Monday, 14 February 2022

 वैद्यकीय उपकरणे यांची नोंदणी लवकरात लवकर करण्याचे

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

            मुंबई, दि. 14 : सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांनी त्यांच्याद्वारे उत्पादित वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. तरी राज्यातील ज्या वैद्यकीय उपकरणे उत्पादक यांनी ही नोंदणी केलेली नाही त्यांनी ही नोंदणी लवकरात लवकर विहित मुदतीत पूर्ण करावी. ज्यांची नोंदणी विहित मुदतीत केली जाणार नाही त्यांच्या विरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.


            सन २०१७ पूर्वी अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांच्यावर औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम अंतर्गत नियंत्रण केले जात होते. मात्र अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांची यादी अत्यल्प होती. सन २०१७ मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम २०१७ पारित केले आहेत. या नियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या बऱ्याच वेगवेगळ्या उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केलेला असून वैद्यकीय उपकरणांचे “अ”, “ब”, “क” व “ड” अशी वर्गवारी केली आहे. “अ” व “ब” या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्याचे नियंत्रण आहे आणि “क” व “ड” या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.


            वैद्यकीय उपकरणांची व्याप्ती व उपलब्धता विचारात घेता केंद्र शासनाच्या दि.११.०२.२०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे जे उत्पादक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करतात त्यांनी त्यांच्या वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाने तयार केलेल्या “सुगम पोर्टल” (www.cdscomdonline.gov.in) या संगणक प्रणालीवर ऐच्छिक नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ही नोंदणी १८ महिन्याच्या आत म्हणजे ३०.०९.२०२१ पर्यंत करणे अपेक्षित होते. त्यानंतर १ वर्षासाठी म्हणजे दि.३०.०९.२०२२ पर्यंत सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांनी त्यांच्याद्वारे उत्पादित वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य (Mandatory) केलेले आहे. तरी राज्यातील ज्या वैद्यकीय उपकरणे उत्पादक यांनी ही नोंदणी केलेली नाही त्यांनी ही नोंदणी लवकरात लवकर विहित मुदतीत पूर्ण करावी. ज्यांची नोंदणी विहित मुदतीत केली जाणार नाही त्यांच्या विरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

००००


 

 कोरोना संकटात सिरम इन्स्टिट्यूटने केलेल्या कामगिरीचा

देशाला सार्थ अभिमान

- उद्योग मंत्री सुभाष देसाई

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली सिरम इन्स्टिट्यूटला भेट

             पुणे, दि. 14 :- सायरस पुनावाला यांच्या जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर सिरम इन्स्टिट्यूट ही संस्था उभी असून संस्थेने कोरोना संकटात केलेल्या कामगिरीचा महाराष्ट्रासोबतच देशाला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

            उद्योग मंत्री देसाई यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देवून येथील लस उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, संजय देशमुख, इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश देशपांडे, कार्यकारी संचालक उत्पादन उमेश शालीग्राम, उपसंचालक उमेश शिरसावकर आदी उपस्थित होते.

            उद्योग मंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत सायरस पुनवाला यांच्याशी संपर्क करीत होते. कोविड लसीमुळे आपल्याला सुरक्षितता वाटत असून नागरिक आत्मविश्वासने घराबाहेर पडताना दिसत आहेत. कोरोना संकटातून बाहेर काढण्यात सिरम इन्स्टिट्यूटचे योगदान महत्वपूर्ण आहे. संस्थेने यापुढेही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन लस निर्मितीचे कार्य सुरुच ठेवावे, असेही ते म्हणाले.

            यावेळी उमेश शालीग्राम यांनी येथील कामकाजाची माहिती दिली.

0000


 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'सी4आय4' लॅबचे

राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

           पुणे, दि. 14 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या 'सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०' (सी4आय4 लॅब) येथील 'एसएमई प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड अनँलिटीक्स लॅब'चे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले.

            यावेळी, किर्लोस्कर उद्योग समूहाचे उद्योगपती राहुल किर्लोस्कर, कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, लॅबचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी उपस्थित होते.

            केंद्र शासनाच्या 'समर्थ' उद्योग कार्यक्रमांतर्गत इंडस्ट्री.4 ला गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 5 केंद्रामध्ये 'सी4आय4' लॅबचा समावेश आहे. ही लॅब उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अनुभव केंद्र म्हणून खुले होत आहे. उद्योगांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी या लॅबमध्ये विश्लेषण आणि उत्पादन विकासच्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधने ठेवण्यात आली आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

 सर्वांच्या आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्यासाठी ग्रामसमृद्धी

            समाज प्रबोधक श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे कार्य सर्वदूर आहे. जीवनविद्या मिशन ही सामाजिक व शैक्षणिक संस्था मागील 65 वर्षापासून समाजातील सर्व स्तरातील कार्यघटकांवर काम करते. अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, भेदभाव नष्ट करणे, स्त्री-सन्मान, शालेय विद्यार्थी व तरुण युवा यांच्याकरिता बाल व युवा संस्कार अभियाने, कार्यशाळा असे विविध प्रकारचे कार्य करून हे जग सुखी व्हावे व राष्ट्र पुढे जावे यासाठी कार्यरत आहे.

            याच कार्याबरोबर जीवनविद्या मिशन ही शासनासोबत ग्राहक संरक्षण, अवयव दान, विविध व्यसनांच्या दुष्परिणाबाबत जागृतीसह गावांचा सर्वांगिण विकास करणे व सर्वच बाबतीत दत्तक घेतलेली गावे आदर्श गाव बनविणे या उद्देशाने ग्रामसमृद्धी अभियान तसेच शेतकरी आत्महत्या थांबविणे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून मानसिक सबलीकरण असे अनेकविध अभियाने संयुक्त विद्यमाने राबवित आहे. त्याचबरोबर विविध कार्पोरेट व सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्येही अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी Enjoy Your Work, Stress Management या विषयाबाबतच्या कार्यशाळा आयोजित करून जीवनविद्या मिशन कार्य करीत आहे.

            भारत देशाचा केंद्रबिंदू असलेल्या खेड्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी जीवनविद्या मिशनने 60 गावे दत्तक घेतली असून त्यापैकी 20 गावांमध्ये जीवनविद्या मिशनने कार्य सुरु केले आहे. त्यातील 4-5 गावांमध्ये अतिशय परिणामकारक बदल दिसून आले. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेवून त्या गावाचा सर्वांगीण विकास करणे व ते गाव सर्वच बाबतीत आदर्श गाव बनविणे याकरिता ग्रामसमृद्धी अभियान राबविणेबाबतचा प्रस्ताव जीवनविद्या मिशनने शासनास सादर केला आणि जीवनविद्या मिशनने केलेल्या कामांची दखल घेत त्यास मान्यता दिली.

            याअन्वये आता प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी व समृद्ध करून प्रत्येक गाव सक्षम करत गावातील भौतिक विकासासाठी सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी संस्था, उद्योग समूहाचे आर्थिक सहकार्य मिळवून, गावातील भौतिक विकास कामे करण्याकरिता जीवनविद्या मिशन या संस्थेचे प्रशिक्षित कार्यकर्ते हे कार्य करणार आहेत. 

 शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्य उपस्थितीसाठी मान्यता

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

            मुंबई, दि. 14 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

            येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

००००

 


 


Featured post

Lakshvedhi