते, यावर्षी देखील केवळ 15 दिवसांत 35 हजार अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.


            काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती होत असे. आता हे चित्र बदलले असून केवळ ‘राईट टू एज्युकेशन’ नव्हे तर ‘राईट टू कॉलिटी अँड सेफ एज्युकेशन’वर भर दिला जात असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शाळेवर आणि शाळेतील शिक्षकांवर विश्वास असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच शाळेतील पायाभूत सोयी-सुविधा आणि अन्य उपक्रम राबविण्याला प्राधान्य दिले जात आहेत. मुंबई मनपाच्या शाळांमधून शिक्षण आणि अन्य उपक्रमांसाठी शिक्षकांबरोबरच सामाजिक संस्थांचाही मोठा सहभाग लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईत‍ टॅक्टिकल अर्बनिझम अंतर्गत रस्त्यांवरील सुरक्षिततेला महत्त्व दिले जात आहे, याचाही विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत लवकरच वाघोबा क्लब, ॲस्ट्रॉनॉमी क्लब सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न पुरविण्यासाठी अक्षय पात्र, अक्षय चैतन्य यांचा सहभाग घेतला जात असल्याचे ते म्हणाले. यापुढे सुरक्षित रूग्णालये तसेच सुरक्षित धार्मिक स्थळे हे उपक्रम राबवायचे असून ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम राज्यात सर्वत्र सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शाळांमधून जीवनाला आकार देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये आता सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाची भर पडत आहे. सर्वच महानगरपालिकांमधून शैक्षणिक बाबींसाठी निधी खर्च होतो, त्याअंतर्गत शैक्षणिक उपक्रमांसह क्रीडा, आरोग्य, रस्ते सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधा, तंत्रज्ञानाचा अंगिकार, दर्जेदार अन्नपुरवठा आदी माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षित शाळा प्रवेश हा स्तुत्य उपक्रम असून यापुढे राज्यात सर्व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल, असे त्यांनी सांगितले.

            

Featured post

Lakshvedhi