Tuesday, 22 February 2022

 राज्यात 27 फेब्रुवारीरोजी पल्स पोलिओ मोहीम

एक कोटी पंधरा लाख बालकांना डोस देणार
        मुंबई दि. 22 : राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले.
        यंदाच्या वर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
        पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
        बैठकीस आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, अवर सचिव मं.प. कुडतरकर, महिला बालकल्याण विभाग सहाय्यक आयुक्त नितीन मस्के, आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी सचिन खांडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. धीरेन कलवाडीया, डॉ. हेमंत बंगोलिया आदी उपस्थित होते.
        डॉ. रामास्वामी यांनी सांगितले की, बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. या दोन्ही लसीकरणाचे नियोजन करताना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावर परिणाम होऊ देऊ नका. पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमही मिशन मोडवरच राबविणे आवश्यक आहे.
        पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमेसाठी महसूल, पोलीस, सहकार, शिक्षण, महिला बालविकास आणि नगरविकास विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी यांना सहभागी करुन घ्यावे. याबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हास्तरावर प्रचार-प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
        डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेची केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. सहाय्यक संचालक डॉ. सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरण व्दारे दिली.
बैठकीस शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, पश्चिम रेल्वे, महिला बालकल्याण, ग्राम विकास विभाग, नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत
राज्यातील सर्व जिल्ह्यात २७ फेब्रुवारीला राबविणार
 एक कोटी पंधरा लाखाहून अधिक बालकांना डोस देण्याचे नियोजन
राज्यासाठी १.५४ कोटी डोस उपलब्ध
राज्यात ९२९५३ बूथ उभारणार
आरोग्य विभागाची २६१२६९ पथके घरोघरी भेट देणार
ट्रान्झिट पथकांची संख्या २९१२१
मोबाईल पथकांची संख्या १५१८२
आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, एएनएम यांचा सहभाग घेणार
मिशन इंद्रधनुष्य लसीकरण
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लसीकरण केले जाणार
सात मार्च, चार एप्रिल आणि नऊ मे पासून सलग सात दिवस मोहिम राबविण्यात येणार.
नऊ जिल्हे आणि दहा महापालिका कार्य क्षेत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार
गर्भवती आणि दोन वर्षांखालील मुलांना लस देणार
****
वृत्त क्र

Holo re Holi

 


 राष्ट्रीय लोकअदालत 12 मार्च रोजी

·       राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
 
            मुंबई, दि. 22 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत दि. 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.
0000

 मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करावे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला सन्मानाने बोलवावे


– आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

          मुंबई शहरातील अंधेरी पूर्व व दहिसर पूर्व तसेच अंधेरी पश्चिम व दहिसर पश्चिम या दोन्ही मेट्रो मार्गीकांचे उद्घाटन पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते करावे अशी मागणी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

          मुंबई शहराच्या एकात्मिक मेट्रो वाहिन्यांच्या प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर मुंबई शहरातील मेट्रो प्रकल्प चालू करण्यामध्ये माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनाही प्रमुख अतिथी म्हणून सन्मानाने बोलवावे अशी मागणी ही आ. भातखळकर यांनी केली आहे. तसेच श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालेले अनेक मोठे प्रकल्प ज्यांची उद्घाटने गेल्या दोन वर्षात झाली, त्यावेळेस श्री. देवेंद्र फडणवीस यांना न बोलावून ठाकरे सरकारने आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले असल्याची टीका ही आ. भातखळकर यांनी केली आहे.

          मेट्रो मार्गीकांचे उद्घाटन पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करून आणि माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला सन्मानाने बोलावून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवावा असे ही आ. भातखळकर शेवटी म्हणाले.


*रायगडकरांची स्वप्नपूर्ती…!*

*अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा होणार संपन्न*

     *अलिबाग,दि.21(जिमाका):-* अलिबाग तालुक्यातील मौजे उसर येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते, खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि.22 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न होणार आहे. अखेर रायगडकरांची स्वप्नपूर्ती झाली.

     हा भूमीपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता जगन पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

     तर खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण आयुक्त विरेंद्र सिंग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये महाराष्ट्र राज्य सचिव सौरभ विजय हे या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

     रायगड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रायगडकरांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे.

     जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम यंत्रसामुग्री व पद निर्मितीस शासनाने मान्यता प्रदान केली असून अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी तब्बल 406 कोटी 96 लाख 68 हजार 336 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

     महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या दि.31 जानेवारी 2012 च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.

     त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील सर्व्हे नं. 75/1अ क्षेत्र 17-10-14 हेक्टर आर. मधील अनुक्रमे 6-00-00 हेक्टर आर व 3-50-00 हेक्टर आर या सरकारी गुरचरण ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांच्या नावे असलेल्या जमिनी पुनर्ग्रहित करून संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता प्रदान करण्यात आल्या. तसेच मौजे ऊसर येथील सर्व्हे नं. 75 / 1क, क्षेत्र 07-50-40 हेक्टर आर. मधील 4-00-44 हेक्टर आर. या महाराष्ट्र शासन, औद्योगिक विकास महामंडळाच्या नावे असलेल्या जमिनी शासनजमा करून संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आल्या आहेत.

     आतापर्यंत अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या रु.61.68 कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे.

     या नियोजित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अटही शिथील करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

     तरी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र कुरा यांनी केले आहे.


00000

 पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे

· मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन

            मुंबई, दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त "माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य’ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी 15 मार्च, 2022 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

            भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय मतदारजागृती स्पर्धेत ( National Voters Awareness Contest), जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन श्रीमती निधी चौधरी, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी केले आहे.   

            स्वीप कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित करुन भारत निवडणूक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करीत आहे. यामध्ये सर्व वयोगटांना सहभागी होता येणार आहे. सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व विषद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकुरांचा गौरव करणे, असा यामागील उद्देश आहे

            "माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य" या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत 5 प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. यामध्ये प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, गीत गायन, व्हिडिओ मेकिंग, आणि भित्तीचित्र स्पर्धा यांचा समावेश आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे निवडणूकीबाबतची जागरुकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्पर्धकांनी तपशिलवार मार्गदर्शन तत्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलासह voter-contest@eci.gov.in येथे ई-मेल करावी. ई-मेल करतांना स्पर्धेचे नांव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशिलासह voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर पाठविण्यांत याव्यात असे मा. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने कळविण्यांत आले आहे. 

0000


 



 

 नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा

                                                        - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

• मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाबार्डचा २०२२-२३ वर्षासाठीचा स्टेट फोकस पेपर प्रकाशित

• नाबार्डचा येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी ६ लाख १३ हजार ५०३ कोटी रुपयांचा संभाव्य पतपुरवठा आराखडा (कर्ज योजना)

        मुंबई दिनांक २१: नाबार्डने राज्य फोकस पेपर एक वर्षासाठी तयार न करता तो किमान तीन ते पाच वर्षासाठी करावा, जेणेकरून पहिल्या वर्षी अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन उर्वरित दोन वर्षात ही कामे पूर्णत्वाला जाऊ शकतील अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

        मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे नाबार्डचा २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठीचा स्टेट फोकस पेपर प्रकाशित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

नाबार्डच्या फोकस पेपरमध्ये

        नाबार्डने राज्यासाठी येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी ६ लाख १३ हजार ५०३ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा (कर्ज योजना) निश्चित केला आहे. तो सध्याच्या ऋण योजनेच्या ३ टक्के अधिक आहे. या योजनेत कृषी क्षेत्रासाठी १ लाख ४३ हजार ०१९ कोटी रुपये (एकूण योजनेच्या २३.३ टक्के) ठेवण्यात आले आहेत. लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांसाठी ३ लाख, ४८ हजार, ३७२ कोटी रुपयांचा निधी (एकूण योजनेच्या ५६.८ टक्के) ठेवण्यात आला आहे. तर इतर प्राधान्यक्रम क्षेत्रासाठी (शिक्षण, गृहनिर्माण, अक्षय उर्जा, बचतगटांचा वित्तपुरवठा इ.) १ लाख २२ हजार ११२ कोटी रुपयांचा निधी ( एकूण योजनेच्या १९.९ टक्के) निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

        यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, विकासासाठी भांडवल, तंत्रज्ञान, कच्चा माल आणि मानव संसाधन या चार गोष्टी महत्वाच्या असतात. आपल्याकडे तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि कच्च्या मालाची कमी नाही. परंतु भांडवल हा त्यातला सर्वात महत्वाचा विषय असतो. नाबार्डने राज्याच्या विकास संधी आणि गरजा लक्षात घेऊन हा फोकस पेपर तयार केला असावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्य शासन व नाबार्डच्या बैठका व्हाव्यात

        नाबार्डसमवेत राज्य शासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या किमान तीन महिन्यांनी बैठका व्हाव्यात जेणेकरून फोकस पेपरमध्ये जी उद्दिष्ट्ये दिली आहेत त्याची पूर्तता होते किंवा नाही याची स्पष्टता होईल तसेच अंमलबजावणीतील उणिवा लक्षात येऊन उद्दिष्टपूर्तीला गती देता येईल.

राज्य विकासाचा रस्ता मिळून तयार करू

        राज्य शासन आणि नाबार्डचा राज्य विकासाचा आणि राज्य हिताचा उद्देश समसमान असल्याने आपण हातात हात घालून काम करूया असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षात कोरोना संकटामुळे कामांची गती मंदावली होती परंतु आता ही बंधने सैल होत असल्याने विकासकामांसाठी याचवेळी अधिक वित्त पुरवठ्याची राज्याला गरज असल्याचे सांगितले.


मंजूर कामे शेल्फवर ठेवावीत

        राज्य शासनाच्या विविध विभागांनीही ग्रामीण पायाभूत विकास निधी, दीर्घकालीन जलसंपदा प्रकल्प विकास निधी, सुक्ष्म सिंचन निधी आणि मत्स्य व्यवसाय या चार विभागातील कामांची यादी तयार करून त्यास प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी घेऊन ही कामे शेल्फवर तयार ठेवावीत त्यामुळे नाबार्डकडून अधिकाधि‍क निधी मिळवता येऊ शकेल हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तशा सूचनाही त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या.

        कोकणात पावसाळा सुरु होताच चक्रीवादळाचा धोका संभवतो. तिथे वारंवार पूर आणि अतिवृष्टीच्या संकटालाही सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता राज्यशासन याठिकाणी विशेष उपाययोजना राबवित आहे. यामध्ये भूमीगत विद्युत तारा टाकण्यात येणार आहेत. यामध्ये कशाप्रकारे योगदान देता येईल याची नाबार्डने स्पष्टता करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी धोरण निश्चित करावे

        विकेल तेच पिकेल या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा प्रयत्न राज्यशासन करत आहे. यामध्ये शेतमालाचे मूल्यवर्धन करतांना शेतकरी ते ग्राहक यांचा थेट समन्वय विकसित केला जात आहे. या कामाला गती देण्यासाठी नाबार्डने शेतकऱ्यांना थेट लाभ कसा देता येईल याचा अभ्यास करावा तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणती पाऊले उचलली पाहिजे यासंदर्भात राज्य शासनासमवेत चर्चा करून निश्चित धोरण आखावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

सुलभ वित्तपुरवठा व्हावा

        अन्नदात्याला सुखी करण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कशाप्रकारे अधिक सुलभ आणि गरजेएवढा पतपुरवठा होईल याकडे नाबार्डने आणि बँकांनी लक्ष द्यावे, त्यासाठी बँकर्स आणि शेतकरी यांच्यात गावपातळीवर समन्वय वाढवला जावा असेही ते म्हणाले.

        सर्व शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचे रक्षण करतांना उद्योग व पर्यटन व्यवसायाला गती देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अशा पद्धतीने नाबार्ड काय योगदान देऊ शकेल यासंबंधी त्यांनी धोरण निश्चित करावे असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी नाबार्डने पेंच व्याघ्र प्रकल्पात केलेल्या सुक्ष्म सिंचन कामाचे कौतुक केले. अशाच पद्धतीने नाबार्डने राज्याच्या इतर वनक्षेत्रातही कामे करावीत असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकऱ्यांना सन्मानजनक पद्धतीने कर्जपुरवठा करावा - कृषीमंत्री दादाजी भुसे

        महाराष्ट्राने विकेल ते पिकेल अंतर्गत पिक पद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, राज्य शासन कृषी विकासाच्या अनेक योजना राबवित आहे. यामध्ये शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना करण्यात आली असून या एका छताखाली शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयांतर्गत येणाऱ्या योजनांचा नाबार्डने त्यांच्या पतपुरवठा धोरणात समावेश करावा असेही ते म्हणाले. त्यांनी जीआय मानांकनामध्ये महाराष्ट्र देशात पहिला असल्याचे सांगतांना शेतकऱ्यांना सन्मानजनक पद्धतीने कर्ज पुरवठा होईल याकडे नाबार्डने लक्ष द्यावे. त्यांनी कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना पुर्नकर्जपुरवठा होत नसल्याकडे नाबार्डचे लक्ष वेधले. पिक कर्ज पुरवठ्यातील कमी, महिला बचतगटांना कमी होणारा वित्त पुरवठा वाढवावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली तसेच सुक्ष्म सिंचन फंडांतर्गत ५८१ कोटी रुपयांचे प्रस्ताव या योजनेला मुदतवाढ नसल्याने खोळंबले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांनी कृषी पतपुरवठा वाढवावा – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

        कोरोना लाटेतही राज्यात अनेक विकासकामे सुरु असल्याचे सांगतांना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कृषी पतपुरवठ्यामध्ये ग्रामीण तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा सहकारी बँका अधिक चांगली उद्दिष्टपूर्ती करतात ही बाब नजरेस आणून दिली. नाबार्ड आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीने यावर वेळोवेळी नियंत्रण ठेऊन आढावा घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचा पिक कर्जाचा लक्षांक पूर्ण करावा, कर्जमाफीनंतर कर्ज मिळण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळावे, बँक शाखांमधून ग्रामीण भागात भौतिक व आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण होतात का याचा आढावा घेतला जावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

        बैठकीत मुख्य सचिव देबाशिष चक्रवती यांनी नाबार्डकडून राज्याला असलेल्या अपेक्षांची माहिती दिली. यावेळी नाबार्डकडून राज्याच्या वित्त पुरवठ्यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले.

        बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह (दूरदृष्यप्रणालीद्वारे), प्रधान सचिव विकास खारगे, राज्य शासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नाबार्डचे सीजीएम जी.एस. रावत, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए.एस राजीव, रिझर्व्ह बँकेचे विभागीय संचालक अजय मिच्यारी आणि नाबार्ड तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. रावत,श्री. राजीव तसेच श्री. मिच्यारी यांनी राज्य पतपुरवठ्यातील त्यांच्या कामाची माहिती दिली. यावेळी श्री. रावत यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दीर्घाकालीन नियोजन करण्यास अनुकूलता दर्शवली. शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्जाचा पुरवठा होईल हेही नाबार्ड सुनिश्चित करील असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. 

Featured post

Lakshvedhi